संजना खंडारे
- महाराष्ट्राच्या शिक्षण नकाशावर “यशाची राजधानी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लातूर पॅटर्न’वर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण, देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात RCC क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आहे.
- तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका मोटेगावकर यांच्यापर्यंत परीक्षेच्या तब्बल दहा दिवस आधीच पोहोचली होती. एकेकाळी “टॉपर घडवणारा लातूर पॅटर्न” म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोचिंग संस्कृतीकडे आता संशयाने पाहिलं जात आहे.
- ‘बाईमाणूस’च्या या विशेष रिपोर्टमध्ये लातूर पॅटर्नचा इतिहास, RCC नेटवर्कचा विस्तार, मोटेगावकरांचा प्रभाव आणि नीट पेपरफुटी प्रकरणातील धक्कादायक कनेक्शनचा घेतलेला सविस्तर आढावा…
लातूर…महाराष्ट्राच्या शिक्षण नकाशावर “यशाची राजधानी” म्हणून ओळखलं जाणारं एक शहर. दरवर्षी हजारो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन इथे येतात. पालक कर्ज काढतात, शेती विकतात, मुलांच्या भविष्याकरता आयुष्याची पुंजी खर्च करतात. कारण एकच, हाच “लातूर पॅटर्न” मुलाचं आयुष्य बदलू शकतो, असा त्यांचा विश्वास.
मात्र, आज त्याच लातूर पॅटर्नवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या प्रतिष्ठित अशा RCC क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना आज सीबीआयने अटक केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या तब्बल दहा दिवस आधीच मोटेगावकर यांच्यापर्यंत पोहोचली होती. एकेकाळी टॉपर घडवणाऱ्या लातूरच्या कोचिंग संस्कृतीकडे आता त्याचमुळे संशयाने पाहिलं जात असून, “रिझल्टच्या शर्यतीत शिक्षण व्यवस्थेने नैतिकतेची सीमाच ओलांडली का?” हा प्रश्न आता देशभरातून विचारला जातोय.
‘बाईमाणूस’च्या या विशेष रिपोर्टमध्ये नेमका “लातूर पॅटर्न” कसा उभा राहिला, उदगीरपासून लातूरपर्यंत त्याचा प्रवास कसा झाला, RCCसारख्या कोचिंग नेटवर्कचा विस्तार कसा वाढत गेला, शिवराज मोटेगावकर यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रभाव कसा निर्माण झाला आणि आता नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात कोणते धक्कादायक धागेदोरे समोर येत आहेत, याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे.
लातूरच्या RCCवर सीबीआयची कारवाई; शिवराज मोटेगावकर अटकेत
नीट पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक, पुण्यानंतर आता लातूरमधील कनेक्शन अधिक गडद होताना दिसतंय. लातूरमधील प्रसिद्ध RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणते क्लासेस, प्राध्यापक किंवा संस्थाचालक सहभागी आहेत का, याचाही तपास सीबीआयकडून केला जातोय. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 3 मे रोजी होणाऱ्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका मोटेगावकर यांच्याकडे तब्बल 23 एप्रिललाच पोहोचली होती. त्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरंही सापडल्याचा दावा तपास यंत्रणांनी केलाय.

सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर मोटेगावकर यांनी मोबाईलमधील डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न केला, मात्र फॉरेन्सिक तपासात तो डेटा पुन्हा रिकव्हर करण्यात आला. याशिवाय, फुटलेला पेपर विवेक पाटीलसह अनेकांना पुरवल्याचाही संशय तपासातून व्यक्त केला जातोय. दरम्यान, एनटीएने यंदाची नीट परीक्षा रद्द करत नव्याने 21 जून रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात तब्बल 11 तास चौकशी केल्यानंतर मोटेगावकरांना अटक करण्यात आली असून, सीबीआयचे पथक पुन्हा RCC च्या लातूर कार्यालयात तपास करतंय. या संपूर्ण कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळली जात असून, सीबीआयकडून सलग छापेमारी आणि चौकशी सुरू असल्याने आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
मोटेगावकर यांचं नाव सीबीआयच्या रडारवर कसं आलं?
मोटेगावकर यांचं नाव सीबीआयच्या रडारवर कसं आलं? याचाही एक मोठा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून लातूरमधीलच पी. व्ही. कुलकर्णी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. कुलकर्णी यांच्या कसून केलेल्या चौकशीतूनच शिवराज मोटेगावकर यांचं नाव समोर आलं होतं. तसेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. ज्यामध्ये मोटेगावकर हे एका विद्यार्थिनीशी बोलत होते की, “पेपर मध्ये मी सांगितलेले किती प्रश्न आले होते.” त्यानुसार सीबीआयनं चक्रं फिरवली अन् त्यांची चौकशी केली. त्यानंतर आता त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.
