आपल्या आलिशान तंबूत आरामात ‘सात्विक’ नाश्ता केल्यानंतर, पंकज बख्शी त्यांच्या कुटुंबासोबत प्रयागराज येथील महाकुंभमध्ये व्हीआयपी संगम येथे जाण्यासाठी खासगी नावेत बसून निघाले. गर्दीच्या घाटांपासून दूर, नवीन व्हीआयपी संगम… गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या संगमाकडे, नदीच्या अगदी मधोमध. दुबईतून आलेल्या बख्शी कुटुंबाने तिथे आरामात आपले ‘पाप’ धुवून काढले.
श्रीमंतांच्या या महाकुंभात तुमचे स्वागत आहे….
इथे ना भक्तांची गर्दी आहे ना लाठीमार करणारे पोलिस. 5 ते 10 हजारात त्यांच्या टूर ऑपरेटरने बख्शींसाठी ही खास व्यवस्था केली होती, जो त्यांचा पहिलाच कुंभ होता. आर्थिक सल्लागार असणारे बख्शी सांगतात, “गर्दीची आम्हाला चिंता होती. कुंभच्या गर्दीचे रिल्स आम्ही पाहिले होते. पण आम्ही त्यात नव्हतो. आमच्या मनातही विचार आला नव्हता की आम्हाला इतक्या चांगल्या सुविधा मिळतील म्हणून.”

आजवर कुंभ म्हणजे धार्मिक आणि गरीब लोकांसाठी एकत्रित येण्याची पवित्र जागा होती. पण आता काहींना तिथे वेगळी जागा मिळत आहे. उत्तर प्रदेश शासनाने अनिवासी भारतीय तसेच श्रीमंत भारतीयांसाठी ही खास व्यवस्था केली आहे. 29 जानेवारीला चेंगराचेंगरीत 30 लोक मारले गेल्यानंतरही या सुविधा सुरूच आहेत. भाजपचे राजनाथ सिंह, अमित शाह, योगी आदित्यनाथ, हेमा मालिनी इत्यादींनी इथेच गंगास्नानाचा आनंद घेतला, अगदी एकट्याने.
पण चेंगराचेंगरी झाल्यानंतर या व्हीआयपी वागणूकीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यानंतर शासनाने सर्व व्हीआयपी पासेस रद्द केले. असं पहिल्यांदाच घडलेलं नाही. 1954 च्या कुंभात 800 हून जास्त लोक मारले गेले होते तेव्हा न्यायमूर्ति कमल कांत वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील तपासनी समितीने व्हीआयपी संस्कृति नष्ट करण्याची शिफारस केली होती.
स्पा, बाथटब, हेलिकॉप्टर अन् आलिशान तंबू…
हा कुंभ काही औरच आहे. आलिशान तंबू, पंचतारांकीत सुविधा, प्रशस्त रस्ते, झाडांनी सजलेले नदी काठ, हेलिकॉप्टरची सवारी, बाथटब, उंची खाणे-पिणे यांनी ही व्हीआयपी नगरी सज्ज आहे. यात भारतीयच नाही तर विदेशी लोकही आहेत. फक्त पैसा हवा. जेनिथ हॉस्पिटॅलिटीचे प्रमुख मनोज मिश्रा, ज्यांना भारत पर्यटन विकास निगमने तंबू लावण्याचा ठेका दिला आहे, सांगतात, “लोकांना असं वाटतं की कुंभ म्हणजे गर्दी, अव्यवस्था आणि गरीब व मध्यमवर्गीयांचाच असतो. आम्ही ही धारणा तोडण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे सर्व 80 तंबू विकले गेले आहेत.”

बख्शी सांगतात की, चांगल्या सुविधा नसल्यामुळेच आमच्यासारखे लोक इथे यायचे टाळत होते. तंबू लावण्यासाठी मिश्रांकडे फक्त तीन महिने होते. तंबूत सर्व श्रीमंती सुविधा होत्या. बनारसची लौंगलता, पूर्वांचलची लिट्टी-चोखा, मलाईदार मिठाया ताज्या ताज्या तयार केल्या जात होत्या.
शंभराहून अधिक लोक यांच्या सेवेत होते. मुंबईतील आर्थिक सल्लागार संदीप गुप्ता सांगतात की, त्यांनी पहिल्यांदाच लौंगलताची चव घेतली होती. २६ जानेवारीला त्यांना तिरंगा पुलाव वाढण्यात आला होता. लोकांनी मोठ्या संख्येने या शाही तंबूंसाठी अर्ज भरले. त्यामुळे बुकींग लवकरच बंद करावी लागली.
26 फेब्रुवारीला कुंभ समाप्ती आहे आणि लोकांना अजून तंबू हवे आहेत. आयटीडीसीने 15 तंबू वाढवले आहेत. ते गंगेच्या काठावरच आहेत. यात योगा, ध्यान, स्पा अशा सुविधाही आहेत. मिश्रा म्हणतात की, आमच्या क्षेत्रासाठी आता धार्मिक पर्यटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यात संधी आहेत.
मनीष कुमार यांनी 2021 मध्ये वाराणसी येथे गंगा रिट्रीट नावाचे तंबू शहर स्थापन केले होते ज्यात त्यांना याची अर्थमहत्ता समजली होती. ते सांगतात, “काशी विश्वनाथ मंदिर कॉरीडॉर झाल्यानंतर लोक इथं येऊ लागले. त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था नव्हती म्हणून आम्ही टेंट रिसॉर्टचा विचार केला. हाय मिडल-क्लास लोक, जे रात्रीत लाखभर रुपये खर्च करू शकतात त्यांच्यासाठीच या सुविधा आहेत.”
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर कुमार यांनी सरयूच्या काठावर भक्तांसाठी आलिशान कोठ्या उभारल्या. कुंभसाठी त्यांनी ३६ कोठ्या उभारल्या आहेत. याचं भाडं दिवसाला आहे २० हजार रुपये. यात जेवण, प्रायव्हेट पार्किंग, संगमयात्रा, आखाडायात्रा यांचा समावेश आहे. श्रीमंत भक्त इथे आरामात गावाचा आनंद घेऊ शकतात, लिंबूसरबत पित संगमावर सूर्यास्त पाहू शकतात.

