टीम बाईमाणूस
- इतिहासात अनेक वीरांनी रणांगणावर तलवार गाजवली, अनेकांनी किल्ले जिंकले आणि अनेकांनी स्वराज्यासाठी रक्त सांडलं. पण एका मावळ्याने तलवारीपेक्षाही मोठा पराक्रम केला.
- स्वतःचा मृत्यू निश्चित आहे हे माहीत असूनही एका दिवसासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज' होण्याचा निर्णय घेतला. तो मावळा म्हणजे वीर शिवा काशीद.
- त्यांच्या त्या अद्वितीय त्यागामुळे छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले आणि स्वराज्याचा इतिहास वेगळ्या वळणावर गेला.
- आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, स्वराज्यासाठी स्वतःचं आयुष्य अर्पण करणाऱ्या या अद्वितीय मावळ्याच्या शौर्यगाथेला उजाळा…
स्वराज्य एक लहानसा शब्द, पण आपल्या अपत्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्यासाठी प्राण देणाऱ्या मावळ्यांनी हे स्वराज्य उभं केलं, आपल्या रक्तानं त्याचं सिंचन केलं. एक संपूर्ण पिढी ह्या स्वराज्याच्या निर्माणासाठी खर्ची पडली. शिवाजी महाराजांना सुद्धा हा एवढा मोठा डोलारा एकट्याने उभा करणं शक्य झालं नसतं, पण त्यांना असे सोबती लाभले, ज्यांनी वेळ पडता आपल्या प्रणांवर आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलं.
बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कोंडाजी फर्जंद अशी अनेक नावे इतिहासाच्या नोंदीत आहेत. बहिर्जी नाईक हे त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेसाठी, जिवा महाला महाराजांना अफजल खान भेटीवेळी सैय्यद बंडा पासून वाचवण्यासाठी ओळखले जातात. पण आणखी एका मावळ्याने स्वतः बलिदान देऊन शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले होते, पण त्यांचे नावही फार लोकांना माहीत नाही. तो वीर मावळा म्हणजे शिवा काशीद, त्यांची ही गोष्ट…
पन्हाळगडाला सिद्दी जोहारने वेढा दिला अन् तब्बल पाच महिने गडावर अडकले
१६६० साली, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि ते पन्हाळ्यावर आले. अफजल खानच्या वधाचा सूड घेण्यासाठी विजापूरच्या आदिलशहाने सरदार सिद्दी जोहरला पन्हाळ्यावर चाल करून जाण्याचे आदेश दिले. सिद्दी जोहर ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशी विशाल सेना घेऊन पन्हाळ्यावर चालून येत होता, वाटेत अफजल खानचा मुलगा, फाजल खान आपल्या 40 हजार सैनिकांच्या फौजेनिशी येऊन सिद्दी जोहरला सामील झाला. फाजल खानकडे ब्रिटिश तोफा देखील होत्या. एवढ्या मोठ्या सैन्याने पन्हाळगडाला वेढा दिला, तिथेच दोन्ही सरदारांनी आपापले तळ ठोकले आणि महाराज व त्यांचे मावळे गडावर अडकून पडले.

मावळ्यांना इतक्या अवाढव्य सेनेला तोंड देणे शक्य नव्हते. गडावर जाणारी अन्नाची रसद व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही खंडित करण्यात आला होता. पण महाराजांनी हार मानली नाही. मार्च ते जुलै असे तब्बल पाच महिने महाराज गडावर अडकून होते.
शिवरायांसारखा दिसणारा एक विश्वासू मावळा
काही तरी करून गडावरून निघणं फार गरजेचं होतं. त्यावेळी शिवरायांना एक युक्ती सुचली. काहीही करून शत्रूंचा हा वेढा फोडून विशाळगडाकडे निघायचं. पण कसं, हे कोणालाच कळत नव्हतं. बाजीप्रभू देशपांडेंनी सिद्दी जोहारचा भ्रम घडवून आणण्याची योजना आखली आणि त्यांच्यासमोर याच शिवा काशिदचा चेहरा दिसू लागला. शिवा काशीद हे महाराजांचे नाभिक म्हणून त्यांच्या सेवेत होते. शिवा काशीद आणि शिवाजी महाराज यांच्या दिसण्यात कमालीचं साम्य होतं. शरीरयष्टी, चेहरा महाराजांशी मिळताजुळता होता आणि त्याचाच वापर करून शत्रूंना गुंगारा देण्याची योजना आखली गेली.
