शंतनू खुजे
- गुजरातच्या जुनागढ येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दलित कुटुंबांना आमंत्रित करून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे.
- दलित बांधवांना भोजनाचे आमंत्रण देताना, 'स्वतःची भांडी घरून घेऊन या आणि इतरांसोबत पंगतीत बसू नका' अशी कठोर ताकीद देण्यात आली.
- एवढेच नाही तर, 'गावातील सवर्ण समाजाचे जेवण पूर्ण झाल्यानंतर उरलेले अन्न खाण्यासाठी या,' अशी निंदनीय अटही त्यांच्यावर लादण्यात आल्याचे समोर आले आहे.
गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली. येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावातील दलित कुटुंबांना आमंत्रित करून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. दलित बांधवांना भोजनाचे आमंत्रण देताना, 'स्वतःची भांडी घरून घेऊन या आणि इतरांसोबत पंगतीत बसू नका' अशी कठोर ताकीद देण्यात आली. एवढेच नाही तर, 'गावातील सवर्ण समाजाचे जेवण पूर्ण झाल्यानंतर उरलेले अन्न खाण्यासाठी या,' अशी निंदनीय अटही त्यांच्यावर लादण्यात आल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत प्रकरणात आता ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"आम्हाला आमची स्वतःची ताटे आणि ग्लास घेऊन यायला आणि इतरांचे जेवण झाल्यावर वेगळे बनवलेले अन्न खाण्यासाठी बसायला सांगितले होते. तसेच आम्हाला मंदिरात न जाण्यासही सांगितले होते," असा दावा अस्पृश्यता पाळल्याच्या आरोपावरून इतर जातीच्या पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल करणारे २५ वर्षीय अजय चतुर बोरीचा यांनी बुधवारी केला. पोलिसांनी सांगितले की त्यांनी या आरोपांची चौकशी सुरू केली असून, याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय…?
बुधवारी २९ एप्रिल रोजी संध्याकाळी गुजरातच्या जुनागढच्या विसावदर तालुक्यातील भुतडी गावात प्रभू रामचंद्राला समर्पित असलेल्या एका मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजन समितीमध्ये असलेल्या इतर जातीतील ग्रामस्थांवर आरोप करणाऱ्या दलित समाजातील काही सदस्यांपैकी अजय बोरीचा हे एक आहेत.

बुधवारी गावात प्राणप्रतिष्ठा तर पार पडली, मात्र गावचे स्नेहभोजन आणि पंगत रद्द करण्यात आली. आयोजकांनी भुतडी गावातील दलित समाजाला दिलेल्या निमंत्रणातून आणि भोजनातील त्यांच्या सहभागाबाबत कथितरीत्या लादलेल्या अटींमुळे हे आरोप पुढे आले आहेत. अजय बोरीचा यांच्या तक्रारीवरून विसावदर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. बोरीचा यांच्या म्हणण्यानुसार, २७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास अनुसूचित जातीचे अनेक सदस्य गावात उपस्थित होते, त्यावेळी त्यांना हे अपमानास्पद आणि काही अटींसह निमंत्रण देण्यात आले.
आरोपींना भारतीय न्याय संहितेअंतर्गत नोटीस
पोलीस उपअधीक्षक रविराजसिंह परमार म्हणाले, “आम्ही प्रथमदर्शनी तक्रारदार आणि इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. हे प्रकरण दोन्ही बाजूंच्या दाव्यांवर आधारित आहे. आम्ही सर्व आरोपींना भारतीय न्याय संहिता ३५(३) अंतर्गत नोटीस बजावली असून, त्यांना पोलिसांसमोर हजर राहून आपला जबाब देण्यास सांगितले आहे. या प्रकरणात काही डिजिटल पुरावे उपलब्ध आहेत का, हे देखील आम्ही तपासण्याचा प्रयत्न करत आहोत.”
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, पाच आयोजक २७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास आमच्या गल्लीत आले होते आणि आमच्या समाजातील दहा लोक तेथे बसले होते. आयोजकांनी आम्हाला सांगितले की २९ एप्रिलच्या संध्याकाळी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.”
बोरीचा यांनी दावा केला की, आयोजकांनी त्यांना म्हटले, “आम्ही तुम्हाला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त भोजनाचे निमंत्रण देत आहोत, परंतु इतर जातीच्या लोकांचे जेवण पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही यायला हवे. तसेच तुम्ही सर्वांनी स्वतःची ताटे आणि वाट्या सोबत आणाव्यात. तुमचे अन्न आणि पाण्याची व्यवस्था वेगळी करण्यात आली आहे.”
दलित समाजातील अनेक सदस्यांनी २८ एप्रिल रोजी विसावदर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीचे एफआयआरमध्ये रूपांतर करण्यात आले. जुनागढ पोलिसांच्या एससी/एसटी सेलचे पोलीस उपअधीक्षक रविराजसिंह परमार यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.
आरोपींवर एससी, एसटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा
बाबू उका हापणी, नरेंद्र भानजी सिरोया, रमणिक समजी सोरठिया, अतुल भिका सिरोया आणि फुला पोपट सिरोया या पाच आरोपी आयोजकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६(२) (गटांमध्ये धर्म, वंश, भाषा इत्यादींवरून शत्रुत्व वाढवणे) आणि ५४ (मदतनीस उपस्थित असणे) यासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलम ३(१)R, ३(१)zaA, आणि ३(१)zaC अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कलमे एससी किंवा एसटी समुदायाच्या सदस्याचा जाणीवपूर्वक अपमान करणे किंवा मानहानी करण्याशी संबंधित आहेत.

"याच अनुषंगाने, तातडीची कारवाई, पीडितांचे संरक्षण आणि उच्चस्तरीय, निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अनुसूचित जाती कल्याण विभागाच्या उपसंचालकांना निर्देश पाठवण्यात आले आहेत. 'अशा प्रकरणांमध्ये अजिबात हयगय केली जाणार नाही. यावर तात्काळ सविस्तर अहवाल सादर करावा आणि अत्यंत कठोर कारवाई सुनिश्चित करावी,' असे या निर्देशांमध्ये म्हटले आहे. दरम्यान, प्रत्यक्ष पातळीवर पोलिसांची पाळत वाढवण्यात आली असून, आरोपींना पकडण्याच्या प्रयत्नांनाही वेग आला आहे."
एससी, एसटींवर होणाऱ्या भेदभावाच्या घटना चिंताजनक…
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15 अंतर्गत जातीय भेदभाव आणि अनुच्छेद 17 अंतर्गत अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आली. मात्र संविधान लागू होऊन जवळपास 76 वर्षे लोटल्यानंतरी सरकारे देशात भेदभाव समाप्त करण्यात अपयशी ठरली आहेत. अलीकडेच मध्य प्रदेशातील दमोह जिल्हयातून एक घटना समोर आली होती. जेथे अनुसूचित जातीच्या नवरदेवाला घोड्यावरून ओढून मारहाण करण्यात आली होती. ही घटना दमोह जिल्ह्यातील हाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बिजोरी पाठक गावात घडली होती.
राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या 'क्राईम इन इंडिया २०२२' च्या अहवालानुसार, संपूर्ण देशभरात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवर होणाऱ्या जातीय भेदभावाच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली पाहायला मिळते. या अहवालानुसार, २०२२ या वर्षात देशभरात अनुसूचित जातींविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये २०२१ च्या तुलनेत १३.१ टक्क्यांनी वाढ झाली असून, तब्बल ५७,५८२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, अनुसूचित जमातींविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही १४.३ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली गेली असून त्याअंतर्गत १०,०६४ गुन्हे दाखल झाले आहेत.






