मंगेशराज दहीवळे
- आजच्या भारतात राजकारण अधिकाधिक चित्रपटाच्या अनुभवातून लोकांपर्यंत पोहोचत आहे. चित्रपटाचा पडदा हे आता एक असं मोठं व्यासपीठ बनलं आहे, जिथे लोक भावनिक पातळीवर “राष्ट्र” काय आहे हे शिकतात.
- चित्रपट आता केवळ राजकारण दाखवत नाही, तर तो लोकांना राजकारण कसे अनुभवायचे, कसे लक्षात ठेवायचे आणि त्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची हे शिकवतो आहे.
- २०१४ नंतर हा बदल विशेषतः अधिक प्रकर्षाने जाणवू लागला. कथा, प्रतीके, दृश्यवैभव आणि इतिहासातील स्मृतींचा वापर करून लोकांच्या जनमानसावर प्रभाव टाकण्याचे मोठे कार्य आता चित्रपटांमार्फत होऊ लागलं आहे. चित्रपट हे माध्यम लोकांना विचार शिकवणाऱ्या सार्वजनिक शिक्षणाच्या साधनासारखं वापरलं जाऊ लागलं आहे.
पूर्वी राजकीय प्रचार हा पत्रकं, भाषणं, रेडिओ प्रसारणं, वर्तमानपत्रं, पक्षसंघटना आणि सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असे. सर्वसामान्य माणूस राजकारण आणि राजकीय विचारसरणीची ओळख वर्ग खोल्या, राजकीय सभा, शासकीय घोषणा आणि वृत्तपत्रांमधील अग्रलेखांमधून करून घेत असे. पण आजच्या भारतात राजकारण अधिकाधिक चित्रपटाच्या अनुभवातून लोकांपर्यंत पोहोचत आहे. चित्रपटाचा पडदा हे आता एक असं मोठं व्यासपीठ बनलं आहे जिथे लोक भावनिक पातळीवर “राष्ट्र” काय आहे हे शिकतात. चित्रपट आता केवळ राजकारण दाखवत नाही, तर तो लोकांना राजकारण कसे अनुभवायचे, कसे लक्षात ठेवायचे आणि त्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची हे शिकवतो आहे.
२०१४ नंतर हा बदल विशेषतः अधिक प्रकर्षाने जाणवू लागला. याचे कारण केवळ राष्ट्रप्रेमी चित्रपटांची संख्या वाढली एवढेच नव्हते. भारतीय चित्रपटांमध्ये राष्ट्रवाद, सैनिकी भावना, धार्मिक प्रतीके आणि उच्चवर्णीय दृष्टिकोन पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. परंतु आता चित्रपट आणि राजकीय सत्ता यांच्यातील संबंधच पालटले आहेत. कथा, प्रतीके, दृश्यवैभव आणि इतिहासातील स्मृतींचा वापर करून लोकांच्या जनमानसावर प्रभाव टाकण्याचे मोठे कार्य चित्रपटांमार्फत होऊ लागलं आहे. चित्रपट हे माध्यम लोकांना विचार शिकवणाऱ्या सार्वजनिक शिक्षणाच्या साधनासारखं वापरलं जाऊ लागलं आहे.

प्रोपोगंडा सिनेमाचे भावनिक इंजिनियरिंग
हा नवीन प्रकारचा सिनेमा नेहमी उघडपणे राजकीय प्रचार करेलच असे नाही. तो थेट “शासनाला पाठिंबा द्या” किंवा “सत्तेचं ऐका” असं स्पष्टपणे सांगत नाही. पण इथेच त्याचं कळीचं स्थान अधोरेखित होतं. तो लोकांच्या भावनांवर थेट परिणाम करतो. आता एका विशिष्ट पठडीतलेच चित्रपट मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होऊ लागले आहेत. या चित्रपटांमध्ये राष्ट्राचा अवमान, विश्वासघात, दहशतवाद, हिंदू संस्कृतीवर झालेला हल्ला आणि शेवटी एका सामर्थ्यशाली पुरुषी नायकाद्वारे राष्ट्राचा सन्मान पुन्हा प्राप्त करणे असे विषय असतात. या चित्रपटांचा भावनिक प्रवास साधारणपणे सारखाच असतो. प्रारंभी राष्ट्राचा अवमान होतो. मग शत्रू दर्शवला जातो. परिस्थितीतील गुंतागुंत काढून टाकली जाते. काय बरोबर काय चूक याबद्दल कोणतीही साशंकता ठेवली जात नाही. शेवटी एक सामर्थ्यशाली सरकार किंवा नायक हिंसेद्वारे राष्ट्राचा सन्मान परत मिळवतो.आणि प्रेक्षकांना अखेरीस सूड, राष्ट्रभक्ती किंवा “प्रतीकात्मक शुद्धीकरण” यांसारख्या भावनांतून समाधान मिळवून दिले जाते.

