मनीष आझाद
इम्तियाज अली यांचा 'मैं वापस आऊंगा' हा चित्रपट फाळणीला पार्श्वभूमी म्हणून वापरत एक सुंदर प्रेमकथा पडद्यावर उभी करतो. द्वेषाच्या या ‘धुरंधर’ काळात 'मैं वापस आऊंगा' या चित्रपटातील हा प्रेमाचा धागा जणू प्रचंड उकाड्यात पडलेल्या थंडगार पर्जन्यसरीसारखा वाटतो.
द्वेषाच्या या ‘धुरंधर’ काळात 'मैं वापस आऊंगा' या चित्रपटातील हा प्रेमाचा धागा जणू प्रचंड उकाड्यात पडलेल्या थंडगार पर्जन्यसरीसारखा वाटतो.
९५ वर्षांचे इशर सिंह ग्रेवाल उर्फ कीनू (नसिरुद्दीन शाह) मृत्यू स्वीकारण्यास नकार देतात, कारण फाळणीपूर्वी आपल्या प्रेयसी ‘जिया’ला दिलेले “मी परत येईन” हे वचन त्यांना पूर्ण करायचे असते. डिमेन्शियाच्या आजारामुळे त्यांचे वर्तमान जवळजवळ पुसले गेले आहे. मानसिकदृष्ट्या ते अजूनही फाळणीच्या आणि फाळणीपूर्व काळातच जगत आहेत.
यावेळी मला आबिद सुरती यांची कथावाचक ही कादंबरी आठवते. बाबरी मशीद वाचवण्याच्या प्रयत्नात जखमी झालेला एक पुजारी कोमातून बाहेर येण्यास नकार देतो. त्याला बाहेरचा ‘विभाजनाचा’ काळ संपल्याचे आश्वासन हवे असते. पण ते आश्वासन त्याला कोण देणार?
मात्र या चित्रपटात इशर सिंह ग्रेवाल यांचा नातू (दलजीत दोसांझ) आपल्या आजोबांचे जियाला दिलेले वचन पूर्ण करतो आणि चित्रपटाच्या शेवटी इशर सिंह शांतपणे अखेरचा श्वास घेतात.

इम्तियाज अली यांचा 'मैं वापस आऊंगा' हा चित्रपट फाळणीला पार्श्वभूमी म्हणून वापरत एक सुंदर प्रेमकथा पडद्यावर उभी करतो. तसेच आजच्या प्रेमाची (नातू निर्वैर आणि त्याची प्रेयसी बनिता संधू यांची कथा) तुलना त्या प्रेमाशी करत त्याला एक प्रकारची आध्यात्मिक उंची देण्याचा प्रयत्न करतो. तथापि, हा देखील एक प्रकारचा स्टीरिओटाइपच आहे, जो आता इम्तियाज अली यांच्या शैलीचा एक भाग बनला आहे.
पण असं का घडतं की जेव्हा जेव्हा बॉलिवूड फाळणीकडे पाहतं, तेव्हा ते बहुधा एखाद्या स्टीरिओटाइपचे बळी ठरततात? अनेकदा अतिशय भोंगळ पद्धतीने आणि कधीकधी या चित्रपटाप्रमाणे अत्यंत सुसंस्कृत व सूक्ष्म स्वरूपात.
चित्रपटात जे शीख मुस्लीमांना मारत आहेत, त्यांचे चेहरे झाकलेले दाखवले आहेत; परंतु जे मुस्लीम शीखांना मारत आहेत, त्यांना आपण स्पष्टपणे ओळखू शकतो. त्यांची नावंही दिली आहेत. शीख स्त्रियांचे कपडे फाडणे, त्यांना केसांनी किंवा पायांनी ओढत नेणे, त्यांचे ‘अपवित्रीकरण’ करणे अशी दृश्ये अल्प कालावधीची असली तरी अत्यंत तीव्र आणि दृश्यात्मक आहेत. मात्र याच्या उलट शीखांकडून मुस्लीम स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे चित्रण जवळजवळ नाहीसे आहे.
कदाचित म्हणूनच प्रसिद्ध चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता यांनी आपल्या परीक्षणात निरागसपणे लिहिले की, मुस्लीमांच्या क्रूर हल्ल्याच्या प्रतिक्रियेत शीखांनीही मुस्लिमांना मारले. असे म्हणता येईल की ही कथानकाची गरज होती; पण कथा लिहिणारा शेवटी माणूसच असतो.
