टीम बाईमाणूस
आशा भोसले आणि आर डी बर्मन या नावांना कोणत्याही विशेष परिचयाची आवश्यकता नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील हे दिग्गज कलाकार केवळ सुपरहिट गाणी देण्यासाठीच ओळखले जात नाहीत, तर त्यांची प्रेमकथा देखील खऱ्या प्रेमाचा अर्थ समजावून सांगते. एकत्र राहता यावे, यासाठी त्यांनी समाजाच्या टोमण्यांचा सामना केलाच शिवाय कुटुंबीयांचा रागही त्यांना सहन करावा लागला.
आशा भोसले आणि आर डी बर्मन या नावांना कोणत्याही विशेष परिचयाची आवश्यकता नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील हे दिग्गज कलाकार केवळ सुपरहिट गाणी देण्यासाठीच ओळखले जात नाहीत, तर त्यांची प्रेमकथा देखील खऱ्या प्रेमाचा अर्थ समजावून सांगते. एकत्र राहता यावे, यासाठी त्यांनी समाजाच्या टोमण्यांचा सामना केलाच शिवाय कुटुंबीयांचा रागही त्यांना सहन करावा लागला. अशा परिस्थितीतही या दोघांनी एक होऊन दाखवलेच आणि जेव्हा मार्ग वेगळे झाले त्यावेळेसही आदर व प्रेम कायम टिकवून ठेवले. याद्वारे कित्येक लोक नात्यांशी संबंधित महत्त्वपूर्ण धडा घेऊ शकतात.
आशा भोसले आपल्या पहिल्या पतीच्या छळाला कंटाळून घर सोडून गेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी आपल्या तिसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यांनी गायनाच्या क्षेत्रात आपले करिअर पुढे नेले. आर डी बर्मन यांच्यासोबत त्यांनी अनेक सुपर-डुपर हिट गाणी इंडस्ट्रीला दिली. ही जोडी संगीत क्षेत्रात पूर्णपणे हिट ठरली. या काळात दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि त्यांनी नातेसंबंध निर्माण करण्याचा निर्णय घेतला. पण या नात्यात आशा यांचं वय, पहिल्या पतीपासून विभक्त होणे आणि तीन मुलांची आई असणे या सर्व गोष्टी प्रेमाच्या मार्गात कठीण ठरत होत्या.

आरडी बर्मन स्वतः देखील घटस्फोटित होते आणि आशासोबत त्यांना प्रेमाचं नातं निर्माण करायचं होते. पण या नात्यास त्यांच्या आईचा कडाडून विरोध होता. जेव्हा बर्मन यांनी लग्न करण्याची परवानगी मागितली तेव्हा त्यांच्या आईने उत्तर दिले की, 'मी जिवंत आहे तोपर्यंत हे लग्न होऊ शकत नाही, तुला हवे असल्यास माझ्या मृतदेहावरून जाऊन आशा भोसलेला या घरात आणू शकतोस'. रिपोर्ट्समधील माहितीनुसार आशा यांचं वय आणि पूर्वीचे वादग्रस्त वैवाहिक नाते, या कारणांमुळे लग्नास विरोध असल्याचं म्हटलं गेलं. दरम्यान आईचे हे हृदयद्रावक विधान ऐकल्यानंतर पंचमदा शांतपणे तेथून निघून गेले. यानंतर त्यांनी आशा भोसले यांच्यासह 1984 साली लग्न केले.
अशी होती पहिली भेट...
पण हे सगळं इतकं सरळ घडलं नव्हतं… पंचम दा आशा भोसले यांचे फॅन होते. याच काळात एक अज्ञात व्यक्ती आशाताईंना फुलांचा गुच्छ पाठवत असे. आशाताई घरी अथवा रेकॉर्डिंगला जिथे कुठे असत, तिथे सुगंधी फुलं त्यांच्या स्वागताला हजर असत. ही फुलं कोण पाठवत आहे, या प्रश्नाचा उलगडा आशाताईंना होत नव्हता. एकदा आशाताई रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये गेल्या होत्या. तिथे आर. डी. बर्मन आणि प्रसिद्ध गीतकार मजरुझ सुलतानपूरी उपस्थित होते. त्याच वेळी अज्ञात व्यक्तीकडून फुलांचा गुच्छ आला.
कोण रोज माझ्यासाठी ही फुलं वाया घालवत आहे", असं म्हणत आशाताईंनी ही फुलं फेकून दिली. आशाताईंच्या या कृतीवर आर. डी. बर्मन शांत होते. मजरुह साब म्हणाले,
"तुला फुलं पाठवणारा व्यक्ती माझ्या बाजूला बसला आहे."
गेले अनेक महिने ज्या अज्ञात व्यक्तीकडून फुलं येत आहेत ते आर. डी. बर्मन आहेत या गोष्टीचा आशाताईंना उलगडा झाला. दोघांनी अनेक गाणी एकत्र केल्याने पंचम दा आशाताईंच्या आवाजाचे दिवाने होते. ते म्हणाले, "आशा, फक्त तूच सुरांना समजू शकतेस. तू प्रयत्न जरी केलास तरी तुझे सुर भरकटू शकत नाहीत."
पहिल्या भेटीत दोघांमध्ये फारसे बोलणे झाले नव्हते. पंचम दांनी फक्त आशा भोसले यांना त्यांचा ऑटोग्राफ मागितला होता. त्याकाळात आशा भोसले यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. तर आरडी बर्मन प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांचा टीनएज मुलगा होता. या भेटीनंतर तब्बल दहा वर्षांनी म्हणजे 1966 साली आरडी बर्मन यांनी तीसरी मंजिल या चित्रपटातील गाणी गाण्यासाठी आशा भोसले यांच्याशी संपर्क साधला होता. 'ओ हसीना जुल्फों वाली..' या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या काळात दोघांची मैत्री झाली.

