टीम बाईमाणूस
- इंदोरमधील खासगी शाळेने आयोजित केले हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी वेगळे वार्षिक कार्यक्रम…
- शाळा प्रशासनाने पुढे केले शब-ए-बरातचे कारण…
मध्यप्रदेशातील इंदोरमधील एका खाजगी शाळेने हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी वेगळे वार्षिक कार्यक्रम आयोजित केले गेले. शाळेत धर्मावर आधारित भेदभावाच्या इतर घटनाही घडल्याचा आरोप शाळेतील मुस्लिम विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे, असे वृत्त न्यूजलॉन्ड्री पोर्टलने दिले आहे.
इंदोरच्या खजराना येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ बॉम्बेने २ आणि ३ फेब्रुवारी रोजी दोन वेगवेगळ्या गटांसाठी स्वतंत्र वार्षिक कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतरच समजले की हा कार्यक्रम फक्त मुस्लिम मुलांसाठीच आहे आणि याबद्दल आम्हाला आधी कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती असं मुस्लिम विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितलं.
दुसऱ्याच दिवशी आयोजित केला हिंदू विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम…
"तिथे फक्त मुस्लिम विद्यार्थी आणि त्यांचे पालक होते. कर्मचारीही कमी होते आणि त्यांनी कोणत्याही प्रमुख पाहुण्याला बोलावले नव्हते. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी हिंदू विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम घेतला, जिथे सर्व कर्मचारी उपस्थित होते आणि एका प्रमुख पाहुण्यालाही आमंत्रित करण्यात आले होते," असे या शाळेत इयत्ता १०वीत शिकणाऱ्या मुलाचे वडील मीर गुलरेज अली यांनी सांगितले.

"त्यांनी शब-ए-बरातचे एक फालतू कारण पुढे केले. ते दुसऱ्या एखाद्या तारखेलाही कार्यक्रम आयोजित करू शकले असते. आधी ते भेदभाव करतात आणि मग अशी मूर्खपणाची कारणे देतात. मी कोणत्याही शाळेत असे काहीही घडल्याचे कधीच ऐकले नाही," असं ते पुढे म्हणाले. ३ फेब्रुवारी रोजी इस्लाममध्ये पवित्र समजण्यात येणारी शब-ए-बरात होती.
स्थानिक काँग्रेस नगरसेविका रुबीना खान, ज्यांनी या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शाळा प्रशासनाची भेट घेतली, त्यांनी सांगितले की, शाळेने वर्गांमध्येही मुस्लिम आणि हिंदू विद्यार्थ्यांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था केली असल्याचे त्यांना कळवण्यात आले.
शाळा प्रशासनाने पुढे केले शब-ए-बारातचे कारण
शाळेचे ॲडमिशन ऑफिसर जॉय जोसेफ म्हणाले, "आम्ही दोन वेगवेगळ्या दिवशी वार्षिक कार्यक्रम घेतले कारण ३ फेब्रुवारीला शब-ए-बारात होती. आम्हाला वाटले की त्या दिवशी मुस्लिम विद्यार्थी कार्यक्रमाला येऊ शकणार नाहीत, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी २ फेब्रुवारीला वेगळा कार्यक्रम आयोजित केला. आम्ही दरवर्षी एका ठराविक तारखेलाच वार्षिक कार्यक्रम घेतो, त्यामुळे आम्ही तो बदलला नाही." तथापि, विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की शाळेने यापूर्वीही अशाच प्रकारे भेदभाव केला आहे.
"गेल्या वर्षीही शाळेने असाच भेदभाव केला होता. शाळेच्या वार्षिक मासिकात त्यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांची फक्त पहिली नावे छापली होती, तर हिंदू विद्यार्थ्यांची पूर्ण नावे प्रसिद्ध केली होती. पालकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला, त्यानंतर शाळेला बदल करण्यास भाग पाडले गेले," असे सय्यद कासिम अली यांनी सांगितले. सध्या त्यांचा पुतण्या याच शाळेत शिकतो आणि त्यांनी याप्रकाराबाबत सीएम हेल्पलाइनद्वारे तक्रार दाखल केली आहे.
अश्या प्रकारची ही देशातील पहिला घटना नाही. पश्चिम बंगालमध्ये जवळपास २५ वर्षे वेगवेगळ्या धार्मिक गटांच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे माध्यान्ह भोजन दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. शाळेत जेवण बनवण्यासाठी वेगळी स्वयंपाकघरे आणि भांडी होती, दोन आचारी एकाच गॅस कनेक्शनचा वापर करत होते. हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये बसवण्यात येत असल्याचा आरोप २०१८ मध्ये दिल्लीतील एका प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी केला होता.
(सौजन्य - न्यूजलॉन्ड्री)






