विठ्ठल साबळे
- यवतमाळच्या जंगलाला लागलेला वणवा विझवण्यासाठी जीवाची पर्वा न करणारे वनपाल विजय शिंगणजुडे यांचा या आगीत मृत्यू झाला.
- या घटनेच्या निमित्ताने जंगल वाचवण्याची जबाबदारी असलेल्या वनपालांना वणव्यांशी लढण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणं आहेत का, त्याचे त्यांना प्रशिक्षण मिळतयं का या प्रश्नांची उत्तरे शोधणे आता अत्यावश्यक झाले आहे.
- जंगलात लागणाऱ्या बहुतांश आगी नैसर्गिक नसतात तर भारतातील सुमारे नव्वद टक्के वणवे मानवनिर्मित असतात.
माणसं स्वतःचं घर वाचवण्यासाठी धावतात, पण जंगलाला आपलं घर मानणारा एक वीर योद्धा रान वाचवता वाचवता शहीद झाल्याची घटना नुकतीच घडली आणि उभा महाराष्ट्र हळहळला.
यवतमाळ जिल्ह्याच्या हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर जंगलाल भयानक वणवा पेटल्याची बातमी ड्युटीवर असलेल्या वनपाल विजय शिंगणजुडे (वय ४७) यांना कळताच क्षणी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जंगलाच्या आतील भागात तीन ते चार ठिकाणी वणवे पेटले होते, त्यामुळे वन कर्मचाऱ्यांचे पथक विभागले आणि त्यांचे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना अचानक वणव्याने रौद्र रूप धारण केले आणि ज्वाळा वेगाने पसरू लागल्या. त्यांच्या इतर सहकाऱ्यांची मात्र त्या आगीतून सुखरुप सुटका झाली होती, मात्र विजय शिंगणजुडे आगीच्या विळख्यात अडकले.
आगीची व्याप्ती वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी जीव वाचवण्यासाठी जवळच्याच एका झाडाचा आधार घेत झाडावर चढण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीच्या प्रचंड उष्णतेमुळे आणि ज्वाळांच्या झळांमुळे ते गंभीररीत्या होरपळले आणि सुमारे ६० टक्क्यांहून अधिक भाजले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील विशेष रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. आग विझवण्यासाठी आवश्यक असलेला ‘ब्लोअर पंप’ त्यावेळी उपलब्ध नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
वनवा विझवताना कर्तव्य बजावताना प्राण गमावलेले वनपाल विजय शिंगणजुडे.
दरम्यान, वन शहीद विजय सिंगनजुडे यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. वनसंपत्ती आणि वन्यजीवांचे रक्षण करताना बलिदान देणाऱ्या या वीर सुपुत्राचे पार्थिव शनिवारी सायंकाळी पुसद येथे आणण्यात आले. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निसर्ग आणि वन्यजीवांचे रक्षण करताना विजय शिंगणजुडे यांनी आपले प्राण पणाला लावले. ज्या वणव्याकडे पाहून माणसं लांब पळतात, त्याच आगीशी दोन हात करण्याची जिद्द त्यांनी दाखवली. कर्तव्य निभावताना आलेले हे वीरमरण अनेकांच्या मनाला चटका लावून गेले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त….
या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून वनपाल विजय शिंगणजुडे यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी वनपरिक्षेत्रात आग विझवण्याच्या धाडसी प्रयत्नात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दु:खद असल्याचे त्यांनी नमूद केले. जंगल आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करताना जीवाची बाजी लावणारे असे कर्मचारी हे खरे “वन शहीद” असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला श्रद्धांजली अर्पण केली. शिंगणजुडे यांच्या कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. मात्र अशा घटनांनंतर केवळ शोकसंदेश किंवा श्रद्धांजली देणे पुरेसे ठरत नाही, तर वनव्याशी झुंज देणाऱ्या वनपालांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना, आधुनिक उपकरणे आणि सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज असल्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.
वनपाल विजय शिंगणजुडे यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली.
