Skip to main content

‘मिशन MBBS’पासून सीबीआय चौकशीपर्यंत; ‘लातूर पॅटर्न’च्या साम्राज्याचं गूढ

Sanjana Khandare
18 May 2026
4 min read
13 views
‘मिशन MBBS’पासून सीबीआय चौकशीपर्यंत; ‘लातूर पॅटर्न’च्या साम्राज्याचं गूढ

संजना खंडारे 


  • महाराष्ट्राच्या शिक्षण नकाशावर “यशाची राजधानी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लातूर पॅटर्न’वर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण, देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात RCC क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आहे.


  • तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका मोटेगावकर यांच्यापर्यंत परीक्षेच्या तब्बल दहा दिवस आधीच पोहोचली होती. एकेकाळी “टॉपर घडवणारा लातूर पॅटर्न” म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोचिंग संस्कृतीकडे आता संशयाने पाहिलं जात आहे.


  • ‘बाईमाणूस’च्या या विशेष रिपोर्टमध्ये लातूर पॅटर्नचा इतिहास, RCC नेटवर्कचा विस्तार, मोटेगावकरांचा प्रभाव आणि नीट पेपरफुटी प्रकरणातील धक्कादायक कनेक्शनचा घेतलेला सविस्तर आढावा…



लातूर…महाराष्ट्राच्या शिक्षण नकाशावर “यशाची राजधानी” म्हणून ओळखलं जाणारं एक शहर. दरवर्षी हजारो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन इथे येतात. पालक कर्ज काढतात, शेती विकतात, मुलांच्या भविष्याकरता आयुष्याची पुंजी खर्च करतात. कारण एकच, हाच  “लातूर पॅटर्न” मुलाचं आयुष्य बदलू शकतो, असा त्यांचा विश्वास.


मात्र, आज त्याच लातूर पॅटर्नवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या प्रतिष्ठित अशा RCC क्लासेसचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना आज सीबीआयने अटक केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या तब्बल दहा दिवस आधीच मोटेगावकर यांच्यापर्यंत पोहोचली होती. एकेकाळी टॉपर घडवणाऱ्या लातूरच्या कोचिंग संस्कृतीकडे आता त्याचमुळे संशयाने पाहिलं जात असून, “रिझल्टच्या शर्यतीत शिक्षण व्यवस्थेने नैतिकतेची सीमाच ओलांडली का?” हा प्रश्न आता देशभरातून विचारला जातोय.  


‘बाईमाणूस’च्या या विशेष रिपोर्टमध्ये नेमका “लातूर पॅटर्न” कसा उभा राहिला, उदगीरपासून लातूरपर्यंत त्याचा प्रवास कसा झाला, RCCसारख्या कोचिंग नेटवर्कचा विस्तार कसा वाढत गेला, शिवराज मोटेगावकर यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रभाव कसा निर्माण झाला आणि आता नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात कोणते धक्कादायक धागेदोरे समोर येत आहेत, याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. 



लातूरच्या RCCवर सीबीआयची कारवाई; शिवराज मोटेगावकर अटकेत 


नीट पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक, पुण्यानंतर आता लातूरमधील कनेक्शन अधिक गडद होताना दिसतंय. लातूरमधील प्रसिद्ध RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणते क्लासेस, प्राध्यापक किंवा संस्थाचालक सहभागी आहेत का, याचाही तपास सीबीआयकडून केला जातोय. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 3 मे रोजी होणाऱ्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका मोटेगावकर यांच्याकडे तब्बल 23 एप्रिललाच पोहोचली होती. त्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरंही सापडल्याचा दावा तपास यंत्रणांनी केलाय. 



User Image


सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर मोटेगावकर यांनी मोबाईलमधील डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न केला, मात्र फॉरेन्सिक तपासात तो डेटा पुन्हा रिकव्हर करण्यात आला. याशिवाय, फुटलेला पेपर विवेक पाटीलसह अनेकांना पुरवल्याचाही संशय तपासातून व्यक्त केला जातोय. दरम्यान, एनटीएने यंदाची नीट परीक्षा रद्द करत नव्याने 21 जून रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. पुण्यात तब्बल 11 तास चौकशी केल्यानंतर मोटेगावकरांना अटक करण्यात आली असून, सीबीआयचे पथक पुन्हा RCC च्या लातूर कार्यालयात तपास करतंय. या संपूर्ण कारवाईबाबत मोठी गुप्तता पाळली जात असून, सीबीआयकडून सलग छापेमारी आणि चौकशी सुरू असल्याने आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.



मोटेगावकर यांचं नाव सीबीआयच्या रडारवर कसं आलं?


मोटेगावकर यांचं नाव सीबीआयच्या रडारवर कसं आलं? याचाही एक मोठा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून लातूरमधीलच पी. व्ही. कुलकर्णी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. कुलकर्णी यांच्या कसून केलेल्या चौकशीतूनच शिवराज मोटेगावकर यांचं नाव समोर आलं होतं. तसेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला. ज्यामध्ये  मोटेगावकर हे एका विद्यार्थिनीशी बोलत होते की, “पेपर मध्ये मी सांगितलेले किती प्रश्न आले होते.” त्यानुसार सीबीआयनं चक्रं फिरवली अन् त्यांची चौकशी केली. त्यानंतर आता त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. 