शिवराय म्हणून शिवा काशीद यांना आधी पाठवण्याचा आणि तोपर्यंत सिद्दी जोहारशी भेटीची चर्चा करून त्याचे लक्ष गुंतवण्याची ही योजना होती. कशाचीच परवा न करता शिवा काशिदांनी होकार दिला. या कामगिरीत शत्रूच्या हाती लागलो तर आपले प्राणही जाऊ शकतात याचा त्यांना पूर्ण अंदाज होता, पण स्वराज्य आपल्या जिवाहून महत्त्वाचे आहे ह्या भावनेने त्यांना प्रेरित केले.
"म्या हाई की... शिवाजी!"
“शिवा, आलास ? ये ! शिवा, सिद्दी जोहारच्या वेढ्यातून निसटण्यासाठी त्याला चकवा देऊन आम्ही आमची पालखी राजरस्त्याने सोडणार आहोत. पण त्यात दूसरा शिवाजी हवा. सिद्दीने ती पालखी पकडली तरी त्यात शिवाजीच आहे असे भासून तो फसेल आणि आम्ही दुसऱ्या रस्त्याने विशाळगडाकडे जाऊ. पण, दूसरा शिवाजी हवा, आमच्या सारखा दिसणारा.” शिवराय आढेवेढे घेत म्हणाले.
शिवाने शिवरायांचे मन ओळखले, तो म्हणाला, “आवं राजे, मला सारं ठाव हाय, शिवाजी हवाय नं व्हं ? म्या हाई की !”
“अरे पण शिवा, शिवाजी होणं खेळ नाही, आम्ही निसटून जाऊ पण तुझा जीव जाईल.” राजे म्हणाले.
“व्वा ! काही गम न्हाई जी ! जीवंच जाईल नं व्हं, ते बी तुमच्यासाठी, अशी कामगिरी कोण सोडल व्हय ?” शिवा म्हणाला.
राजे थोडे संभ्रमात होते, परंतु शिवा आता मागे कसला जातोय, गडी भलताच खुशीत. शिवरायांनी स्वत: एकेक वस्त्र आणि अलंकार शिवाला चढवले, भवानीची माळ त्याच्या गळ्यात घातली, स्वतःचे आरशातले प्रतिबिंब आपण बघतोय असाच भास शिवरायांना झाला.

“शिवा, किती रे आम्ही अभागी, आमच्या जिवासाठी तुझा जीव जातोय आणि आम्हीच तुला अलंकाराने सजवून प्रती-शिवाजी करतोय, आमच्या स्वार्थासाठी.” राजे गहिवरून म्हणाले, आणि त्यांनी शिवाला मिठीत घेतले.
मिठी सोडवत शिवा म्हणाला, “राजे, चिंता नसावी ! सोंगातला का होईना पर म्या शिवाजी बनलो. शिवाजी म्हणून मरण घेतोय यापरीस काय लागतय, जीवनाचं सोनं झालं बगा.”
शिवा काशिद यांना महाराजांचा पोशाख घालण्यात आला. ते हुबेहूब महाराजांसारखे दिसू लागले. खरे महाराज कोण आणि शिवा कोण हे ओळखणे अवघडच झाले होते.
१२ जुलै १६६० ची ती रात्र… मृत्यू निश्चित असतानाही मोहिमेला होकार
१२ जुलै १६६० सालची ती रात्र होती… त्यादिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला. ढगांच्या गडगडासह निसर्गाचं रुद्र तांडव सुरु होतं. वातावरण महाराजांसाठी अनुकूल झाल होतं. त्यांनी निर्णय घेतला आज काहीही करून वेढा भेदायचा. विशाळगडाकडे प्रस्थान करण्याची सगळी तयारी झाली. राजे येताच बांदलांचे सहाशे मावळे उठले. बाजीप्रभू सोबत असणार होते.
महाराजांना भर पावसात पालखीतून पळवीत पळवीत न्यायचं ठरलं होतं. महाराज पालखीत बसले! मोठी जोखीम होती. गडावर हजर असणाऱ्या प्रत्येकाच काळीज धडधडत होत. भोयांनी पालखी उचलली. पाठोपाठ बाकीचे मावळे ही निघाले. पालखी आल्यावर राजदिंडी उघडली गेली. शिवाजीराजे तटाबाहेर पडले. जाताना किल्लेदाराला सांगितलं,
"गड सांभाळा ! येतो आम्ही! जगदंबे ! उदयोस्तु !"
