भारतात एकीकडे अब्जाधीशांची संख्या वाढते आहे, तर दुसरीकडे तेवढ्याच वेगाने गरिबांची संख्याही वाढते आहे. देशातील एक टक्का गर्भश्रीमंतांना संपत्तीमुळे अजीर्ण होत असताना दुसरीकडे 74 टक्के लोकांना पुरेसे दोन वेळचे अन्न आणि न्याहारी मिळत नाही. केंद्र सरकार ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची बढाई मारते आणि त्याच वेळी 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढल्याचा दावा करते, ही परस्परविरोधी बाब आहे.
एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान पगार आता 38 हजार तर जास्तीत जास्त पगार दरमहा साडेचार लाख रुपये होणार असताना दुसरीकडे असंघटित क्षेत्रातील बहुतांश कामगारांना वीस हजार रुपयांच्या आत पगार असल्याचे विदारक चित्र गेल्या आठवड्यात पुढे आले.
वाढती महागाई, शिक्षण, वैद्यकीय खर्चात होणारी वाढ लक्षात घेता सध्या असलेला पगार पुरेसा नाही, हे वास्तव असताना त्याकडे मात्र नियोजनकर्त्यांचे लक्ष नाही. भारत महासत्ता झाला, तरी त्यामुळे मध्यमवर्गाच्या खाली असलेल्या घटकाच्या राहणीमानात आणि जीवनमानात काही फारसा फरक पडत नाही. शिक्षण हा मूलभूत अधिकार असला, तरी खरेच प्रत्येकाला मनाप्रमाणे शिक्षण घेता येते का, हा प्रश्नच आहे.
भारताची दोन चित्रे आहेत. एका बाजूला गरीब आणि मध्यमवर्गीय लोक आहेत. दुसऱ्या बाजूला श्रीमंत आणि अब्जाधीश लोक आहेत. देशात ज्या गतीने श्रीमंत आणि त्यांची संपत्ती वाढत आहे, त्या गतीने सामान्य माणसाची संपत्ती वाढत नाही.

इंडिया रिच लिस्टचा अहवाल काय सांगतो?
‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’मध्ये पहिल्यांदाच 1500 हून अधिक श्रीमंतांचा समावेश करण्यात आला आहे. ही संख्या 7 वर्षांपूर्वीच्या तुलनेत दीडशे टक्के जास्त आहे. भारतातील अब्जाधीशांची संख्याही 300 च्या वर पोहोचली आहे. 13 वर्षांत अब्जाधीशांची संख्या सहापट वाढली आहे. 2024 च्या ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’मध्ये गौतम अदानी पहिल्या स्थानावर आहेत.
95 टक्क्यांच्या वाढीसह गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 11.6 लाख कोटी रुपये झाली आहे. अहवालानुसार, 1539 लोकांची संपत्ती 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यामध्ये 272 नवीन लोकांचा समावेश आहे. यानुसार गेल्या वर्षी देशात दर पाचव्या दिवशी एक नवा अब्जाधीश निर्माण झाला. गरिबांची संख्या कमी होण्याचा वेग कमी आहे. भारतात श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढली आहे; परंतु गरिबांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ‘डेटा थिंक प्राईस’ अहवालात असे दिसून आले आहे, की गेल्या सात वर्षांत भारतातील श्रीमंतांची संख्या पाचशे टक्क्यांनी वाढली आहे, तर गरीबांची संख्या केवळ 58 टक्क्यांनी कमी झाली आहे.
उच्च उत्पन्न गटाची लोकसंख्या 2016 मध्ये 10.1 टक्क्यांवरून 2023 मध्ये 14.7 टक्क्यांपर्यंत वाढली. कोविड नंतर, 64.9 कोटींच्या तुलनेत 2020-21 मध्ये कनिष्ठ आणि मध्यमवर्गाची लोकसंख्या 97.3 कोटी झाली; परंतु 2016 च्या तुलनेत ती 9.3 कोटी कमी होती. यावरून भारतात आर्थिक विषमता वाढत असल्याचे दिसून येते.
