अप्सरा आगा
- आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त पुण्यात राज्यस्तरीय संमेलन संपन्न
- महिलांना जमिनीचे अधिकार आणि शेतकरी ओळखीची मुख्य मागणी
- संपूर्ण महाराष्ट्रातून १०० महिलांनी घेतला सहभाग
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ च्या निमित्ताने सोपेकॉम आणि महिला किसान अधिकार मंच (मकाम) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात १९ व २० जानेवारी रोजी दोनदिवसीय महिला शेतकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात राज्यभरातून आलेल्या महिला शेतकरी, सामाजिक कार्यकर्त्या, अभ्यासक आणि तज्ज्ञांनी शेतीतील महिलांचे योगदान, त्यांच्या हक्कांचा प्रश्न आणि धोरणात्मक बदलांची गरज यावर सखोल चर्चा करण्यात आली.

शेतीचा कणा मानल्या जाणाऱ्या महिला आजही केवळ ‘मदतनीस’ म्हणून ओळखल्या जातात. प्रत्यक्षात बी पेरण्यापासून ते काढणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर महिला सक्रिय भूमिका बजावतात. मात्र, त्यांच्या श्रमांना शेतकरी म्हणून अधिकृत मान्यता मिळत नाही. संयुक्त राष्ट्रांनी २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केल्यामुळे, महिलांच्या श्रमाला ‘शेतकरी’ म्हणून खरी ओळख मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. ही संधी केवळ औपचारिक कार्यक्रमांपुरती मर्यादित न राहता, महिलांच्या आयुष्यात ठोस बदल घडवून आणणारी चळवळ ठरावी, अशी ठाम भूमिका या संमेलनात मांडण्यात आली.
महिलांनी व्यक्त केली खंत…
संमेलनात शेतीतील लिंगभेद, जमिनीचे अधिकार, पर्यावरणपूरक शेती, आर्थिक सक्षमीकरण आणि ग्रामीण भागातील महिलांवरील हिंसाचार यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अनेक महिलांनी आपल्या अनुभवातून शेतीतील वास्तव मांडले. “संपूर्ण शेतात राबूनही जमीन आमच्या नावावर नाही, कर्जासाठी आम्हाला शेतकरी मानले जात नाही, सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही,” अशी खंत अनेक महिलांनी व्यक्त केली.
तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, महिलांना शेतकरी म्हणून मान्यता मिळाल्यास त्यांचे सामाजिक स्थान उंचावेल, आर्थिक स्वावलंबन वाढेल आणि कुटुंब व समाजात त्यांचा निर्णय प्रक्रियेतला सहभाग मजबूत होईल. त्यासाठी जमिनीचे अधिकार महिलांच्या नावावर करणे, शासकीय नोंदींमध्ये त्यांना शेतकरी म्हणून समाविष्ट करणे, तसेच महिलांसाठी स्वतंत्र व सुलभ धोरणे राबवणे अत्यावश्यक आहे.
महिला शेतकऱ्यांनी केले पर्यावरणस्नेही, स्वावलंबी आणि मिश्र शेतीचे यशस्वी प्रयोग
या संमेलनातून सरकार आणि प्रशासनाकडे काही ठोस मागण्या करण्यात आल्या. महिलांच्या नावावर जमिनीचे हक्क देणे, शेतीविषयक सर्व योजनांमध्ये महिलांना थेट लाभार्थी म्हणून समाविष्ट करणे, शेती क्षेत्रातील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करणे, तसेच पर्यावरणपूरक शेतीसाठी महिलांना प्रशिक्षण व आर्थिक मदत देणे, या प्रमुख मागण्यांचा त्यात समावेश आहे.

