Skip to main content

'शेरलॉक होम्स’इतकं प्रेम मिळूनही झुंजार, काळा पहाड, धनंजयचे लेखक बाबूराव अर्नाळकर कायम उपेक्षीत का राहिले…?

Article in Marathi
Suraj Patke
11 May 2026
25 views
'शेरलॉक होम्स’इतकं प्रेम मिळूनही झुंजार, काळा पहाड, धनंजयचे लेखक बाबूराव अर्नाळकर कायम उपेक्षीत का राहिले…?

सुरज पटके


  • गिनीज बुकने ज्या रहस्यकथाकाराची दखल घेतली ते बाबूराव अर्नाळकर आजच्या पिढीला माहीत असणे जरी कठीण असले तरी झुंजार, काळा पहाड, धनंजय, गोलंदाज, तिरंदाज, फू मांच्यू यांसारख्या हिरोंची नावं मात्र नक्कीच आठवत असतील.
  • या लेखकाचं नाव होतं, चंद्रकांत सखाराम चव्हाण…पण, या नावानं त्यांना कोणीच ओळखत नाही. त्यांना ओळखलं जाते ते रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर या नावाने.किती रहस्य कादंबऱ्या लिहिल्या असतील बाबूरावांनी? तब्बल एक हजार चारशे ऐंशी. हा विश्वविक्रमच.
  • आज इतक्या वर्षांनी बाबूराव अर्नाळकरांची आठवण काढण्याचे निमित्त म्हणजे Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली त्यांच्याच एका पात्रावर आधारीत डिटेक्टिव्ह धनंजय- रहस्यकथा ही  वेबमालिका…


शेरलॉक होम्सच्या घराचा पत्ता होता २२१, बी बेकर स्ट्रीट, लंडन... लोकं हा पत्ता शोधत यायचे शेरलॉक होम्सला भेटण्यासाठी, पाहण्यासाठी. त्याला पत्र पाठवायचे. आपल्या समस्या, अडचणी कळवायचे. हे शहर खरं होतं. तो रस्ता, ती इमारत, हे सारं खरं होतं. पण, शेरलॉक होम्स मात्र पूर्णपणे काल्पनिक होता. ऑर्थर कॉनन डॉयल हे लेखक त्या पात्राचे निर्माते होते. पण, त्यांच्या कथांची मोहिनी लोकमानसावर इतकी पडली होती, की वाचकांना ते जिवंत पात्रच वाटायचं; ते सारं काही खरं वाटायचं….


असंच भाग्य आणखी दोन काल्पनिक पात्रांना मिळालं होतं आणि तेही मुंबईतल्या. त्यांची नावं झुंजार आणि धनंजय…


मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवरील झुंजार महालात झुंजार, त्याची पत्नी विजया आणि नोकर नेताजी यांच्यासह राहत असे; तर धनंजयचं घर होतं गावदेवीत. त्याकाळी म्हणजे स्वातंत्र्याच्या आगेमागच्या काळात अनेक तरुण मुलं झुंजार वा धनंजय यांची घरे शोधण्यासाठी काखेत त्यांच्या कादंबऱ्या घेऊन रात्रीच्या वेळी फिरत असायची. रात्री का, तर सहसा याच वेळेत झुंजार, धनंजय आपल्या मोहिमांवर निघत असत, म्हणून. अशा अपसमयी फिरणाऱ्या या तरूणांना पोलीस पकडायची, त्यांच्या हातातली पुस्तक काढून घेऊन, त्यांना घरी पाठवून द्यायची. धनंजय, झुंजार यांच्या नावांनी वाचक पत्रेही पाठवत असत त्या कादंबऱ्यांच्या लेखकाला. 