दोन दशकांत उभं राहिलेलं RCCचं कोचिंग साम्राज्य


लातूरच्या कोचिंग संस्कृतीतून उभं राहिलेलं RCC नेटवर्क हे गेल्या दोन दशकांत महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली कोचिंग ब्रँडपैकी एक बनलं. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी लातूरमध्ये मर्यादित स्वरूपात सुरू केलेले क्लासेस पुढे NEET आणि JEE सारख्या स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रीत करत मोठ्या नेटवर्कमध्ये रूपांतरित झालं. लातूर पॅटर्नच्या यशाचा आधार घेत मोटेगावकर यांनी “रिझल्ट ओरिएंटेड” शिक्षण पद्धतीवर भर दिला. सातत्याने टेस्ट सिरीज, रँकिंग सिस्टिम, टॉपर विद्यार्थ्यांची निर्मिती आणि आक्रमक मार्केटिंग यांच्या जोरावर RCC ने विद्यार्थ्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. 



User Image


सुरुवातीला लातूरपुरतं मर्यादित असलेलं हे नेटवर्क पुढे पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, पिंपरी-चिंचवड, हडपसर आणि अकोला अशा शहरांमध्ये विस्तारलं. विशेष म्हणजे, स्पर्धा परीक्षांमध्ये अधिकाधिक यश मिळवण्यासाठी RCC ने उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान आणि हरियाणा यांसारख्या राज्यांतून अनुभवी शिक्षकांना आणण्यास सुरुवात केली. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी शिकवणाऱ्या या शिक्षकांना लाखोंच्या पॅकेजवर नियुक्त केलं जात असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात होती. 


याशिवाय, NEET आणि JEE मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे मोठमोठे होर्डिंग, शहरभर लागणाऱ्या जाहिराती, “AIR Rankers”, “Mission MBBS”, “Topper from RCC” अशा मोहिमांमुळे RCC हे केवळ क्लासेस न राहता एक मोठं ‘कोचिंग साम्राज्य’ बनलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी “डॉक्टर बनण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग” अशी प्रतिमा RCC ने तयार केली आणि त्यातूनच शिवराज मोटेगावकर यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रभाव झपाट्याने वाढत गेला. 



लातूर पॅटर्नपासून नीट पेपरफुटीपर्यंत; सीबीआयच्या रडारवर शिक्षण क्षेत्र


लातूरचे पत्रकार आणि लातूर पॅटर्नचा अभ्यास व मागोवा घेत आलेले सुनील कांबळे यांच्याशी ‘बाईमाणूस’ने संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले, “लातूर पॅटर्न”ची सुरुवात प्रत्यक्षात उदगीरमधून झाली. उदगीरमधील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात रात्रीच्या विशेष अभ्यासिका आणि कठोर सरावाच्या माध्यमातून विद्यार्थी राज्यात अव्वल येऊ लागले आणि त्याच पद्धतीचा अवलंब १९८० च्या दशकात लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाने केला. दिवंगत खासदार जनार्दन वाघमारे, प्राचार्य अनिरुद्ध जाधव आणि कावळे सर यांनी उदगीरचा अभ्यास पॅटर्न आत्मसात करत दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा-केंद्रित शिक्षण व्यवस्था उभी केली आणि त्यातून “लातूर पॅटर्न” देशभर प्रसिद्ध झाला. मात्र, काळ बदलत गेला तस तसं बोर्डाकडून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराची परंपरा बंद झाली आणि महाविद्यालयांचं विद्यार्थ्यांकडे लक्ष कमी होत गेलं. याचाच फायदा घेत खाजगी कोचिंग क्लासेस मोठ्या प्रमाणावर वाढले आणि लातूरमध्ये कोचिंग संस्कृतीचं व्यापारीकरण सुरू झालं. या वाढत्या स्पर्धेतूनच अविनाश चव्हाण हत्याकांडासारखी घटना घडली."


सुनील कांबळे पुढे म्हणाले, "गेल्या काही वर्षांत नीट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटत असतानाच नीट पेपरफुटीच्या पाचही प्रकरणांमध्ये सातत्यानं लातूर कनेक्शन समोर आलं. जून २०२४ मधील प्रकरणात दोन शिक्षक आणि एका खासगी संस्थाचालकाचा संबंध समोर आला होता, तर त्यावेळी सीबीआयने महिनाभर लातूरमध्ये तळ ठोकून तपास केला होता. आता पुन्हा या प्रकरणात एनटीएशी संबंधित आणि दयानंद महाविद्यालयाचे माजी रसायनशास्त्र प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांची चौकशी करण्यात आली. कुलकर्णी हे पेपर सेटिंग प्रक्रियेशी संबंधित असल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर सीबीआयने RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली. सुरुवातीला आठ ते नऊ तास चौकशी करून लॅपटॉप, मोबाईल आणि कागदपत्रं जप्त करण्यात आली. पुढे पुण्यात तब्बल दहा तास चौकशी केल्यानंतर सीबीआयला मोटेगावकरांचा नीट पेपरफुटी प्रकरणात सहभाग असल्याचा संशय बळावला. विशेष म्हणजे, नीट परीक्षेच्या तब्बल दहा दिवस आधीच प्रश्नपत्रिका मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये सापडल्याचा खळबळजनक दावा सीबीआयने केलाय. त्यामुळे केवळ लातूरच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात आणखी काही राजकीय व्यक्ती, संस्थाचालक किंवा शिक्षण क्षेत्रातील मोठी नावं सहभागी आहेत का, याचा तपास आता सीबीआयकडून सुरू आहे." 



