- भागा वरखडे
स्वारगेट हे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले बस स्थानक आहे. दिवसभरात दीड हजारांहून अधिक बसमधून सुमारे एक लाख प्रवाशांची वाहतूक या स्थानकावरून होते. या बसस्थानकावर सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि शंभर फुटावर पोलिस ठाणे अशा विविध यंत्रणा असतानाही भल्या पहाटे एका युवतीची फसवणूक करून तिच्यावर एकदा नव्हे, तर दोनदा बलात्कार व्हावा, यासारखी दुर्दैवी बाब नाही.
माजी मंत्र्याच्या अपहरण न झालेल्या मुलाला परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी केंद्र आणि राज्याच्या यंत्रणा ज्या गतीने कामाला लागल्या होत्या, तेवढ्याच तत्परतेने त्या कृष्णा आंधळे आणि दत्तात्रय गाडे यासारख्या आरोपींना अटक करू शकल्या नाहीत, हे वास्तव आहे.
विरोधकांवर लक्ष ठेवण्यात गृहखात्याचा जेवढा वापर होतो, तेवढा वापर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात होत नाही. पोलिसांच्या कामातील राजकीय हस्तक्षेप आणि त्यांचा कायदा व सुव्यवस्थेऐवजी दुसरीकडेच वापर यामुळे ते ही हतबल झाले आहेत.
गेल्या पाच वर्षांपूर्वी पोलिसांच्या कमी संख्येचे कारण दिले जात होते. आता तर पोलिस भरतीही टप्प्याटप्प्याने सुरू आहे, तरीही गुन्हेगारांवर वचक नाही, हे चित्र दुर्दैवाने दिसते. मंत्र्यांच्या निकटवर्तीयावर जोपर्यंत हल्ला होत नाही, तोपर्यंत गजा मारणे टोळीवर ‘मोक्का’ लावण्याचा मुहूर्त आयुक्तांना सापडत नाही. मंत्र्यांना नाराजी व्यक्त करावी लागल्यावर पोलिस यंत्रणा हलणार आहे का, हा प्रश्न आहे.
स्वारगेट बसस्थानकाच्यावरच्या दुर्दैवी घटनेनंतर नागपूर, नाशिक, शिवाजीनगरसह राज्याच्या अन्य महत्त्वाच्या बसस्थानकांवर रात्रीची महिलांची सुरक्षा रामभरोसे असते, हे वेगवेगळ्या पाहण्यांतून पुढे आले आहे. बसस्थानकात गर्दुल्यांचा, मद्यपींचा वावर आणि काही अडचणीमुळे स्थानकावर अडकून पडलेल्या एकटयादुकट्या महिला असे अनेक ठिकाणी निदर्शनास आले.
अशा परिस्थितीत महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय युवतीवर पहाटे झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे राज्यातील समाजमन अस्वस्थ झाले.
भारतात रोज बलात्काराचे 87 गुन्हे दाखल होतात. हा केंद्र सरकारने जाहीर केलेला अधिकृत आकडा आहे; मात्र नोंदविले न जाणारे गुन्हे किती असतील? कित्येक अत्याचारांची पोलिसांकडे नोंदही होत नाही. दिल्लीतील निर्भया, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपर्डीतील चिमुरडी, कोलकात्यातील अभया अशा अनेक घटना घडतात.
हैदराबादमधील पशुवैद्यकीय अधिकारी महिलेवर झालेला सामूहिक अत्याचार, पाच वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार, बदलापूरच्या शाळेतील चिमुरड्यांशी अक्षय शिंदेने केलेला प्रताप, वडिलांनीच आपल्या पोटच्याच तीन-तीन मुलींच्या शरीराचे तोडले जाणारे लचके..किती विकृती? अशा घटनानंतर मेणबत्त्या जाळून दोन-चार दिवस विरोध होतो. त्या मेणबत्त्या जाळून खाक झाल्यावर त्याचे विस्मरण होते आणि मग काही दिवसांनी पुन्हा एखादी घटना घडते.
समाज म्हणून व्यवस्था आहे, त्यात कायद्याची आणि न्यायाची चौकट आहे. प्रत्येकाची भूमिका निश्चित आहे; पण ही चौकट तकलादू आहे. भूमिका विसंगत आहेत आणि त्याची जबाबदारी असणारे लोकप्रतिनिधी वेळेवर हात वर करून जबाबदारीपासून पळ काढतात, असा आजवरचा अनुभव आहे.