दोन दशकांत उभं राहिलेलं RCCचं कोचिंग साम्राज्य
लातूरच्या कोचिंग संस्कृतीतून उभं राहिलेलं RCC नेटवर्क हे गेल्या दोन दशकांत महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली कोचिंग ब्रँडपैकी एक बनलं. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी लातूरमध्ये मर्यादित स्वरूपात सुरू केलेले क्लासेस पुढे NEET आणि JEE सारख्या स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रीत करत मोठ्या नेटवर्कमध्ये रूपांतरित झालं. लातूर पॅटर्नच्या यशाचा आधार घेत मोटेगावकर यांनी “रिझल्ट ओरिएंटेड” शिक्षण पद्धतीवर भर दिला. सातत्याने टेस्ट सिरीज, रँकिंग सिस्टिम, टॉपर विद्यार्थ्यांची निर्मिती आणि आक्रमक मार्केटिंग यांच्या जोरावर RCC ने विद्यार्थ्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली.

सुरुवातीला लातूरपुरतं मर्यादित असलेलं हे नेटवर्क पुढे पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, पिंपरी-चिंचवड, हडपसर आणि अकोला अशा शहरांमध्ये विस्तारलं. विशेष म्हणजे, स्पर्धा परीक्षांमध्ये अधिकाधिक यश मिळवण्यासाठी RCC ने उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि हरियाणा यांसारख्या राज्यांतून अनुभवी शिक्षकांना आणण्यास सुरुवात केली. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी शिकवणाऱ्या या शिक्षकांना लाखोंच्या पॅकेजवर नियुक्त केलं जात असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात होती.
याशिवाय, NEET आणि JEE मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मोठमोठे होर्डिंग, शहरभर लागणाऱ्या जाहिराती, “AIR Rankers”, “Mission MBBS”, “Topper from RCC” अशा मोहिमांमुळे RCC हे केवळ क्लासेस न राहता एक मोठं ‘कोचिंग साम्राज्य’ बनलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी “डॉक्टर बनण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग” अशी प्रतिमा RCC ने तयार केली आणि त्यातूनच शिवराज मोटेगावकर यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रभाव झपाट्याने वाढत गेला.
लातूर पॅटर्नपासून नीट पेपरफुटीपर्यंत; सीबीआयच्या रडारवर शिक्षण क्षेत्र
लातूरचे पत्रकार आणि लातूर पॅटर्नचा अभ्यास व मागोवा घेत आलेले सुनील कांबळे यांच्याशी ‘बाईमाणूस’ने संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले, “लातूर पॅटर्न”ची सुरुवात प्रत्यक्षात उदगीरमधून झाली. उदगीरमधील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात रात्रीच्या विशेष अभ्यासिका आणि कठोर सरावाच्या माध्यमातून विद्यार्थी राज्यात अव्वल येऊ लागले आणि त्याच पद्धतीचा अवलंब १९८० च्या दशकात लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने केला. दिवंगत खासदार जनार्दन वाघमारे, प्राचार्य अनिरुद्ध जाधव आणि कावळे सर यांनी उदगीरचा अभ्यास पॅटर्न आत्मसात करत दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा-केंद्रित शिक्षण व्यवस्था उभी केली आणि त्यातून “लातूर पॅटर्न” देशभर प्रसिद्ध झाला. मात्र, काळ बदलत गेला तस तसं बोर्डाकडून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा बंद झाली आणि महाविद्यालयांचं विद्यार्थ्यांकडे लक्ष कमी होत गेलं. याचाच फायदा घेत खाजगी कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणावर वाढले आणि लातूरमध्ये कोचिंग संस्कृतीचं व्यापारीकरण सुरू झालं. या वाढत्या स्पर्धेतूनच अविनाश चव्हाण हत्याकांडासारखी घटना घडली."
सुनील कांबळे पुढे म्हणाले, "गेल्या काही वर्षांत नीट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत असतानाच नीट पेपरफुटीच्या पाचही प्रकरणांमध्ये सातत्यानं लातूर कनेक्शन समोर आलं. जून २०२४ मधील प्रकरणात दोन शिक्षक आणि एका खासगी संस्थाचालकाचा संबंध समोर आला होता, तर त्यावेळी सीबीआयने महिनाभर लातूरमध्ये तळ ठोकून तपास केला होता. आता पुन्हा या प्रकरणात एनटीएशी संबंधित आणि दयानंद महाविद्यालयाचे माजी रसायनशास्त्र प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांची चौकशी करण्यात आली. कुलकर्णी हे पेपर सेटिंग प्रक्रियेशी संबंधित असल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर सीबीआयने RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली. सुरुवातीला आठ ते नऊ तास चौकशी करून लॅपटॉप, मोबाईल आणि कागदपत्रं जप्त करण्यात आली. पुढे पुण्यात तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर सीबीआयला मोटेगावकरांचा नीट पेपरफुटी प्रकरणात सहभाग असल्याचा संशय बळावला. विशेष म्हणजे, नीट परीक्षेच्या तब्बल दहा दिवस आधीच प्रश्नपत्रिका मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये सापडल्याचा खळबळजनक दावा सीबीआयने केलाय. त्यामुळे केवळ लातूरच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात आणखी काही राजकीय व्यक्ती, संस्थाचालक किंवा शिक्षण क्षेत्रातील मोठी नावं सहभागी आहेत का, याचा तपास आता सीबीआयकडून सुरू आहे."
