Skip to main content

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

Article in Marathi
shekhar patil
3 days ago
14 views
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

शेखर पाटील


महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे. 



कविची महानता मोजण्याचा सर्वात बिनचूक मापदंड म्हणजे जनमानसातील त्याच्या काव्यपंक्तींची लोकप्रियता होय. याचा विचार करता, रावापासून ते रंकापर्यंत आणि संसदेपासून ते गल्लीबोळापर्यंत ज्यांच्या शायरीने असंख्य हृदयांना आंदोलीत केले ते नाव म्हणजे बशीर बद्र ! उर्दू काव्यातल्या तेजस्वी परंपरेतील एक उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजे बशीर बद्र होत. खरं तर विसाव्या शतकातील काही मान्यवरांनी शायरीला ईश्क आणि मुश्क यांच्यातून मुक्त केले. बशीरजी हे त्याच परंपरेतील दिग्गज नाव ! 


अत्यंत साध्यासोप्या शब्दात जीवनातील विविध भावनांना त्यांनी समर्थपणे अभिव्यक्त केले. त्यांनी अरबी आणि फारसी शब्दांपेक्षा दैनंदिन वापरातील हिंदुस्थानी शब्दांना प्राधान्य दिले. याचमुळे त्यांची शायरी ही फक्त अभिजनांपर्यंत न राहता सर्वसामान्यांपर्यंत पोहचली. त्यांच्या अनेक काव्यपंक्ती या आपल्या जीवनाच्या अविभाज्य घटक बनल्या. यातीलच-


उजाले अपनी यादो के हमारे साथ रहने दो ।

न जाने किस गली मे जिंदगी की शाम हो जाय ।


या आयकॉनीक ओळी तर आपण अनेक जणांनी बऱ्याचदा वापरल्या असतील. अनेकांच्या आयुष्यातील कातर क्षणांना या काव्यपक्तींनी जीवंत केले आहे. याला मान्यवरांसह सर्वसामान्यांनी असंख्य वेळेस वापरले असून सोशल मीडियात देखील आपण याचा अनेकदा उल्लेख बघतो.


दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे

जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों।


User Image


या ओळी तर राजकारणात अनेकदा उद्‌धृत करण्यात येतात. बशीरजींनी फाळणीच्या भयंकर कालखंडात लिहलेल्या या ओळी सिमला कराराच्या वेळेस जुल्फीकार अली भुट्टो यांनी इंदिरा गांधी यांना ऐकवल्या होत्या ही बाब विशेष. हा शेर जागतिक स्तरावर कूटनीती आणि मैत्रीचे सूत्र म्हणून ओळखला जातो. विरोधाभासातही माणुसकी आणि मर्यादा राखण्याचा संदेश ते देतात. जीवनातील मैत्री व वैमनस्याचे सार अवघ्या काही शब्दांमध्ये मांडण्याचे त्यांचे सामर्थ्य हेच बशीर बद्र यांना दुसऱ्यांपासून वेगळेपण देणारे ठरले.  


बशीर बद्र यांनी कवी म्हणून त्यांनी प्रेम, मानवी नातेसंबंध आणि सामाजिक प्रश्नांना आपल्या शायरीतून अजरामर केले आहे. त्यांनी गझलला राजवाड्यांच्या बंदिस्त दिवाणखान्यांतून आणि क्लिष्टतेच्या जंजाळातून बाहेर काढत सामान्य माणसापर्यंत आणून सोडले. ही एक शांत पण प्रभावी क्रांती होती. त्यांनी गझलची अभिजातता न घालवता तिला लोकभाषा दिली. 


यापेक्षा देखील त्यांची सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी गझलमध्ये केलेली भाषिक क्रांती. त्यांनी पारंपारिक, कठीण आणि बोजड शब्दावली नाकारून 'हिंदुस्तानी' भाषेचा अंगीकार केला. त्यांनी 'स्वेटर', 'डायरी', 'ट्रेनची खिडकी', 'छत्री', 'लिफाफा' यांसारख्या रोजच्या वापरातील शब्दांना आपल्या काव्यात सन्मानाचे स्थान दिले. ही केवळ शब्द बदलाची प्रक्रिया नव्हती, तर ती गझलला एकविसाव्या शतकातील सामान्य माणसाशी जोडण्याची धडपड होती. त्यांनी उर्दू आणि हिंदी या दोन्ही भाषांना 'संस्कृतची अपत्ये' मानले. किंबहुना या दोन्ही भाषा म्हणजे संस्कृतच्याच 'लेटेस्ट आवृत्त्या' असल्याची संकल्पना मांडली.  गझल जर काळासोबत धावायची असेल, तर तिने आधुनिक संवेदनांना आपल्यात सामावून घेतले पाहिजे, हा त्यांचा आग्रह त्यांनी आयुष्यभर पाळला.


