सायली मेश्राम
सध्या देशभरात एक गंभीर आणि चिंताजनक विषय चर्चेत आहे. 2015 च्या UPSC परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या IAS अधिकारी टीना डाबी यांच्या विरोधात सुरू असलेला विषारी प्रचार आणि बदनामी मोहीम. टीना डाबी या दलित (SC) पार्श्वभूमीतील अधिकारी आहेत. त्यांच्या यशापासूनच त्या सातत्याने ट्रोलिंग, टीका आणि बदनामीचा सामना करत आहेत. अलीकडे राजस्थान मधील बाड़मेर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित वादाने पुन्हा एकदा हा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे.
IAS अधिकारी टीना डाबी यांची बदनामी का केली जातेय?
टीना डाबी यांच्यासोबत राजस्थान येथे घडलेल्या या प्रकरणातील घटनाक्रम समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. 22 डिसेंबर 2025 रोजी बाड़मेर येथील महाराणा भूपाल कॉलेज अर्थात मुल्तानमल भीखचंद छाजेड महिला महाविद्यालयात परीक्षा शुल्कात तब्बल तीनपट वाढ केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. ही शुल्कवाढ राजस्थान विद्यापीठाने केली होती. विद्यार्थ्यांची मागणी स्पष्ट होती, वाढीव शुल्क मागे घ्यावे.
या आंदोलनात सहभागी विद्यार्थी प्रामुख्याने ABVP या आरएसएस संबंधित विद्यार्थी संघटनेशी संबंधित होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी टीना डाबी यांची भेट घेण्याची मागणी केली. त्या वेळी उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने चर्चा करताना म्हटले की, टीना डाबी तुमच्यासाठी रोल मॉडेल आहेत.
यावर एका विद्यार्थी नेत्याने उत्तर दिले, “त्या रोल मॉडेल नाहीत, त्या रील स्टार आहेत.” हा उल्लेख त्यांच्या सोशल मीडिया वरील सक्रियतेकडे होता, जिथे त्या प्रेरणादायी व्हिडिओ शेअर करतात.
“त्या रोल मॉडेल नाहीत, त्या रील स्टार आहेत.”
खरंतर या घटनेबद्दल टीना डाबी यांना काहीच कल्पना नव्हती,पोलिसांनी स्वत:हून कारवाई केली. या घटनेनंतर पोलिसांनी चार विद्यार्थी नेत्यांना ताब्यात घेतले. विद्यार्थ्यांचा आरोप असा होता की, “रील स्टार” हा शब्द वापरल्यामुळेच ही कारवाई झाली. पोलिसांनी म्हटले की, विद्यार्थ्यांनी रस्ता अडवल्यामुळे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. कोणत्याही अपमानास्पद वक्तव्यामुळे अटक करण्यात आलेली नव्हती.
मात्र याचा राजकीय आणि जातीय फायदा घेण्यासाठी या घटनेनंतर महिला विद्यार्थिनींनी कोतवाली पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केले. परिस्थिती गंभीर बनत असल्याचे लक्षात येताच बाड़मेरचे पोलीस अधीक्षक स्वतः तेथे पोहोचले. पोलीस प्रशासनाने कारवाई चुकीची होती, असे मान्य करत कोणतीही FIR न नोंदवता विद्यार्थ्यांना सोडण्यात आले.
‘’हा मुद्दा मुद्दाम उकरून काढून व्हायरल केला गेला’’ - टीना डाबी
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना टीना डाबी यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा मुद्दा मुद्दाम उकरून काढून व्हायरल केला गेला. आपण विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकल्या असून शुल्कवाढीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही सर्व तथ्ये विश्वासार्ह राष्ट्रीय वृत्तस्रोतांमध्येही प्रसिद्ध झालेली आहेत.कोणत्याही मिडिया रिपोर्टमध्ये कुठेही विद्यार्थ्यांचा अपमान, नागरिकांवर अन्याय किंवा सूडबुद्धीने केलेली कारवाई असा आरोप सिद्ध होत नाही. तरीही सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये हे प्रकरण “टीना डाबी यांनी विद्यार्थ्यांना अटक केली” अशा स्वरूपात चुकीचे नॅरेटीव्ह पसरवले जात आहे.