पण निम्न आणि मध्यम वर्गाची काय स्थिती आहे?
भारतात अब्जाधीश वाढले; पण निम्न आणि मध्यम वर्गाची काय स्थिती आहे? ‘होम क्रेडिट इंडिया कंपनी’ने नुकताच 'द ग्रेट इंडियन वॉलेट स्टडी' नावाचा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात सामान्य माणूस किती कमावतो आणि कुठे खर्च करतो हे सांगते. भारतातील मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढत आहे; पण त्याचवेळी महागाईही वाढत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

2024 मध्ये महानगरांमधील सामान्य लोकांचे मासिक उत्पन्न केवळ 35 हजार रुपये आहे, तर टियर-1 आणि टियर-2 शहरांमध्ये ही कमाई 32 हजार रुपये आहे. 2023 मध्ये, महानगरांमधील सामान्य लोकांचे सरासरी उत्पन्न 33 हजार रुपये होते. टियर-1 शहरांमध्ये त्यांचे उत्पन्न 30,000 रुपये आणि टियर-2 शहरांमध्ये त्यांचे उत्पन्न 27,000 रुपये होते; मात्र उत्पन्न वाढल्याने खर्चही वाढला आहे. खर्चातही सरासरी सह टक्के वाढ झाली आहे. किराणा सामान (26%) आणि भाडे (21%) यांसारखे खर्च सर्वात जास्त योगदान देतात. त्यानंतर वाहतूक (19%), शिक्षण (15%) आणि वैद्यकीय बिले (7%)यांचा समावेश होतो.
2024 मध्ये निम्न-मध्यमवर्गीय लोकांचे मासिक उत्पन्न सुमारे 33 हजार रुपये आहे, तर मासिक खर्च 19 हजार रुपये आहे. चेन्नईमध्ये लोक सर्वाधिक भाडे देतात. कोलकाता आणि जयपूरमध्ये भाडे सर्वात कमी आहे. चेन्नईचे लोक आपला बहुतेक पैसा मौजमजेवर खर्च करतात. लखनऊचे लोक या बाबतीत सर्वात कंजूष निघाले. प्रवास करणे, बाहेर खाणे आणि चित्रपट पाहणे यावर ते कमीत कमी खर्च करतात.
डेहराडूनचे लोक वैद्यकीय उपचारांवर सर्वाधिक पैसा खर्च करतात; पण तेच लोक मुलांच्या शिक्षणावर कमीत कमी खर्च करतात. केवळ एक-दोन नव्हे, तर टॉप 20 क्षेत्रात सर्वत्र श्रीमंत आणि अब्जाधीशांची संख्या वाढली आहे. यामध्ये जुने कौटुंबिक व्यावसायिक, स्टार्टअप संस्थापक, प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूकदार, देवदूत गुंतवणूकदार, नवीन पिढीचे नेते, चित्रपट तारे आणि बरेच लोक प्रगती करत आहेत. चीनमधील अब्जाधीशांची संख्या 25 टक्क्यांनी कमी झाली असताना भारतात ती 29 टक्क्यांनी वाढली आहे.
आता आपल्याकडे विक्रमी 334 अब्जाधीश आहेत. या यादीतील जवळपास 70 टक्के लोक असे आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 1.5 ट्रिलियन डॉलर आहे. ही इतकी मोठी रक्कम आहे की ती भारताच्या जीडीपीच्या एक तृतीयांश आहे. आता हा पैसा हळूहळू पुढच्या पिढीच्या हातात जात आहे. याचा अर्थ नवीन लोक, नवीन उद्योजक आणि सक्षम व्यवस्थापक आता पैसे कमावण्याच्या शर्यतीत उतरू लागले आहेत.
