निसर्ग व मानव यांचे सहअस्तित्व गेल्या कित्येक काळापासून पृथ्वीवर आहे. परंतु मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपाने अनेक वन्य, पशू पक्ष्यांच्या प्रजातींना नामशेष होण्याच्या मार्गावर आणून ठेवले आहे. यापैकीच एक म्हणजे सारस पक्ष्याची भारतात आढळणारी Greater Adjutant Stork या नावाची प्रजात. दिवसेंदिवस प्लास्टिक प्रदूषण, हवेचे प्रदूषण, निसर्गात सोडली जाणारी घातक रसायने, कृषी क्षेत्रातील वाढती रासायनिक खते या व अन्य काही कारणांमुळे सारस पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक प्रजाती ही जैविक साखळीद्वारे निसर्ग संवर्धनात मोलाची भूमिका बजावत असतात. सारस पक्षी देखील अन्न साखळीतील विघटनाची भूमिका पार पाडतो. त्या पक्ष्याची कमी होणारी संख्या पाहून आसामच्या पूर्णिमा देवी बर्मन यांनी विशेष प्रयत्न केले.ते नेमके कोणते याचा आढावा आपण पुढे घेणारच आहोत. त्याआधी पूर्णिमा देवी बर्मन यांचा उल्लेख आत्ता करण्याचे कारण म्हणजे, नुकताच त्यांना ‘Whitley Fund for Nature’ या संस्थेचा, Whitley Gold हा पुरस्कार घोषित झाला आहे. आणि हा पुरस्कार त्यांना सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्यासाठी जाहीर केला आहे. आसामच्या पूर्णिमा देवी बर्मन यांनी केलेले विशेष प्रयत्न नेमके काय आहेत ते पाहूया.

आसाममध्ये सारस पक्ष्याला तेथील स्थानिक भाषेत हरगीला या नावाने संबोधतात. पूर्णिमा देवी बर्मन यांचे बालपण ब्रह्मपुत्रेच्या काठावरील गावांत व शहरांत गेले. त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संवर्धनासाठी काम करण्यास सुरुवात केली. हरगीला आर्मी स्थापन करून त्यांनी स्थानिक लोकांमध्ये या पक्ष्याच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्यास सुरुवात केली. या संवर्धनात सगळ्यांत महत्वाची भूमिका आसामच्या स्थानिक महिलांनी बजावली आहे. या पक्ष्याची घरटी वाचवण्यापासून तर संवर्धनाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्यापर्यंत सर्वच बाबतीत महिलांनी पुढाकार घेतला. हळूहळू त्यांची संख्या वाढत आहे. आता तर पूर्णिमा देवी यांच्या पुढाकाराने आसाममध्ये हा फक्त एक कार्यक्रम न राहता व्यापक संवर्धन चळवळ बनली आहे. वर्ष 2030 पर्यंत सारस पक्ष्यांची संख्या 5000 झाली पाहिजे हे लक्ष्य ठेवून आसामच्या महिलांची ही आर्मी काम करत आहे. निसर्गाचे संवर्धन म्हणजेच पर्यायाने मानवाचे संवर्धन आहे हे समजून स्थानिक महिलांच्या आधारे राबविलेली ही संवर्धन चळवळ पाहून यावर्षीचा Whitley Gold Award त्यांना मिळाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पूर्णिमा देवी बर्मन यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणतात की,
“माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे सारस पक्ष्यांचा विजय आहे. जी प्रजाती लोकांमध्ये नकारात्मक पद्धतीने चर्चिली जाते त्या पक्षी प्रजातीने गोल्ड मिळवलंय. मी हा पुरस्कार आसामच्या लोकांना समर्पित करते ज्यांनी मला कायम साथ दिली.हा पुरस्कार म्हणजे आसामच्या प्रत्येक महिलेचा सन्मान आहे. आसामच्या महिला या धाडसी आहेत. त्या कोणतीही बाब पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील यात शंका नाही. आणि अर्थातच आम्ही सर्व निसर्गाचा अविभाज्य भाग आहोत.”

या आधीही पूर्णिमा देवींच्या कार्यात जगात गौरव
निसर्ग संवर्धक असलेल्या पूर्णिमा देवी यांना याआधी देखील महत्वाच्या पुरस्कारांनी गौरवले आहे. 2017 साली त्यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा प्रतिष्ठित असा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे.