आपण फाळणीसारख्या घटनेकडे केवळ क्रिया-प्रतिक्रियेच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो का? किंवा तसे पाहणे योग्य आहे का? दुर्दैवाने, इम्तियाज अली यांच्यासारखे चित्रपट दिग्दर्शकसुद्धा या कथनशैलीचे बळी ठरले आहेत. असा युक्तिवाद करता येईल की चित्रपटात ‘रेडक्लिफ’च्या माध्यमातून ही फाळणी साम्राज्यवादी कारस्थान होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु शब्दांपेक्षा दृश्ये स्मरणात अधिक काळ टिकतात. त्यामुळे आजच्या टोकाच्या ध्रुवीकरणाच्या वातावरणात अधिक सावध राहणे आवश्यक आहे.
तरीही, चित्रपटाच्या शेवटी 'कमाल है' या गाण्याद्वारे गाझा, रोहिंग्या आणि इतर निर्वासितांना स्मरल्याबद्दल मी इम्तियाज अली यांना सलाम करेन. आणि हे अशा वेळी, जेव्हा गाझाच्या समर्थनार्थ बोलणे अनेकदा देशद्रोहाचे आरोप आमंत्रित करण्यासारखे मानले जाते. मात्र हेही खरे की हा भाग चित्रपटाच्या कथानकातून सहजपणे उगवत नाही; तो जणू स्वतंत्र संगीत-अल्बमसारखा वाटतो.

प्रत्यक्षात बॉलिवूडने फाळणीवर चित्रपट बनवताना बहुतांश वेळा मध्यमवर्गीय किंवा उच्चवर्गीय जखमांनाच केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यामुळे बहुतांश चित्रपट फाळणीकडे प्रेम आणि दडपलेल्या आठवणींच्या (nostalgia) चष्म्यातून पाहण्याची सवय लावून घेतात.
याउलट, जर आपण ऋत्विक घटक यांचे चित्रपट पाहिले, तर फाळणीचे वेगळे पैलू दिसून येतात. तो असा भाग आहे ज्याकडे बॉलिवूडची नजर अद्याप पुरेशी गेलेली नाही.
भारत-पाकिस्तान फाळणी इतकी भीषण, क्रूर आणि व्यापक होती की ती आजही आपल्या वर्तमान आणि भविष्याला आकार देत आहे. म्हणून वर्तमानावर पडदा टाकून फाळणीबद्दल कोणतीही अर्थपूर्ण चर्चा करणे शक्य नाही. बेनेडेटो क्रोचे यांनी उगाचच म्हटले नव्हते की, “सर्व इतिहास हा समकालीन इतिहास असतो.”
२०२० च्या दिल्ली दंगलीत जिवंत जाळून मारल्या गेलेल्या ८८ वर्षीय गरीब अकबरीची कथा कोण सांगणार? ती फाळणीच्या भयावहतेतून कशीबशी वाचली होती; पण आजच्या ‘नव्या फाळणीत’ तिला जाळून मारण्यात आले. भारत-पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या त्या गरीब सारीची कथा कोण सांगणार? तिच्या शीख वडिलांनी फाळणीच्या काळात तिच्या आईचे अपहरण करून तिला भारतात आणले. तिच्यावर बलात्कार केला. त्यातून सारीचा जन्म झाला. पण सारी अवघी एक वर्षांची असताना अपहृत महिलांना शोधून त्यांच्या मातृभूमीत परत पाठवण्याच्या योजनेअंतर्गत तिच्या आईला पाकिस्तानला पाठवण्यात आले.
आणि आज भारत-पाक सीमेवरील सारीची झोपडीही ‘सुरक्षे’च्या नावाखाली पाडण्यात आली आहे. तब्बल ७८ वर्षांनंतर ती पुन्हा एकदा बेघर झाली आहे. खरे तर १९४७ च्या या फाळणीत जे गरीब, दलित विशेषतः नामशूद्र समाजातील लोक सर्वाधिक भरडले गेले, त्यांची कथा अजूनही सांगितली जाणे बाकी आहे. त्यांना त्यांचा ‘इम्तियाज अली’ कधी मिळणार? त्यांची कथा पडद्यावर पुन्हा कधी येणार?
(मराठी अनुवाद - भरत यादव)






