- संजना खंडारे (छ. संभाजी नगर)
"ओ दीदी मटन लेना है क्या बोलो? झटका और हलाल मे फरक हमको कायको पुछते? किसी पढे लिखे को जाके पूछो... आपको समझता नहीं मेरा हुलीया देख के, हम हलाल ही बेचते है.."
छत्रपती संभाजीनगर शहरातील एका मटणाच्या दुकानात लाकडी ओंडक्यावर मटणाचे बारीक तुकडे करत असतानाच उस्मान एकदम खेकसलाच. सध्या देशभर सुरू असलेला ‘हलाल की झटका’ हा वाद आणि त्यावरून पेटलेलं राजकारण हे कदाचित उस्मानला ठाऊक होतं आणि म्हणूनच तो रागाने बोलत होता.
हलाल विरुद्ध झटका… उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान आणि दिल्ली या उत्तरेकडच्या राज्यात सुरू असलेल्या या वादाने गेल्या काही महिन्यांपासून आता महाराष्ट्रतही शिरकाव केलाय. फक्त ‘हलाल की झटका’ इतकंच नव्हे तर भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मढीच्या कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना धंदा करू न देणं, कावड यात्रेत मुस्लिम हॉटेल आणि दुकानांवर नावांसहित बोर्ड लावायला सांगणं, त्या काळात जबरदस्तीने मुस्लिम हॉटेल्स बंद करायला लावणं, होळीच्या दिवशी मुस्लिमांनी घराबाहेर पडू नये असा फतवा काढणं… अशा अनेक कारणांमुळे सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे. त्यातच आता भर पडलीये महाराष्ट्रात सुरू असलेल्या ‘हलाल विरुद्ध झटका’ या वादाची.
मंत्री नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे पेटला वाद..
अनेकदा राजकीय नेत्यांनी केलेली वक्तव्यं हिंदू-मुस्लिम वादाचं कारण ठरतात. मात्र आता धर्माचा वाद हा पोटापाण्यापर्यंत येऊन पोहोचलाय. याला कारण ठरलंय मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतंच केलेलं वक्तव्य…
नितेश राणे म्हणतात, “आम्ही मटणाच्या दुकानांना ‘मल्हार झटका प्रमाणपत्र’ देणार आहोत. येथे केवळ झटका मांसाची विक्री होईल. त्यासाठी आम्ही मल्हार सर्टिफिकेशन नावाची व्यवस्था तयार केली आहे. या मल्हार सर्टिफिकेशनच्या संकेतस्थळावर दुकानांची नोंदणी करता येईल. याद्वारे हिंदूंसाठी हिंदूंची मटणाची दुकानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या दुकानांमध्ये 100 टक्के हिंदूंचं प्राबल्य दिसेल. मांस विक्री करणारी व्यक्ती हिंदूच असेल.”
त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात एकच खळबळ उडाली. राणेंच्या वक्त्यावर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी, विरोधी पक्षाने आणि अनेक सामाजिक संघटनांनी, कार्यकर्त्यांनी त्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही विविध माध्यमांवर त्यांचं मत मांडलंय. ते म्हणाले, "खाण्यावरुनही आता हिंदू – मुसलमान करण्याचा हा वाद आहे. मला सांगा तुम्ही मच्छी कशी खाणार? हलाल, हराम की मल्हार?"
हलाल, झटका, मल्हार सर्टिफिकेट हा सगळा नेमका काय प्रकार सुरू आहे…? ग्राहकाला त्याच्याशी काही घेणंदेणं असतं का? हा वाद खरंच धर्मांशी निगडित आहे की, फक्त राजकीयांची पोळी यावर भाजली जाते म्हणून असं बोललं जातंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि खरी परिस्थिती काय आहे हे बघण्यासाठी बाईमाणूसची टीम छ.संभाजीनगरमधील मटण विक्रेते आणि मटण खाणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहचली…
‘’मेरे पास सभी धरम के लोगा आते..’’