जंगल वाचवण्यासाठी गेलेल्या एका कर्मचाऱ्याचा जीव गमावण्याची ही घटना वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर चर्चा निर्माण करणारी ठरली आहे. जंगलातील आग विझवताना एका वनपालाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना केवळ एक अपघात म्हणून पाहता येणार नाही, तर या घटनेने भारतातील वन विभागाच्या यंत्रणेतील काही गंभीर प्रश्न आणि उणिवा समोर आणले आहेत. जंगल वाचवण्याची जबाबदारी असलेल्या वनपालांना वणव्यांशी लढण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणं आहेत का, त्याचे त्यांना प्रशिक्षण मिळतयं का आणि प्रत्येक उन्हाळ्यात जंगलात आग का भडकते, या प्रश्नांची उत्तरे शोधणे आता अत्यावश्यक झाले आहे.
वनरक्षकांचा प्रत्यक्ष अनुभव
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या झरण रेंजमध्ये सोनी पंधरे गेल्या १३-१४ वर्षांपासून वनपाल म्हणून काम करत आहेत. ‘बाईमाणूस’शी सोनी पंधरे सांगतात की,
विजय शिंगणजुडे यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. नियमावलीनुसार जंगलातील वणवे नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक ‘वन बीट’मध्ये किमान दोन ते तीन ब्लोअर मशीन तसेच चार ते पाच हंगामी वनमजूर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या झरण रेंजमध्ये गेल्या १३-१४ वर्षांपासून वनपाल म्हणून काम करणाऱ्या सोनी पंधरे.
कारण उन्हाळ्यात साधारण तीन महिन्यांचा हा अत्यंत संवेदनशील असतो. जंगलातील जाळरेषा (फायर लाईन) वेळेत साफ करून जाळणे आणि जंगलातील रस्ते व्यवस्थित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी जंगलातील रस्त्यांची अवस्था खराब असल्यामुळे घटनास्थळी पोहोचायला उशीर होतो आणि तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर पसरलेली असते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात अग्निशामक यंत्रे (फायर एक्स्टिंग्विशर) उपलब्ध असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा :
“आमची सोनी मॅडम वाघीणेय, वाघीण! अख्खं जंगल सांभाळते”
पंधरे यांच्या मते सध्या अनेक ठिकाणी एका वन बीटमध्ये केवळ एकच ब्लोअर मशीन दिली जाते. ती आग विझवण्यासाठी उपयोगी असली तरी सतत वापरल्याने ती लवकर गरम होते आणि काही वेळा त्यातूनही धोका निर्माण होऊ शकतो. उन्हाळ्यात जंगलातील पालापाचोळा, बांबू आणि गवत पूर्णपणे कोरडे झालेले असते. त्यात वाऱ्याचा वेग वाढला की आगीच्या ज्वाळा दहा फूटांपर्यंत उसळतात आणि अशा वेळी आग अचानक अंगावर येण्याची भीती असते. जंगलात सुरक्षित बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक बनते. त्यामुळे अशा परिस्थितीत वणवे विझवणे हे वन कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आव्हानात्मक आणि जीवघेणे काम ठरते.
वाढते वणवे आणि त्यांच्याशी दोन हात करणारे वनपाल
भारतामध्ये जंगलातील आगीचा प्रश्न नवीन नाही. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की देशातील अनेक राज्यांतील जंगलात वणव्याच्या घटना वाढतात. वन सर्वेक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार भारतातील सुमारे ३६ टक्के जंगल क्षेत्राला दरवर्षी वणव्याचा धोका असतो, तर जवळपास १० टक्के जंगल क्षेत्र अत्यंत संवेदनशील मानले जाते. उपग्रह प्रणालीद्वारे मिळणाऱ्या माहितीप्रमाणे देशभरात 2 ते 3 लाखांपर्यंत फायर अलर्ट नोंदवले गेले आहेत. म्हणजेच जंगलात आग लागण्याच्या घटना अत्यंत मोठ्या प्रमाणात घडत असतात.

महाराष्ट्रातही हा प्रश्न गंभीर आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ भागात उन्हाळ्यात वणव्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नाशिक, धुळे आणि पुणे जिल्ह्यांमध्ये दरवर्षी अनेक वेळा जंगलात आग लागते. वन विभागाच्या माहितीनुसार राज्यात दरवर्षी हजारो हेक्टर जंगल क्षेत्र वणव्यामुळे प्रभावित होते. अनेकदा या आगी काही तासांत नियंत्रणात येतात, पण काही वेळा त्या इतक्या मोठ्या होतात की त्यांना विझवण्यासाठी दिवस लागतात.
