अभिजीत तांगडे
- AIFF मध्ये सुप्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांचा प्रतिष्ठेचा 'पद्मपाणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
- भारतीय सिनेमा संगीतातील द्रोणाचार्य आहेत इलैयाराजा
- अमेरिकेने भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केलेल्या सर्वेक्षणानुसार इलैया राजा यांना ऑल टाइम ग्रेटेस्ट म्युझिक डायरेक्टरसाठी सर्वाधिक मते मिळाली होती.
'तंत्रज्ञानामुळे संगीत वेगवान झाले. कमी वेळात अधिकाधिक चित्रपट होत आहेत. मात्र, त्यातील जिवंतपणा हरवला आहे. आम्ही आजही ८८ वादकांसह संगीत रचना करतो म्हणूनच चित्रपटातील व्यक्तिरेखा, प्रसंग आणि भावना संगीतातून जनसामान्यांपर्यंत पोहोचतात.', अशी खंत सुप्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांनी व्यक्त केली. छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (AIFF) ते बोलत होते. या महोत्सवात इलैयाराजा यांचा प्रतिष्ठेचा 'पद्मपाणि जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इलैयाराजा यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि ₹2,00,000 ची रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.
महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात बुधवार, २८ जानेवारी रोजी अकराव्या अजिंठा वेरुळ आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. हा महोत्सव १ फेब्रुवारी पर्यंत चालणार असून जगभरातील उत्कृष्ट चित्रपटांची पर्वणी येथे रसिकांना अनुभता येईल. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन (MGM) युनिव्हर्सिटी आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्यांना FFSI (Federation of Film Societies of India) आणि भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचेही पाठबळ आहे.

कार्यक्रमात बोलताना इलैयाराजा म्हणाले की, 'पद्मपाणी पुरस्कार घेताना मला खूप आनंद होत आहे. ही संधी मला दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आजकाल प्रत्येकामध्ये काही ना काही कला असते. त्यात आवड असली की आपोआप मार्ग मिळतात. आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे वाद्यामध्ये मोठी वाढ झालेली दिसते. आजकालच्या मुलांचा पियानो, ड्रमसेट याकडे त्यांचा ओढा जास्त आहे. त्यांना पारंपरिक संगीत आणि वाद्याचीही ओढ लागली पाहिजे.
‘’तंत्रज्ञानामुळे संगीतामधील जिवंतपणा संपला’’
इलयाराजा पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे संगीत वेगवान झाले. कमी वेळात अधिकाधिक चित्रपट होत आहेत. मात्र, त्यातील जिवंतपणा संपला आहे. आम्ही आजही ८८ वादकांसह संगीत रचना करतो. चित्रपटातील व्यक्तिरेखा, प्रसंग आणि भावना संगीतातून जनसामान्यांपर्यंत पोहोचतात. संगीतामुळे चित्रपट निराळ्या उंचीवर पोहोचतो. आज मी १५४५ व्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. मी प्रसंग पोहतो, कहाणी समजावून घेतो. कुठल्या ठिकाणी कोणती भावना पोहोचवायची आहे, त्यानुसार वादकांसह संगीत रचना करतो. संगीत ही एक साधना आहे. एकाच शब्दातून अनेक भावना व्यक्त होतात. सध्या नवीन पिढी उत्तम प्रयत्न करत आहे. मात्र सर्व वाद्यवृंदानसह लाईव्ह संगीताचे नियोजन केले तर संगीतप्रेमींच्या हृदयापर्यंत पोहोचते.'
भारतीय सिनेमा संगीतातील द्रोणाचार्य आहेत इलैयाराजा
इलैयाराजा हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 7 हजार गाणी संगीतबद्ध केली असून 20 हजार कॉन्सर्टमध्ये सादरीकरण केले आहे. इलैयाराजा यांनी भारतीय लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीत यांचे मिश्रण करून चित्रपटसृष्टीला उत्कृष्ट संगीत दिले आहे. इलैयाराजा यांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट संगीतासाठी पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यासोबतच मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविले आहे. 2013 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, त्यांची गणना भारतीय चित्रपटसृष्टीतील ऑल टाइम सर्वोत्कृष्ट संगीतकारांमध्ये होते. तसेच, अमेरिकन वर्ल्ड सिनेमाने 25 सर्वोत्कृष्ट संगीतकारांमध्ये इलैया राजा यांना 9 वे स्थान दिले आहे.
दलित कुटुंबात झाला जन्म
इलैयाराजा यांचा जन्म 2 जून 1943 रोजी तामिळनाडूमधील दलित कुटुंबात झाला. त्याच्या नावाची कहाणीही खूप रंजक आहे. इलैया राजा यांचे नाव त्यांच्या वडिलांनी राजैया ठेवले होते पण गावातील लोक त्याला रासय्या म्हणत. त्यानंतर ते संगीताचे धडे घेण्यासाठी धनराज मास्तर यांच्याकडे गेले, तेथे मास्तरांनी त्यांचे नाव राजा ठेवले. यानंतर त्यांना अन्नकिली हा त्यांच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटात त्यांना निर्माता पंचू अरुणाचलमसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि इथेच पंचू यांनी त्याच्या नावासमोर इलैया जोडले. वास्तविक तमिळमध्ये इलैयाचा अर्थ छोटा असा होतो आणि फिल्म इंडस्ट्रीत राजा नावाचे आणखी एक संगीत दिग्दर्शक आहे, ए.एम. राजा असे त्यांचे नाव आहे. त्यामुळे राजाचे नाव इलैयाराजा पडले.
वयाच्या 14 व्या वर्षी तामिळ लोकसंगीताचा अनुभव
इलैयाराजा खेड्यात वाढले, त्यामुळे त्यांना गावातील वातावरण आणि संगीताची चांगली जाण होती. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यामुळे त्यांनी बालपणीच संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. इलैयाराजा यांनी वयाच्या 14 व्या वर्षी ग्रामीण लोकसंगीत एक्सपोज करायला सुरुवात केली. ते पवलर ब्रदर्स ग्रुपमध्ये सामील झाले होते जो एक ट्रॅव्हलिंग म्युझिकल ग्रुप होता.
लंडन कॉलेजमध्ये मिळाले सुवर्णपदक इलैयाराजा यांनी लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमधून संगीताचे धडे गिरवले. तिथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना उत्कृष्ट वाद्य कामगिरीसाठी सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्यांनी टी.व्ही. गोपाल यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले आहे.