1999 पासून छ. संभाजीनगरमध्ये 'महाराष्ट्र मटण अँड चिकन शॉप' नावाचं दुकान आहे. त्या दुकानात काम करणारा शोहेब कुरैशी म्हणतो, "देखो मॅडम हमारे दुकान को छब्बीस साल हो गया. अभी तलक सिर्फ सरदारजी छोड के कोई नहीं पुछता की झटका हे क्या?" 
(महाराष्ट्र मटण अँड चिकन सेंटर चा मालक शोहेब कुरेशी)
शोहेब पुढे म्हणाला, "राजकारणी लोक जे काही बोलले त्याचा माझ्या धंद्यावर काहीच फरक पडत नाही. मेरे पास सभी धर्म के लोगा आते, मटण चिकन लेके जाते. सभी लोगो से मेरा अच्छा दोस्ताना है… मी सकाळी 8 वाजता दुकान उघडतो आणि रात्री 10.30 ला बंद करतो. दहा बोकडे कसेही विकले जातात. माझा रोजचा गल्ला एक लाखांचा होतो त्यात मला 40 हजार रुपये नफा असतो. रविवारी नफा जास्त प्रमाणात होतो. तसंही मटण घ्यायला जे येतात ते हलाल आहे की झटका असंल काही विचारतच नाही. त्यांना माहितीये मुसलमान हा हलालच विकतो. त्यामुळे राजकारणी काही बोलो माझ्या धंद्यावर काही फरक पडणार नाही.
झटका आणि हलाल मध्ये नेमका काय फरक आहे?
हलाल मटण
- हलाल मध्ये जनावराच्या मानेवरील रक्तवाहिनी, श्वासनलिका कापली जाते.
- जनावराच्या शरीरातलं सर्व रक्त बाहेर आल्यानंतर त्याचे तुकडे केले जातात.
- या मध्ये जनावराला मारण्याआधी त्याला खाऊ घातलं जातं
- मुस्लिम समाजामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हलाल केलेलंच मटण खातात.
- मुस्लिम समाजाच्या पद्धतीनुसार आधी कलमा वाचून त्यानंतरच जनावराच्या गळ्यावर सूरी फिरवली जाते.
- हलालमुळे जनावराच्या शरीरातलं सगळं रक्त बाहेर पडत असल्यामुळे रक्तातले विषाणूदेखील बाहेर पडतात.
- अस्सल खवय्ये हलाल पद्धतीचेचं मटण अधिक पसंत करतात.
(झटका मटण दुकानाचे मालक शरद कराळे)
झटका मटण
- एका झटक्यात जनावराची मान त्याच्या धडावेगळी करण्याची पद्धत म्हणजे झटका मटण पद्धत.
- या पद्धतीत प्राण्याला बेशुद्धही केलं जातं.
- शीख समाजामध्ये झटका मटण पद्धत वापरली जाते.
- झटकाची सुरवात शीख समुदायाने प्राण्याला कमी त्रास व्हावा म्हणून 20 व्या शतकात केली होती.
- हीच पद्धत पुढे हिंदू धर्मियांनी स्वीकारली.
मल्हार सर्टिफिकेट म्हणजे काय... ?
मटणाच्या विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेट नावाची एखादी पद्धत आहे हेच मुळात महाराष्ट्राला माहित नव्हतं. ते नितेश राणे यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा प्रकाशझोतात आलं. नितेश राणेंच्या म्हणण्यानुसार मल्हार सर्टिफिकेट हे फक्त झटका मटणासाठीचं प्रमाणपत्र आहे. हे सर्टिफिकेट सांगतं की ज्या बकरी, शेळीचं हे मटण आहे ते हिंदू रिती रिवाजाने म्हणजेच झटका पद्धतीने कापण्यात आलं आहे आणि त्यात भेसळ नाही.