फक्त ३ हजार फी घेणाऱ्या अविनाश चव्हाण सरांची हत्या का झाली?
लातूरमधील 'स्टेप बाय स्टेप' कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांची २४ जून २०१८ रोजी रात्री व्यावसायिक स्पर्धेतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अविनाश चव्हाण (वय ३५) हे लातूरमध्ये ५ कोचिंग क्लासेस चालवत होते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रति विषय अवघ्या ३,००० रुपयात शिकवणी घेत असत, तर इतर क्लास चालक प्रति विषय २०,००० रुपये घेत होते. त्यांनी उत्कृष्ट निकाल देणाऱ्या विद्यार्थ्यांना ११,००० रुपयांपासून ते तब्बल १ कोटी रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या धोरणामुळे आणि प्रचंड लोकप्रियतेमुळे लातुरातल्या कोचिंग क्लासेसच्या आर्थिक बाजारपेठेत खळबळ उडाली होती.

त्यांचाच पूर्वीचा व्यावसायिक भागीदार चंदनकुमार शर्मा याच्या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. चंदनकुमार शर्मा याने अविनाश यांच्या प्रगतीचा मत्सर करून त्यांना संपवण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने मारेकऱ्यांना ८.५ लाखांची सुपारी दिली. २४ जून २०१८ रोजी रात्री सव्वा बारा ते दीडच्या दरम्यान अविनाश चव्हाण आपल्या कारने घरी परतत असताना, शिवाजी हायस्कूलजवळ (रेव्हेन्यू कॉलनी) हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. छातीत गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येने लातूरच्या 'लातूर पॅटर्न' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. तपासानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी चंदनकुमार शर्मा आणि इतर मारेकऱ्यांसह ५ जणांना अटक केली.
रिझल्टच्या रेस”मध्ये हरवत चाललेली नैतिकता?
एकेकाळी महाराष्ट्राला टॉपर देणारा “लातूर पॅटर्न” आज शिक्षणाच्या व्यापारीकरणाचं मोठं उदाहरण ठरत असल्याची टीका आता शिक्षण क्षेत्रातूनच होऊ लागलीये. NEET, JEE आणि बोर्डाच्या निकालांच्या शर्यतीत विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण वाढताना दिसतोय. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत अभ्यास, सततच्या टेस्ट, रँकिंग आणि स्पर्धा यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं बालपणच हरवत चालल्याची भावना व्यक्त केली जातेय. शहरभर लागलेले मोठमोठे होर्डिंग, “AIR Rankers”, “NEET Toppers”, “Selection Guaranteed”, “Results Speak”, “Mission MBBS”, “90% Students Qualified” अशा जाहिरातींनी कोचिंग संस्कृतीचं रूप पूर्णपणे बदललं. काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांच्या फोटोसह “Future Doctor”, “Proud Topper of Latur Pattern” असे मजकूर झळकताना दिसतात.

निकाल आणि रँक यांनाच यशाचं अंतिम मोजमाप मानलं जाऊ लागल्याने शिक्षणातील नैतिकता, ज्ञान आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास मागे पडला. “डॉक्टर बनवण्याची फॅक्टरी” अशी उपमा आता लातूरच्या कोचिंग संस्कृतीला दिली जातेय. विशेष म्हणजे, लातूर पॅटर्नची सुरुवात विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत आणण्यासाठी झाली होती, मात्र कालांतराने त्याच पॅटर्नचं रूपांतर गुण, रँक आणि जाहिरातींच्या आक्रमक बाजारात झाल्याचं चित्र आता समोर येतंय.
एकेकाळी महाराष्ट्राला टॉपर देणारा आणि ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर-इंजिनिअर बनण्याचं स्वप्न दाखवणारा “लातूर पॅटर्न” आज देशातील सर्वात मोठ्या परीक्षा घोटाळ्याच्या तपासाच्या केंद्रस्थानी उभा आहे. प्रश्न केवळ एका पेपरफुटीचा नाही, तर शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या व्यापारीकरणाचा, रिझल्टच्या अंधाधुंद स्पर्धेचा आणि हरवत चाललेल्या नैतिकतेचाही आहे. सीबीआयचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र, या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचं आणि त्यांच्या स्वप्नांचं नेमकं काय?






