Skip to main content

फुटबॉलच्या प्रेमासाठी जिथे लाटा होत्या, तिथेच त्यांनी गोलपोस्ट उभारले अन् जन्माला आली जगाला प्रेरणा देणारी ‘पान्यी’ची कहाणी...

shekhar patil
Today
8 views
फुटबॉलच्या प्रेमासाठी जिथे लाटा होत्या, तिथेच त्यांनी गोलपोस्ट उभारले अन् जन्माला आली जगाला प्रेरणा देणारी ‘पान्यी’ची कहाणी...

शेखर पाटील


  • फिफा वर्ल्ड कपचा थरार अनुभवण्यासाठी सबंध जग सज्ज झालयं. भव्य स्टेडियम्स, लख्ख प्रकाशात न्हाऊन निघालेले हिरवेगार मखमली गवत, सुपर ह्युमन भासणारे वलयांकीत खेळाडू आणि हजारो प्रेक्षकांचा तो कानठळ्या बसवणारा जल्लोष…


  • मात्र जिथे जमिनीचा एक तुकडाही नाही, फक्त अथांग निळा समुद्र आणि चुनखडीचे अक्राळविक्राळ सुळके हीच जीवनाची सीमा आहे. अशा एका ठिकाणी, कुणी फुटबॉल खेळू शकेल का ?


  • अशाच एका दुर्गम भागात सागराच्या लाटांवर, मानवी जिद्दीचे एक विलक्षण महाकाव्य लिहिले गेले आहे आणि यातूनच फुटबॉलचे वैश्वीक गारूड विलक्षण परिणामकारक पध्दतीत समोर आले आहे. ही कथा आहे थायलंडमधील पान्ये फुटबॉल क्लबच्या जन्मासह आजवरच्या वाटचालीची !


जेव्हा आपण फुटबॉलचा विचार करतो, तेव्हा आपल्या नजरेसमोर भव्य स्टेडियम्स, लख्ख प्रकाशात न्हाऊन निघालेले हिरवेगार मखमली गवत, सुपर ह्युमन भासणारे वलयांकीत खेळाडू आणि हजारो प्रेक्षकांचा तो कानठळ्या बसवणारा जल्लोष उभा राहतो. पण या चकाचक दुनियेच्या पलीकडे जगातील कान्याकोपऱ्यात देखील फुटबॉलची विलक्षण लोकप्रियता अनुभवायला मिळते. असतील-नसतील त्या साधनांसकट हा खेळ दुर्गम भागांपासून ते महानगरांपर्यंत खेळला जातो. 


आता कल्पनेच्या पलीकडे असलेल्या एका जगाचा विचार करा, जिथे जमिनीचा एक तुकडाही नाही, फक्त अथांग निळा समुद्र आणि चुनखडीचे अक्राळविक्राळ सुळके हीच जीवनाची सीमा आहे. अशा एका ठिकाणी, कुणी फुटबॉल खेळू शकेल का ? याचे उत्तर सर्व जण नकारार्थीच देतील. मात्र अशाच एका दुर्गम भागात सागराच्या लाटांवर, मानवी जिद्दीचे एक विलक्षण महाकाव्य लिहिले गेले आहे आणि यातूनच फुटबॉलचे वैश्वीक गारूड विलक्षण परिणामकारक पध्दतीत समोर आले आहे. ही कथा आहे थायलंडमधील पान्ये फुटबॉल क्लबच्या जन्मासह आजवरच्या वाटचालीची !


User Image


थायलंडच्या 'कोह पान्यी' या बेटाचा रोमांचकारी इतिहास


थायलंडच्या कोह पान्यी या वसाहतीचा इतिहास एखाद्या कादंबरीसारखा रोमांचक आहे.  अठराव्या शतकाच्या अखेरीस, इंडोनेशिया आणि मलय द्वीपकल्पातून आलेल्या तीन भटक्या मच्छिमार कुटुंबांनी या वसाहतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी फांग न्गा उपसागरातील एका विशालकाय उभ्या खडकाच्या उंच कड्यांच्या सावलीत, समुद्रात खांबांवर घरे बांधून राहण्यास सुरुवात केली. म्हणजे एका बाजूला भला मोठा खडक आणि दुसऱ्या बाजूला सागर अशा स्थितीत त्यांनी वसाहत करून या ठिकाणाला 'कोह पान्यी' असे नाव दिले, ज्याचा अर्थ मलय भाषेत 'ध्वजाचे बेट' असा होतो. 