दुसऱ्या कुठल्याही मटणाची भेसळ बकरीच्या मटणात नाही याची खात्री हे सर्टिफिकेट देतं. सर्वात महत्त्वाचं हे मल्हार सर्टिफिकेट फक्त हिंदू खाटिक आणि हिंदू समाजाच्या मटण विक्रेत्यांनाच मिळणार आहे. https://www.malharcertification.com/ या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे.
मल्हार सर्टिफिकेटच्या वेबसाइटची भानगड
- https://www.malharcertification.com या वेबसाइटची मालकी कोणाकडे आहे, त्याविषयी माहिती उपलब्ध नाही.
- या वेबसाइटला gov.in अशाप्रकारचे एक्स्टेन्शनसुद्धा नाही.
- त्याचबरोबर नितेश राणे वगळता महाराष्ट्र सरकारमधील कोणीच या मल्हार सर्टिफिकेशनसंबंधी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
- अथवा शासनानेही आपल्या कोणत्याच वेबसाइटवर त्याचा उल्लेख केलेला नाही.
'कृपया येथे मुस्लिमधर्मीयांनी मटण घेऊ नये'
छ. संभाजीनगर मध्ये उस्मानपुरा भागात गेल्या 30 वर्षांपासून 'जय मल्हार मराठा' हे मटणाचे दुकान आहे. संपूर्ण शहरात हे एकच असं ठिकाण आहे जिथे झटका मटण-चिकन मिळतं. त्या दुकानात अतिशय ठळकपणे लिहिलेलं आहे, 'कृपया येथे मुस्लिमधर्मीयांनी मटण घेऊ नये'.
('मुस्लिमधर्मीयांनी येथून मटण घेऊ नये' असं झटका मटण शॉप मध्ये स्पष्ट लिहिलंय..)
या दुकानाचे मालक शरद कराळे यांच्याशी बाईमाणूसने जेव्हा संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, "माझ्याकडे मल्हार सर्टिफिकेट नाही, आता मी ते काढणार आहे. पण, संपूर्ण शहरात माझं एकच दुकान आहे जिथे झटका मटण मिळतं. कारण आमची जातच खाटकाची आहे. मी जातीने हिंदू खाटीक आहे. माझ्या जातप्रमाणपत्रावर ही खाटीकच जात लिहिली आहे. आमच्या जातीत हलाल कधीच करत नाही."
शरद कराळे पुढे म्हणतात, "मुळात खाटिकाचा धंदा हा हिंदूंचाच आहे. त्यात मुस्लिम कधीच नव्हते. ते कसाई आहेत. त्यांनी त्यांचं जातप्रमाणपत्र दाखवावं की ते खाटीक आहेत. विदर्भामध्ये किंवा पुण्यामध्ये सगळे हिंदू खाटीक आहेत. ते सगळे झटका पद्धतीने मटण कापतात. पण, हिंदूंनाही कळत नाही कोणाकडून घ्यावं कोणाकडून नाही घ्यावं. त्यामुळे नितेश राणेंनी जे केलं ते योग्यच केलं. आता तरी हिंदूंना समजेल की आपल्या धर्मात कसं खावं."
शरद कराळे हे त्यांच्या दुकानावर हिंदूच मुलांना कामावर ठेवतात. या शहरात खाटीक दुकानावर हिंदू आता काम करत नाहीत म्हणून मी गावाकडून माझ्या दुकानावर काम करायला माणसं बोलवली असेही ते सांगतात.
मटण-चिकन कसं ही कापलं तरी पोटातच जाणार आहे...
मटण विकत घ्यायला आलेल्या काही ग्राहकांशी जेव्हा बाईमाणुसने संवाद साधला तेव्हा अभिजीत पवार (नाव बदलले) यांनी सांगितले, "मी लहानपणापासून मटण खातो आणि स्वतः किमान ४० वर्षांपासून घरी मटण घेऊन जातो. ना कधी मी माझ्या बापाला विचारलं की तुम्ही हलाल आणलं की झटका. ना माझा पोरगा मला विचारतो की कोणतं मटण आणलं. ना मी देणाऱ्याला विचारतो की तुम्ही कोणतं देताय. मटण खाण्याशी मतलब बा. ते ताजं आहे की शिळं एवढंच काय ते मी विचारतो. कसंही कापलं तर पोटातच जाणार आहे."
