भल्या पहाटेच कांता बुधाजी चौधरी (वय 65), शुभांगी मनोज चौधरी (वय 28), रेखा शालिक शेंडे (वय 50) या तीन महिला तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. कांता आणि शुभांगी या सासु-सुना तर रेखा ही त्यांची शेजारीण… चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल हे या तिघींचे गाव.शुभांगी, सारिका आणि कांताबाई जंगलात एका बाजूला तेंदूची पानं तोडत होत्या, तर त्यांच्याच मागच्या बाजूला त्यांच्यासोबत गेलेल्या इतर महिला होत्या.
पुरेसा तेंदुपत्ता तोडल्यानंतर इतर बायांनी निघण्यासाठी या तिघींना आवाज दिला, परंतू तिकडून काहीच उत्तर न आल्याने कदाचित लवकर घरी गेल्या अशतील म्हणून इतर महिलाही घरी परतल्या. घरी पोहचल्यावरही त्या तिघी दिसल्या नाहीत. मग पुन्हा जंगलात शोधाशोध सुरू केली, पण त्या सापडल्या नाहीत. अखेर सगळेच ग्रामस्थ आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलात शोधमोहीम सुरू केली आणि संध्याकाळी पाच वाजता त्या तिघींचे मृतदेह जंगलात सापडले. एका वाघिणीच्या हल्ल्यात त्या तिघींचा एकाचवेळी जीव गेला होता…
सिंदेवाही तालुक्यातील तीन महिलांच्या बळी घेतल्याच्या घटनेला काही तासच झालेले असताना वाघाने पुन्हा एका महिलेचा बळी घेतला. मूल तालुक्यात येणाऱ्या नागाळा गावातील विमल बुधाजी शेंडे यांचा वाघाचा हल्ल्यात मृत्यू झाला. मृत्यूचे हे सत्र सुरूच असून वाघांच्या हल्ल्यांमुळे गेल्या दहा दिवसांत तेंदू संकलनासाठी जंगलात गेलेल्या आठ जणांचा बळी गेला आहे.
चंद्रपूरच्या जंगलांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू झाला की, निसर्गाच्या कुशीत रोजगारासाठी गेलेल्या मजुरांवर मृत्यू दबा धरून बसलेला असतो. तेंदूपत्ता हे केवळ पान नाही, तर आदिवासींसाठी तो घराचा तांदूळ, औषधांचा खर्च, मुलांच्या भविष्यासाठी एक आशेचा किरण आहे. पण, या आशेच्या अन् रोजगाराच्या पानांवर आता वाघाच्या पंजाचे आणि अस्वलासह इतर वन्यप्राण्याच्या हल्ल्याचे रक्तरंजित ठसे उमटू लागले आहेत.
चंद्रपूरमध्ये एकाच वेळी तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणाऱ्या वाघाने या हंगामात आतापर्यंत आठ बळी घेतले. हे केवळ आकडे नाहीत, तर दररोज जिवाची बाजी लावून उपजीविकेसाठी जंगलात उतरलेल्या मजुरांच्या पाठी लागलेल्या मृत्यूची गोष्ट आहे. मानव व वन्यप्राणी संघर्षातील मृत्यूची ही रेषा दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याने हे संकट उभे ठाकले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी, मध्य चांदा, चंद्रपूर व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच चंद्रपूर वनविभागाचा समावेश असून सध्या जिल्ह्यात तेंदूपाने संकलन हंगाम सुरू आहे. यंदा जिल्ह्यात एकूण 75 तेंदूपाने घटकांपैकी 70 घटकांमध्ये संकलनाचे कार्य सुरू आहे. यातून दरवर्षी सुमारे 35 हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळतो. जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे तेंदूपाने संकलनादरम्यान खबरदारी घेणे आवश्यक आहे.
संबंधित लेख वाचा: 1) वाघ मागावर आहे… |
वन विभागामार्फत यासाठी विशेष जनजागृती मोहीम, विशेष पथकांची नियुक्ती व विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि, तेंदूपाने हंगाम-2025 दरम्यान मे महिन्यात वाघाच्या हल्ल्यांमध्ये आठ व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे वनविभागाकडून तेंदूपाने संकलन करणाऱ्या ग्रामस्थांना सुरक्षा उपाय काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.
नऊ दिवस आणि आठ बळी
- 10 मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल गावातील सारिका शालिक शेंडे (55), कांता बुद्धाची चौधरी (60), शुभांगी मनोज चौधरी (31) या तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा मृत्यू झाला.
- 11 मे रोजी मूल तालुक्यातील नागाळा गावातील विमल बुद्धाजी शेंडे ही महिला चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील 537 कंपार्टमेंटमध्ये तेंदूपाने तोडण्यासाठी गेली असता वाघाच्या हल्ल्यात ठार झाली.
- 12 मे रोजी मूल तालुक्यात वडिलांकडे राहत असलेल्या भादुर्णा येथील भूमिका दीपक भेंडारे हिचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
- 14 मे ला चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रामधील करबडा येथे कचराबाई अरुण भरडे (54) ही महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. वाघाने तिला ठार केले.
मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यासाठी…
यासंबंधी वन विभागाकडून काही मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी असे आव्हान वन विभागाने केले आहे.
- वाघांचा अधिवास असलेल्या वनक्षेत्रात प्रवेश टाळावा.
