विनोद टी.
- एरवी, ढोल-ताशे बडवून, इतिहासाचे गोडवे गाऊन, रोशणाई आणि आतशबाजी करून दिवस साजरा करता येतो, पण यंदाच्या महाराष्ट्र दिनाला किनार आहे ती, मराठवाडा-विदर्भातल्या भीषण दुष्काळाची आणि कामगार दिनाला संदर्भ आहे तो, वर्षागणिक बेदखल होत चाललेल्या संघटित-असंघटित श्रमिकांची.
- या घटकेला दुष्काळी भागातून उद्याच्या आशेवर शहरांकडे स्थलांतर करणाऱ्या चिंताग्रस्त कुटुंबांची संख्या वाढतेच आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा आनंद साजरा करताना त्यांच्या कष्टप्रद जगण्याची दखल घेणे, हे सहवेदना जपणे आहे…
गावात पानी नाई… रोजंदारी बी नाई… रोजगार हमीचे कामंई बंद पडले हाये… मंग काय कराव? जीव देल्ल्यापेक्षा अथीसा आलो…
झाडाच्या सावलीच्या गारव्यातून बाहेरच्या उन्हाकडे किलकिल्या डोळ्यांनी पाहात यवतमाळमधील राळेगाव भागातून आलेला शालीक शिंदे सांगत होता.
जगण्याच्या त्याच्या संघर्षाची पुसटशी कल्पनाही नसलेली बोलक्या डोळ्यांची चार-पाच वर्षांची छोकरी, त्याच्या गळ्याभोवती हात टाकून त्याच्या पाठीवर खेळत होती. आज सकाळीच शालीक आणि त्याच्या गावातले दहा-बारा जण विदर्भ एक्सप्रेसने आपापल्या कुटुंबांचं लटांबर घेऊन नवी मुंबईत दाखल झाले होते. सिवूड्स रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या डेब्रीजच्या ढिगाऱ्यावरच त्यांनी काठ्या आणि चादरींचा आडोसा बनवला होता. सोबत आलेल्या बायकांची डोक्यावरून आणलेला टीचभर संसार मांडण्याची लगबग सुरू होती.
रात्रभराच्या प्रवासाचा शीण घालवत शालीक आणि इतर काही जण रस्त्याशेजारच्या फूटपाथवरच सावलीला बसलेले होते. काही वेळापूर्वीच रोजगारासाठी नेरूळ नाक्यावर गेलेले, आणि रोजगार मिळाला नाही म्हणून परत आलेले... यातल्या प्रत्येकाची गावी थोडीबहुत कोरडवाहू शेतजमीन आहे. पाऊस बरा झाला, तर कापूस आणि सोयाबीन पिकं घेतो. बाकी उरलेल्या काळात गावातच शेतमजुरी करतो, असे जवळच बसलेला प्रभाकर शिंदे म्हणाला.

‘’भेटंन ते काम कराचं… त्याच्यावर गुजारा कराचा.’’
‘’यंदा पान्याचे भलकशेच हाल हून रायले… अथिसा बरसातीपर्यंत दोन म्हैने काढाचे… भेटंन ते काम कराचं… त्याच्यावर गुजारा कराचा.’’
प्रभाकरचीच री ओढत त्याच्या शेजारीच पोटाखाली चादर घेऊन उकिडवे झोपलेले केरबा सांगू लागले. सुरकुतलेला चेहरा, पांढरे केस आणि दाढीचे वाढलेले खुंट पाहून विचारलं, ‘काय वय आहे तुमचं?’ तर म्हणाले, सत्तरला दोन कमी... मग एवढ्या वयातही कामासाठी गाव सोडून आलात, या प्रश्नावर केरबा कसनुसं हसत म्हणाले, मंग काय कराव सायेब… जिंदा राहाले आलो, या पोराहिच्या संगं… एवढं बोलून थांबले. पण पुढे काय बोलावं, हे नं कळल्याने, मग बराच वेळ माझ्याकडे बघत मंद हसत राहिले... पण त्या वृद्ध हसऱ्या चेहऱ्यामागची वेदना त्यांना लपवता आली नाही…
मुंबईच्या पुलांखालचं स्थलांतरित कामगारांच जग
ग्रामीण भागात दुष्काळ असा सर्वांनाच चहुबाजूने खायला उठलाय. पाणी नाही म्हणून कामं नाहीत, कामं नाहीत म्हणून पैसा नाही, पैसा नाही म्हणून पोटाला अन्न नाही. माणसं नुसती कावून गेलीत. त्यांचा धीर सुटतोय. तरीही कसंही करून जगायचंय, या एकमेव ध्येयापोटी पाण्याअभावी कासावीस झालेल्या या जिवांचे लोंढे शहरांकडे येताहेत. नवी मुंबईच्या सानपाडा पुलाखाली, वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरील फुटपाथवर, सिवुड्स रेल्वे स्थानकाशेजारील उकिरड्यावर, कळंबोलीच्या मुख्य चौकातील पुलाखाली, जशी जागा मिळेल तशी माणसं मराठवाड्यातून, विदर्भातून, आणखी कुठून कुठून येताहेत.