या संदर्भात ‘जागल्या भारत’चे संपादक मिलिंद धुमाळे म्हणतात की, या बदनामीमागे एक गंभीर सामाजिक मुद्दा दडलेला आहे. मनुवादी विचारसरणी दलित महिलांना सत्तास्थानी पाहू शकत नाहीत. टीना डाबी दलित समाजातून आलेल्या महिला अधिकारी आहेत. UPSC मध्ये टॉप केल्यानंतरही त्यांना “आरक्षणामुळे यश” मिळाल्याचे आरोप सहन करावे लागले. नंतर मुस्लिम IAS अधिकाऱ्याशी विवाह केल्यामुळे इस्लामोफोबिक आणि जातीय ट्रोलिंग झाले. आता सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे त्यांना “रील स्टार” म्हणून कमी लेखले जात आहे. प्रत्यक्षात हा विरोध त्यांच्या कामगिरीला नाही, तर त्यांच्या सामाजिक ओळखीला आहे, असे स्पष्टपणे दिसते.
टीना डाबी सुरुवातीपासूनच ट्रोलिंगच्या बळी
ऑनलाइन चर्चांमध्ये असे आरोप करण्यात येत आहेत की, या आंदोलनाचा वापर टीना डाबी यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी केला जात आहे, जेणेकरून त्यांच्या जागी उच्च जातीतला अधिकारी नेमला जावा. काही पोस्ट्समध्ये व्यंगात्मक पद्धतीने विचारले जाते, “दलित IAS अधिकाऱ्यांवर टीका करण्याची हिंमत कशी झाली?” हे वाक्य विनोद वाटत असले, तरी त्यामागील मानसिकता गंभीर आहे. मनुवादी विचारसरणी दलित महिलांना सत्तास्थानी पाहू शकत नाही. त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, वर्तनावर आणि ओळखीवर हल्ला केला जातो.
सोशल मीडियावर पसरवले जाणारे ट्रोलिंग व्हिडिओ, टीकात्मक पोस्ट्स आणि अफवा या संघटित ट्रोल आर्मीचा भाग असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते. या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींच्या प्रतिक्रियाही चर्चेत आहेत. त्यांच्या पोस्ट्समधून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असले, तरी त्याचा फटका थेट एका दलित महिला अधिकाऱ्याला बसत आहे. तहसीन पूनावाला भाजपचा नेता आहे. त्यांनी तर टीना डाबी यांनाच दोष देत माफी मागण्याचे आवाहन केले आहे. यामुळे समाजात जातीय द्वेष, अविश्वास आणि विष पसरवले जात आहे.यात कारण नसताना आरक्षण मुद्दाही आणला गेला. अनुराधा तिवारी नामक महिला कायम आरक्षण विरोधी ट्विट करताना दिसते, यावेळीही तिने कारण नसताना आरक्षण मुद्दा आणला.
टीना डाबी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दोन कोटींचा पुरस्कार
या सगळ्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित होतो, दलित महिला अधिकारी सत्तेत असणे आजही काहींना असह्य का वाटते? नुकतेच टीना डाबी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. टीना डाबी यांनी जलसंधारण आणि जनभागीदारी या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर मोठा सन्मान मिळाला आहे. ‘कॅच द रेन’ अभियानांतर्गत वर्षा जल संग्रहण आणि जनसहभाग वाढवण्यासाठी जिल्ह्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या समारंभात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी टीना डाबी यांना प्रथम जल संचय जनभागीदारी पुरस्कार प्रदान केला. या पुरस्कारासोबत जिल्ह्याला दोन कोटी रुपयांची रक्कमही देण्यात आली आहे.यामुळे जातीयवादी समाजाचे पित्त खवळणे साहजिक आहे, असाही आरोप मिलिंद धुमाळे यांनी केला आहे.
(संदर्भ - जागल्या भारत)