खारफुटीच्या (mangrove) जंगलांनी वेढलेले हे ठिकाण केवळ मासेमारीसाठी सोयीचे होते. कालांतराने येथे एक गाव वसले. हे संपूर्ण गाव लाकडी आणि काँक्रीटच्या खांबांवर उभे आहे. गावात अगदी थोडीशीच जमीन असल्याने नागरिकांना दाटीवाटीने रहावे लागते. तर या बेटावरून दुसरीकडे जाण्यासाठी बोटीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. हे बेट जगापासून विलग असेच आहे. मच्छीमारी हाच या गावाचा एकमात्र व्यवसाय. १९८६ साली घडलेल्या एका घटनेने या लहानशा बेटाला आमूलाग्र बदलून तर टाकलेच पण त्याला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान देखील प्रदान केले. 


बरोबर चाळीस वर्षांपूर्वी मेक्सिकोत फुटबॉल विश्वचषकाचा थरार रंगला होता. या स्पर्धेने संपूर्ण जगाला वेड लावले होते. दिएगो मॅराडोना नावाचा एक जादूगार मैदानात आपली किमया दाखवत होता अन्‌ जगातील कोट्यवधी रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटत होते. कोह पान्यीच्या त्या छोट्याशा गावात, जिथे वीज आणि तंत्रज्ञानाचे मर्यादित स्रोत होते, तिथे एका छोट्याशा कृष्णधवल टेलिव्हिजनवर या सामन्यांचे प्रक्षेपण पाहिले जात होते. लाटांच्या आवाजात मॅराडोनाची जादू पाहून तिथल्या मुलांच्या फुटबॉल प्रेमाची एक विलक्षण ठिणगी पडली.


User Image


"पोरांनो इथे कसे खेळणार? तुमच्याकडे मैदान कुठे आहे, आहे तो फक्त समुद्र ?


या मुलांना वाटले, "जर जगातील इतर मुले खेळू शकतात, तर आपण का नाही?" पण त्यांच्यासमोर सर्वात मोठे आणि न सुटणारे आव्हान होते-मैदान ! कारण त्यांच्या दुर्गम गावात जमिनीचा एक इंचही तुकडा शिल्लक नव्हता. सगळीकडे फक्त लाकडी रस्ते आणि खाली अथांग समुद्र. जेव्हा या मुलांनी फुटबॉल खेळण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा गावातील ज्येष्ठ मंडळी आणि पालकांनी त्यांना अक्षरश: वेड्यात काढले. "पोरांनो इथे कसे खेळणार? तुमच्याकडे मैदान कुठे आहे ? तुम्ही फक्त मासेमारीवर वा फार तर नौका शर्यतीवर लक्ष द्या," अशा शब्दांत त्यांची हेटाळणी करण्यात आली. पण या विरोधाने मुलांची जिद्द अधिकच प्रज्वलित केली. त्यांना कळून चुकले होते की, जर त्यांना खेळायचे असेल, तर अशक्य ते शक्य करावे लागेल. यासाठी त्यांनी थेट स्वत:चे फुटबॉलचे मैदान उभारण्याच संकल्प केला.


आता लक्षात घ्या-जिथे एक इंचही जमीन नाही, तिथे थेट सागरावर मैदान कसे उभारणार? हा प्रश्न त्या बालकांनाही पडला. मात्र त्यांनी त्यावरही मार्ग काढला. त्यांच्याकडे जमीन तर नव्हतीच पण पैसा नव्हता, यंत्रणा नव्हती अन्‌ मोठ्यांचे पाठबळही नव्हते ! फक्त होती अफाट इच्छाशक्ती. त्यांनी तहानभूक विसरून काम सुरू केले. यासाठी त्यांनी जुन्या लाकडी फळ्या, मासेमारीसाठी वापरले जाणारे जुने तराफे, भंगारातील लाकूड आणि गंजलेले खिळे गोळा करण्यास सुरुवात केली. आणि अनेक महिने परिश्रम करून त्यांनी समुद्राच्या लाटांवर चक्क एक तरंगणारा लाकडी सांगाडा तयार केला आणि हेच त्यांचे तरंगते मैदान बनले. 