दोघांचेही पहिले लग्न ठरले होते अपयशी...
'तीसरी मंजिल' या चित्रपटानंतर आशा यांनी पंचम दांसाठी गाणे सुरु केले. आरडी बर्मन ज्या चित्रपटांचे संगीत देत, त्या चित्रपटांमध्ये आशा भोसले यांचे गाणे नक्की असायचे. 70 च्या दशकात दोघांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. हा तो काळ होता, जेव्हा दोघांचेही पहिले लग्न अपयशी ठरले होते. आरडी बर्मन त्यांची पहिली पत्नी रीटा पटेलपासून विभक्त झाले होते. तर आशा भोसले यादेखील त्यांचे पहिले पती गणपतराव भोसलेंपासून वेगळ्या झाल्या होत्या. दोघेही एकटे होते, हळूहळू दोघे एकमेकांच्या जवळ आले.
आरडी बर्मन यांच्या आईचा होता लग्नाला विरोध...
आर.डी बर्मन यांनी आशा यांना लग्नाची मागणी घालताना म्हटले होते, की तुच फक्त माझा सूर समजू शकते. मी तुझ्या आवाजाच्या प्रेमात पडलोय. आशा यांना आरडींच्या बोलण्याचा उद्देश कळला आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. ही गोष्ट स्वतः आशा यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. पण या लग्नाला आरडी यांच्या मातोश्रींचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी लग्नासाठी योग्य वेळेची प्रतिक्षा केली. याचकाळात आरडी बर्मन यांचे वडील सचिनदेव बर्मन यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या धक्क्याने आरडींच्या मातोश्री मीरा मनोरुग्ण झाल्या. त्यांची स्मृती गेली होती. त्या स्वतःच्या मुलालासुद्धा ओळखत नव्हत्या. एक वेळ अशी आली, जेव्हा आईच्या प्रकृतीत सुधार होणार नसल्याचे आरडींना कळले आणि त्यांनी 1980 मध्ये आशा यांच्यासोबत लग्न केले.

लता मंगेशकर यांनी दिली खास भेट
आशा भोसले आणि पंचम दा यांच्या लग्नाशी संबंधित आणखी एक मनोरंजक गोष्ट लता मंगेशकर यांच्याशी संबंधित आहे. लता दीदी आणि पंचम दा यांनी मिळून अनेक सुपरहिट गाणीही दिली. लता मंगेशकर यांनी चैतन्य पादुकोण यांच्या 'आरडी बरमनिया' या पुस्तकात पंचम दांसोबतच्या त्यांच्या अतूट नात्याचा उल्लेख केला आहे. लता दीदींच्या म्हणण्यानुसार, 'जेव्हा पंचम आणि आशाचे लग्न झाले, तेव्हा पंचमने मला सांगितले की आम्हाला तुझ्याकडून कोणतंही महागडे गिफ्ट नको आहे. तुला काही द्यायचं असेल तर माझ्यासाठी एक समुपदेशन पत्र लिहा आणि सुंदर वैवाहिक जीवनासाठी मी काय करावं आणि काय करू नये ते मला सांगा.'
पंचम दा यांनी लता मंगेशकर यांचं ते पत्र आयुष्यभर जपून ठेवल्याचं लता मंगेशकर यांनी सांगितलं होतं. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे पंचम दा आणि आशा भोसले जीवनसाथी झाले. मात्र, त्यांचा हा प्रवास खूपच छोटा होता. पंचम दा यांचे ४ जानेवारी १९९४ रोजी वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आणि ते आशा ताईंपासून कायमचे दूर गेले.