क्षणिक सुखासाठी एखादा जीव घेण्याची विकृती का वाढत आहे. तिच्यावर पोलिसांचा, कायद्याचा धाक का नाही? समाज व्यवस्था म्हणून केंद्र आणि राज्य सरकार सपशेल अयशस्वी ठरते. घरातून मुलगा आणि मुलीवर होणारे वेगवेगळे संस्कार आणि मुलांमध्ये नकार पचवण्याची सवय नसणे यामुळे असे प्रकार मुलींकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते.
ती माणूस आहे आणि नकाराचा तिला अधिकार आहे, याचाच जणू आता विसर पडला आहे. शारीरिक संबंधात ही सहमती असायला हवी. जबरदस्ती नको. त्यामध्ये आदर असायला हवा होता. त्यासाठी ‘कन्सेंट’ ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचा त्याचा स्वीकार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण जबरदस्तीतून फक्त शारीरिक इजा नाही, तर मानसिक आघातही होतो. हा आघात आयुष्यभर त्रास देणारा असतो.
स्वारगेटसारख्या घटना घडल्या, की त्यात महिलेची चूक शोधून त्याकडे बोट दाखविले जाते. मुलीला बचाव कसा करता आला असता, याची चर्चाच जास्त होते. आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी समाजमन पेटून उठते;परंतु प्रत्येक घटनेनंतर फाशीची शिक्षा दिल्याची भाषा केली जाते. फाशीची शिक्षा दिली, तर आरोपी एकदाचा सुटतो.
त्याऐवजी त्याला आयुष्यभर स्मरणात राहील आणि दररोज जगूनही मरण परवडले असे वाटेल अशी शिक्षा व्हायला हवी. त्यावर कुणीच भर देत नाही. आपण केवळ स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारतो; पण ती प्रत्यक्षात आहे का, हा प्रश्न आहे. फक्त शिक्षण घेतले आणि त्यांच्या बरोबरीने काम केले म्हणजे समानता येते असे नाही.
समानता ही विचारांमध्ये हवी. आचरणात हवी. स्त्रीकडे सार्वजनिक मालमत्ता म्हणून पाहण्याची वृत्ती अगोदर संपवायला हवी. स्त्रीबद्दल आदर बाळगण्याचे बाळकडू घरातूनच दिले पाहिजे. अगदी लहान वयापासून मुलगा आणि मुलगी यांच्यावर समान वागणुकीचे संस्कार व्हायला हवेत. मुलगा आई, बहिण, मैत्रिणीबद्दल आदर असला पाहिजे आणि पुढे अनोळखी स्त्री बरोबरही तो आदराने वागेल, असे संस्कार घराघरातून झाले, तरच ही विकृती समूळ नष्ट होईल.
राज्यात सांस्कृतिक शहर, शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या अनेक दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. एका 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करणाऱ्या या आरोपीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिसांनी त्याला जामीनच कसा मिळू दिला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 
शिरूर आणि पुणे पोलिसांची एकूण 13 पथके आरोपीचा शोध घेतला आणि अखेर त्याला अटक करण्यात आली. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्याने बलात्काराच्या या घटनेव्यतिरिक्तही काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासाठी तो आपण पोलिस असल्याचे भासवायचा.
त्याच्या संपर्कामध्ये आलेल्या राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. गाडेवर आत्तापर्यंत सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गाडे सातत्याने स्वारगेट बसस्थानकावर वारंवार जात असावा. त्यामुळे त्याला परिसरातील पूर्ण माहिती होती. त्याचाच फायदा घेऊन त्याने पीडित तरुणीला बसस्थानकावरील निर्जनस्थळी घेऊन जाऊन बलात्कार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वारगेट बसस्थानकावर महिला, मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही पोलिसांकडे येत होत्या. त्या त्या वेळी गस्त घालून, संशयितांची चौकशी करून त्यांना हाकलून देण्यात येत होते; मात्र या वेळी ती एकटी असल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत नराधम आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले.
त्या वेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. तिच्या उत्तरातून गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिस आता तपास करत आहेत. गुन्हे शाखेने गाडे याच्या दहा मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून गाडे याच्याबद्दल खडान्खडा माहिती पोलिसांनी काढून घेतली आहे.
त्याचबरोबर तो एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा ‘कार्यकर्ता’ असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या संपर्कात राजकीय व्यक्ती, पोलिस कर्मचारी असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. नराधम आरोपी ‘पीएमपी’, ‘एसटी’ स्थानकांवर रेंगाळत मुली, तरुणींना आपण पोलिस असल्याचे भासवून जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न करायचा. स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली. सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले. आगारप्रमुख आणि स्थानकप्रमुखांवरची कारवाई ही पश्चातबुद्धी आहे.