सिनेमाद्वारे भावनांचे नियमन : हव्या त्याच राजकीय जाणिवांची निर्मिती
सिनेमा फक्त मनोरंजन करत नाही. तो लोकांच्या भावनिक प्रतिक्रिया तयार करतो. कोणाची भीती बाळगायची, कोणावर संशय घ्यायचा आणि कोणाला “राष्ट्राचा घटक” मानायचे आणि कुणाला नाही हे तो शिकवतो. त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो लोकांनी राजकारणाकडे कोणत्या भावनेने पाहिले पाहिजे याचे तो शिक्षण देतो. परिणामी, संवैधानिक चर्चा, कायदे, प्रक्रिया आणि लोकशाहीतील संवाद हे घटक लोकांना दुर्बळ, कंटाळवाणे आणि निरुपयोगी वाटू लागतात. लोकशाहीची शांत आणि संथ प्रक्रिया ही सूडप्रधान राष्ट्रवादाच्या तीव्र भावनिक अनुभवाशी स्पर्धा करू शकत नाही. म्हणूनच आजच्या प्रचारात्मक चित्रपटाला केवळ विचारसरणी म्हणून न पाहता भावनिक नियंत्रणाची पद्धत म्हणून पाहणे गरजेचे आहे. प्रेक्षक राष्ट्राकडे अधिकार, कायदे, संस्था आणि बंधुता यांवर आधारलेली संवैधानिक व्यवस्था म्हणून पाहत नाहीत. त्यांना राष्ट्र हे सतत बाहेरील आणि अंतर्गत शत्रूंनी वेढलेले एक भावनिक शरीर वाटू लागते. परिणामी, राजकीय मतभेद व्यक्त करणे मानसिकदृष्ट्या कठीण बनते, कारण चित्रपटांमध्ये विरोधाला “देशद्रोह” म्हणून दर्शवले जाते. लोकांना विचार करण्याऐवजी केवळ भावना अनुभवायला शिकवले जाते.
अशा चित्रपटाची राजकीय शक्ती याच भावनिक गुंतवणुकीत दडलेली असते. लोकशाहीमध्ये संयम, चर्चा, गुंतागुंत आणि समजूतदारपणा आवश्यक असतो. परंतु, चित्रपट तत्काळ भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतो. त्यामुळे चित्रपटांमधील शासन अत्यंत निर्णायक आणि सामर्थ्यशाली वाटते, कारण चित्रपट वास्तवातील लोकशाही प्रक्रियेतील अडचणी आणि मर्यादा दाखवत नाहीत. या अर्थाने प्रचारात्मक चित्रपट केवळ सत्तेला साहाय्य करत नाही, तर तो लोकांच्या मनात “सत्ता कशी असावी” याची व्याख्याच बदलून टाकतो.
