अप्सरा आगा
- धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला.
- वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले.
- केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.
हवामान बदलाचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागातील महिलांना बसतो. त्यात मराठवाडा हा देशातील सर्वाधिक दुष्काळप्रवण भागांपैकी एक मानला जातो. अतिवृष्टी असो वा दुष्काळ, याचा सर्वात मोठा फटका महिलांनाच बसतो. या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे 'धाराशिव पंचायत परिषदेचे' आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसांच्या परिषदेमध्ये ३५ गावांतील महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग घेतला होता. या सगळ्यांनी मिळून एक वातावरणीय कृती आराखडा तयार करून तो सादर केला.
स्वयं शिक्षण प्रयोग, वातावरण, रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट, पीडीएजी आणि सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या या परिषदेमध्ये स्थानिक पातळीवर हवामान बदलाला तोंड देण्यासाठी सक्षम पूर्वतयारी आणि शाश्वत उपाययोजनांवर भर देण्यात आला.
वाढत्या उष्णतेचा रोग्यावर आणि मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा…
परिषदेमध्ये वेगवेगळ्या भागांनुसार गट तयार करण्यात आले होते. हवामान बदलाचा कोणता त्रास होतो आणि त्यावर काय उपाय योजता येतील, यावर आपापल्या गटात चर्चा करून त्यांनी आपापल्या भागाचा एक कृती आराखडा तयार केला व तो सादर केला. हे आराखडे तक्त्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आले. तसेच, हवामान बदलाला कोण जबाबदार आहे, हे नाटकांच्या माध्यमातून मांडण्यात आले. यावरच महिला थांबल्या नाहीत, तर आरोग्य, पाणी साठवणूक, दुष्काळ निवारण आणि हवामान बदल यावर स्थानिक पातळीवर कोणती धोरणे राबवता येतील, यावरही त्यांनी चर्चा केली. या परिषदेमध्ये महिला वाढत्या उष्णतेचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर, आरोग्यावर आणि मुलांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामांबाबत भरभरून बोलत होत्या.

“वातावरण बदलाचा आमच्या आरोग्यावर लई परिणाम होतोय.”
धाराशिव जिल्ह्यातील कळंब गावच्या महिला चंद्रकला ठाकणे सांगतात, "हे जे वातावरण बदलतंय ना, त्याचा आमच्या आयुष्यावर लई (खूप) परिणाम झाला आहे. मी एक शेतकरी महिला आहे. आता जे वाढत चाललेलं ऊन आहे ना, त्याचा आमच्या आरोग्यावर लई परिणाम होतोय. काहीच काम करावंसं वाटत नाही. एवढं ऊन वाढलं आहे की सकाळी नऊनंतर घराच्या बाहेर पडावंसं वाटत नाही. आमच्या स्लॅबच्या घरात सुद्धा दम निघत नाही. या उष्णतेमुळे अंगावर घामोळ्या येणे, उन्हात पायाला फोड येणे आणि शेतात गेलं की जीव कासावीस होतोय. मळमळतंय, चक्कर आल्यासारखी होते. काय सांगू, आमचं कामच होत नाही. आम्ही कामच करू शकत नाही. कामच नाही केलं, तर घर चालवायला पैसे कुठून आणायचे? घर चालवणं अवघड होतंय."
"वातावरण बदलतंय, तसं आमचं आयुष्य पण बदलत चाललंय. आमच्यावर परिणाम होतोयच, पण आमच्या मुलांवरही परिणाम होतोय. आमच्या आईवडिलांच्या परिस्थितीमुळे आम्ही शिकलो नाही, पण आमची मुलं शिकावीत असं वाटतंय. पण या उन्हामुळं पीकच करपलं तर उत्पन्न मिळणार नाही. मग शिक्षणाला पैसे कुठून आणायचे? मुलांना तर खूप शिकवायचं असतं, पण आमची आर्थिक मजबुरी असते. मुलींच्या शिक्षणाचा तर विचार पण करत नाहीत. पालक म्हणतात, 'मुलाला कसं तरी शिकवलं, बस झालं. मुलीच्या शिक्षणाला कुठून पैसे आणायचे?'" त्यामुळे मुलींना शिक्षण मिळत नसल्याचे दुःख सारिका जाधव मांडत होत्या.
"मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असल्याने झाडांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याचा परिणाम जमिनीतील पाण्यावर होतोय, त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पुरेसं पाणीच मिळालं नाही, तर आमच्या आरोग्यावर परिणाम होतोय. वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या दहा वर्षांत तापमानात लई वाढ झालेली आहे, याचा परिणाम आमच्या शेतीवर झाला आहे. उन्हामुळे आम्हाला उलट्या होतात, त्यामुळे काम होत नाही. काम नाही झालं की मजुरी कमी मिळते. मजुरी मिळाली नाही की जगणं मुश्किल होतं," असे दुःख त्या व्यक्त करत होत्या.
परिषदेमध्ये हवामान बदलामुळे महिलांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, यावर महिला भरभरून बोलत होत्या. याच पार्श्वभूमीवर वातावरण बदलाचे परिणाम आणि त्यावरील उपाय शोधण्यासाठी ही परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी पूर्वतयारी आणि शाश्वत उपाययोजनांवर भर देण्यात आला. कृती आराखड्यामध्ये महिलांनी गट शेती, सुनियोजित पीक पद्धती, मिश्र शेती आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांसाठी शासकीय यंत्रणेकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली आहे. तसेच, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तुषार आणि ठिबक सिंचनाला प्रोत्साहन दिल्यास गाव पातळीवरील स्थलांतर रोखणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.

स्वयं शिक्षण प्रयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नसीमा शेख सांगतात, "आपल्याकडे मनुष्यबळ आणि संसाधनांची कमतरता नाही." तर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांनी बांधांवर वृक्षलागवड आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवून माती वाचवण्याचे आवाहन केले.
'लिंगभाव - समावेशी दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचे प्रकाशन
दोन दिवसांच्या या कार्यशाळेमध्ये 'असर'तर्फे 'लिंगभाव - समावेशी दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाबाबत भारतातील वाढती असुरक्षितता या अहवालातून समोर आली आहे. या परिस्थितीत अधिक प्रभावी दुष्काळ पूर्वसूचना प्रणालीची गरज अधोरेखित होते. अशी प्रणाली दुष्काळाची पूर्वतयारी करण्यासाठी मोठा आधार ठरते. वेळेवर मिळणाऱ्या सूचनांमुळे शारीरिक श्रम कमी होण्यास मदत होते. उपजीविका, कुटुंब आणि समुदायाशी संबंधित निर्णय अधिक माहितीपूर्ण पद्धतीने घेणे सोपे होते.
परिषदेमध्ये समुदाय पातळीवर पाण्याचा कार्यक्षम वापर आणि अल्पकालीन पिकांच्या अवलंबासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी समिती स्थापन करण्याची गरज महिलांनी व्यक्त केली. शेतीमध्ये पाण्याचा वापर कमी करण्यासाठी पारंपरिक पद्धतीपासून दूर जात स्प्रिंकलर (तुषार), ठिबक सिंचन आणि रेन पाईप यांसारख्या शाश्वत सिंचन पद्धतींचा अवलंब करण्याच्या गरजेवर यावेळी भर देण्यात आला.






