"जल जीवन मिशन म्हणजे काय…? मला तर या योजनेचं नावदेखील माहीत नाही. . माझ्या दारापर्यंत नळही पोहोचलेला नाहीये. आमच्या पाड्यावर एकच हातपंप आहे तिथूनच मी आणि गावातील महिला पाणी भरतात. माझ्या घरापासून हातपंप दोन किमी दूर आहे. एका वेळेस दोन-दोन हंडे डोक्यावर ठेवून मी पाणी आणते. सकाळी 3 खेपा आणि रात्री 2 खेपा..."
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असणाऱ्या पाटीलपाड्यावर जी 142 लोकांची वस्ती आहे, त्याच वस्तीतील लिला वसावेची ही प्रतिक्रिया… आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरकारच्या ज्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत लिला वसावे यांच्या घरात नळ असल्याची नोंद आहे ती ‘जल जीवन मिशन योजना’ म्हणजे नेमकं काय हेच तिला माहीत नाही आणि म्हणूनच जर ती दररोज 3-4 तास पाणी भरायला दोन किमी पायपीट करते तर मग तिच्या घरात नळ असल्याची नोंद कशी यावर तिला आश्चर्याचा धक्का बसतो.
बरं तात्रिक चुकांमुळे असे एखाददुसरे उदाहरण घडू शकते असे म्हणायलाही वाव नाही, कारण घरात नळ असल्याची सरकार दफ्तरी नोंद आहे, परंतू प्रत्यक्षात घरात नळच नाही असे उदाहरण फक्त लिला वसावेचेच नाहीये तर अक्कलकुवा तालुक्यातील अनेक पाड्यांवर अशी कैक उदाहरणे सापडू शकतील. ‘बाईमाणूस’ने अशा घटना उजेडात आणून जल जीवन मिशन योजनेचा फोलपणा उघड करण्याचा प्रयत्न केला आहे.
हर घर नल… हर घर जल… काय आहे योजना?
हर घर नल… हर घर जल… सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यभरात जलजीवन मिशनच्या कामांचे उद्घाटन केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकींच्या प्रचारातदेखील सरकारने जलजीवन मिशनचा मोठा गाजावाजा करून पानभर जाहिराती ही प्रसिद्ध केल्या होत्या.
2021 मध्ये केंद्र शासनाची 'जल जीवन मिशन' योजना अस्तित्वात आली. आजही देशातील काही भागात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही. या समस्येवर मात करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहे. जेणेकरून प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकेल. केंद्र सरकारने 2021 ला 'हर घर नल' योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घरात 2024 पर्यंत शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाईल असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ग्रामीण भागात शुद्ध पाणी उपलब्ध करणे आणि देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. याशिवाय या योजनेमुळे देशातील नागरिकांचे जीवनमानही सुधारेल.
देशातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर जाण्याची गरज भासू नये. प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर या दराने पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
या योजनेची पुर्तता करण्यासाठी अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात सरकारने मोठा गाजावाजा करत जलजीवन मिशनच्या कामांचे उद्घाटन केले. जिल्ह्यात जलजीवनच्या कामांच्या उद्घाटनाला दोन वर्षाचा कालावधी उलटला असला तरी ग्रामीण भागातील जलजीवन मिशनचं काम अजूनही अपूर्ण असल्याने आदिवासी भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचं चित्र आहे.
सरकार म्हणते त्याच्या घरी नळ आहे, पण प्रत्यक्षात…?
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींना आज ना उद्या या योजनेंतर्गत पाणी मिळेलच परंतू प्रश्न तो नाहीये. 'बाईमाणूस’ने नंदुरबारच्या वेगवेगळ्या भागात फिरून सरकारच्या जल जीवन मिशन योजनेचा आढावा घेतल्यानंतर जी धक्कादायक माहिती समोर आली ती आश्चर्यकारक आहे.
या जिल्ह्यातील अनेक गावातील आदिवासी लोकं सुरवातीपासूनच अपुऱ्या सोयी-सुविधांमध्ये आयुष्य जगत आहेत. त्यामध्ये सर्वात मोठी समस्या जर या लोकांना कोणती असेल तर 'पाण्याची समस्या'. उन्हाळ्यामध्ये तर या लोकांचे पाण्यावाचून बरेच हाल होतात. पण फक्त उन्हाळ्यातच नाही तर या आदिवासींना बाराही महिने पाण्यासाठी भटकंती करावे लागते.
केंद्र शासनाची 'जल जीवन मिशन' योजना अस्तित्वात आली आणि या आदिवासींना थोडासा दिलासा मिळाला. पण, जसे आजपर्यंत शासनाच्या कोणत्या ही योजना या आदिवासी भागात पोहोचल्या नाहीत तसेच 'जल जीवन मिशन' द्वारे राबवली जाणारी 'हर घर नल' ही योजनादेखील कागदावरच आहे.