राष्ट्रवादाची दृश्य भाषा : महागाथा, पौरुषत्व आणि पडद्यावरील राष्ट्रसत्ता
२०१४ नंतरच्या प्रचारात्मक चित्रपटांमध्ये दृश्यांची मांडणी अत्यंत महत्त्वाची असते. अशा अनेक चित्रपटांमध्ये एक विशिष्ट शैली दिसून येते. संथगतीतील सैनिकी दृश्ये, भव्यदिव्य पार्श्वसंगीत, नायकाला अतिशय सामर्थ्यशाली दर्शवणारी प्रकाशयोजना आणि संगणकीय दृश्यवैभवाचा सढळ वापर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. भगवे किंवा केशरी आकाश आणि त्यासमोर फडकणारा राष्ट्रध्वज ही प्रतिमा वारंवार दिसते. ड्रोन दृश्ये, युद्धनियंत्रण कक्ष आणि निगराणी तंत्रज्ञान यामुळे शासन सर्व काही पाहू शकते आणि सर्व काही नियंत्रित करू शकते, असा एक भाव निर्माण केला जातो. हे चित्रपट एकाच वेळी सैनिकी जाहिराती, पुराणकथा आणि मोठ्या खर्चाच्या व्यावसायिक जाहिरातींसारखे वाटतात. त्यांचा उद्देश वास्तव मांडणे नसून, लोकांना भावनिकरीत्या त्या वातावरणात ओढून घेणे हा असतो.या दृश्यभाषेत पुरुषत्वाला अत्यंत महत्त्व दिले जाते. आदर्श नागरिक हा शिस्तबद्ध, आक्रमक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम, भावना नियंत्रणात ठेवणारा आणि राष्ट्रासाठी हिंसा करण्यासही सिद्ध असलेला दर्शवला जातो. करुणा, प्रश्न विचारणे किंवा मतभेद व्यक्त करणे या गोष्टी दुर्बलतेशी जोडलेल्या असतात. हळूहळू 'राष्ट्र' आणि 'सैनिकी मर्दानगी' या दोन गोष्टी लोकांच्या मनात एकमेकांशी जोडल्या जातात.

इतिहास आणि सिनेमातून कथन केलेली काल्पनिक रम्य दंतकथा
या प्रकारच्या सिनेमाच्या जगात इतिहासाचेही स्वरूप पालटले जात आहे. गुंतागुंतीचा इतिहास सुलभ करून तो हिंदूंच्या पीडितपणाच्या आणि प्रतिशोधाच्या कथांमध्ये रूपांतरित केला जातो. भूतकाळ हा विश्वासघातकी व्यक्ती, आक्रमक, तारणहार आणि हुतात्मे यांनी भरलेले युद्धक्षेत्र म्हणूनच केवळ दर्शवला जातो. इतिहासातील गुंतागुंत नष्ट केली जाते. सामाजिक विरोधाभास लुप्त होतात. आर्थिक आणि सामाजिक वास्तव मागे पडते. इतिहासाचे रूपांतर एका नैतिक नाट्यात केले जाते. हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कोट्यवधी लोक इतिहास पुस्तकांमधून किंवा शैक्षणिक चर्चांमधून शिकत नाहीत. ते इतिहास चित्रपटांच्या माध्यमातून पाहतात. त्यामुळे चित्रपटांतील दृश्ये लोकांना कागदोपत्री पुराव्यांपेक्षा अधिक सत्य वाटू लागतात. एकदा इतिहासाचे रूपांतर भावनिक पुराणकथेत झाले की, तर्कशुद्ध चर्चा करणे कठीण होते. समाज मग निवडक घटनाच स्मरणात ठेवू लागतो.इतिहासाचे असे पुनर्लेखन प्रतिशोध घेण्याची भावना निरंतर जिवंत ठेवते. जुन्या जखमांची वारंवार आठवण करून दिली जाते कारण दुखावलेली भावनावेगी जनता राजकीयदृष्ट्या उपयुक्त असते. सतत आपण पीडित आहोत अशी भावना असलेला समाज प्रतीकात्मक संघर्षासाठी सहजपणे सिद्ध होतो.

जातीप्रश्नावर पडद्यावरील कमालीची शांतता आणि हरवलेली वैचारिक चौकट
या तथाकथित राष्ट्रप्रेमी चित्रपटांमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातिव्यवस्थेबद्दल असलेली जवळजवळ पूर्ण शांतता. हे चित्रपट राष्ट्र, संस्कृती, परंपरा, अभिमान आणि बलिदान याबद्दल निरंतर बोलतात; परंतु जातिव्यवस्थेतील हिंसा आणि विषमता यांबद्दल फार कमी भाष्य करतात.हे योगायोगाने घडत नाही. जातिव्यवस्था समोर आली तर “एकसंध हिंदू संस्कृती”ची संकल्पना दुर्बल होईल ना. समाजातील फूट, अवमान, बहिष्कार, भूमिहीनता, सामाजिक विभाजन आणि दडपशाही यांविषयी बोलावे लागेल. असे प्रश्न बहुसंख्याकवादी राष्ट्रवादासाठी आव्हानात्मक ठरतात.आंबेडकरी दृष्टिकोनातून पाहिले तर हे मौन अत्यंत राजकीय आहे. बाहेरील शत्रूंवर लक्ष केंद्रित केले जाते कारण समाजातील अंतर्गत अन्याय लपवायचा असतो. त्यामुळे प्रोपगंडा चित्रपट केवळ इतिहास पालटत नाही, तर तो लोकांचे सामाजिक वास्तवावरचे लक्षही विचलित करतो. लोकांना कटकारस्थानांची आणि बाहेरील संकटांची भीती दाखवली जाते, परंतु समाजातील दैनंदिन अन्यायाकडे दुर्लक्ष केल्या जाते.