या लेखकाचं नाव होतं, चंद्रकांत सखाराम चव्हाण…पण, या नावानं त्यांना कोणीच ओळखत नाही. त्यांना ओळखलं जाते ते रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर या नावाने. किती रहस्य कादंबऱ्या लिहिल्या असतील बाबूरावांनी? तब्बल एक हजार चारशे ऐंशी. हा विश्वविक्रमच. गिनीज बुकने त्याची नोंद घेतली; पण आपल्या साहित्यविश्वाने मराठी बाण्यास जागून याकडेही दुर्लक्ष केलं. मात्र, रसिकांच्या मनाच्या 'अंडरवर्ल्ड'मध्ये आता बाबूराव अर्नाळकरांच्या झुंजार, काळा पहाड, धनंजय, गोलंदाज, तिरंदाज, फू मांच्यू यांसारख्या हिरोंचे साम्राज्य निर्माण झालं होतं. ते कोण कसं खालसा करणार? या रसिकांत कोण नव्हतं? आचार्य अत्रे, लता मंगेशकर, बालगंधर्व यांसारखी दिग्गज मंडळी त्यांत होती. आणि सर्वसामान्य रसिक, ते तर मुबलक होते. असे सांगतात, बाबूराव हे ज्या चष्यांच्या दुकानात बसून कादंबऱ्या लिहित असत, तेथे त्यांना पाहण्यासाठी कधी कधी या रसिकांची एवढी गर्दी होत असे, की बाबूरावांनाच दुकानात प्रवेश करणे कठीण होऊन जाई. अशा वेळी चक्क पोलिसांना पाचारण करावे लागे. ही होती बाबूरावांची लोकप्रियता. केवळ लेखणीच्या बळावर, तिचे पावित्र्य जपत मिळवलेली लोकप्रियता. रहस्यरंजनाच्या हा बादशहाने ९० व्या वर्षी ५ जुलै १९९६ ला या जगाचा निरोप घेतला.


User Image


आज इतक्या वर्षांनी बाबूराव अर्नाळकरांची आठवण काढण्याचे निमित्त म्हणजे Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली डिटेक्टिव्ह धनंजय- रहस्यकथा ही  वेबमालिका…बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबरीतील सगळ्या गाजलेले पात्र म्हणजे गुप्तहेर धनंजय. ही वेबमालिका त्याच्यावरच आधारीत आहे. या मालिकेचे दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांनी केले असून, आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत झळकला आहे.


चंद्रकांत सखाराम चव्हाण हे बाबूराव अर्नाळकर कसे झाले?


चंद्रकांत सखाराम चव्हाण हे मूळचे अर्नाळ्याचे, म्हणून अर्नाळकर. तसे ते पक्के मुंबईकरच. अवघे दहा महिन्यांचे होते ते, तेव्हा त्यांच्या मावशीने त्यांना मुंबईत आणले. अर्नाळ्यात आई-बापाच्या घरातल्या दारिद्र्यात हाल होण्यापेक्षा पोर मुंबईत जरा सुखात तरी राहील हा त्यामागचा हेतू. ही मावशी राहायची ग्रँट रोड स्टेशनजवळच्या जुन्या चिखलवाडीतील मानाजी राजुजीच्या एकमजली चाळीत. तेथेच बाबूरावांचे बालपण गेले. १९१६ साली पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनांच्या बॉम्बहल्ल्याच्या भयाने मुंबईत मोठी पळापळ झाली. त्यावेळी त्यांना अर्नाळ्याला परतावे लागले; पण तिसरी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा मुंबईला आणण्यात आले. येथील आर्यन हायस्कूलमध्ये त्यांचा दाखला घेण्यात आला. ही चाळ, ही शाळा यांनी बाबूरावांना खुप काही शिकवलं. या शाळेत चौथी इयत्तेत असताना त्यांनी शाळेच्या हस्तलिखित मासिकाचे संपादन केले. येथेच त्यांना पुढाऱ्यांची भाषणे ऐकण्यात रस निर्माण झाला. कळत फारसे नसे; पण बाबूराव ती भाषणे ऐकत.


मुगभाटातील शांतारामच्या चाळीच्या पटांगणात त्यांनी पहिले भाषण ऐकले होते ते महात्मा गांधींचे. पुढे स्वातंत्र्याच्या चळवळीत १९३८ साली प्रक्षोभक लिखाणाबद्दल बाबूरावांना १८ महिने कारावासाची शिक्षा झाली, तेव्हा विसापूर जेलमध्ये त्यांना महात्मा गांधी व पं. नेहरू यांचा सहवास लाभला. लहानपणी तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही भेटले होते. सहस्रबुद्धे नावाचे एक कामगार पुढारी होते. ते बाबूरावांच्या मामांचे मित्र. त्यांच्यासमवेत बाबूराव अनेकदा परळच्या बीआयटी चाळीत आंबेडकरांच्या घरी जात असत. तेथे गप्पागोष्टी रंगत. बाबूराव बाबासाहेबांना न्याहाळत बसत. कधी कधी रमाई त्यांना चहा-साखर आणण्यासाठी दुकानातही पाठवत असत. असे समृद्ध बालपण या चाळीने दिले बाबूरावांना.