खरं तर, हे मैदान अत्यंत धोकादायक होते. ओल्या लाकडामुळे याचा पृष्ठभाग निसरडा होता आणि बाहेर आलेल्या गंजलेल्या खिळ्यांमुळे ती मुले वारंवार जखमी होत असत. मैदानाला कोणतीही संरक्षक भिंत नसल्यामुळे चेंडू वारंवार समुद्रात पडायचा. येथेच एक कठोर आणि अघोषित नियम अस्तित्वात आला. तो म्हणजे-"ज्याने किक मारली, तोच पोहत जाऊन चेंडू परत आणणार." या नियमामुळे केवळ फुटबॉलचीच प्रॅक्टिस होत नव्हती, तर मुलांची शारीरिक क्षमता आणि पोहण्याचे कौशल्यही वाढत गेले. सर्वात महत्वाचे म्हणजे यातून त्यांचे फुटबॉल खेळण्याचे कौशल्य देखील वाढीस लागले. 


User Image


भर समुद्रात जन्मलेल्या ‘पान्ये फुटबॉल क्लब’ची अनोखी कथा


या मुलांनी तयार केलेले तरंगते मैदान हे आकाराने अगदी लहान म्हणजे १६ बाय २५ मीटर इतके असल्यामुळे त्यांना खेळण्यात खूप अडचणी आल्या. मात्र याच अडचणींनी त्यांचे कौशल्य वृध्दींगत झाले. लाकडी मैदानावर खेळताना त्यांच्यात नैसर्गिकरित्या अशा काही गोष्टी विकसित झाल्या, ज्या आधुनिक प्रशिक्षण केंद्रांतही शिकवता येत नाहीत. मैदान लहान असल्याने, मुलांना चेंडू आपल्या पायाजवळ ठेवण्याचे अवघड तंत्र अवगत करावे लागले. थोडीही चूक झाली तर चेंडू समुद्रात जाणार होता, आणि तो त्यांनाच पोहून परत आणावा लागणार होता. त्यामुळे त्यांचे 'ड्रिबलिंग' अचाट बनले. समुद्राच्या लाटांमुळे मैदान सतत डळमळीत असायचे. अशा परिस्थितीत पडू नये म्हणून आणि धावण्यासाठी त्यांना आपल्या शरीराचा समतोल राखण्याची जी सवय झाली, ती त्यांना जमिनीवरच्या मैदानावरील गतीमान संतुलनासाठी खूप कामात आली. तर यातूनच  'पोझिशनल अवेअरनेस' म्हणजे जागेचे भान विकसित झाले. 


याहून लक्षणीय बाब म्हणजे लाकडी तराफ्यावर जर सर्व मुले एकाच बाजूला चेंडूचा पाठलाग करत गेली असती, तर वजनामुळे तो भाग पाण्यात बुडण्याची किंवा मैदान उलटण्याची भीती होती. यामुळे त्यांना विखुरून खेळण्याची आणि अचूक पास देण्याची सवय लागली. यातून तरंगणाऱ्या लहानशा मैदानावर या चिमुकल्या बेटांवरील मुले बेभान होऊन फुटबॉल खेळू लागली तेव्हा त्यांचे पालक व ज्येष्ठांना सुखद धक्का बसला. अर्थात, असे असले तरी ते या खेळाबाबत साशंकच होत. मात्र लवकरच एक अशी घटना घडली की, तिने या बेटाचे भाग्य बदलून टाकले. 


काही महिन्यानंतर दक्षिण थायलंडमध्ये 'पांगा कप' या फुटबॉल स्पर्धेची घोषणा झाली. पान्यीच्या या मुलांनी, ज्यांनी कधीही जमिनीवर फुटबॉल खेळला नव्हता, त्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे धाडस केले. यात पुन्हा गावकरी सुरुवातीला साशंक होते, पण मुलांची जिद्द पाहून संपूर्ण गाव त्यांच्या मागे उभे राहिले.


User Image


जेव्हा संघ स्पर्धेसाठी निघाला, तेव्हा एक आश्चर्यकारक घटना घडली. गावातील लोकांनी वर्गणी काढून मुलांसाठी नवीन गणवेश आणि बूट खरेदी केले होते. मुलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. कारण ते आयुष्यात पहिल्यांदा फुटबॉलसाठी बूट घालणार तर होतेच पण वडिलधाऱ्यांनी त्यांच्यावर पहिल्यांदाच विश्वास टाकला होता. पान्यी एफसीचा हा प्रवास एका छोट्या बोटीतून सुरू झाला आणि ते स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले.