या जागांची निवड करण्यामागे प्रमुख कारण म्हणजे, या ठिकाणांच्या जवळच त्या त्या परिसरातले कामगार नाके आहेत. सकाळी यातली जाणती मंडळी नाका कामगार म्हणून रोजगार शोधायला जातात. कुणाला काम मिळतं, कुणाला मिळत नाही. मग काम न मिळालेले पुन्हा आपल्या आडोशाकडे येतात. पुढचा उरलेला दिवस उपाशीपोटी पडून घालवतात. कोणतीही कला नसलेला हा अकुशल कामगार वर्ग. त्यामुळे कुठं गवंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून, कुणी एखाद्या मुकादमासोबत हरकाम्या म्हणून रोजंदारी करतात. पण इथंही त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार संपलेले नसतात.
सानपाड्याच्या पुलाखाली पंधरा दिवसांपूर्वी आपला भाऊ आणि वहिनीसोबत आलेला राजू रुमाले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून गळ्यातल्या गमछ्याशी चाळा करत विचारमग्न अवस्थेत बसला होता. यवतमाळमधल्या महागाव तालुक्यातील उटी गावातून आलेला हा राजू आठ दिवसांपासून एका मुकादमासोबत इमारतीच्या स्लॅब टाकण्याच्या कामावर लागला होता. दिवसाला ३०० रुपये याप्रमाणे पाच दिवस त्याने मुकादमाकडे सलग काम केलं.
शेटले पैशे मांगतले, तं देतो म्हनते, पन अजून काई देल्ले नाई…
त्यावर मी त्याला विचारलं, आता काय करणार? तर म्हणाला,
पैशे नाई द्यून रायला म्हनून तीन दिवसापासून त्याच्या इथं कामाले नाई गेलो. काल दुसऱ्या जागी काम भेटलं… आता सांजीले जाऊन पायतो पैशे देते काय तं…

पाच दिवसांचे १५०० रुपये दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या राजूसाठी मोठी रक्कम होती. मात्र दुष्काळी भागातून आलेला हा पोरगा जातोय कुठं, असा विचार करत त्याच्या मुकादमाने त्याला पैशासाठी तंगवला होता. कदाचित त्या पैशातून त्याला आपल्या तीन वर्षांच्या पुतणीला काहीतरी खायला आणावसं वाटत असेल, तिला एखादं खेळणं घ्यावं असंही मनात असेल, कदाचित स्वत:साठी काहीतरी घ्यावं असं त्याला वाटत असेल. पण पैसे मिळाल्याशिवाय यातलं काहीही घडणार नाही.
दुष्काळग्रस्तांच्या परिस्थितीचा आम्ही शहरी लोक कसा गैरफायदा घेतो, याचं आणखी एक उदाहरण नांदेडहून आलेल्या माणिकच्या बोलण्यातून समोर आलं. माणिक गेली चार-पाच वर्षे या दिवसांत नवी मुंबईत रोजगारासाठी येतो. सिवूड्स स्थानकाशेजारी दरावे नावाचे एक गावठाण आहे. य गावातल्या तरुणांचं एक टोळकं दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या या लोकांकडून इथे राहण्याच्या बदल्यात जबरदस्तीने महिन्याला प्रत्येकी शंभर रुपये वसूल करतं. का तर म्हणे, आमच्या जागेवर येऊन राहता, म्हणून ही वसुली. का उगा वाद घालायचा म्हणून आम्ही पैशे देतो. तसं बी दुसरीकडं कुटं जानार.
