ना. रा. शेंडे हे भंडारा जिल्ह्यातील जुन्या पिढीतील लेखक-संशोधक. त्यांनी झाडीपट्टी आणि वऱ्हाडातील लोकसाहित्याचे उत्तम संपादन केले आहे. शासनाच्या नागपूर विभागाच्या प्रसिद्ध विभागाच्या माहिती केंद्रात ते माहिती सहायक पदावर होते. ‘लोकसाहित्य संपदा’(1964) हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने ‘ऑन द स्पॉट’ जाऊन लोकगीते-कथा संकलित करण्याचे धाडस त्यांनी केले होते. त्याकाळी जो अनुभव ना. रा. शेंडे यांना आला हे त्यांनी त्यांच्या ‘एका दिवसाची गोष्ट’ या प्रकरणात लिहून ठेवले आहे.
एका दिवसाची गोष्ट….
चांदा (आताचे गडचिरोली-चंद्रपूर) जिल्ह्यातील सिरोंचा विभागाच्या जंगलात केवळ 20-22 घरांच्या वस्तीत एक बाई सुंदर लोकगीते म्हणते असे मला कळले आणि मी त्या घनदाट जंगलात वसलेल्या गावी गेलो. तेव्हा सायंकाळ होऊन गेली होती. अस्सल आदिवासी लोकांची ती वस्ती. मला पाहाताच दहाबारा जणांनी गराडा घातला. मी कोणत्या हेतूने आलो हे त्यांना परोपरीने समजावून सांगितले पण त्यांचा विश्वास बसेना. हा कोणी सरकारी माणूस आहे व आपल्याला पकडण्यासाठी आला आहे, असा त्यांनी समज करून घेतला.

(आदिवासी पारंपरिक नृत्य आणि लोकगीते सादर करतांना)
त्यांनी माझे सर्व सामान हिसकावले. बॅग, फाऊंटनपेन, पाच पंचवीस रुपये असलेले पैशाचे पाकीट वगैरे काढून घेतले. त्यांचा म्होरक्या त्या रात्रीला गावी नव्हता. त्यांनी मला उपाशी ठेवून, एका झोपडीत खांबाला करकचून बांधले व कोंडून ठेवले. पहाट झाली तेव्हा एक दणकट, काळ्याकुट्ट रंगाचा धिप्पाड माणूस दोनचार सोबत्यांबरोबर मिशीला पीळ देत आत आला. तोच त्यांचा म्होरक्या. त्याने हुकूम करताच मला बांधलेला दोर सोडण्यात आला नि मी बेशुद्ध होऊन धाडकन् खाली कोसळलो !
मला शुद्धीवर आणण्यात आले तेव्हा मी त्या म्होरक्याच्या घरी होतो. त्याला मी माझा छंद शपथवारीने सांगितला. माझे म्हणणे सुदैवाने त्याला पटले, नाहीतर जीवावरच बेतायचे! माझे म्हणणे ऐकून घेतल्यावर, त्याने टाळी वाजविली. मला बांधून ठेवणाऱ्यांना बोलाविले नि चात्रकाच्या फटकाऱ्यांनी त्याने त्यांना झोडपून काढले. आपली कदर करण्यासाठी आलेल्या एका भल्या माणसाला उगाच उपाशी ठेवून त्रास दिला, याबद्दल त्याने सर्वांना दोषी ठरविले. माझे सर्व सामान परत करायला लावून, मानाने मला खाऊ पिऊ घातले; आणि मग त्या बाईकडून मला लोकगीते ऐकविली.
त्या बाईचे नाव मला आता नीट आठवत नाही, पण घुमरा असे काहीसे तिचे नाव होते. पिकल्या केसांची व लांब लांब सुरकुत्या पडलेली ती वृद्धा होती. मी तिला दहाची नोट देऊ केली. तिने म्होरक्याकडे पाहिले. त्याने ती नोट न स्वीकारण्याबद्दल तिला मानेने खुणविले. त्याने आग्रहाने मला ठेऊन घेतले. सायंकाळी मेजवानी दिली. रात्री गोंडी नृत्य दाखविले आणि दुसरे दिवशी रेंगीतून माझी रवानगी केली. दगडाचे अंतःकरण असलेल्या माणसातही माणुसकीचे व जिव्हाळ्याचे झरे कसे पाझरत असतात, याचा सुंदर अनुभव मला आला.