वाटाडे हेर सगळ्यात पुढे पळत होते. पाठोपाठ सर्वजण अंधार पोखरत चिखल तुडवत विलक्षण वेगाने निघाले होते. बहिर्जी नाईकांच्या हेरांनी शोधलेला हा चोर रस्तामार्ग विलक्षण दुर्गम होता. मोठमोठ्या शिळा सगळीकडे पडलेल्या होत्या. जागोजागी पर्वताचे कडे तुटलेले होते. त्यावरून कोसळणाऱ्या नद्या गर्जना करीत वाटेवरून धावत होत्या. ढोपरभर चिखलात पाय रुतत होते. त्यात शेवाळामुळे निसरडेपणा आला होता. ही वाट हेरांनी निवडली. कारण हाच भाग निर्मनुष्य होता.

पालखी झपाझप पळत होती. वेढ्याची हद्द संपली पण भय संपले नाही. आता विशाळगडाच्या रोखाने पावले धावत होती. आणखी बरेच अंतर काटले गेले, पालखी पुढेपुढे धावतच होती. राजे कुंभारवाडीच्या दरीजवळ आले. दरी शांत होती. त्यातून जायचे होते. फक्त एवढा मार्ग संपला की राजे संकटाच्या बाहेर जाणार होते. सारे हळूहळू दरीवरून पुढे सरकत होते, तोच दूरवरून आवाज आला,
‘’होशियार! कौन है?
दगा दिसत असल्याची जाणीव झाली. मराठ्यांनी चपळाईने पाय उचलून ती दरी कशीबशी पार केली. एक क्षण गेला आणि मावळे थांबले. परत भराभर पालखी विशाळगडकडे निघाली. अखेर मांडलोईवाडी आणि करपेवाडी या मधील जंगलात महाराजांची पालखी सिद्धी जोहारच्या सैनिकांनी घेरली. थोडी चकमक उडाली. परंतु महाराज व त्यांचे मावळे पालखीसह पकडले गेले.
सिद्धी जौहरच्या सैनिकांनी शिवाजी समजून शिवा काशीदला पकडलं...
पालखीमध्ये शिवाजी महाराजांना पाहताच, त्या गनिम सैनिकांना दसरा-दिवाळीचा आनंद झाला. पालखी वेगाने दौडवत व आनंदाने "दीन, दीन" अशा आरोळ्या ठोकीत पन्हाळगडाच्या पूर्व भागात, सिद्दी जोहराच्या शामियान्यात आणली गेली. ही बातमी ऐकून सिद्दी जोहार प्रसन्नपणे हसला ! शिवाजीची पालखी पकडली, शिवाजी गिरफ्तार झाला. अशी बातमी सर्व छावणीभर पसरली व आनंदाची एक लाटच छावणीभर उसळून गेली.
पालखीतील शिवाजी तोऱ्यात जोहारच्या छावणीत आला. सिद्दी जोहरने कधीही महाराजांना पाहिले नसल्यामुळे तो जरा साशंक होता. सोबत पकडल्या गेलेल्या इतर सरदारांना, मावळ्यांना त्याने विचारणा केल्यावर त्यांनी सुद्धा ‘हो हेच आमचे महाराज आहेत’, असं सांगितलं.
शिवाजी इतक्या लवकर पकडलाच जाऊ शकत नाही, हे त्याला वारंवार वाटत होतं. आणि त्याची शंका खरी ठरली. काहीच तासात एक बातमी आली की गडावरून दुसरी पालखी विशाळगाकडे निघाली आहे आणि महाराज त्यात आहेत. सिध्दीने उलटतपासणी केली. तेव्हा कळाले हा तर ‘तोतया शिवाजी’ आहे. सिद्धी जौहरच्या सैनिकांनी शिवाजी समजून शिवा काशीदला पकडले होते.
दुसऱ्या बाजूला खुद्द शिवाजी महाराजांची पालखी मोठ्या टोळीसह आडरानात घुसली आणि महाराज तिकडे विशाळगडाकडे सुखरूप मार्गक्रमण करत होते.
"महाराजांसाठी एकदाच काय, हजार वेळा मरायला तयार आहे."
ही तर भयंकर नामुष्कीची बाब ! अक्षरशः आदिलशहाच्या मोठमोठ्या खानसाहेब सरदारांना आणि सिद्दी जौहाला मराठ्यांनी उल्लू बनवले होते. सिद्धीने शिवा काशीदला मरणाचे भय वाटत नाही का विचारले. तेव्हा तो म्हणाला,
"महाराजांसाठी एकदाच काय, हजार वेळा मरायला तयार आहे."