भाड्यानं रुम घेयाची म्हनलं, तर दहा हजार रुपये डिपाजीट मागतात. आता सायेब एवडे पैशे आसते, तर गावीच ऱ्हायलो असतो की? माणिकचा सवाल बिनतोड होता. त्याच्या म्हणण्याला त्याच्या सोबतच्या लोकांनीही मान हलवून दुजोरा दिला. या व्यतिरिक्त आणखी काही त्रास होतो का, चोऱ्या वगैरे होतात का? या माझ्या प्रश्नावर "नाही' अशी मान हलवत माणिक म्हणाला, सायेब हाये काय चोरायला आमच्याकडे...
मारुती गर्जे नवी मुंबईच्या पुलाखाली उसाचा चरक चालवतो
नवी मुंबईच्या करावे गावच्या नाक्यावर असाच जेमतेम १५-१७ वर्षांचा असलेला मारुती गर्जे उसाचा रस काढायचं लाकडी चरक चालवतो. आपल्या काकीसोबत दिवसभर चरकाचा लाकडी दांडा ढकलून ढकलून काकी-पुतण्याची ही जोडगोळी दिवसाला ४००-५०० रुपये कमावते. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीच्या माणेकदिंडी या गावाच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलाय. त्यामुळे या दिवसांत महाविद्यालयीन शिक्षण घेणारा मारुती गर्जे, त्याचा चुलत भाऊ आणि काका-काकी असे चौघे जण लाकडी चरक घेऊन तडक नवी मुंबई गाठतात. इथे एखादी छोटीशी जागा प्रति महिना ३००० रुपये या दराने दोन महिन्यांसाठी भाड्याने घेऊन चौघे जण उसाचा रस काढून चरितार्थ चालवतात. पै पै गोळा करून ही मंडळी या दिवसात आपला चरितार्थ चालवतात, पावसाळा सुरू होताच पुन्हा गावी जातात. आताशा मोटरवर चालणाऱ्या चरकाच्या जमान्यात माणसाने ढकलायचं हे लाकडी चरक कितीला बनवलं, असं विचारताच काकी म्हणाल्या,
३० हजार रुपये लागल्यात त्याला भाऊ... दोन वर्षं झाली... दिवसाला एखाद क्विंटल उसाचा रस काढतू बगा आम्ही... इकडं ५५० रुपये लागत्याती एका क्विंटल उसाला... गावाकडं आम्ही २००-२५० रुपड्यांत क्विंटलभर ऊस घालतो कारखान्याला...
असं म्हणत तिनं चढ्या दराने मिळणाऱ्या उसाबद्दल नाराजी व्यक्त केली.
मुंबईतील घाटकोपर भागातील भटवाडीतल्या दत्ताजी साळवी मैदानातसुद्धा मराठवाड्यातून आलेल्या दोन-अडीचशे कुटुंबांनी डेरा टाकलाय... नवी मुंबईतल्या दुष्काळग्रस्त स्थलांतरितांपेक्षा यांची परिस्थिती थोडीशी बरी म्हणावी, अशी. कारण काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते इथं येऊन त्यांना मोफत धान्य आणि डाळीचं वाटप करतात. मुंबईच्या महाविद्यालयातले काही हौशी तरुण-तरुणी येऊन इथल्या पोराटोरांना बिस्किटांचे पुडे वगैरे देतात. स्थानिक नगरसेवकाने यांच्यासाठी पाण्याच्या मोठ्या दोन टाक्या ठेवल्यात. त्यात दिवसाला दोनदा टँकरने पाणी भरले जाते.
मी पोहोचलो तेव्हा, इथं नुकताच पाण्याचा टँकर येऊन गेला होता. त्यामुळे पाण्यासाठी बायाबाप्यांची झंुबड उडाली होती. मी बराच वेळ निरीक्षण करतोय, हे पाहून त्यातला एक जण पुढे आला. पत्रकार आहे सांगितल्यावर नांदेडच्या मुखेड परिसरातून आलेल्या या बालाजी राठोडने माझ्यासमोर आपल्या तक्रारीचा पाढाच वाचायला सुरुवात केली.