फक्त ३ हजार फी घेणाऱ्या अविनाश चव्हाण सरांची हत्या का झाली? 


लातूरमधील 'स्टेप बाय स्टेप' कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांची २४ जून २०१८ रोजी रात्री व्यावसायिक स्पर्धेतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अविनाश चव्हाण (वय ३५) हे लातूरमध्ये ५ कोचिंग क्लासेस चालवत होते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रति विषय अवघ्या ३,००० रुपयात शिकवणी घेत असत, तर इतर क्लास चालक प्रति विषय २०,००० रुपये घेत होते.  त्यांनी उत्कृष्ट निकाल देणाऱ्या विद्यार्थ्यांना ११,००० रुपयांपासून ते तब्बल १ कोटी रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे देण्याची घोषणा केली होती.  त्यांच्या या धोरणामुळे आणि प्रचंड लोकप्रियतेमुळे लातुरातल्या कोचिंग क्लासेसच्या आर्थिक बाजारपेठेत खळबळ उडाली होती. 



User Image


त्यांचाच पूर्वीचा व्यावसायिक भागीदार चंदनकुमार शर्मा याच्या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. चंदनकुमार शर्मा याने अविनाश यांच्या प्रगतीचा मत्सर करून त्यांना संपवण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने मारेकऱ्यांना ८.५ लाखांची सुपारी दिली.  २४ जून २०१८ रोजी रात्री सव्वा बारा ते दीडच्या दरम्यान अविनाश चव्हाण आपल्या कारने घरी परतत असताना, शिवाजी हायस्कूलजवळ (रेव्हेन्यू कॉलनी) हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. छातीत गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येने लातूरच्या 'लातूर पॅटर्न' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. तपासानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी चंदनकुमार शर्मा आणि इतर मारेकऱ्यांसह ५ जणांना अटक केली. 



रिझल्टच्या रेस”मध्ये हरवत चाललेली नैतिकता?


एकेकाळी महाराष्ट्राला टॉपर देणारा “लातूर पॅटर्न” आज शिक्षणाच्या व्यापारीकरणाचं मोठं उदाहरण ठरत असल्याची टीका आता शिक्षण क्षेत्रातूनच होऊ लागलीये. NEET, JEE आणि बोर्डाच्या निकालांच्या शर्यतीत विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण वाढताना दिसतोय. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत अभ्यास, सततच्या टेस्ट, रँकिंग आणि स्पर्धा यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं बालपणच हरवत चालल्याची भावना व्यक्त केली जातेय. शहरभर लागलेले मोठमोठे होर्डिंग, “AIR Rankers”, “NEET Toppers”, “Selection Guaranteed”, “Results Speak”, “Mission MBBS”, “90% Students Qualified” अशा जाहिरातींनी कोचिंग संस्कृतीचं रूप पूर्णपणे बदललं. काही ठिकाणी तर विद्यार्थ्यांच्या फोटोसह “Future Doctor”, “Proud Topper of Latur Pattern” असे मजकूर झळकताना दिसतात.



User Image


निकाल आणि रँक यांनाच यशाचं अंतिम मोजमाप मानलं जाऊ लागल्याने शिक्षणातील नैतिकता, ज्ञान आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास मागे पडला.  “डॉक्टर बनवण्याची फॅक्टरी” अशी उपमा आता लातूरच्या कोचिंग संस्कृतीला दिली जातेय. विशेष म्हणजे, लातूर पॅटर्नची सुरुवात विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेत आणण्यासाठी झाली होती, मात्र कालांतराने त्याच पॅटर्नचं रूपांतर गुण, रँक आणि जाहिरातींच्या आक्रमक बाजारात झाल्याचं चित्र आता समोर येतंय.


एकेकाळी महाराष्ट्राला टॉपर देणारा आणि ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर-इंजिनिअर बनण्याचं स्वप्न दाखवणारा “लातूर पॅटर्न” आज देशातील सर्वात मोठ्या परीक्षा घोटाळ्याच्या तपासाच्या केंद्रस्थानी उभा आहे. प्रश्न केवळ एका पेपरफुटीचा नाही, तर शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या व्यापारीकरणाचा, रिझल्टच्या अंधाधुंद स्पर्धेचा आणि हरवत चाललेल्या नैतिकतेचाही आहे. सीबीआयचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र, या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचं आणि त्यांच्या स्वप्नांचं नेमकं काय?


Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...