आपल्या कुटुंबीयांच्या पोटापाण्यासाठी अगदी हमालीपासून, ज्यांच्याविरोधात आंदोलन केले त्या ब्रिटिशांचीच नोकरी करण्यापर्यंत बाबूरावांनी अनेक व्याप केले. नंतर एका चष्यांच्या दुकानात त्यांनी व्यवस्थापक म्हणून नोकरी धरली. पुढे १९४१ साली त्यांनी गिरगावात स्वतःचा चष्याचा व्यवसाय सुरू केला. याच दुकानात त्यांची पहिली रहस्य कादंबरी जन्माला आली. साल होते १९४२. महिना फेब्रुवारी. कादंबरीचे नाव चौकट राणी. विसापूर कारागृहात एडगर वॉलेसची 'थ्री जस्ट मेन' ही कादंबरी त्यांनी वाचली होती. तिने त्यांना रहस्यकथेची ओळख करून दिली. ती येथे कामाला आली. पाहता पाहता या कादंबरीने वाचकांना वेड लावले आणि बाबूराव अर्नाळकर नावाचे एक साहित्यिक गारूड येथे जन्मास आले.


धनंजय, झुंजार,काळा पहाड कसे जन्माला आले?


लहानपणापासूनच त्यांना लेखनाची आवड. नाटके लिहावीत, त्यात काम करावे, असाही खाक्या. त्यामुळे चंद्रकांत सखाराम चव्हाण असे मूळ नाव असलेल्या या मुलाला नाटकमंडळींत बाबू या नावाने हाक मारली जायची. पुढे हाच बाबू "बाबूराव' झाला लेखक म्हणून. बाबूरावांनी नाटके लिहिली आहेत, ललित साहित्यही लिहिले आहे. इतकेच काय, "वैतरणाच्या तीरावरून' नावाचे आत्मचरित्र त्यांनी लिहायला घेतले होते.ते अपुरे राहिले. त्याची पंधरा-वीस पानेच आज उपलब्ध आहेत. "मनोरंजन'मासिकात "सतीची समाधी' नावाची बाबूरावांनी आयुष्यात पहिल्यांदा लिहिलेली कथा प्रसिद्ध झाली. त्या कथेचे कौतुक साक्षात नाथ माधवांनी केले होते. ही कथा वाचून गिरगावात व्ही. आर. प्रभू (अभिनेता बबन प्रभू यांचे वडील) यांचा छापखाना होता. त्यांनी बाबूरावांना एक पुस्तक लिहायची विनंती केली. त्यातून बाबूरावांनी "चौकटची राणी' हे पहिले पुस्तक लिहिले. व्ही. आर. प्रभू यांनी काही मुलांना हाताशी धरून या पुस्तकाची रस्त्यावर उभे राहून विक्री करण्याचे अनोखे तंत्र अवलंबले, ते कामाला आले.अवघ्या दोन महिन्यांत चौकटची राणीच्या ५०० प्रती संपल्या. मग सिलसिला सुरू झाला तो अखंड रहस्यकथा लेखनाचा. प्रभू यांनीच अर्नाळकरांची पहिली काहीशे पुस्तके छापली आहेत. त्यानंतर मग अर्नाळकर अन्य प्रकाशकांकडे वळले. 


User Image


बाबूराव अर्नाळकर महिन्यातून चार ते पाच रहस्यकथांची पुस्तके लिहीत असत. त्या प्रत्येक पुस्तकाचे त्यांना मिळणारे मानधन मात्र अगदीच अल्प होते. त्यामुळे गिरगावमध्ये चश्म्याचे दुकान उघडून त्यांनी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविला होता. एडगर वॉलेस हा रहस्यकथाकार त्यांचा आवडता. बाबूरावांच्या पहिल्या काही पुस्तकांवर वॉलेसच्या शैलीची छाप स्पष्ट दिसते. पण त्यातून अर्नाळकर लवकरच बाहेर आले. त्यांना त्यांची शैली गवसली. झुंजार,काळा पहाड आदी त्यांचे मानसपुत्र गिरगाव, ग्रँटरोडपासून ते अख्ख्या मुंबईत जिथे जिथे आपले कारनामे करीत भ्रमण करीत तो परिसर ते आपल्या कादंबऱ्यातून जिवंत करू लागले. झुंजार महाल शोधण्यासाठी त्यांचे वाचक हातात रहस्यकथेचे पुस्तक घेऊन गिरगावपासूनचा परिसर पालथा घालू लागले. अर्नाळकरांच्या कथानायकांना चित्ररूप देऊन जिवंत केले ते प्रख्यात चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी. 