- संकलनासाठी केवळ नजीकच्या गावातील व्यक्तींनाच परवानगी द्यावी.
- सकाळी 8 वाजतापूर्वी जंगलात प्रवेश करू नये व संध्याकाळी पाच वाजतापूर्वीच जंगलातून बाहेर पडावे.
- एकट्याने जंगलात जाऊ नये, समूहानेच वनविभागाच्या देखरेखीखाली संकलन करावे.
- प्राथमिक बचाव दल, कंत्राटदारांचे अग्निशमन कर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संकलन करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे व वाघाचा वावर आढळल्यास तत्काळ सतर्क करावे.
- संकलनादरम्यान पुरवण्यात आलेला मानवी मुखवटा डोक्याच्या मागील भागात लावावा.
- वाघाची चाहूल लागल्यास त्वरित मागे फिरावे व वनविभागाला माहिती द्यावी.
एआय यंत्रणा अपयशी का ठरतेय?
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष नवीन नाही. ताडोबात वाघांची संख्या वाढली तेव्हापासून मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होत गेला. यावर वनविभागाकडून वेळोवेळी उपायही शोधण्यात आले. काही वर्षांपूर्वीच ताडोबातला मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आर्टीफिशीयल इंटलिजन्सचा वापर करण्यात आला. गाव आणि जंगलाच्या सीमेवर एआय कॅमेरा बसवून वन्यप्राणी गावाजवळ आल्यानंतर त्याचा अलर्ट ग्रामस्थांना दिला जातो. पण, हा उपाय करूनही वाघांच्या हल्ल्यांमध्ये पाच दिवसांत सहा महिलांचा मृत्यू झालाय.
त्यामुळे ही एआय यंत्रणा अपयशी ठरली का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पण, एआय कॅमेरे हे गावाच्या सीमेवर बसवण्यात आले आहेत आणि हे सगळे मृत्यू जंगलात झालेले आहेत. लोक जंगलात दूरवर जाऊन तेंदू तोडतात त्याठिकाणी हे एआय कॅमेरे नाहीत. वाघ गावाजवळ आले, तर एआय सिस्टम अलर्ट देते. त्यामुळे एआय यंत्रणेला दोष देता येणार नाही. ही यंत्रणा आपलं काम करत आहे, असं मत चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षण डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केले आहे.
तेंदूपाने आणि आदिवासींचा रोजगार
तेंदूपाने संकलन हा हमखास हंगामी रोजगार आहे. मे महिनाभराच्या कालावधीत पूर्व विदर्भात लाखभर अधिक लोकांना यातून रोजगार मिळतो. तेंदूपाने तोडणाऱ्या मजुरांना 70 पानांच्या शंभर पुड्यांमागे 800 ते 900 रुपये मजुरी मिळते. एक कुटुंब 50 ते 60 हजार रुपये कमाई करते. तेंदूपाने संकलन हे दोन पद्धतीने केले जाते. पेसा (2006) कायद्यान्वये ग्रामसभांना तेंदूपाने संकलन, लिलाव व विक्रीचा अधिकार आहे. बिगर पेसा क्षेत्रातील गावांमध्ये वनविभागाच्या देखरेखीखाली वनसमित्यांच्या मदतीने संकलन होते. 
2025 या वर्षासाठी वनक्षेत्रातून प्रतिगोणी 4 हजार 250 रुपये तर खासगी क्षेत्रातून 4 हजार 300 रुपये प्रतिगोणी दर शासनाने जाहीर केला आहे. या आधारभूत किमतीच्या कमी दराने ठेकेदारांना तेंदूपाने विकत घेता येत नाहीत. यंदा प्रतिगोणी दरात 8 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, या दराबाबत शासनाचे धोरण निश्चित नाही, मजुरांचा विमाही काढला जात नाही. त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात टाकून मजूर जंगलात वन्यप्राण्यांच्या दहशतीत तेंदूपाने संकलित करीत असतात.
दक्षिणेकडील राज्यांत या पानांचा विड्या बनविण्यासाठी वापर केला जातो. राज्यातील 35 टक्के तेंदू एकट्या गडचिरोलीच्या जंगलातून बाजारात जातो. मात्र, तेंदूपत्ता मिळणाऱ्या कोणत्याही जिल्ह्यात तेंदूपानांवर आधारित कुटीरोद्योग किंवा प्रक्रिया उद्योग नाही. मजुरांना शाश्वत मजुरीचे धोरणही नाही. त्यामुळे तेंदूमजुरांच्या नशिबी परवड कायम आहे.
दुसरीकडे वाघाचे हल्ले वाढल्याने साधारणतः दोन महिने चालणारा तेंदूपत्ता हंगाम लवकरच गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षी वाघाने 18 बळी घेतले असून, गेल्या तीन वर्षात तेंदू हंगामा बळींची संख्या २१ आहे. पूर्व विदर्भात वाघ व मानव संघर्ष आता ऐरणीवर आला आहे. वन्यप्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात आहेत आणि मानव पोटासाठी त्या अधिवासात शिरतो आहे. हाच संघर्षाचा धागा आहे. वाघांची संख्या वाढत असताना, संरक्षित जागा मात्र मर्यादित आहे. त्यामुळे मानवाचे जीवन धोक्यात आले आहे.