भारताची अर्थव्यवस्था किती वेगाने बदलत आहे हे या बदलावरून दिसून येते. या यादीतील 65 टक्के लोक असे आहेत, ज्यांनी उद्योजकतेची सुरुवात स्वतःपासून केली आणि श्रीमंत झाले. पाच वर्षांपूर्वी हा आकडा 54 टक्के होता. याचा अर्थ आता अधिक लोक आता स्वतःच्या श्रीमंतीत भर घालीत आहेत. या वर्षी यादीत आलेल्या 64 टक्के लोकांनी शून्यातून सुरुवात करून अब्जाधीश झाले. एवढेच नाही, तर काही लोक पहिल्या पिढीतच श्रीमंत झाले आहेत.
त्यात त्यांचे योगदान मोठे आहे. या यादीत एकूण संपत्तीपैकी 57 टक्के संपत्ती या लोकांची आहे, ज्यांनी स्वतः शून्यातून सुरुवात केली आहे. भारताचे उत्पादन क्षेत्र खूप वेगाने वाढत आहे. या वर्षी 1016 मॅन्युफॅक्चरिंग युनीट ‘हुरून रिच लिस्ट’मध्ये समाविष्ट झाली असून अशा लोकांच्या संपत्तीत 28 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’मध्ये समाविष्ट लोकांची एकूण संपत्ती 159 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ती सौदी अरेबिया आणि स्वित्झर्लंडच्या एकत्रित जीडीपीपेक्षा मोठे आहे. ते भारताच्या जीडीपीच्या निम्म्याहून अधिक आहे.

1334 अब्जाधीशांनी आपली संपत्ती वाढवली आहे. याशिवाय 272 नवीन चेहरे या यादीत सामील झाले आहेत; मात्र 205 लोकांची संपत्तीही कमी झाली आहे. या यादीतून 45 लोक वगळले आणि 5 जणांचा मृत्यू झाला. 2024 च्या ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’मध्ये 386 अब्जाधीशांसह मुंबई अव्वल स्थानावर आहे. यानंतर दिल्लीत 217 आणि हैदराबादमध्ये 104 अब्जाधीश आहेत. या वर्षी मुंबईतून 66 नवीन लोक सामील झाले.
‘एचसीएल’च्या शेअरच्या किमतीत 50 टक्के वाढ झाल्यानंतर 79 वर्षीय शिव नाडर 3.1 लाख कोटींच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर पोहोचले. 1,200 कोटी रुपयांच्या संपत्तीसह 45 वर्षीय आनंद चंद्रशेखरन हे 2024 च्या ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’मध्ये पदार्पण करणारे पहिले देवदूत गुंतवणूकदार आहेत. यादीतील सर्वात तरुण अब्जाधीश हर्षिल माथूर आणि शशांक कुमार आहेत.
सर्वात तरुण 21 वर्षांचे कैवल्य वोहरा आहेत, ते ‘झेप्टो’ स्टार्टअपचे संस्थापक आहे. दुसऱ्या क्रमांकावर याच कंपनीचे सह-संस्थापक आदित पालीचा आहेत. ‘एनआरबी बिअरींग’ कंपनीच्या हनवंतबीर कौर साहनी यांनी वयाच्या 95 व्या वर्षी ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’ मध्ये पदार्पण केले. 2024 च्या ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’मध्ये 102 अनिवासी भारतीय आहेत.
अनिवासी भारतीयांसाठी अमेरिका सर्वाधिक पसंतीचा देश आहे. यानंतर संयुक्त अरब अमिराती आणि ब्रिटनचा क्रमांक लागतो. गोपीचंद हिंदुजा आणि त्यांचे कुटुंब एक लाख 92 हजार 700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वात श्रीमंत अनिवासी भारतीय आहेत. एक लाख साठ हजार 900 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह, एलएन मित्तल आणि त्यांचे कुटुंब ब्रिटनमध्ये राहणारे सर्वात श्रीमंत अनिवासी भारतीय आहेत. त्याचवेळी अनेक भारतीयांना राहायला घर, प्यायला चांगले पाणी, दोन वेळचे पोषक भोजन मिळण्याची मारामार आहे.