हा रहस्यकथांचा डौल काही वेगळाच होता...पण बाबूराव अर्नाळकरांच्या या कामगिरीची मराठीतील मठाधिपती साहित्यिक व समीक्षकांनी फारशी दखल घेतली नाही. त्यांना रहस्यकथाकार म्हणून कायमच दुय्यम स्थान दिले. ही खंत नक्कीच बाबूरावांच्या मनात होती. १४८० रहस्यकथा लिहिल्याने गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड‌्समध्ये अत्यंत सन्मानाने नोंद झालेले पहिले मराठी साहित्यिक...रहस्यकथा व ललित साहित्यप्रकारातील पुस्तके असा ग्रंथसंभार लक्षात घेतला तर त्यांच्या पुस्तकांची संख्या भरते तब्बल १८००... इतका बहुप्रसवा व विश्वविक्रम करणारा लेखक असूनही त्यांना मराठी साहित्याच्या प्रथम श्रेणीच्या साहित्यिकांमध्ये कधीच मानाची जागा मिळाली नाही. ही उपेक्षा हयात असताना व मृत्यूनंतरही कायम राहिली…


अर्नाळकरांची कीर्ती सांगती लतादीदी…


बाबूराव अर्नाळकर आणि मंगेशकर कुटुंबीयांमध्ये स्नेहबंध होते. मुंबईत ग्रँटरोड पश्चिमेला १९व्या शतकामध्ये नाना शंकरशेठ यांनी बांधलेलेे शंकराचे देऊळ आहे. या देवळाच्या परिसरात पूर्वी धर्मशाळा होती. गंधर्व नाटक मंडळीचा मुंबई दौरा असेल तेव्हा त्या नाटक कंपनीचा मुक्काम याच देवळाच्या शेजारी असलेल्या धर्मशाळेत असे. या देवळाशेजारीच जी एक चाळ होती, त्यामध्ये मंगेशकर कुटुंब त्यांच्या संघर्षकाळात वास्तव्य करून होते. मंगेशकर कुटुंबीय राहात होते त्या खोलीच्या शेजारीच बाबूराव अर्नाळकर राहात होते. बाबूरावांची मुलगी उषा व लता मंगेशकर त्या वेळी लहानग्या होत्या. त्या दोघी एकत्रित गाणे शिकायला जायच्या. 


"निवडक बाबूराव अर्नाळकर' या ग्रंथासाठी आपला अभिप्राय देताना लतादीदींनी लिहिले आहे की, "रहस्यकथा लेखक बाबूराव अर्नाळकरांबरोबर आम्हा मंगेशकरांचा, खास करून आमची आई"माई' हिचा परिचय होता. तिच्यामुळे आम्हा भावंडांना बाबूरावांच्या रहस्यकथा वाचण्याची आवड निर्माण झाली. धनंजय,छोटू, झुंझार, काळा पहाड या रहस्यकथा आम्ही वाचलेल्या आहेत. 


लता मंगेशकर व सी. रामचंद्र यांनी संगीत क्षेत्रात खूप मोठी एकत्रित कामगिरी केली आहे. दोघांनाही बाबुराव अर्नाळकर हे लेखक आवडायचे. बाबुराव अर्नाळकर यांच्या कादंबरीवर आधारित धनंजय नावाचाच एक मराठी चित्रपट अनेक वर्षांपूर्वी आला होता. त्या चित्रपटाला संगीत दिले होते सी. रामचंद्र यांनी व धनंजयचीच भूमिकाही त्यांनीच केली होती. तेच या चित्रपटाचे निर्मातेही होते. सी. रामचंद्र दिसायला देखणे, सहा फुटाहून अधिक उंचीचे. मात्र त्यांच्या रुपाची जादू मात्र हा चित्रपट यशस्वी करु शकली नाही. `जीवाच्या सखीला कितीदा पुकारु, किती साद घालू, किती हाक मारु' हे सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले व महेंद्र कपूर, उषा मंगेशकर यांनी गायलेले सुश्राव्य गाणे हीच काय ती धनंजय या चित्रपटाची लोकांच्या मनात राहिलेली आठवण. हे गाणे आता यू ट्यूबला रसिकांना ऐकायला मिळते पण ऑडियो स्वरुपात. त्या गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अजून तरी अपलोड झालेला नाही.