गिटार वादक म्हणून करिअरला केली सुरुवात इलैयाराजा यांनी गिटार वादक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. लंडनहून परतल्यानंतर त्यांनी एका बँडसोबत सेशन गिटारिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. हा बँड संगीतकार आणि दिग्दर्शक साहिल चौधरी यांचा होता. इथेच साहिल चौधरी यांनी इलैया राजा यांच्याबद्दल भविष्यवाणी केली होती की, ते आगामी काळात सर्वोत्कृष्ट संगीतकार बनतील.
200 कन्नड चित्रपटांना संगीत दिले इलैयाराजा यांना ओळख मिळू लागली होती. त्यानंतर त्यांनी संगीतकार जी.के. व्यंकटेश यांच्याकडे सहाय्यक संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या दोघांनी जवळपास 200 कन्नड चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. इलैया यांना जेव्हा-जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा ते सेशन म्युझिकसोबत संगीत तयार करायला सुरुवात करु लागले. इलैया राजा आणि जी.के. व्यंकटेश यांच्याकडून म्युझिक कंपोझिशनबद्दल बरेच काही शिकले.
संगीतकार झाले इलैया इलैयाराजा यांना 1975 मध्ये चित्रपट निर्माता पंजू अरुणाचलम यांनी त्यांच्या अन्नाकली चित्रपटासाठी संगीत देण्याची संधी दिली होती. या चित्रपटात इलैया यांनी आधुनिक आणि तामिळ लोकसंगीताचे मिश्रण करून सर्वोत्कृष्ट संगीत दिले आहे. ज्याला लोकांचे खूप प्रेम मिळाले आणि इलैया यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून ओळखले गेले.
कवितांसाठी चाली तयार करु लागले
इलैयाराजा यांनी 1980 च्या दशकात तामिळ कवींसोबत मिळून त्यांच्या कविवतांसाठी संगीत तयार करण्यास सुरुवात केली आणि चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या रचना पसंतही पडू लागल्या. त्यांनी गुलजार, आर. बाल्की, मणिरत्नम, फाजिल, शंकर नाग यांच्यासोबतही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
जगातील 25 सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक
कॉम्प्युटरवरुन गाणे रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय इलैयाराजा हे पहिले भारतीय आहेत ज्यांनी संगणकावरून गाणी रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. 1986 मध्ये त्यांनी विक्रम चित्रपटासाठी संगीत दिले. तसेच, भारतीय कंपोझिशनमध्ये वेस्टर्न क्लासिक म्युझिक हार्मनी वापरणारे इलैयाराजा हे पहिले भारतीय आहेत.

अमेरिकेने जगातील 25 सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक मानले CNN-IBN ने भारतीय चित्रपटसृष्टीला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केलेल्या सर्वेक्षणानुसार, इलैया राजा यांना ऑल टाइम ग्रेटेस्ट म्युझिक डायरेक्टरसाठी सर्वाधिक मते मिळाली होती. अमेरिकन वर्ल्ड सिनेमा पोर्टल 'टेस्ट ऑफ सिनेमा'द्वारे इलैया यांना जगातील 25 सर्वोत्कृष्ट संगीतकारांमध्ये 9 वे स्थान मिळाले आहे. या यादीत समाविष्ट झालेले इलैयाराजा हे पहिले भारतीय संगीतकार आहेत.
5 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित इलैयाराजा यांना तीनदा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी आणि दोनदा सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शिवाय मनोरंजन विश्वातील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना 2010 मध्ये पद्मभूषण आणि 2018 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित केले आहे. त्यांना 2012 मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे.






