- सुरज पटके
- 'दलित हिस्ट्री मंथ' दरवर्षी एप्रिल महिन्यात साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म याच महिन्यात झाला म्हणून या महिन्याला 'दलित हिस्ट्री मंथ' म्हटलं जातं.
- दलित, बहुजन आणि आदिवासी समुदायांचा दुर्लक्षित इतिहास, संघर्ष आणि कर्तृत्व जगासमोर आणणे हा 'दलित हिस्ट्री मंथ' साजरा करण्यामागचा हेतू आहे.
- आजच्या पहिल्या भागात बाळू पालवणकरची कहाणी, जो एक महान फिरकी गोलंदाज असूनही अस्पृश्यतेचा त्याला कसा सामना करावा लागला…
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि बाळू पालवणकर यांचा नेमका एकमेकांशी काय संबंध होता…?
खेळाला जातपात, धर्मपंथ नसतो, असे आपण लहाणपणापासून वाचत आलोय, ऐकत आलोय, पण आपल्या भारतात खेळाला जातही असते हे घडलेल्या काही घटनांमुळे अधोरेखित झालं आहे.
ही गोष्ट आहे बाळू पालवणकरची… ते साल होतं १८९२. बाळू तेव्हा १७ वर्षांचा होता. पूना क्लबमध्ये त्याला नोकरी मिळाली होती. नोकरी कसली तर माळीकामाची, पण त्या कामाव्यतिरिक्त गोऱ्यांसाठी क्रिकेटची खेळपट्टी तयार करणं, रोलर फिरवणं, नेट लावणं अशी काम त्याला करावी लागायची. पगार होता दर महिन्याला चार रुपये…
या क्लबचा नियम म्हणजे फक्त इंग्रजांनाच फलंदाजी मिळायची आणि इतरांनी एकतर फिल्डिंग तरी करायची किंवा गोऱ्यांना बॉलिंग करायची. फलंदाजी नाहीच… गोऱ्या क्रिकेटपटूंना गोलंदाजी टाकणे हे काम त्यामुळे बाळूकडे आलं.
बाळू डावखुरा फिरकी गोलंदाजी करायचा. त्यावेळी भारतात जी. जी. ग्रेग नावाचे ब्रिटिश क्रिकेटपटू होते. त्यांनीच बाळूला बॉलिंग करायला सांगितली. बाळूच्या फिरकीचं कौशल्य पाहून ग्रेग चकित झाले. त्याच्या फिरकीचा सराव व्हावा, यासाठी ग्रेग आधी एक तास येऊ लागले.
ग्रेग यांना आऊट केलं तर बाळूला आठ आणे मिळत असत. यातून दोन गोष्टी झाल्या, ग्रेग यांना चांगल्या दर्जाच्या फिरकीचा सामना करता येऊ लागला आणि बाळूला बॉलिंगची, खेळण्याची नियमित संधी मिळाली.

बाळूच्या फिरकीची जादू ग्रेग यांच्या सहकाऱ्यांनाही उमगली. त्यावेळी पुण्यातले हिंदू हे ब्रिटिशांच्या संघाला आव्हान देऊ इच्छित होते. बाळूच्या फिरकीच्या बळावर आपण जिंकू शकतो, असा विश्वास त्यांना होता. पण अनेकांसाठी बाळू 'अस्पृश्य' होता! अस्पृश्य मुलाला टीममध्ये घेण्यावरून अनेक वाद झाले.
पण त्याला घेतल्याशिवाय ब्रिटिशांना हरवता येणार नाही, ही जाणीव झाल्यामुळे त्याला टीममध्ये स्थान मिळालं. त्यांचं बॉलिंगमधलं कौशल्य पाहून पुण्याच्या क्लबमध्ये त्यांना स्थान मिळालं खरं, पण बरोबरीची वागणूक मिळत नव्हती. तो दलित होता आणि त्याकाळामध्ये अस्पृश्यता तर भारतीय समाजात होतीच होती.