‘ए- वन चिकन मटण शॉप’ चे मालक फारूक फकिरा कुरैशी सांगतात, "मी वयाच्या १५ व्या वर्षांपासून हा धंदा करतो आज मी 65 पार आहे. मल्हार सर्टिफिकेट, हलाल की झटका याचं बघायला गेलं तर लोकांना काही घेणं देणं नाही. पण जर धर्म-धर्मात वाद लावणार नाही ते राजकारणी कुठले? उभ्या आयुष्यात बघत आलोय विकासावर नाही तर धर्मावर राजकारण करतात. कारण त्यांना माहितीये धर्म हा लोकांच्या खूप जवळचा विषय आहे. माझ्या दुकानातून कोणी यावं मटण घेऊन जावं मी नाही म्हणत नाही. कारण माझा तो धंदा आहे. पण आता धंद्यावरच राजकारण करायचं असेल तर हे गरिबांच्या पोटावर पाय देऊन उभं राहणार" 
(फारूक कुरेशी यांचं हेच ते ए-1 चिकन शॉप जे 50 वर्षांपासून आहे.)
फारूक कुरैशी यांच्याशी संभाषण सुरू असतानाच दुकानात एक गिऱ्हाईक येतो. 'चाचा अच्छा फ्रेश चिकन देदो' असं म्हणतो. त्यांच्याशी बोलल्यावर तो म्हणाला "असं ही काही असतं का? झटका आणि हलाल माहितीच नाही बाबा. मी पण एक हिंदू आहे आणि गेल्या 15 वर्षांपासून यांच्याकडूनच मटण-चिकन नेतो."
‘’दिवसाला 200 ते 500 रुपये कमावणारा माणूस यात मरणार आहे.”
नितेश राणे यांच्या या वक्त्यावरून राजकीय वातावरणदेखील चांगलंच ढवळून निघालयं. जितेंद्र आव्हाड यांनी हलाल विरुद्ध झटका या प्रकरणावर माध्यमांशी बोलतांना सांगितलं, “हलाल विरुद्ध मल्हार प्रमाणपत्र असलेलं मटण असा वाद मी ऐकला. मी सांगू इच्छितो की हलाल हा शब्द कायद्याला धरुन आहे. जागतिक पातळीवर हलाल हा शब्द वापरला जातो. हलाल मीट म्हणजे कायदेशीररित्या असलेलं मटण. पशू बळी दिल्यानंतर त्याचं रक्त वाहून देण्यासाठी मार्ग केला जातो. रक्त साकाळून त्याचं रक्त मिसळणार नाही म्हणून हे केलं जातं. आपल्याकडे जे पशूबळी दिले जातात ते बळी हलाल पद्धतीनेच दिले जातात. तुळजापूरच्या भवानीला जातो, खंडोबाला जातो तेव्हा तिथला खाटिक हलाल पद्धतीनेच बळी देतो. कारण त्याला पशूमधलं रक्त बाहेर काढायचं असतं. झटका ही पद्धत फक्त पंजाब प्रांतात आणि खास करुन शीख समुदायात वापरली गेली."
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणतात की, "आत्तापर्यंत गावागावांमध्ये कसाई आणि खाटिक एकत्र दुकानं लावत होते. छोट्याश्या गावांमध्ये बाहेर खाटिक किंवा कसाई यांची दुकानं दिसतात. लोक येतात मटण घेतात आणि जातात. शांत पद्धतीने सगळं सुरु आहे. अशात ही आग लावण्याची गरज काय आहे? महाराष्ट्राचं जातीय द्वेषाच्या माध्यमातून विभाजन करतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही का? दिवसाला 200 ते 500 रुपये कमावणारा माणूस यात मरणार आहे.”