‘सायेब गावात पानी नाय म्हनून आम्ही हितं आलो, हितली लोकबी आमाला मदत करतेत... धान्य देतेत, पन इकडं वरच्या बाजूला ऱ्हानारी हितलीच लोकं आमच्यासाठी आनल्यालं धान्य नेतेत...’
तो मला काहीतरी सांगतोय म्हणून अजूनही काही बायका पुढे आल्या आणि सांगू लागल्या. त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं की, दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून मुंबईभरातून काही सेवाभावी संस्था, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, तसेच स्वेच्छेने मदत करू इच्छिणारे लोक इथे येऊन या स्थलांतरितांना धान्य देतात. असे लोक धान्य वाटप करू लागले की, आसपासच्या परिसरातील झोपडपट्टीत राहणारे गरीब लोकही हे धान्य घ्यायला येतात. यातले दुष्काळग्रस्त भागातील स्थलांतरित कोण, आणि परिसरातील झोपडपट्टीवासीय कोण, हे माहीत नसल्याने वाटप करण्यासाठी आलेले लोक सरसकट सर्वांनाच धान्य देतात.
त्यामुळे आपल्या वाट्याला कमी धान्य येतं, ही त्यांची तक्रार होती. अर्थात त्यामुळे स्थलांतरित आणि झोपडपट्टीवासीयांच्यात वादही होत असावेत, ही बाब उघड होती. पण या प्रश्नावर तोडगा सापडत नसल्याने सगळेच मेटाकुटीला आले होते. दुष्काळाला वैतागून शेकडो किलोमीटर दूरवर येऊनही त्यांच्या जगण्याचा संघर्ष संपला नव्हता. उलट, तो वेगळ्या रूपात अधिक तीव्रतेने त्यांच्यासमोर उभा ठाकला होता.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची अगतिकता
या दुष्काळाने माणसांना अगदी हतबल बनवून टाकलंय. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करतोय. मग तो उपाय भला आहे की बुरा, याचा कुणीही विचार करत नाहीए. किंबहुना या संकटासमोर तसा विचार करण्याची सवडही नाहीए. मध्यंतरी म्हणजे आठ-पंधरा दिवसांपूर्वी कधीतरी खारघरच्या लिटिल वर्ल्ड मॅालसमोर काही पोरसवदा तरुण भीक मागताना आढळल्याचं माझ्या एका मित्राने सांगितलं. हे तरुण एरवी दिसणाऱ्या भिकाऱ्यांसारखे वाटत नसल्याने एका वृत्तवाहिनीसाठी काम करणाऱ्या माझ्या या मित्राला संशय आला. त्याने या तरुणांकडे चौकशी केली तेव्हा त्यालाही धक्का बसला. हे तरुण दहावी-बारावीला शिकणारे विद्यार्थी होते. गावी पाणी नाही म्हणून आपल्या कुटुंबासह इथं पोट भरायला आलेले. आपल्या घरच्या वडिलधाऱ्यांबरोबर रोजंदारीवर जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण या पोरगेल्या तरुणांकडून अंगमेहनत होणार नाही, असं वाटून यांना कुणी कामाला नेईना. आता बसून तरी काय करायचं, म्हणून त्यांनी या परिसरात भीक मागायला सुरुवात केली.
या सगळ्या भ्रमंतीत एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे, दुष्काळ आणि गरिबीचे चटके सोसत इतक्या दूर फक्त जगायला आलेल्या यातल्या कुणालाही कायमस्वरूपी शहरात राहायचं नाही. शहरातील सुबत्ता त्यांना आकर्षित करत असेल कदाचित; पण आपली पाळंमुळं अजूनही त्या दूरवरच्या दुष्काळी भागातच घट्ट रुजलीत, याचं त्यांना भान आहे. त्या सोबतच कायमस्वरूपी शहरात राहणं हे आपल्या समस्येचं उत्तर नाही, हेही त्यांना कळतंय. सतत डोक्यावर बसलेल्या दुष्काळाचं उत्तर त्यांना हवंय, पण त्यांच्याच मातीत…