बाळू पालवणकरची पूर्ण कहाणी ऐकल्यावर ‘लगान’ चित्रपटातील ‘कचरा’चीच व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभी राहते. क्रिकेट अभ्यासक, संशोधक आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या 'ए कॉर्नर ऑफ ए फॉरेन फिल्ड: द इंडियन हिस्ट्री ऑफ ए ब्रिटिश स्पोर्ट' या पुस्तकात तसंच 'क्रिकेट, कास्ट अँड द पालवणकर ब्रदर्स' या सबऑल्टर्न स्पोर्ट्स पुस्तकात बाळूंच्या कारकिर्दीविषयी तपशीलवार लिहिलं आहे. याशिवाय 'एपिक' या टीव्ही वाहिनीवरच्या 'मिडविकेट टेल्स' या कार्यक्रमात बाळूंसंदर्भात ही माहिती देण्यात आली होती.
गोऱ्यांना बॉलिंग करता करता तो एक महान फिरकी गोलंदाज बनला खरा, पण?
त्या काळात 1875 साली महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत धारवाडला बाळू पालवणकरांचा जन्म झाला. चामड्याशी संबंधित काम करणारे म्हणजेच चर्मकार कुटुंबात ते जन्मले. बाळूचे वडील सैन्यात होते. त्यांना बाळूसह चार मुलं.
सैन्याने निकाली काढलेल्या वस्तूंच्या साह्याने बाळू आणि त्याचे भाऊ क्रिकेट खेळायला शिकले. तेव्हा अस्पृश्य मानलेल्या जातीत जन्म झाला होता, पण वडील सैन्यात असल्यामुळे घरातली परिस्थिती बरी होती.
बघता बघता बाळू पालवणकर एक महान डावखुरा फिरकी गोलंदाज झाला. मात्र बाळूला खेळण्याआधी आणि खेळून झाल्यावर वेगळं वागवलं जायचं. त्याला वेगळ्या कपात चहा दिला जात असे. त्याच्या जेवणासाठी वेगळी ताटवाटी असे आणि ती त्यालाच धुवून ठेवावी लागत असे.
त्याला हातपाय धुवायचे असतील तर वेगळा माणूस पाणी आणून देत असे. या अस्पृश्यतेच्या वागणुकीचा बाळूंनी कधी खेळावर परिणाम होऊ दिला नाही. युरोपीय संघाविरुद्ध जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बाळूंच्या फिरकीचा करिश्मा चालला आणि पुणे क्लबने युरोपीय संघाला नमवण्याची किमया केली.
दलित समाजाच्या पी. बाळूला क्रिकेटमध्ये अस्पृश्यतेचा सामना करावा लागला
दिवंगत क्रीडा समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांनीही बाळू पालवणकरबद्दल लिहून ठेवलं आहे. संझगिरी लिहितात की, 1896 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. महाभयंकर अशी ती साथ होती. त्याच काळात मुंबईत क्रिकेटला बहर आला होता म्हणून बाळू मुंबईत गेले.
बॉम्बे बेरार अँड सेंट्रल इंडियन रेल्वे कंपनीने त्यांना नोकरी दिली. बाळू हिंदू जिमखान्यासाठी खेळला. नंतर १९११ च्या इंग्लडच्या दौऱ्यावर गेला आणि बाळू पालवणकर हे नाव तिथे प्रचंड गाजलं. त्याने दौऱ्यावर १८.८४ च्या सरासरीने ११४ बळी घेतले.
वलयाचा जर विचार केला तर तो त्या काळातला विराट कोहली होता. तो दलित होता, त्यामुळे पराक्रम गाजवूनही त्याला मॅचच्या वेळेला जेवण वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या ताटात दिलं जायचं. चहा देताना मातीचे पेले वापरले जायचे आणि त्याचा चहा पिऊन झाला की ते तोडून टाकले जात.
त्याला साधं पाणी द्यायला सुद्धा एक दलित माणूस ठेवला होता. कुठलाही सवर्ण माणूस त्याला पाणी देत नसे. मैदानावर सवर्ण खेळाडू त्याचा स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करत. आणि इतकं सगळं करून देखील या दलिताने हिंदूंच्या संघाला वारंवार विजय मिळवून दिले.

त्यावेळी धर्मावर आधारित अशी एक स्पर्धा होती, ज्याला चौरंगी अशी स्पर्धा म्हणत. हिंदू, पारशी, ब्रिटिश आणि मुस्लीम असे धर्मनिहाय संघ होते. त्या स्पर्धेत हिंदूंचं वर्चस्व हे या बाळू पालवणकरने टिकवलं आणि ते टिकवून सुद्धा तो दलित असल्यामुळे त्याला हिंदू संघाचं कर्णधारपद कधी मिळालंच नाही.