OTT प्लॅटफॉर्म्स आणि अल्गोरिदमप्रेरित राष्ट्रवाद
ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियामुळे ही प्रक्रिया अधिक वेगाने विस्तारली आहे. पूर्वी प्रचारासाठी शासनाच्या नियंत्रणाची आवश्यकता होती. आता प्रचार अल्गोरिदमच्या (संगणकीय कार्यप्रणाली) माध्यमातून निरंतर पसरतो. चित्रपटांतील दृश्ये 'मीम्स' बनतात. राष्ट्रप्रेमी संवाद 'व्हायरल क्लिप्स'मध्ये रूपांतरित होतात. भावनिक दृश्ये वारंवार लोकांसमोर येत राहतात. लोक आता चित्रपट केवळ चित्रपटगृहात एकदाच पाहत नाहीत. ते निरंतर एका प्रकारच्या भावनिक प्रवाहात जगत असतात. मोबाईलवरील शिफारस प्रणाली (Recommendation System) लोकांना अशाच प्रकारचे चलचित्र पुन्हा पुन्हा दाखवत राहते. राष्ट्रवाद हा एका दमात पाहण्यासारखा (बिंज वॉच) अनुभव बनतो. यामुळे राजकीय संवादाचे स्वरूप पालटते. क्रोध आणि संताप व्यसनासारखे होतात. प्रोपोगंडा सिनेमाचे दृश्यवैभव कायम समोर येत राहते. राजकारण हे एखाद्या मालिकेसारखे वाटू लागते. नागरिक हा निरंतर भावनिक उत्तेजना घेणारा प्रेक्षक बनतो. व्यसनी. अशा परिस्थितीत प्रत्यक्षातले सरकारी शासन आणि अभिनय यांमधील अंतर धूसर होऊ लागते.

सिनेमाला राजकीय धर्माचे स्वरूप आणि जनसमूहांचे भावनिक उत्तेजन
आजचा प्रचारात्मक सिनेमा अनेकदा धार्मिक विधीसारखा वाटतो. चित्रपटगृह हे भावनिकरित्या एकत्र येण्याचे स्थान बनते. ध्वज, घोषणा, हुतात्म्यांची दृश्ये, भक्तिमय संगीत आणि सांस्कृतिक घोषणा यामुळे धार्मिक वातावरण निर्माण होते. प्रेक्षक केवळ चित्रपट पाहत नाहीत, तर ते भावनिकरीत्या त्यात सहभागी होतात. चित्रपटाचा अनुभव हा उपासनेसारखा वाटू लागतो. राष्ट्राला पवित्र रूप दिले जाते. सैनिकाला पुजाऱ्याप्रमाणे दर्शवले जाते. नेता पुराणकथांतील नायकासारखा वाटू लागतो. राजकीय निष्ठा ही विचारांवर आधारित न राहता भावनिक भक्तीमध्ये रूपांतरित होते.हे आजच्या जागतिक राजकारणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे, राजकारणाचे भावनिक आणि प्रतीकात्मक प्रदर्शनात रूपांतर होणे.
