टीम बाईमाणूस
- ‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबियांना तथाकथित सवर्णांनी जबर मारहाण केली आहे.
- "माझा मुलगा अपंग आहे. मात्र तरीदेखील त्याला कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. त्याला फरफटत नेलं आणि मारहाण केली’ असा आरोप नवरदेवाच्या आईने केला आहे.
- या प्रकरणात आपोलिसांनी म्ही, एससी-एसटी ॲक्ट आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 अंतर्गत जातीय भेदभाव आणि अनुच्छेद 17 अंतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आली. मात्र संविधान लागू होऊन जवळपास 76 वर्षे लोटल्यानंतरी सरकारे देशात भेदभाव समाप्त करण्यात अपयशी ठरली आहेत. याचा अंमलबजावणीचा कायदाच नसल्यामुळे जातीय भेदभावाच्या घटना कमी होण्याऐवजी वाढून राहिलेल्या आहेत.
मध्य प्रदेशातील दमोह जिल्हयातून अशीच एक घटना समोर आली आहे. येथे अनु.जातीच्या नवरदेवाला घोड्यावरून ओढून मारहाण करण्यात आली. ही घटना दमोह जिल्ह्यातील हाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बिजोरी पाठक गावात घडली. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दलित नवरदेवाला घोड्यावर खाली खेचले आणि मारहाण केली
मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील हटा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बिजौरी पाठक गावातील एका गल्लीत २१ एप्रिल रोजी लग्न विधी सुरू होते. वरात निघाली होती. अनु.जातीच्या गोलू अहिरवार यांचं लग्न होतं. ते घोड्यावर बसलेले होते. त्यांच्यापुढे वरातीत बँड वाजत होता. त्यामागे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक आनंदानं नाचत होते. गोलूची वरात छतरपूर जिल्ह्यातील बक्सवाहा येथे जाणार होती. वरात निघण्यापूर्वी, वराला घोड्यावर बसवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. मात्र वरात गावातील तथाकथित उच्च जातीच्या परिसरात पोहोचताच काही तरुणांनी नवरदेवाचा मार्ग अडवला. जेव्हा गावातील सवर्ण लोकांनी अनु.जातीच्या तरुणाला घोड्यावर बसलेले पाहिले, तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला. गोलू आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर हिंसा करण्यात आली.

गावातील लोकांनी सनातनी परंपरांचा हवाला देत, त्यांनी दावा केला की अनु.जातीच्या वराला घोड्यावर बसण्याची परवानगी नाही, आणि या हिंसक लोकांनी त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. त्या लोकांनी वराला खाली पाडले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. वराच्या बहिणीलाही सोडले नाही आणि भाऊ व बहीण दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर नवरदेवाला पोलीस ठाण्यात आणि रुग्णालयात दाखल व्हावे लागले.
या घटनेनंतर, संपूर्ण वरात हाटा पोलीस ठाण्यात पोहोचली, जिथे पीडितांनी तक्रार दाखल केली. नवरदेव गोलू आणि त्याच्या बहिणीला अनेक जखमा झाल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांची प्रकृती काहीशी सुधारल्यानंतर, वरात रात्री उशिरा बक्सवाहाकडे निघाली.
‘’तुमच्या जातीतील लोक घोड्यावर बसू शकत नाहीत’’
‘बीबीसी’शी बोलताना गोलू अहिरवारने प्रतिक्रिया दिली की, "आमच्या गावात एरवीदेखील भेदभाव केलाच जातो. त्या दिवशी तो खूपच जास्त प्रमाणात झाला. मी दलित असूनदेखील घोड्यावर बसलो, ही गोष्ट गावातील उच्च जातीतील लोकांना आवडली नाही. त्यांनी आम्हाला मारहाण केली. तुमच्या जातीतील लोक घोड्यावर बसू शकत नाहीत, असं ते म्हणत होते."

पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, घुप्पू लोधी, विश्वनाथ लोधी, विचू लोधी आणि चिन्नू लोधी यांनी जातीयवादी शिवीगाळ करत गोलूला घोड्यावरून खाली खेचले आणि त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा नवरदेवाला मारहाण होताना पाहून त्याची बहीण मनीषा त्याच्या मदतीला धावून आली, तेव्हा आरोपींनी तिलाही सोडले नाही. मनीषाला मारहाण करण्यात आली आणि या झटापटीत तिचे काही सोन्याचे दागिनेही गायब झाल्याचा आरोप आहे. नवरदेवाची आई, विद्या अहिरवार म्हणाल्या की, आम्ही त्यांना विनवणी केली की आज लग्नाची वरात निघणार आहे, घोड्यावर बसल्याशिवाय विधी कसे पूर्ण होतील? पण त्यांनी आमचे काहीही ऐकले नाही आणि आमच्यावर हल्ला केला.
"माझा मुलगा अपंग आहे, तरीही त्याला दया दाखवली नाही’’
गोलू अहिरवार (23 वर्षे) जन्मापासूनच अपंग आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या कुटुंबात त्यांच्याव्यतिरिक्त, आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण आहे.
"माझा मुलगा अपंग आहे. मात्र तरीदेखील त्याला कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. त्याला फरफटत नेलं आणि मारहाण केली. माझी मुलगी त्याला वाचवायला गेली असता, तिलादेखील त्यांनी मारहाण केली," असं गोलूच्या आई विद्या अहिरवार म्हणाल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींपैकी तीनजण एकाच कुटुंबातील आहेत. चौथा जण इतर गावकरी आहे. हे चारही जण लोधी समुदायातील आहेत. या चौघांवरही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोधी समुदाय हा मध्य प्रदेशातील इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी समुदायात येतो. मध्य प्रदेशात ओबीसी समुदायाची लोकसंख्या 50 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे अनेक भागात या समुदायाचा प्रभावदेखील आहे. या प्रकरणी हाटा पोलीस ठाण्याचे प्रभारी सुधीर बेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितांच्या तक्रारीच्या आधारे, लोधी समाजाच्या सदस्यांविरुद्ध अनुसूचित जाती/जमाती कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बिजोरी पाठक गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. या घटनेने सरकार आणि प्रशासनाचे दावे उघडे पाडले आहेत.

दमोहचे पोलीस अधीक्षक श्रुतकीर्ति सोमवंशी यांनी बीबीसीला सांगितलं, "या प्रकरणात आम्ही, एससी-एसटी ॲक्ट आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. एका जणाला अटक करण्यात आली आहे. आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमअंतर्गत कारवाई करण्याबाबत कलेक्टरला पत्र लिहिलं आहे."
बुंदेलखंडमध्ये जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या सर्वात ताज्या अहवालात, 2023 पर्यंतच्या गुन्ह्यांची माहिती दिली आहे. या अहवालानुसार, 2021, 2022 आणि 2023 या वर्षांमध्ये देशभरात अनुसूचित जातींविरोधात झालेल्या गुन्ह्यांमध्ये मध्य प्रदेश सातत्यानं तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. याच्या वरच्या क्रमांकावर फक्त उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये आहेत.
बुंदेलखंडमधील दमोहमध्ये घडलेली ही पहिली घटना नाही. यापूर्वी 2025 मध्ये, टिकमगड जिल्ह्यातील मोखरा गावात, जितेंद्र अहिरवार नावाच्या अनु. जातीच्या वरावर घोड्यावर बसल्याबद्दल दगडफेक करण्यात आली होती. डिसेंबर 2024 मध्ये, दमोह जिल्ह्यातीलच चौराई गावात, एका अनु.जातीच्या वराला रथातून फेरफटका मारल्याबद्दल समाजकंटकांनी रथाची तोडफोड करून वराला मारहाण केली होती. आजही बुंदेलखंडच्या ग्रामीण भागात अनु.जातीच्या वराला घोड्यावर बसण्यावरून वाद निर्माण होत आहेत.