महाराष्ट्रातील महिला किसान अधिकार मंच (मकाम) आणि सोपेकॉम संस्थेच्या संयुक्त प्रकल्पात सहभागी झालेल्या अनेक महिला शेतकऱ्यांनी पर्यावरणस्नेही, स्वावलंबी आणि मिश्र शेतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. या प्रकल्पात सहा जिल्ह्यांमध्ये (बीड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, नागपूर, अकोला) सुमारे २५० महिला सहभागी आहेत. त्यांनी रसायनमुक्त, विषमुक्त शेती करून जमीन सुपीक केली, उत्पादन वाढवले आणि स्वावलंबी जीवन जगले. 'पुष्कळा : दखल शेतकरणींची' या पुस्तकात त्यापैकी १२ महिलांच्या खऱ्या गोष्टींचे कथन आहे.
'मी पाच वर्षांपासून स्वावलंबी शेती प्रयोगामध्ये…”
सोपेकॉम आणि महिला किसान अधिकार मंच यांनी आंतराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त महिला शेतकरी संमेलन घेतलं आहे. या संमेलनातील ‘पर्यावरणस्नेही स्वावलंबी शेती’ करणाऱ्या महिला.या सत्रामध्ये द्वारकाताई वाघमारे सांगतात, 'मी पाच वर्षांपासून स्वावलंबी शेती प्रयोगामध्ये आहे. माझ्या शेताच्या चारी बाजूने डोंगर असल्यामुळे त्याच्या शेतात रानडुकरांचा सारखा वावर असतो.'शेतातील सगळी पिके रानडुकरे खाऊन जातात. जेव्हा शेतात पिक असत तेव्हा पिकांना रानडुकरापासून खूप सावधानता बाळगावी लागते. पिकाची खूप काळजी घ्यावी लागते. तरच खरिपातील पिके हाती लागतात.’
शेलूबाजार येथील सागर संजय पोरे सांगतात, 'मी स्वावलंबी शेती प्रयोगाच्या पहिल्या वर्षी पेरणी करताना उरलेले बोरू हराळी जास्त असलेल्या जागी टाकले, कारण तिथे काहीच येत नाही तर बोरू टाकून द्यावा या उद्देशाने बोरू उगवला पण त्या ठिकाणची हिरवळ कमी झालेली दिसली. मी सतत हा प्रयोग केल्यामुळे हराळी पूर्णपणे नष्ट झाली.' हा प्रयोग इतर जिल्ह्यातील महिलांनी हि करून बघितला , हा प्रयोग सर्वानाच प्रभावी वाटला. आज सर्व महिला धुऱ्यावर बोरू लावून बियाणेही जतन करत आहेत. या सोबतच बोरूच्या कळ्यांची भाजी खाल्याने संधिवाताचा त्रास कमी झाल्याचा अनुभव महिलांनी घेतला आहे.

काही महिलांनी कापसाचे पती व फुल गळ होऊ नये म्हणून ताक, अंडी आणि गूळ यापासून संजीवक तयार करून यांनी पिकावर फवारणी करून बघितलं. त्याबाबत महिलाना आलेला अनुभव सांगतात, 'उतराच्या महिन्यात जेव्हा कापसाच्या झाडाला पात्या फुले असतात तेव्हा पाऊस पडतो आणि खूप ऊन तापते तेव्हा झाडाच्या पात्या उष्णतेने गळून पडतात तेव्हा संजीवकाची फवारणी केल्यामुळे पिकाची फुले, पती गळत नसल्याचं आम्हाला दिसलं. आणि अजून एक फायदा झाला त्याच्या वासामुळे जंगली जनावरांचा त्रास कमी झाला.'
“बड्या बड्या कॉर्पोरेट लोकांच्या हातात जी शेती आहे, ती शेती आम्हाला नकोय.”
या संमेलनाबाबत सोपेकॉमच्या सीमा कुलकर्णी म्हणाल्या की, “या संमेलनामध्ये अर्थातच महत्त्वाचे जे शेतकरी महिला म्हणून प्रश्न आहेत, त्याची मांडणी करण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, रायगड अशा अनेक भागांमधून जवळजवळ १०० शेतकरी महिला आल्या होत्या आणि त्यांनी मांडणी केली. त्यांच्या प्रश्नांची ही मांडणी केली तसेच या वर्षामध्ये त्यांच्या सरकारकडून काय काय अपेक्षा आहेत याविषयी मांडणी केली. आणि एका बाजूला त्यांचे प्रश्न मांडत असताना त्यांना जमिनीवरती अधिकार, शेतकरी म्हणून त्यांना ओळख कशी मिळावी, अशी मांडणी करत असतानाच दुसऱ्या बाजूला शेतीची एकूण पद्धती कशी असावी? म्हणजे आज जी पूर्णतः व्यापारीकरण, बाजारीकरण आणि सगळ्या कॉर्पोरेट... बड्या बड्या कॉर्पोरेट लोकांच्या हातात जी शेती आहे, मग बियाणं असो, रासायनिक खतं असो आणि त्याच्यामुळे जे आमच्या ताटात विष आम्हाला मिळतं, अशी शेती आम्हाला नकोय.”
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे केवळ एक वर्षापुरते मर्यादित न राहता, महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारी चळवळ ठरली पाहिजे, असा सूर संमेलनात होता. महिलांच्या श्रमाला सन्मान, त्यांच्या हक्कांना मान्यता आणि त्यांच्या अस्तित्वाला ‘शेतकरी’ म्हणून ओळख हेच या संमेलनाचे मुख्य उद्दिष्ट ठरले. पुण्यातील हे संमेलन महिला शेतकऱ्यांच्या हक्कांच्या लढ्याला नवी दिशा देणारे ठरल्याचे सहभागी महिलांनी स्पष्ट केले.