१९८७ मध्ये मेरठमध्ये झालेल्या भीषण जातीय दंगलीने बशीर बद्र यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण केली. या विक्राळ आगीच्या भक्ष्यस्थानी केवळ त्यांचे घर पडले नाही, तर त्या आगीत मीर आणि गालिब यांच्या काळातील संदर्भ असलेली अत्यंत अमूल्य हस्तलिखिते जळून खाक झाली. त्यांच्या स्वतःच्या शेकडो अप्रकाशित गझलांचे संचित एका रात्रीत राख झाले. या आघातातून सावरणे त्यांना केवळ अशक्य वाटत होते. 'लोग टूट जाते हैं एक घर बनाने में, तुम तरस नहीं खाते बस्तियां जलाने में' या हृदयद्रावक शेराचा जन्म याच वेदनेतून झाला. बेख़बर कुर्सियां आँख मलती रहीं । बस्तियाँ बेगुनाहों की जलती रहीं ॥ या काव्यपंक्ती देखील यात व्यथेतून जन्मल्या. या आघाताने त्यांच्या लेखनाला एक 'तात्वीक खोली' दिली. ज्या हातांची हस्तलिखिते जळाली, त्याच हातांनी सूडाची भाषा न लिहिता प्रेमाचा संदेश दिला. या घटनेच्या पश्चातचे त्यांचे काव्य याच राखेतून जन्माला आलेल्या करुणेचा आविष्कार आहे.


बशीर बद्र हे केवळ प्रेमकवीच नव्हते, तर ते मानवी संबंधांचे सूक्ष्म मानसशास्त्र मांडणारे कवी होते. त्यांचे शेर माणसाच्या जटिल वर्तनावर भाष्य करतात. त्यांच्या गझलांमध्ये विरह आणि प्रेमाची ओढ तर आहेच, पण त्यासोबतच मानवी हतबलतेचे (मजबूरियां) एक वेगळेच दर्शन घडते. 'कोई काँटा चुभा नहीं होता दिल अगर फूल सा नहीं होता । कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं कोई बेवफ़ा नहीं होता॥' या ओळींमधून ते मानवी चुकांकडे पाहण्याचा एक सहानुभूतीपूर्ण आणि करुणामय दृष्टिकोन मांडतात. 


User Image


तर, मिल भी जाते हैं तो कतरा के निकल जाते हैं । हाये मौसम की तरह दोस्त बदल जाते हैं । उम्र भर जिनकी वफ़ाओं पे भरोसा कीजे । वक़्त पड़ने पे वही लोग बदल जाते हैं || या ओळींची दाहकता प्रत्येकाने आयुष्यात कधी तर अनुभवलेली असतेच. ज़िन्दगी तूने मुझे कब्र से कम दी है ज़मीं । पाँव फैलाऊँ तो दीवार में सर लगता है । या ओळीत जीवनभराची व्यथा दडलेली आहे. अशाच प्रकारे एकापेक्षा एक सरस रचनांमुळे असंख्य रसिकांच्या हृदयाचा त्यांनी ठाव घेतला. त्यांच्या मुक्तछंदातील कविता तशा कमी लिहल्या असून छंदबध्द अशा गजल आणि यातील विविध अशआर हे त्यांचे खरे काव्यवैभव होय. 


अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. वाजपेयी यांना त्यांनी आपले 'साहित्यिक पिता' मानले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्यासाठी त्यांनी प्रचारही केला होता. यावरून त्यांच्यावर टिका देखील करण्यात आली असली तरी त्यांनी अटलजींसोबतचा स्नेह कायम ठेवला. नियतीचा क्रूर खेळ असा की, अटलजींप्रमाणेच बशीरजी यांना आयुष्यातील शेवटच्या टप्प्यात स्मृतीभ्रंशाची व्याधी जडली. असंख्य रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणारे लिखाण करणाऱ्या या महान कविला शेवटच्या वर्षांमध्ये त्यांचा एक शेर देखील आठवू नये हा काळाचा क्रूर खेळच मानावा लागेल.


बशीर बद्र यांची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती; भारतीय उपखंडात बशीर बद्र' मोठ्या प्रमाणावर वाचले गेले. त्यांच्या साहित्याचा अनुवाद इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत झाला असून, जगजित सिंह आणि हरिहरन यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी त्यांच्या गझलांना दिलेल्या आवाजामुळे ते जगभरातील रसिकांच्या घराघरात पोहोचले. कधी काळी जगभरातील मुशायरे गाजविणारे बशीरजी हे आजच्या गतीमान सोशल मीडियाच्या युगात देखील तितकेच प्रासंगीक आणि लोकप्रिय असल्याचे आपण सर्वच जण अनुभवतोय.