जल जीवन मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर असलेल्या माहितीत असे दाखवण्यात आले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील उर्मिलामाळ या गावात 165 घरे आहेत. त्यातील 49 घरांपर्यंत नळ पोहचवण्याचे काम यशस्वीरीत्या पूण झालेलं आहे आणि बाकी 116 घरांपर्यंत नळ पोहचवण्याचे काम चालू आहे. पण सत्यपरिस्थिती वेगळीच आहे.
गणेश भांगा वसावे हे उर्मिलामाळ गावातील रहिवासी आहेत. जलजीवन मिशनची अधिकृत सरकारी वेबसाईट असे सांगते की, गणेश यांच्या घरी नळाद्वारे पाणी पोहोचलंय. ‘बाईमाणूस’ने गणेश वसावे यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष त्यांचाशी संवाद साधल्यावर गणेश सांगतात, "आमच्या गावात 'हर घर जल' मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बांधली आहे आणि विहीरही खोदली आहे.
पण, पाईप टाकण्याचे काम पूर्ण न झाल्याने माझ्या घरापर्यंत नळ पोहोचलेच नाही. अजूनही आम्ही एक कि.मी दूर जाऊन पाणी आणतो. घरामध्ये जनावरं असल्यामुळे त्यांना ही पाणी लागतं. म्हणून दिवसातून तीन ते चार वेळेस माझ्या बायकोला पाणी आणायला जावं लागतं."
माझ्या घरी नळ असता तर मी कशाला चार-चार तास पाणी भरलं असतं?
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात असणाऱ्या पाटीलपाड्यावर 142 लोकं 29 घरांमध्ये राहतात. त्यातील 21 घरांपर्यंत नळजोडणीचे काम पूर्ण झालेलं आहे असे जल जीवन मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर दाखवण्यात आलंय. हांज्या पुन्या वसावे हे पाटीलपाड्यावरच राहतात.
त्यांचे नाव लाभार्थींमध्ये आहे आणि त्यांच्या घरापर्यंत नळजोडणीचे काम पूर्ण झालेले आहे असे अधिकृत संकेतस्थळावर दाखवण्यात आले आहे. पण, हांज्या पुन्या वसावे यांच्या पत्नी लिला वसावे यांना ‘बाईमाणूस’ने जेव्हा या योजनेच्या कामाबद्दल विचारपूस केली तर त्या सांगतात, "मला या योजनेचे नावही माहिती नाहीये. माझ्या दारापर्यंत नळ ही पोहोचलेला नाहीये.
आमच्या पाड्यावर एक हातपंप आहे तिथूनच मी आणि गावातील महिला पाणी भरतात. माझ्या घरापासून हातपंप दोन किमी दूर आहे. एका वेळेस दोन दोन हांडे डोक्यावर ठेवून मी पाणी आणते. सकाळी ३ खेपा आणि रात्री 2 खेपा पाणी आणते."
जल जीवन मिशन मध्ये समावेश असलेल्या 572 योजनांवर 198 कोटी रुपयांचा खर्च झालाय. 446 योजनांची कामे तर अजून बाकीच आहेत. निवडणूका झाल्या, सरकारही बनले पण दरवर्षीप्रमाणे आदिवासींच्या प्रश्नांकडे कुठलाही राजकीय पक्ष असो वा प्रशासन असो ढुंकूनही बघत नाही.
याच अक्कलकुवा तालुक्यातील नंदलवाड गावात 10 पाडे आहेत. त्या पाड्यांमध्ये एकूण 1533 आदिवासी राहतात. या पाड्यांमध्ये एकूण 367 घरं आहेत आणि त्यामधून 25 घरापर्यंत नळ पोहचवले आहेत आणि 342 घरांपर्यंत नळ पोहचवण्याचे काम चालू आहे अशी माहिती ‘जल जीवन मिशन’च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. पण त्याच नंदलवाड गावातील आरकीबाईने तर 'जल जीवन मिशन' योजनेचे नावही ऐकलेले नाही.
आरकीबाई सांगतात की , "त्यांच्या नातेवाईकाने खाजगी बोरिंग काढलेलं आहे तिथून त्या पाणी भरतात. तिथे पाणी नाही मिळालं तर खूप दुरून त्यांना पाणी आणावं लागतं. त्यांच्या घराजवळ हातपंप आहे पण पाइप कमी टाकल्यामुळे त्या हातपंपातरून पाणीच येत नाही.."
ही समस्या त्या गावातील एकट्या आरकीबाईची नाहीये तर गावातील प्रत्येक महिलेची आहे. त्यांना फक्त पिण्याचेच नाही तर घरकामासाठी,जनावरांसाठी सुद्धा पाणी आणावे लागते. नंदलवाड गावात राहणारी रमीला सांगते की तिचे दिवसातील 2 ते 3 तास पाणी भरण्यात जातात. दिवसातून आठ ते दहा खेपा तिला आणाव्या लागता. ज्या दिवशी शेतातली कामे असली त्या दिवशी पाणी भरून ते काम करणे रमीलाला खूप अवघड जाते.