हे ऐकून छावणीत जमलेल्या प्रत्येकाचा जळफळाट झाला. सिद्धीच्या रागाचा पारा एकदम वाढला. खामोश ! कंबख्त ! तो जोराने ओरडला. अन् त्याने आपली तलवार सरळ शिवाच्या छाताडात आरपार भोकसली… तलवारीचे पाते रक्ताने न्हाले. शिवाच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना उमटली. जखमेची जागा त्याने डाव्या हाताने दाबून धरली. उजव्या हाताने डेऱ्याचा खांब पकडला.

‘’मी सोंगातला शिवाजी झालो म्हणून काय झालं? तो काय पालथा पडेल?राजे, मुजरा… त्रिवार मुजरा…!
शिवा काशीदच बलिदान वाया गेलं नाही. रागाच्या भरात सिद्धी जौहारने सिद्धी मसूदला मोठं सैन्य घेऊन महाराजांच्या मागावर धाडलं पण घोडखिंडीत त्याची वाट पाहत असलेल्या बाजी प्रभूंनी महाराज गडावर सुखरूप पोहचेपर्यंत त्याला पुढे जाऊ दिले नाही. बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या रक्ताने घोड खिंड पावन झाली. तिची ओळखच ‘पावन खिंड’ अशी झाली.
पन्हाळगड कोल्हापूरच्या वायव्येस, शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. त्याच्याच पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावात नाभिक कुटुंबात शिवा काशीदा यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच व्यायाम, कुस्ती, रोज गड चढून-उतरून शिवा अगदी रांगडा पैलवान झाला होता. पिळदार शरीर, अंगात भरपूर ताकद असलेल्या शिवा काशीद यांचे एक वैशिष्ट हे होते की ते हुबेहूब महाराजांसारखे दिसत. जणूकाही पुढच्या योजना नीट पार पडाव्या म्हणून नियतीनेच मुद्दाम हा योगायोग घडवून आणला होता.
आज कुठे आहेत शिवा काशीद यांचे वंशज?
वीर शिवा काशीद यांची समाधी अनेक काळ दुर्लक्षित होती, परंतु इतिहास संशोधक कै. मु. गो. गुळवणी यांनी अथक परिश्रमाने ही समाधी शोधून काढली. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर या गावी ही समाधी स्थित आहे. आज हे ठिकाण प्रेरणास्थान बनले असून दरवर्षी हजारो लोक या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात.

या शोधामुळे शिवा काशीद यांच्या घराण्याचा आणि त्यांच्या महान वारशाचा दुवा पुन्हा एकदा जगासमोर आला. वीर शिवा काशीद यांचे वंशज रघुनाथ बापू काशीद आणि बापू केदारी काशीद या थोर बलिदानाचा जिवंत वारसा जपून आहेत. सध्याच्या पिढीबद्दल बोलायचे झाले तर वीर शिवा काशीद यांचे थेट १३ वे वंशज आनंदराव रघुनाथ काशीद हे आहेत. ते सध्या पन्हाळा तालुक्यातील नेबापूर याच ऐतिहासिक गावी वास्तव्यास आहेत. काशीद कुटुंबाने आपली परंपरा जपली असून ते अत्यंत साध्या पद्धतीने आपले जीवन व्यतीत करत आहेत. केवळ शेतीच नव्हे, तर सामाजिक कार्यातही या कुटुंबाचा सहभाग असतो ज्यामुळे परिसरातील लोकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.
काशीद कुटुंबाची सध्याची पिढी केवळ नाभीक काम किंवा शेतीवर अवलंबून न राहता, नव्या युगाशी जुळवून घेत आहे. आनंदराव काशीद यांचे पुत्र आणि कुटुंबातील इतर सदस्य नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने प्रगती करत आहेत. आपल्या पूर्वजांच्या नावाला साजेसे काम करत असतानाच, ते शिवा काशीद यांच्या शौर्याची गाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कामही करत असतात. शिवजयंती आणि वीर शिवा काशीद यांच्या बलिदान दिनी नेबापूर येथे मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये हे वंशज सक्रिय सहभाग घेतात. इतिहासाचा हा जिवंत वारसा आजही महाराष्ट्राच्या मातीत मोठ्या दिमाखात नांदत आहे.