वणव्याशी लढताना सर्वात मोठी जबाबदारी असते ती वनरक्षक आणि वनपाल यांच्यावर. हे कर्मचारी प्रत्यक्ष जंगलात जाऊन आग विझवण्याचे काम करतात. अनेकदा ही लढाई अत्यंत कठीण परिस्थितीत लढावी लागते. तापमान चाळीस अंशांपेक्षा जास्त असते, जंगलातील कोरडी पाने आणि गवत पटकन पेटतं आणि वाऱ्याचा वेग वाढला की आग काही मिनिटांतच मोठ्या क्षेत्रात पसरते. अशा परिस्थितीत वनपालांना प्रत्यक्ष ज्वाळांच्या जवळ जाऊन आग विझवावी लागते.
उपकरणांची कमतरता आणि वाढता धोका
परंतु इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. वनपालांकडे या कामासाठी आवश्यक असलेली आधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत का? इतर प्रगत देशांत जंगलातील आग विझवण्यासाठी अनेक विशेष साधने वापरली जातात. त्यामध्ये फायर बीटर, ब्लोअर मशीन, वॉटर मिस्ट ब्लोअर, फायर होज, चेनसॉ, संरक्षणात्मक अग्निरोधक कपडे, हेल्मेट, मास्क आणि विशेष बूट यांचा समावेश असतो. काही देशांमध्ये तर अग्निशमनासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा देखील वापर केला जातो.

परंतु भारतातील अनेक भागांमध्ये वास्तव यापेक्षा खूप वेगळे आहे. जंगलातील वणवे विझवताना वन कर्मचाऱ्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागते. आग लागल्याची माहिती मिळताच कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचतात आणि सर्वप्रथम आग पुढे पसरू नये यासाठी परिसरातील कोरडी पाने व गवत बाजूला करण्याचे काम सुरू करतात. त्यासाठी फायर बीटर, ब्लोअर मशीन, बॅकपॅक वॉटर स्प्रेयर आणि हातातील साधनांच्या मदतीने ज्वाळांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. काही ठिकाणी पाण्याच्या टँकर किंवा पाइपद्वारेही आग आटोक्यात आणली जाते. मात्र अनेक दुर्गम जंगल भागांमध्ये साधनसामग्री मर्यादित असल्यामुळे वन कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ज्वाळांच्या जवळ जाऊन हातानेच आग विझवण्याचा प्रयत्न करावा लागतो. अशा वेळी दाट धूर, प्रचंड उष्णता आणि वेगाने बदलणारी वाऱ्याची दिशा यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनते आणि वन कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात पडण्याची शक्यता वाढते
वणव्याशी लढताना झालेल्या दुर्घटना
जंगलातील आग अंदाज न लागणाऱ्या स्वरूपाची असते. अचानक वाऱ्याची दिशा बदलली की ज्वाळा काही सेकंदांतच दुसऱ्या दिशेने धाव घेतात. अशा वेळी कर्मचारी आगीच्या वर्तुळात अडकण्याची शक्यता असते. धूर इतका पसरलेला असतो की श्वास घेणे कठीण होते आणि अनेकदा लोकांना मार्ग दिसत नाही. अनेक दुर्घटनांमध्ये हेच कारण पुढे आले आहे.
भारतामध्ये यापूर्वीही वणव्याशी लढताना अनेक कर्मचारी मृत्यूमुखी पडले आहेत. कर्नाटकातील बांदीपूर अभयारण्यात २०१७ मध्ये जंगलातील आग विझवताना एका वनरक्षकाचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रात यापूर्वीही जंगलातील आग विझवताना वन कर्मचाऱ्यांचा जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. २०१८ मध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात जंगलातील वणवा विझवताना वनरक्षक सदाशिव नागठाणे हे गंभीररीत्या भाजले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. तसेच एप्रिल २०२१ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्य परिसरात लागलेली आग विझवताना तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू झाला होता. अशा घटनांमधून जंगलातील वणव्याशी झुंज देणाऱ्या वन विभागातील कर्मचाऱ्यांना किती मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागते हे स्पष्ट होते.