सरकारची वेबसाईट खोटं का दाखवते?
नंदुरबार जिल्ह्यातील अकराणी (धडगाव) तालुक्यातील खर्डी (खुर्द) गावाची एकूण लोकसंख्या 795 इतकी आहे. त्या गावात 206 घरे आहेत आणि 198 घरापर्यंत नळ जोडणीचे काम पूर्ण झाले आहे आणि उरलेल्या आठ घरापर्यंत नळ पोहचवण्याचे काम सुरु आहे असे जल जीवन मिशन च्या अधिकृत संकेतस्थळावर दाखवण्यात आले आहे. पण त्याच अधिकृत संकेतस्थळावर फक्त 23 लोकांचीच नवे दिलेली आहे मग उरलेल्या कोणत्या 175 घरापर्यंत नळ पोहचवले याची कोणतीही माहिती त्या संकेतस्थळावर उपलब्ध नाहीये.
‘बाईमाणूस’ने जेव्हा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तेव्हा 'हर घर नल' योजना त्या गावापर्यंत तर आली. पण अर्धवट काम करून ते काम तसेच सोडून देण्यात आले असल्याचे निदर्शनास आले.
सरकारची योजना काही आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही अशी खात्री पटल्यावर खर्डी गावचे ग्रामस्थ गुलाबचंद पावरा यांनी एकेक पैसा जमा करून त्यांच्या शेतात खाजगी बोरिंग सुरू केली आणि त्याच बोरिंग वर आजूबाजूच्या पाड्यावरची माणसं पाणी भरायला येतात.
गुलाबचंद पावरा सांगतात की, "माझ्या बोरिंगवर दिवसभर बायका पाणी भरण्यासाठी येत असतात. पण उन्हाळ्यामध्ये माझ्या बोरिंगचे पाणी जातं आणि त्यामुळे या बायकांना दुसऱ्या पाड्यातील विहिरीवर जाऊन पाणी आणावं लागतं."
जल जीवन मिशनने लोकांना आशा दाखवली होती की देशातील प्रत्येक घरात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होईल, ज्यामुळे देशातील नागरिकांचे आरोग्य आणि जीवनमानही सुधारेल. एका पाड्यामध्ये एक किंवा दोनच विहिरी असतात.
त्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात. घरापर्यंत नळ पोहोचणे तर दूरच पण जे हातपंप किंवा विहिरी पाड्यावर आहेत त्यात ही या महिलांना उन्हाळ्यात पाणी मिळत नाही.आजही खर्डी गावातील महिलांचे दिवसातील दोन ते तीन तास पाणी भरण्यात जातात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या ही उद्भवल्या आहेत.
खर्डी गावात राहणाऱ्या सेवीबाई सांगतात. "पाणी आणायला आम्ही दुसऱ्या पाड्यावर जातो. किमान 4 ते 5 खेपा तरी पाणी आणावं लागतं. एवढ्या दुरून पाणी आणतांना पाय दुखतात, डोक्यावर दोन-दोन हंडे वाहिल्यामुळे डोकं जड पडतं."
नंदुरबार जिल्यातील अक्राणी तालुक्यातील राजबर्डी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच माधव पावरा सांगतात की, "जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावातील फक्त एका पाड्यावर विहीर खोदण्यात आलेली आहे बाकी कुठे टाकी नाही कुठेही पाइप टाकण्यात आलेले नाही. कोणत्या कंत्राटदाराकडे हे काम देण्यात आलेले आहे त्याचे नाव ही आम्हाला माहित नाही."
'हर घर जल' योजनेचे काम एवढ्या संथगतीने का चालू आहे असा प्रश्न ‘बाईमाणूस’ने जेव्हा तेथील गटविकास अधिकाऱ्यांना केला तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पाणी पुरवठा विभागाचं तर ऑफिसच बंद होतं. तिथल्या ग्रामसेवकांनी सांगितलं की आमच्याकडे कोणतंही पत्र येत नाहीत.
त्यांना हवं तेव्हा ते काम सुरु करतात आणि हवं तेव्हा ते बंद करतात. गेले चार महिने भीषण पाणीटंचाईचा सामना ग्रामीण महाराष्ट्राला करावा लागला. लोकसभा निवडणुकीतील घोषणा हवेतच विरून गेल्या. आता विधानसभा तोंडावर आहे. घरोघरी मत मागायला जाणारे राजकीय नेते याच घरांपर्यंत पाणी पोहोचवू शकतील का हाच काय तो प्रश्न आजही कायम आहे.
शब्दांकन - संजना खंडारे