भंडारा जिल्ह्याच्या झाडीपट्टीची गोष्ट….
भंडारा जिल्ह्यातील झाडीपट्टीतील गोष्ट…. भंडाऱ्यापासून सुमारे 10 मैल अंतरावर असलेल्या रानातील पहेला या गावी मुक्काम करून, काही लोकगीते प्राप्त केल्यावर, तेथेच कळले की लाखांदूर - पालांदूर येथे उत्कृष्ट गीते मिळू शकतील. वाहनांची काहीच सोय नसलेल्या त्या गावी मोठ्या मुश्किलीने पोहचलो. त्या गावात पवार (पोवार) जातीच्या लोकांचा अधिक भरणा. शोध काढता काढता झिबलाबाई नावाच्या एका प्रौढ बाईकडे गेलो, तिच्या घराच्या बाजूलाच असलेल्या एकादोघा बायांनी हेल काढून असे काही अपमानास्पद शब्द काढले की, परत पावली निघून यावे, असे वाटले.
पण इतका त्रास घेतल्यावर परत जाणे मनाला पटेना. हिय्या केला आणि त्या बाईला एक दोन तरी गाणी म्हणा, मी ती उतरवून घेतो, अशी विनंती केली. पण तिनेही कपाळावर तिरस्काराच्या आठ्या चढविल्या. शेवटी एका गाण्याला पाच रुपये देऊ केल्यावर, त्या बाईने कसेबसे एक गीत म्हटले. तेही पुढे येऊन न बसता, ती आत माजघरात बसलेली व मी ओसरीच्या दगडावर बसलेला. पण त्या गीतातील काही शब्द उमगेनात. त्या बाईला विचारण्याचा प्रयत्न केला पण तिने जे नाक मुरडले ते काही विचारू नका. पण पूर्वी ज्या बायांनी मला उपहासाने डिवचले त्या बाया मात्र पुढे आल्या.

(पारंपरिक वाद्य वाजवतांना आदिवासी बांधव)
त्यांना प्रत्येकी आठ आठ आणे देऊ केल्यावर, त्यांनी त्या गीतातील शब्दांचा अर्थ सांगितला. इतकेच नव्हे तर त्यांनी सुंदर दोन तीन गीते व एक कथाही सांगितली. यापायी 22 रुपये खर्ची पडले खरे पण समाधान बरेच झाले. पैशापेक्षा त्या गीतांचे मूल्य कितीतरी पटीने अधिक होते. उन्हाळ्यात भर दुपारी अंगाची लाही लाही होत असताना, माझी कीव येऊनच की काय, त्या बाईने मला आंचिल व पोपटीच्या घुगऱ्या (उसळ ) दिल्या, ही सहृदयताही काही कमी मोलाची नाही!
याच भंडारा जिल्ह्यातील पोहरा या गावी तर भलताच अनुभव आला. एका कोसरी जातीच्या घरी गेलो तेव्हा एक तरुण बाई गाणी म्हणायला तयार झाली. तिची सासू व नणंद घरीच होती. नवरा मात्र कुठे काही कामानिमित्त बाहेर गेला होता. पण ती बाई गाणे म्हणत असतानाच तिचा पतिराज घरी आला व रागाने लालबुंद होऊन त्याने बायकोला माझ्यासमक्षच झोडपून काढले. त्यावेळी माझी अवस्था काय झाली असेल, याची आपण कल्पना करू शकता.
मी त्या भल्या गृहस्थाला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो मजवरही उलटला आणि त्याने जवळ जवळ मला हाकलूनच लावले. शेजारची दोनचार बायामाणसेही जमली. खिन्न चेहऱ्याने मी पडवीतून पाय काढला. जवळच एका झाडाच्या छायेखाली क्षणभर उभा राहिलो. तोच तो गृहस्थ उभारी हाती घेऊन धावत आला. जमलेल्या एकादोघाने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. तो मजजवळ आला तेव्हा मी नम्रतेने त्याला हात जोडले. त्याच्या हातून उभारी गळून पडली.