लोकशाही आणि विवेकनिष्ठ विचारांच्या अभावाचे संकट
लोकशाहीसमोरील सर्वात मोठा धोका केवळ सेन्सॉरशिप (अभिव्यक्तीवरील बंदी) नाही. उघड बंदी ओळखणे तुलनेने सोपे असते. परंतु, खरा धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा लोक स्वतःच साधे, भावनिक आणि एकतर्फी राजकीय चित्रण स्वीकारू लागतात.लोकशाहीसाठी संयम, मतभेद सहन करण्याची क्षमता, संवैधानिक मूल्ये आणि आत्मपरीक्षण आवश्यक असते. मात्र, प्रचारात्मक चित्रपट याच्या विपरीत भावना प्रबळ करतो. तो भावनिक खात्री, “आपण विरुद्ध ते” असा विचार, 'हिंसक नायकत्व' आणि “शुद्ध राष्ट्रवाद" यांना उत्तेजन देतो.जेव्हा लोक राजकारण प्रामुख्याने चित्रपटांतील सोप्या विभागणीतून पाहू लागतात, तेव्हा विरोध करणेच चुकीचे वाटू लागते. अल्पसंख्याक लोक “संकट” वाटू लागतात. बुद्धिजीवी संशयास्पद वाटू लागतात. चर्चा आणि वादविवाद कंटाळवाणे वाटू लागतात, कारण फक्त भव्य दृश्यवैभव आणि तीव्र भावना हे ग्रहण करण्यास अधिक सुलभ आणि आकर्षक असतात. समोरच्या श्रीमंत दृश्यांचा तमाशात अडकून पडलेली लोकशाही हळूहळू लोकशाहीसाठी आवश्यक असलेली प्रगल्भ भावनिक क्षमता गमावूनच बसते.

प्रचारात्मक सिनेमाची आंबेडकरवादी चिकित्सा : बंधुभाव विरुद्ध लादलेली शत्रूता
आंबेडकरी दृष्टिकोनातून पाहिले तर सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. बहिष्कार, इतिहासाचे विकृतीकरण, आक्रमक मर्दानगी, आणि निरंतर संशयावर आधारलेली संस्कृती हे संवैधानिक नैतिकता जपून ठेवू शकत नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी बंधुता ही केवळ नैतिक भावना नव्हती; ती लोकशाही टिकवण्यासाठी अनिवार्य अट होती. निरंतर शत्रू निर्माण करणारी संस्कृती लोकशाहीचा नैतिक पाया दुर्बल करते.आंबेडकरांनी मांडलेली घटनात्मक राष्ट्राची संकल्पना समता, प्रतिष्ठा आणि देशबांधव आणि भगिनींबद्दलच्या प्रत्येक नागरिकांच्या नैतिक जबाबदारीवर आधारित होती. मात्र, प्रचारात्मक चित्रपट अनेकदा भय, द्वेष आणि सततच्या भावनिक ध्रुवीकरणावर आधारलेला असतो. म्हणूनच हा संघर्ष केवळ राजकीय नाही; तो दोन भिन्न समाजदृष्टींमधील संघर्ष आहे एक संवैधानिक बंधुतेवर आधारलेली आणि दुसरी भावनिक बहुसंख्याकवादावर आधारलेली.
कल्पनाशक्तीवर ताबा मिळवण्याची धडपड
आजच्या भारतात प्रोपोगंडा सिनेमाभोवतीचा संघर्ष हा केवळ एक मर्यादित सांस्कृतिक प्रश्न नाही. तो जनमानसाच्या कल्पनाशक्तीवर नियंत्रण मिळवण्याच्या एका मोठ्या संघर्षाचा भाग आहे. एकविसाव्या शतकातील राजकीय संघर्ष हे केवळ निवडणुका किंवा कायद्यांपुरते मर्यादित नसतील; ते कथा कोण सांगते, इतिहास कोण निश्चित करतो, भावना कोण घडवते आणि राष्ट्र स्वतःकडे कोणत्या दृष्टीने पाहते, याबद्दलही असतील.
२०१४ नंतर चित्रपट केवळ करमणुकीचे साधन न राहता राजकारण समजून घेण्याचे आणि पसरवण्याचे प्रमुख माध्यम बनले आहे. लोक आता सिनेमाच्या अनुभवातूनच राजकीय विचार अवचेतनात मुरवून घेतात. त्यामुळे आजचा लोकशाही टिकवण्याचा लढा केवळ मतदानापुरता उरलेला नाही, तर तो लोकांच्या भावना, विचार आणि कल्पनाशक्तीवर प्रभाव टाकणाऱ्या कथा आणि प्रतिमांचा लढा बनला आहे.
(साभार - जन-गण-मंगलदायक फेसबुक पेज)