पांगा कपमध्ये खऱ्या मैदानावर खेळताना ही मुले सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरली. त्यांची चपळता आणि बॉलवरचे नियंत्रण पाहून अनुभवी संघही थक्क झाले. पान्यी एफसीने एक एक करत सामने जिंकत थेट उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. तिथे त्यांचा सामना त्या काळातील गतविजेत्या आणि बलाढ्य संघाशी होता. 


उपांत्य फेरीच्या सामन्याच्या वेळेस मुसळधार पाऊस सुरू झाला. पान्यीच्या मुलांना चिखलयुक्त आणि गवताळ मैदानावर आणि विशेष म्हणजे बुट घालून खेळण्याचा सराव नव्हता. नवीन बुटांमुळे त्यांना धावणे कठीण जात होते, ते वारंवार घसरत होते. मध्यंतरापर्यंत पान्यी एफसी २-० ने मागे होता.. पराभव समोर दिसत होता. तेव्हा मुलांनी आपले बूट काढून फेकून देत अनवाणी पायांनी खेळण्याचा निर्णय घेतला. ज्या लाकडी मैदानावर ते अनवाणी खेळायचे, तिथेच त्यांना आपली खरी ताकद सापडली. 


बूट काढताच त्यांची चपळता परतली. त्यांनी चिखलात अशा वेगाने हालचाली केल्या की प्रतिस्पर्धी संघ गोंधळून गेला. त्यांनी २-२ अशी बरोबरी साधली. मात्र, दुर्दैवाने सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला एक गोल स्वीकारल्यामुळे त्यांचा ३-२ असा पराभव झाला. कोसळणाऱ्या जलधारांमध्ये त्या मैदानावर ही मुले रडत होती, पण उपस्थितांनी टाळ्यांच्या गगनभेदी गजरात त्यांना मानवंदना दिली. यानंतरच्या सामन्यात विजय मिळवून त्यांनी या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला आणि ते जेव्हा गावात परतले तेव्हा त्यांचे विजेत्यांसारखे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर गावकऱ्यांनी कधीही आपल्या मुलांची टिंगल केली नाही. कारण त्यांनी या लहानशा गावाला मोठी ओळख दिली होती. यानंतर गावातील सर्व मुले या मैदानावर खेळू लागली.  


User Image


पान्यी एफसीची शौर्यगाथा जगासमोर आली आणि…?


पान्यी एफसीची ही शौर्यगाथा अनेक वर्षे थायलंडच्या कोपऱ्यात दबलेली होती. मात्र, २०१०-२०११ मध्ये टीएमबी बँकेने आपल्या 'Make the Difference' या जाहिरात मोहिमेसाठी या स्फुर्तीदाय कथेची निवड केली. 'द ग्लू सोसायटी'च्या मॅथ्यू डेव्हाइन या दिग्दर्शकाने स्थानिक मुलांचा वापर करून ही कथा एका लघुपटाच्या माध्यमातून जगासमोर मांडली. त्यांनी या फिल्ममध्ये खरी पान्यी संस्कृती टिपली. या जाहिरातीने इतिहास रचत केवळ बँकच लोकप्रिय केली नाही, तर पान्यी एफसीला जागतिक स्तरावर 'हिरो' बनवले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही कथा जगभर पसरली आणि पान्यी एफसी हा फुटबॉल प्रेमासह मानवी चिकाटीचे जागतिक प्रतीक बनला. 


फुटबॉलने या मच्छिमारांच्या गावाची नियतीच बदलून टाकली. एकेकाळी केवळ मासेमारीवर अवलंबून असणारे हे गाव आज एक प्रमुख पर्यटन केंद्र बनले आहे. स्थानिक प्रशासन आणि 'गंबल ३००० फाऊंडेशन'च्या मदतीने आता गावात एक आधुनिक, सुरक्षित आणि खिळेमुक्त फुटबॉल मैदान बांधण्यात आले आहे. ते आधीप्रमाणे केवळ लाकडी नसून त्यावर पीयू कोटींगचे आवरण आहे. यावर खेळणाऱ्या मुलांकडे किटसह सर्व सुविधा आहेत. तसेच,  पान्यी एफसी आता केवळ एक हौशी संघ राहिलेला नाही. त्यांनी २००४ ते २०१० या काळात सलग सात वेळा दक्षिण थायलंड युवा चॅम्पियनशिप जिंकून आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यांच्यावरच्या अनेक शॉर्ट फिल्ममुळे जगभरात या क्लबची ख्याती पोहचली आहे.