1913 मध्ये हिंदू संघात बाळू यांच्याबरोबरीने शिवराम, विठ्ठल आणि गणपत हे तिघे भाऊही खेळू लागले. हिंदू संघाचे कर्णधार एम. डी. पै होते. पै यांचा गौड सारस्वत ब्राह्मण मित्र मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतानाच्या भाषणात पै यांनी बाळूंना टीमचा कॅप्टन करण्याची मागणी केली.
बाळू हे संघातले अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांची कामगिरी सर्वोत्तम झाली, असा पै यांचा युक्तिवाद होता. ज्यावेळेला पै ना कर्णधार केलं तेव्हा पै नी उघडपणे सांगितलं सुद्धा की, 'अहो मला कसलं कर्णधार करता. तुम्ही या बाळूला कर्णधार करा. तो माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला खेळाडू आहे आणि तो चांगला कर्णधार होऊ शकतो.' पण बाळू दलित असल्यामुळे त्याला कुणी कर्णधार केलंही नाही, असे द्वारकानाथ संझगिरी लिहितात.
बाळू दलित असल्यामुळे त्याला कधीच कर्णधार करण्यात आलं नाही
मात्र हिंदू जिमखाना संघाचे बाळू कॅप्टन झाले नाहीत. 'बॉम्बे क्रोनिकल' वर्तमानपत्रात यासंदर्भात अग्रलेखही छापून आला. तत्कालीन वाचकांच्या पत्रांमध्येही याचा उल्लेख दिसला होता. या वादामुळे बाळूंना टीम सोडावी लागली. त्यावर टोकाच्या प्रतिक्रिया तत्कालीन वर्तमानपत्रांमध्ये पाहायला मिळाल्या.
1920मध्ये आयोजित चौरंगी स्पर्धेत, नियमित कर्णधार पै आजारी पडले. बाळूंना वगळण्यात आलं होतं, मात्र त्यांचे बंधू विठ्ठल आणि शिवराम संघात होते. निवड समितीने पै यांच्याऐवजी देवधर यांची कॅप्टनपदी निवड केली.
विठ्ठल आणि शिवराम पालवणकर देवधर यांना वरिष्ठ होते. बाळू संघात नसणं, गणपत या चौथ्या भावाचा अकाली मृत्यू आणि कर्णधारपदापासून दूर राहावं लागणं या एकापाठोपाठ एक धक्क्यांतून विठ्ठल आणि शिवराम यांनी माघार घेतली.
कर्णधारपद नियुक्तीवेळी जातीचा मुद्दा अग्रणी ठरला यावरून या दोघांनी सविस्तर निवेदन दिलं. पालवणकर बंधूंच्या समर्थनार्थ निधीही जमा झाला. लोकांच्या विनंतीला मान देऊन बाळू आणि त्यांचे बंधू पुन्हा संघात परतले.
बाळू यांना उपकर्णधारपद देण्यात आलं. बाळूंचे धाकटे भाऊ विठ्ठल यांना काही वर्षांच्या संघर्षानंतर हिंदू संघाचं कर्णधारपद मिळालं. त्यांनी यशस्वी नेतृत्व करत विश्वास सार्थ ठरवला.
इतिहासकार रामचंद्र गुहा त्यांच्या पुस्तकात लिहितात की, 1906 मध्ये या स्पर्धेत हिंदू विरुद्ध ब्रिटिश संघ असा मुकाबला रंगला. बाळूंचा समावेश असलेल्या हिंदू संघाने 242 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ब्रिटिशांचा डाव 191 धावांतच आटोपला.

हिंदू संघाने दुसऱ्या डावात 160 धावांची मजल मारली आणि ब्रिटिश संघासमोर 212 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र बाळू आणि इरशा या दोन गोलंदाजांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्याने ब्रिटिशांचा डाव 102 धावांतच आटोपला.
मॅचदरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकत्र जेवले. हिंदू जिमखान्याने बाळू आणि त्यांचे बंधू शिवराम यांना कॅफेतही प्रवेश दिला होता. एका क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने जातिभेदाच्या भिंती तुटल्या, असं 'द ट्रिब्यून'ने म्हटलं होतं.