बशीर बद्र हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते एका सर्वसमावेशक आणि प्रवाही विचारधारेचे नाव होते. त्यांनी गझलला अभिजन वर्गाच्या चौकटीतून मुक्त करून सर्वसामान्यांच्या काळजाची धडकन बनवले. आत्यंतीक द्वेषाच्या आणि विखारी कालखंडात प्रेमाची मुलायम भाषा कशी बोलावी, हे त्यांच्या साहित्यावरून कुणालाही शिकता येईल. त्यांचा वारसा केवळ शब्दांत नाही, तर त्यांनी जपलेल्या मानवी मूल्यांमध्ये आहे. त्यांच्या आयुष्याची सायंकाळ झाली असली तरी त्यांनी पेरलेले शब्द आता एका चिरंतन पहाटेच्या रूपात आपल्यासमोर उभे आहेत. आज ते आपल्यात नसले, तरी त्यांचे शब्द "उजाले अपनी यादों के..." या रूपात आपल्या सर्वांच्या सोबतीला कायम राहतील. येणाऱ्या पिढ्यांसाठी ते माणुसकी, प्रेम आणि संवेदनेचा प्रकाश बनून राहतील. उर्दू गझलेचा हा मखमली आवाज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्यांच्या शब्दांचे प्रतिध्वनी विश्वाच्या कानाकोपऱ्यात सदैव धडधडत राहील आणि मानवी मनाला साद घालत राहील. साहित्याच्या या महान उस्तादाला हीच खरी आणि अजरामर श्रद्धांजली आहे.


बशीर बद्र यांचे अनेक शेर मानवी संवेदनांनी ओतप्रोत भरलेले आहेत. यातील मला आवडलेले निवडक अशआर- त्यांनी मैत्रीवर देखील भेदक भाष्य केलेले आहे. याची प्रचिती खालील पंक्ती आपल्याला देतील.


User Image


मोहब्बतों में दिखावे की दोस्ती न मिला ।* 

*अगर गले नहीं मिलता तो हाथ भी न मिला ॥


तसेच


कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से

ये नए मिज़ाज का शहर है ज़रा फ़ासले से मिला करो ॥


या शब्दांमध्ये त्यांनी मैत्री, संधीसाधूपणा, शत्रूत्व यांची विलक्षण गुंफण केली आहे. तसेच गजल म्हणजे काय ? याचे उत्तर त्यांनी किती सारगर्भ दिलेय ते बघा-


पत्थर के जिगर वालों, ग़म में वो रवानी है

ख़ुद राह बना लेगा बहता हुआ पानी है ।

ये शबनमी लहजा है आहिस्ता ग़ज़ल पढ़ना

तितली की कहानी है फूलों की ज़बानी है ॥


जीवनातील व्यथा व्यक्त करतांना ते म्हणतात-


भूल शायद बहुत बड़ी कर ली

दिल ने दुनिया से दोस्ती कर ली ।


माझे जीवाभावाचे मित्र व मार्गदर्शक पीटर अंकल यांच्या अंत्ययात्रेत माझी भावविभोर दशा ही बशीरजींच्याच खालील चारोळीसारखी होती-


सब कुछ खाक हुआ है लेकिन चेहरा क्या नूरानी है

पत्थर नीचे बैठ गया है, ऊपर बहता पानी है ।

तेरे बदन पे मैं फ़ूलों से उस लम्हे का नाम लिखूं

जिस लम्हे का मैं अफ़साना, तू भी एक कहानी है ॥


असे असंख्य शेर, गजल आदींच्या माध्यमातून बशीर बद्र यांनी आपले जीवन समृध्द केले आहे. तर सर्वात शेवटी त्यांचा मी वर नमूद केलेला अजरामर शेर. या संपूर्ण गजलमधील मधल्या काव्यपंक्ती वगळून चारोळी तयार होते ती अशी-


कभी तो आसमाँ से चाँद उतरे जाम हो जाये, ।

तुम्हारे नाम की इक ख़ूबसूरत शाम हो जाये ॥

उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो,

न जाने किस गली में ज़िन्दगी की शाम हो जाये ॥


आपल्या जीवनातील अनेक क्षणांच्या सोबतीला बशीर बद्र यांचा कलाम असतोच. अगदी समर्पक शब्दांत सांगावयाचे तर- 'जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात !' यामुळे ते लौकीक अर्थाने गेले असले तरी त्यांच्या काव्याच्या माध्यमातून ते चिरंतन आपल्या सोबत राहणार आहेत.


Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod
प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की…!
कला / साहित्य / सिनेमा

प्रिय चहाच्या कपास, पत्र लिहिण्यास कारण की…!

चहा हे असं पेय आहे, जे झोपडीतल्या गरिबापासून ते पंचतारांकित हॉटेलातल्या श्रीमंतापर्यंत सर्वच पितात. म्हणून तर मी चहाला समाजवादी पेय म्हणतो. चहा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. ‘चहातरी घेऊन जा’ असं घरी आलेल्या माणसाला आपण किमान सांगतो तरी (ह्यात अस्सल सदाशिव पेठी घरं धरलेली नाहीत.) सध्या ‘रात्री सातनंतर चहा घेत नाही’ असं म्हणण्याचा जरी जमाना आलेला असला, तरी सकाळी उठल्यावर पहिली आठवण अजूनही चहाची येते. म्हणूनच आजच्या ‘आंतरराष्ट्रीय चहा दिना’निमित्त हे आपल्या जीवाभावाच्या मित्राला पत्र...

7 min read
D
Dwarkanath Sanjhgiri

Comments

Comments are currently disabled or loading...