पान्यी फुटबॉल क्लबची वाटचाल केवळ खेळाची कथा नाही, तर ती जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संघर्ष करणाऱ्यांसाठी एक दिशादर्शक आहे. आजही तरंगणारे मैदान उभारणाऱ्या त्या 'पहिल्या अकरा' खेळाडूंना गावात देवासमान मानले जाते. ते आता केवळ मच्छिमार राहिले नसून ते तरुण पिढीचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक बनले आहेत. आजही कोह पान्यीच्या त्या तरंगत्या मैदानावर चेंडूचा आवाज घुमतो, तेव्हा तो आवाज सांगत असतो की, तुमची परिस्थिती तुम्हाला कधीच मर्यादित करू शकत नाही. जर तुमच्याकडे जिद्द असेल, तर तुम्ही समुद्राच्या अथांग लाटांनाही तुमच्या स्वप्नांचे मैदान बनवू शकता. आणि या अदम्य जिद्दीच्या कथेचा खरा नायक आहे तो फुटबॉल ! 


User Image


या खेळावरील विलक्षण प्रेमापोटीच पान्यीच्या पोरांनी थेट सागरी लाटांवरच खेळण्याचा संकल्प करून तो प्रत्यक्ष साकार देखील करून दाखविला. त्यांच्यावर तयार झालेली अवघ्या काही मिनिटांची शॉर्ट फिल्म ही आपल्याला भावविभोर तर करतेच, पण फुटबॉलची वैश्वीक लोकप्रियता किती विलक्षण आहे याची प्रचिती देखील करून देते. 


अमेरिकन टेनिसपटू आर्थर ॲश यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे: "तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करा. तुमच्याकडे जे आहे त्याचा वापर करा. आणि तुम्ही जे करू शकता ते सर्वोत्तम करा." पान्यीच्या मुलांनी हेच तत्व जगून दाखवले. आणि याला कारणीभूत ठरला तो फुटबॉल....संपूर्ण जगातील सर्वाधीक लोकप्रिय खेळ !


पान्यी एफसीचा प्रवास आपल्याला एकच शिकवतो: यश हे आलिशान साधनांवर नाही, तर तुमच्या अंतर्मनातील जिद्दीवर अवलंबून असते. ज्या मुलांकडे धावायला जमीन नव्हती, त्यांनी आपल्या स्वप्नांना समुद्रावर तरंगायला शिकवले. आपल्या आयुष्यातही असे काही अडथळे असतील जे तुम्हाला अडवत असतील. पण एकदा शांतपणे विचार करा, तुमच्या मार्गात उभे असलेले अडथळे खरोखरच अडथळे आहेत की तुमचे स्वतःचे 'तरंगते मैदान' तयार करण्याची ती एक सुवर्णसंधी आहे? लक्षात ठेवा, जिद्द असेल तर समुद्रही तुमच्यासाठी रस्ता तयार करतो. म्हणूनच-'पान्यीसारखे बना !'


Share this article
सर्वोच्च न्यायालय म्हणते, लग्नाआधीचे सहमतीने ठेवलेले संबंध हा चारित्र्यावरील डाग नाही…
ताज्या घडामोडी

सर्वोच्च न्यायालय म्हणते, लग्नाआधीचे सहमतीने ठेवलेले संबंध हा चारित्र्यावरील डाग नाही…

लग्नाआधीचे सहमतीने प्रस्थापित केलेले संबंध हा एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावरील डाग मानला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. बदलत्या सामाजिक नियमांबाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील असणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. खंडपीठाने म्हटले की, विवाहपूर्व संबंधांच्या संदर्भात अधिकाऱ्यांना बदलत्या काळाची संवेदनशीलता समजून घ्यावी लागेल.

3 min read
T
Team BaiManus
ज्याच्या दुखापतीमुळे सूर्याला संधी मिळाली, आता तोच श्रेयस कर्णधार म्हणून घेतोय सूर्याची जागा
ताज्या घडामोडी

ज्याच्या दुखापतीमुळे सूर्याला संधी मिळाली, आता तोच श्रेयस कर्णधार म्हणून घेतोय सूर्याची जागा

ज्या श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे २०२१ मध्ये सूर्यकुमार यादवला भारतीय टी-२० संघात पदार्पणाची संधी मिळाली, आता त्याच श्रेयसने कर्णधार म्हणून सूर्याची जागा घेतली आहे. निवड समितीने श्रेयसच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने, अवघ्या ५ वर्षांत टी-२० क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सूर्यकुमारच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला जवळपास ब्रेक लागल्याचे मानले जात आहे. सूर्यकुमारने प्रस्थापित केलेले जागतिक विक्रम आणि त्याच्याच नेतृत्वात भारताने नुकत्याच जिंकलेल्या टी-२० विश्वचषकाच्या ऐतिहासिक कामगिरीचा घेतलेला हा सविस्तर आढावा.