मानवनिर्मित वणवे आणि नियंत्रणासाठी आवश्यक ते उपाय
वणव्याचा प्रश्न समजून घेताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते. जंगलात लागणाऱ्या बहुतांश आगी नैसर्गिक नसतात तर भारतातील सुमारे नव्वद टक्के वणवे मानवनिर्मित असतात. काही लोक जाणूनबुजून आग लावतात, तर काही वेळा निष्काळजीपणामुळे आग लागते. जंगलातील काही भागात नवीन गवत लवकर उगवावे म्हणून स्थानिक लोक आग लावतात. काही ठिकाणी मध गोळा करताना धूर करण्यासाठी आग लावली जाते आणि ती नंतर पसरते. तेंदूपत्ता किंवा महुआ गोळा करणारे लोक झाडाखालील कोरडी पाने साफ करण्यासाठी आग लावतात. काही वेळा पर्यटकांनी टाकलेल्या सिगारेटच्या ठिणगीमुळेही मोठी आग लागते. एक छोटी ठिणगी कोरड्या जंगलात काही मिनिटांत मोठ्या वणव्यात बदलू शकते.
रस्त्यांवरून कुणी चुकून सिगारेट किंवा आगीची काडी फेकल्यावर आग जंगलात पसरू नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही कडेला कटाई आणि जलाई करून परिसर स्वच्छ केला जातो.
उन्हाळ्यात वणव्याचा धोका जास्त असण्याचे कारण म्हणजे हवामान. मार्च ते मे या कालावधीत तापमान जास्त असते आणि जंगलातील बहुतांश झाडांची पाने गळून पडलेली असतात. ही कोरडी पाने आणि गवत सहज पेटतात. आर्द्रता कमी असल्यामुळे आग पटकन पसरते. जर वाऱ्याचा वेग वाढला तर परिस्थिती आणखी गंभीर होते. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभाग काही उपाययोजना जातो करतो, मात्र त्यामध्ये सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे फायर लाईन तयार करणे. जंगलात ठराविक अंतरावर मोकळे पट्टे तयार केले जातात, जेणेकरून आग एका भागातून दुसऱ्या भागात पसरू नये. तसेच काही ठिकाणी वॉच टॉवर उभारले जातात, जेथून दूरवरून धूर दिसला की त्वरित माहिती मिळते. उपग्रह प्रणालीद्वारेही अनेक ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळवली जाते.
‘बाईमाणूस’शी बोलताना निसर्ग अभ्यासक किशोर पाठक सांगतात की,
जंगलात लागणाऱ्या बहुतेक आगी या मानवी निष्काळजीपणातून किंवा जाणीवपूर्वक लावलेल्या असतात. भारताच्या राष्ट्रीय वन धोरणानुसार देशात किमान ३३ टक्के हरितक्षेत्र असणे अपेक्षित आहे. मात्र मराठवाड्यासारख्या भागात हे प्रमाण अत्यंत कमी असून काही ठिकाणी ते काही टक्क्यांपुरतेच मर्यादित आहे. वनक्षेत्र कमी असल्यामुळे अशा भागातील जंगलांवर पर्यावरणीय ताण अधिक वाढतो आणि वणव्याचा धोका वाढतो. त्यामुळे अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ आग विझवणे पुरेसे नसून जंगल परिसरात नियमित गस्त (पेट्रोलिंग), जनजागृती आणि कठोर नियंत्रण व्यवस्था आवश्यक असल्याचे पाठक सांगतात. त्याचबरोबर वणव्याशी लढणाऱ्या वनपाल आणि वन कर्मचाऱ्यांना आधुनिक उपकरणे, संरक्षणात्मक साधने आणि योग्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण अनेकदा त्यांनाच प्रत्यक्ष ज्वाळांच्या जवळ जाऊन आग आटोक्यात आणावी लागते.
जंगल वाचवताना वनपालांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..
जंगलातील वणवे रोखण्यासाठी स्थानिक समुदायाचा सहभागही महत्त्वाचा आहे. जंगलाच्या आसपास राहणाऱ्या लोकांना वणव्याचे धोके समजावून सांगणे आणि आग लावण्याच्या प्रथांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने वन विभागाने वनव्यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. वणव्याचा प्रश्न हा केवळ पर्यावरणाचा नाही, तर मानवी सुरक्षेचाही प्रश्न आहे. जंगल जळाले तर वनसंपत्ती नष्ट होते, वन्यजीवांचा अधिवास उद्ध्वस्त होतो आणि हवामानावरही त्याचा परिणाम होतो. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे जंगल वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या वनपालांची सुरक्षितता.