उत्तर प्रदेश शासनासाठी आता अन्य ठिकाणी अशाच योजना राबवण्यासाठी हा एक पथदर्शक प्रकल्प समजला जातो. एक सरकारी अधिकारी सांगतो, “एक पूर्ण अर्थव्यवस्था नव्या पद्धतीने जन्माला येत आहे. महाकुंभच्या हॉस्पिटॅलिटी एरियातूनच 2500 कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. आम्हाला गरीब-श्रीमंत सर्वांना एकाच छताखाली आणायचं आहे पण व्हिआयपी लोकांसाठी वेगळी व्यवस्था आहे.”
गुप्तांसाठी महाकुंभ हा आध्यात्मिक पैलू तपासण्याची संधी होती. ते एक दिवस व एक रात्रच इथे होते व त्यासाठी त्यांनी आयटीडीसी प्रिमीयम तंबू बुक केला 50 हजार रुपयांत फक्त. गुप्ता सांगतात की या आलिशान जागेत आराम, सोयी आणि आध्यात्मिक समृद्धी हा वेगळाच अनुभव होता. तंबूत हीटर होता, वाय-फाय सुविधा होती. राजेशाही दिमाखात तंबूवासी राहू शकत होते.
तंबूंना गावाचा चेहरा देण्यासाठी मिश्रा यांनी उत्तर प्रदेशच्या एका गावापासून प्रेरणा घेतली होती. आयटीडीसी सांगते की त्यांनी मध्य भारताचा ग्रामीण चेहरा आपल्या तंबूंना दिला आहे. हे, महाकुंभ ग्रामः पवित्र आरामासाठी आदर्श तीर्थस्थळ असल्याची जाहिरात त्यांनी केली आहे. लोकांना निसर्गाचा फिल देण्यासाठी हजारो झाडं लावण्यात आली आहेत.

फाईव्ह स्टार अध्यात्म…
मिश्रा सांगतात, “आम्ही आमच्या पाहुण्यांसाठी पूर्ण दिवसाची योजना बनवतो ज्यामुळे त्यांचा वेळ जराही वाया जाऊ नये. सकाळी योग आणि ध्यान कार्यक्रम, मग आध्यात्मिक चर्चा, नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक मंच, संध्याकाळी गंगा आरती आणि कुंभ मेळ्यातील फेरफटका ज्यात आखाड्यातील संतांची भेट असते.” तंबू शहर एक चौरस किमी परिसरात वसलेली आहे. यातील डोम सिटी हा सर्वांत सुंदर भाग आहे. यात 176 सुसज्ज कोठ्या आहेत.
ज्यात सात्विक भोजन वाढलं जातं. अधिकृत महाकुंभ एक्स अकाऊंटवर लिहीलंयः दिव्य संगमाच्या वातावरणात एक शानदार अनुभव. डोम सिटीतील तंबू बुलेटप्रुफ व फायरप्रुफ आहेत. एका रात्रीसाठी इथे 1 लाख रुपये मोजावे लागतात. तरीही सारे तंबू विकले गेले आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतरही इथली बुकींग कमी झाली नाही.
अमेरिकन लघुपट निर्माता मेगन आणि त्यांची मुलगी कुंभसाठी आले आहेत. गर्दीत त्या सावधपणे वावरत होत्या पण तंबूतील त्यांचा निवास सुखद होता. मेगन सांगते की, गर्दीची आम्हाला माहिती होती त्यामुळे आम्ही आयटीडीसीच्या तंबूत राहण्याचा निर्णय घेतला. हा एक दिव्य अनुभव होता. गंगेच्या दुसऱ्या काठावर या व्हिआयपी लोकांसाठी जागा होती. जिथे गर्दी अजिबात नसते. इथले श्रीमंत भक्त लिंबू सरबत पितात, तुपातील अन्न जेवतात आणि लौंगलताचा आनंद लुटतात. याच्या दुसऱ्या काठावर लाखो गरीब भक्त धक्काबुक्की करत स्नान करतात, सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी रांगेत उभे राहतात आणि रस्त्यावरच्या ठेल्यांवरील चणे, भेळ, शेंगदाणे खात आपला कुंभ साजरा करतात.

डोम सिटीविषयी या गरीब भक्तांनाही उत्सुकता असल्यामुळे वेळात वेळ काढून ते इथे चक्कर मारून येतात. कारण यातला एक भाग मुद्दाम सर्वांसाठी उघडा आहे ज्यामुळे लोकांना समजावं की व्हिआयपी लोकांसाठी कोणत्या सुविधा केलेल्या आहेत. एका धर्मशाळेत राहणारे मुकेश सिंह हे सारं बघून चकीत झाले होते. इथं प्रचंड मोकळी जागा होती आणि गर्दी अजिबात नव्हती. ते म्हणतात, “हा काही कुंभ नाही. इतकी मोकळी जागा आणि सुनसान रस्ते. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील अंतर आता धर्मातही आलं आहे.”