7 min read
S
Shantanu Khuje
लोकशाहीच्या टेबलावर निम्म्या जगाची खुर्ची रिकामी…!
ताज्या घडामोडी

लोकशाहीच्या टेबलावर निम्म्या जगाची खुर्ची रिकामी…!

जगभरातील संसदांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व २७.५ टक्क्यांवर पोहोचले असले तरी वाढीचा वेग गेल्या दशकातील सर्वात मंद आहे. संसदीय नेतृत्वाच्या पदांवर महिलांची उपस्थिती उलट घसरत असून २०२६ मध्ये केवळ १९.९ टक्के संसदाध्यक्ष महिला आहेत. ज्या देशांमध्ये महिला आरक्षण किंवा कोटा व्यवस्था आहे, तिथे प्रतिनिधित्व लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आयपीयूच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग ४४.४ टक्के असताना संसदेत तो केवळ १४.७२ टक्के आहे. राजकीय प्रतिनिधित्व, शिक्षण, रोजगार आणि निर्णय प्रक्रियेत महिलांना अजूनही संरचनात्मक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

7 min read
V
Vikas Meshram
मोटार पंप चोरीच्या संशयावरून दलित युवकावर अमानुष अत्याचार; विहिरीत उलटे टांगून मारहाण
ताज्या घडामोडी

मोटार पंप चोरीच्या संशयावरून दलित युवकावर अमानुष अत्याचार; विहिरीत उलटे टांगून मारहाण

हरियाणातील हांसी जिल्ह्यात मोटार पंप चोरीच्या संशयावरून एका दलित युवकावर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी युवकाला बेदम मारहाण करून विहिरीत उलटे टांगल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हत्या प्रयत्न, धमकी आणि एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

3 min read
T
Team BaiManus
 सव्वाशे कर्मचाऱ्यांना दीड कोटींचा पगार आणि १५ लाख कोटींचा बोगस महसूल! 'राजेश एक्सपोर्ट्स'वर सेबीची बंदी
ताज्या घडामोडी

सव्वाशे कर्मचाऱ्यांना दीड कोटींचा पगार आणि १५ लाख कोटींचा बोगस महसूल! 'राजेश एक्सपोर्ट्स'वर सेबीची बंदी

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) राजेश एक्सपोर्ट या कंपनीवर गेल्या पाच वर्षांत तब्बल १५.१५ लाख कोटी रुपयांचा महसूल फुगवून दाखवल्याचा आरोप केल्याने कंपनी अडचणीत आली आहे. सेबीने आपला तपास पूर्ण होईपर्यंत कंपनी आणि तिचे अध्यक्ष राजेश मेहता यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. जर हे आरोप सिद्ध झाले, तर हा भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा अकाउंटिंग घोटाळा ठरू शकतो.

7 min read
S
Shantanu Khuje
 ‘उष्णतेची चिंता ही एक चैन आहे, गरिबांना ते स्वांतत्र्य नसतं...’
ताज्या घडामोडी

‘उष्णतेची चिंता ही एक चैन आहे, गरिबांना ते स्वांतत्र्य नसतं...’

जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना भारतातील अनेक भाग ४५ ते ४८ अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करत आहेत. उष्णतेची लाट ही केवळ हवामानाची समस्या राहिलेली नसून ती आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न बनली आहे. वातानुकूलित खोल्यांतील लोक आणि उन्हात काम करणारे मजूर यांच्यातील दरी वाढत्या तापमानामुळे अधिक स्पष्ट होत आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बालकं, शेतमजूर, बांधकाम कामगार, फेरीवाले आणि स्थलांतरित कुटुंबांना बसत आहे. तापती शहरं थंड करण्यासाठी हरित क्षेत्रं, शीत छतं आणि लोककेंद्रित नगररचना यांची गरज पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाली आहे.

9 min read
A
Atul Deulgaonkar

Comments

Comments are currently disabled or loading...