दोन मिनिटे तो मजकडे पाहातच राहिला. त्याला मिठी मारून मी म्हटले, " मित्रा, कोणत्याही दुष्ट बुद्धीने तुमच्या बायकोला गाणे म्हणायला लावले नाही. पण तसा माझा दोष आहे. तुमची आधी परवानगी घ्यायला हवी होती. क्षमा करा. माझ्या ह्या उद्गाराने त्याचे डोळे पाणावले. तो मला पुन्हा घरी घेऊन गेला. नंतर ज्या सन्मानाने त्याने मला वागविले त्याचे काय वर्णन करावे ? मला अनेक सुंदर गाणी ऐकायला मिळाली. सुग्रास भोजन मिळाले. परतलो तेव्हा लुचईच्या तांदळाचे एक पोतेही त्याने मला भेट म्हणून दिले.
मद्य प्या अन्यथा गाणी नाही ऐकवणार…
बालाघाट जिल्ह्यातील बार तहसिलीतसुद्धा असाच एक मजेदार अनुभव आला. बैगा जातीच्या लोकांची ती वस्ती. त्यांची संस्कृती आणि जीवन काही वेगळेच ! त्यावर कितीतरी लिहिता येण्यासारखे आहे. ज्या घरी मी उतरलो तेथे त्या दिवशी मेजवानी होती. एका मुलीचे लग्न ठरले होते. परगावची मंडळी जमली होती. मद्याचे भांडे मजपुढे ठेवण्यात आले.

(आदिवासी महिला)
आयुष्यात मद्याच्या थेंबाला स्पर्श न करणारा मी माणूस, ते न घ्यावे तर त्या घरातील व्यक्तींचा अपमान, घ्यावे तर आयुष्यात घेतलेल्या व्रताला कलंक ! काय करावे ते सुचेना. पाहुणे मंडळींपैकी एकाला माझी अडचण कळली. त्याने हळूच मला सुचविले, 'मद्याचे भांडे एखाद्या स्त्रीला नेऊन दे.' सूचनेप्रमाणे मी केले. परंतु लगेच जेवणाची पाळी आली. मांस भक्षण कसे करावे ? आज मला उपवास आहे, अशी मी थाप दिली. पण कोणाला ते पटले नाही. जेवण घेतले नाही तर तुम्हाला गाणी मिळणार नाहीत अशी अट घालण्यात आली.
निरुपायाने पंक्तीला बसलो. मोहाच्या भाकरीचा तुकडा भातात कालवून कसेबसे दोन घास घेतले व उसनी ढेकर देऊन उठलो. रात्रभर नाचगाणे झाले. त्यातली गीते टिपून घेतली, पण काही अर्थबोध सकाळी हिंदी - मराठी जाणणाऱ्या व्यक्तीचा शोध काढला. घेतली. तीच गाणी मराठीत कशी आहेत दुसऱ्या दिवशी गाण्याची भाषा समजून होईना. ती त्या व्यक्तीने आपल्या बायकोकडून म्हणवून घेतली. ती उतरवून घेतल्यावर मोठे समाधान वाटले.
लोकसाहित्यापायी गेल्या 20-25 वर्षांत असे कितीतरी कटु-मधुर अनुभव आले. त्यामुळे खेड्यांच्या जीवनाचा, तेथील रीतीभातीचा नि व्यवहाराचा अनायासेच अभ्यास घडला. कुठे अपमान उपहास, तर कुठे मान सन्मान; कुठे पदरचे पैसे खर्चून साहित्य पदरी पाडायचे, तर कुठे भेट म्हणून काही देणगी लाभायची; कुठे जंगला - पहाडातून वणवण भटकायचे व काही वेळा निराशेने परतायचे, तर कुठे पाटील मालगुजारीशाहीने रेंग्या-खाचरातून मानाने भटकत, उल्हासित वृत्तीने साहित्यधन घेऊन यायचे ! या अशा विचित्र जगात जो साहसाने आणि तळमळीने काही लाभ घेण्यासाठी जातीने भ्रमण करील त्यालाच या जगाचे वैचित्र्य पाहायला सापडून, तो विशेष काही प्राप्त करील!”
(प्रमोद मुनघाटे यांच्या फेसबुक वॉलवरून)