'इंडियन सोशल रिफॉर्मर' या वृत्तपत्राने क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद मिटवला यावर प्रदीर्घ लेख छापला. बारोनेट क्रिकेट क्लबचे डॉ. एम.ई. पावरी यांनी बाळूंना 'भारताचे विल्फ्रेड ऱ्होड्स' असं म्हटलं. ऱ्होड्स हे तत्कालीन श्रेष्ठ फिरकीपटू होते.
युरोपीय संघाला हरवल्यानंतर बाळूचा साताऱ्यात हत्तीवरून सत्कार करण्यात आला. पुण्याला परतल्यानंतर विचारवंत, अभ्यासक आणि समाजसुधारक महादेव गोविंद रानडे यांच्या हस्ते बाळूला गौरवण्यात आलं.
'बाळूंबरोबर खेळत असाल तर त्यांच्याबरोबरीने खा-प्या,' असा सल्लाही रानडेंनी दिला होता. एका सार्वजनिक सभेत लोकमान्य टिळकांनी बाळूंच्या कामगिरीचं कौतुक केलं. समाजरचनेत तळाशी असणाऱ्या वर्गातील व्यक्तीचं जाहीर कौतुक केल्याने टिळकांवर टीकाही करण्यात आली, असं गुहा लिहितात.
बाळूंची कीर्ती मुंबईपुरती मर्यादित राहिली नाही. ती कलकत्त्यापर्यंत पोहोचली. नाटोरच्या महाराजांनी देशभरातील सर्वोत्तम हिंदू क्रिकेटपटूंचा एक संघ बनवला. या संघाने ऑल युरोपियन कलकत्ता क्रिकेट क्लबला आव्हान दिलं. नाटोरच्या महाराजांनी तयार केलेल्या संघाने युरोपियन संघाला हरवलं.
या संघात बाळू आणि त्यांचे छोटे बंधू शिवराम हेदेखील होते. बाळू यांच्यापेक्षा सात वर्षांनी लहान असलेले शिवराम आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध होते. मात्र बाळूवर जी आपत्ती कोसळली होती तीच त्याचे जे दोन भाऊ होते पी. विठ्ठल आणि पी. शिवराम यांच्यावर आली. पी. विठ्ठल तर विजय मर्चंट सारख्या महान फलंदाजाचा फलंदाजीतला आदर्श होता. पण त्या दोघांना सुद्धा नेतृत्व करायला मिळाल नाही. तो काळच तसा होता.
एकेकाळी भारतीय टीममध्ये 3 पालवणकर!
भारताबाहेर भारताचं प्रतिनिधित्व करू शकेल, अशी टीम तयार करण्याचे प्रयत्न एव्हाना बारा वर्षं सुरू होता. तीन वेळा संघबांधणीचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. अखेर 1911 मध्ये देशातले राजेमहाराजे, उद्योगपती यांनी ब्रिटिश प्रशासन, सनदी अधिकारी, पत्रकार, प्रशिक्षक यांच्या समन्वयातून भारतीय संघ तयार केला.
हा संघ निवडण्यासाठी मुंबईत निवड चाचणी सामने खेळवण्यात आले. सहा पारसी, तीन मुस्लीम, पाच हिंदू असा हा संघ होता. संघाचं नेतृत्व केलं पतियाळाचे 20वर्षीय महाराज भूपेंद्र सिंग यांनी. या संघात बाळू, त्यांचे छोटे बंधू शिवराम आणि विठ्ठल असे एकाच कुटुंबातले तिघे होते. यावरून त्या काळी या त्रिकुटाचा क्रिकेटविश्वातला दबदबा लक्षात यावा.

हा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला. या दौऱ्यात 23 सामने खेळवण्यात आले. त्यांपैकी 14 सामन्यांना प्रथम श्रेणी दर्जा देण्यात आला. तत्कालीन भारतीय संघाने यांपैकी 10 सामने गमावले, 2 अनिर्णित झाले तर 2 मध्ये भारतीय संघाने विजय मिळवला.
बहुतांश सामन्यांमध्ये पराभूत होऊनही बाळूंचं मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं. बाळूंनी त्या दौऱ्यात 18.14च्या सरासरीने 114 विकेट्स पटकावल्या. इंग्लंडमधल्या पत्रकारांनी, क्रिकेट समीक्षकांनी बाळूंच्या प्रदर्शनाची प्रशंसा केली. कोणत्याही काउंटी संघाला बाळूंना आपल्या संघात घ्यायला आवडेल, अशा शब्दात बाळूंचं कौतुक झालं.