User Image


जगात सर्वाधिक पुस्तकं लिहिण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड


‘नाही चिरा नाही पणती’ इतकी नक्कीच बाबूराव अर्नाळकरांच्या साहित्याची वाईट अवस्था मात्र झाली नाही. १९४०च्या दशकापासून सुरू झालेल्या त्यांच्या साहित्यलेखनाचा प्रवास डोळ्यांच्या विकारामुळे १९७०च्या दशकात विराम पावला. या ३०-३५ वर्षांच्या काळात बाबूरावांना रहस्यकथाकार म्हणून वाट्याला आली कोणालाही हेवा वाटावी अशी विलक्षण लोकप्रियता. त्यांच्या एकेका पुस्तकाच्या दोन दोन हजार प्रती दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत हा हा म्हणता खपून जात. हे इतके भाग्य साहित्यचंद्र वगैरे असलेल्या ना. सी. फडकेंपासून साहित्यसूर्य असलेल्या आचार्य अत्रे या समकालीनांनाही लाभले नव्हते.


बाबुराव अर्नाळकर या मराठी लेखकाचा स्वतःचा असा फॅन क्लब होता. त्यांचे फॅनमधल्याच एक वाचक म्हणजे विभाकर कर्वे. विभाकर कर्वे हे कल्याणचे. बाबुराव अर्नाळकरांच्या अनेक रहस्यकथा त्यांना तोंडपाठ होत्या. त्यांची बरीच पुस्तके त्यांच्या संग्रही होती. या व्यक्तींने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डशी संपर्क साधला. गिनीजवाल्यांनी बाबुराव अर्नाळकरांच्या पुस्तकांची नोंद आपल्या रेकॉर्डमध्ये केली. जगभरात सर्वाधिक पुस्तके लिहण्याचा मान बाबुराव अर्नाळकर यांच्या नावावर जमा झाला.


आता ही सगळी माणसे काळाच्या पडद्याआड गेली आहेत. पण तुम्हा-आम्हाला आजही फडके, अत्रे यांची पुस्तके सहजी बघायला मिळतात. आजही त्यांच्या काही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या निघतात. पण मग बाबूराव अर्नाळकरांच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या काढाव्या, हे एक-दोन प्रकाशकांनाच वाटत राहते. बाबूरावांची १८०० पुस्तके छान संग्रहित करून ठेवली आहेत, असे एकही जाणते ग्रंथालय या उभ्या-आडव्या महाराष्ट्रात नाही! 


मात्र सतीश भावसार यांनी संपादित केलेला निवडक बाबूराव अर्नाळकर हा डबल क्राऊन आकाराचा ७०० पानांचा ग्रंथ राजहंस प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकाला प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांची प्रस्तावना आहे. बाबूराव अर्नाळकर यांचे व्यक्तिमत्त्व व लेखनपैलूंविषयी कुमार केतकर, रत्नाकर मतकरी, अभिराम भडकमकर, अंबरिश मिश्र अशा दहा नामवंतांनी आपापले अनुभव लेखबद्ध केले आहेत. तसेच लता मंगेशकर यांनीही अर्नाळकरांविषयी लिहिले आहे. बाबूरावांच्या १८०० पुस्तकांपैकी पहिल्या ५०० पुस्तकांमधून दहा पुस्तके निवडून ती या ग्रंथात छापण्यात आली आहेत. त्यात जसे ‘चौकटची राणी’ हे बाबूरावांचे पहिले पुस्तक आहे, तसेच सुवर्णकाराचे रहस्य आणि अजून आठ पुस्तके... ही दहाही पुस्तके या एकाच मोठ्या पुस्तकात पाहता-वाचता येतील...त्याशिवाय बाबूराव अर्नाळकरांची चरित्रात्मक ओळख करून देणारा एक लेख, बाबूरावांना त्यांच्या वाचकांनी पाठविलेली काही पत्रे, असे बरेच काही रंजक नि रोमांचक ‘निवडक बाबूराव अर्नाळकर’मध्ये असेल…


Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod

Comments

Comments are currently disabled or loading...