बाळू पालवणकरने बाबासाहेबांविरुद्ध निवडणूक का लढवली?
द्वारकानाथ संझगिरी लिहितात, भारतीय संघाने जेव्हा इंग्लंडचा दौरा केला, तेव्हा भारतात स्वातंत्र्यासाठी विविध चळवळी सुरू होत्या. त्याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामजिक आणि राजकीय हक्कांसाठी लढा सुरू होत होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी तर तो सुरवातीच्या काळात आयडॉल होता. बाळू भारतात परतल्यानंतर, मुंबईत डिप्रेस्ड क्लासेस ऑफ बॉम्बे संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. जातीपातींची कर्मठ चौकट भेदल्याबद्दल बाळूंचा गौरव करण्यात आला.
त्या कार्यक्रमात बाळूंना जे सन्मानपत्र देण्यात आलं, ते लिहिलं होतं भीमराव आंबेडकर अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. बाळूंच्या कारकिर्दीबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर नियमितपणे बोलत असत. युवा वर्गाला 'बाळूंकडून प्रेरणा घ्या' असं सांगत. 27 जुले 1927 मध्ये बाबासाहेबांनी 'मूकनायक'मध्ये त्यांच्यावर लेखही लिहिला होता.
याचदरम्यान महात्मा गांधींनी अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवला होता. पी. बाळू हे गांधीजींच्या विचाराने भारावलेले होते. त्यामुळे पुढे त्यांच्यात आणि बाबासाहेब यांच्यात मतभेद झाले. हे मतभेद झाले ऐतिहासिक पुणे करारावरून…

'अस्पृश्यां'साठी राखीव जागा आणि स्वतंत्र मतदारसंघाच्या मुद्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते. मात्र महात्मा गांधींचा याला विरोध होता. यासाठी गांधीजी पुण्यातल्या येरवडा तुरुंगात आमरण उपोषणाला बसले. गांधीजींच्या उपोषणामुळे अखेर डॉ. आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात पुणे करार झाला. 'अस्पृश्यां'ना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी कायदेमंडळात जागा वाढवून देण्यात आल्या.
पुणे करार घडवून आणण्यात दाक्षिणात्य सामाजिक नेते एम. सी. राजा आणि बाळू पालवणकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. बाळू पालवणकर काँग्रेस बरोबर राहिले. 1937मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला आंबेडकरांविरुद्ध तुल्यबळ उमेदवार हवा होता.
काँग्रेसने बाळू पालवणकरांना मैदानात उतरण्यासाठी प्रवृत्त केलं. मात्र चुरशीच्या निवडणुकीत डॉ. आंबेडकरांनी बाळू पालवणकरांना नमवलं. डॉ. आंबेडकरांना 13245 तर बाळू यांना 11,225 मतं मिळाली.
त्या काळामध्ये अस्पृश्यता घालवण्यासाठी आणि जाती मधल्या उच्च नीचतेच्या व्यवस्थेवर हल्ला करण्याचा लोकहितवादी, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे अशी अनेक मंडळी प्रयत्न करत होती.
त्यांच्या प्रयत्नामुळे पुढे स्वतंत्र भारतामध्ये ती अस्पृश्यता कायद्याने गाडली गेली. पी. बाळूनी स्वतःच्या डोळ्यांनी हा बदलेला काळ पहिला. महिना ४ रुपयांवर नोकरी करणाऱ्या पी. बाळूनी स्वतःचा एक छान, सुंदर बंगला खारमध्ये बांधला. त्यांनी स्वतःची सुद्धा क्रिकेट बरोबर प्रगती केली. एक दलित माणूस, प्रतिकूल वातावरणात जर त्याच्यात कुवत असेल तर मोठा होऊ शकतो, याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण होतं.
(संदर्भ - जाति न पूछो खेल की…- द्वारकानाथ संझगिरी, रामचंद्र गुहा लिखित - ए कॉर्नर ऑफ ए फॉरेन फिल्ड -द इंडियन हिस्ट्री ऑफ ए ब्रिटिश स्पोर्ट आणि क्रिकेट, कास्ट अँड द पालवणकर ब्रदर्स (सबऑल्टर्न स्पोर्ट्स). बीबीसी मराठी)






