अप्सरा आगा
- अवघ्या १६ व्या वर्षी लग्नाला नकार दिला म्हणून गावातल्या एका विवाहित मुलानं माननीच्या अंगावर ॲसिड ओतलं.
- नऊ शस्त्रक्रिया होऊनही समाजानं स्वीकारलं नाही. पण राज्यात नोकरीसाठी धावपळ केली.
- 'छांव फाउंडेशन' आणि 'शेरोज हँगआउट' कॅफेच्या माध्यमातून ती आणि अशा ॲसिड हल्लाग्रस्त मुली आता स्वाभिमानानं काम करत आहेत.
माझ्या गावात घडलेली ही पहिलीच एवढी भयानक घटना होती. की, माझ्या अंगावर ॲसिड पडल्याबरोबर माझ्या शरीरातून वाफा निघत होत्या. वेदनेने माझं सगळं अंग फुगलं होतं, कातडी जळत होती. मी जिवाच्या आकांतानं ओरडत होते, किंचाळत होते...पण दुर्दैव बघा, आजूबाजूचं कुणीही माझ्या मदतीला धावून आलं नाही. साधी विचारपूस करायलाही कुणी उंबरठा ओलांडला नाही,' त्या रात्रीची भयानक घटना सांगताना माननीचे डोळे पाणावतात.
माननीचा जन्म ओडिसामध्ये अगदी एका साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. तिचं बालपण इतर पोरांसारखंच हसत-खेळत, बागडत आणि मजेत गेलं. ती अभ्यासात हुशार होती. दहावीपर्यंत तिची शाळा एकदम व्यवस्थित सुरू होती. तिच्या मनात एकच विचार असायचा की, भविष्यात खूप शिकायचं, मोठं व्हायचं, चांगली नोकरी करायची आणि आपल्या कष्टकरी आई-वडिलांना मदत करून घराला हातभार लावायचा. आई-वडिलांचे कष्ट कमी करायचे, या एकाच ध्येयाने बिचारी दिवसरात्र मन लावून अभ्यास करायची. तिची वाटचालही अगदी योग्य दिशेने सुरू होती.
(शीरोज कॅफेतर्फे महिलांना नक्षीकामच ट्रेनिंग)
लग्नाला दिला स्पष्ट नकार...
माननी सांगत होती की, तिच्याच गावातल्या एका मुलाची वाईट नजर तिच्यावर पडली. माननी त्या वेळी अवघी १६ वर्षांची होती आणि तो मुलगा २५ वर्षांचा. त्याचं लग्नही झालेलं होतं. तरीही तो माननीच्या मागे लग्न कर म्हणून हात धुवून पाठी लागला होता. तो तिचा सतत पाठलाग करायचा, तिला मानसिक त्रास द्यायचा. माननीच्या घरचे या लग्नाला अजिबात तयार नव्हते, कारण एक तर तिचं वय लहान होतं, शिक्षण सुरू होतं आणि तो मुलगा आधीच लग्न झालेला होता. माननीला लग्नात काडीचाही रस नव्हता, तिला फक्त आणि फक्त शिकायचं होतं. तिची स्वप्नं खूप मोठी होती, तिला आयुष्यात काहीतरी बनून दाखवायचं होतं. तिनं त्याला स्पष्ट नकार दिला, पण तो विकृत मुलगा काही तिची पाठ सोडायला तयार नव्हता.
अंगावर ॲसिड ओतलं, अन्..
एके दिवशी माननीचं अख्खं आयुष्यच उलटं झालं. तिचे वडील नोकरीनिमित्त लांब केरळला असायचे. माननीची नुकतीच दहावीची परीक्षा संपली होती, त्यामुळे गावातल्या घरी केवळ माननी आणि तिची आई या दोघीच राहिला होत्या. माननीच्या घराशेजारी राहणारा एक मुलगा त्या विकृत मुलाचा जीवलग मित्र होता. त्यामुळं माननीच्या घरातील प्रत्येक बारीक-सारीक हालचाल, सगळी माहिती त्या मुलाला द्यायचा. घरात पुरुष माणूस नाही आणि दोघी मायलेकी एकट्याच आहेत, हीच संधी साधून त्या मुलानं आपल्या चार मित्रांना सोबत घेतलं आणि एक क्रूर डाव रचला.
माननी सांगते, 'त्या रात्री गावात लाईट नव्हती, सगळीकडे अंधार होता. मी आणि आई घरात झोपलो होतो. याच गोष्टीचा फायदा घेऊन तो मुलगा त्याच्या मित्रांसह घरात घुसला. त्यांनी मोबाईलचा उजेड केला आणि थेट माझ्या अंगावर ॲसिड ओतलं. अवघ्या काही सेकंदांच्या या क्रूर आणि अमानुष घटनेने माझं हसतं-खेळतं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त करून टाकलं.'
मदतीला पण कोणी आलं नाही
पुढे ती सांगते, 'माझ्या अंगावर ॲसिड पडल्याबरोबर माझ्या शरीरातून वाफा निघत होत्या. मदतीला पण कोणी आलं नाही. या भीषण अपघातातून बरी व्हायला मला दोन वर्ष लागली. या काळात वेदना सहन करत माझ्यावर नऊ मोठ्या आणि कठीण शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. मी कशीबशी बरी होऊन शेवटी घरी आली.'
खरंतर, माननी घरी आल्यावर तिच्या आई-वडिलांनी तिला धीर दिला आणि म्हणाले,
'बाळा, जे झालं ते झालं, तू हार मानू नको, तुझं राहिलेले शिक्षण पूर्ण कर.' आई-वडिलांच्या सांगण्यावरून ती मोठ्या हिंमतीने पुन्हा शाळेत गेली. पण तिथलं वातावरण खूप बदललं होतं. लोकांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलला होता. वर्गात तिच्या शेजारी बसायला कोणी तयार नसायचं, तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींनी तिच्या पाठ फिरवली होती. तिला कोणी दोस्त उरला नव्हता. अशा घुसमटणाऱ्या वातावरणात ती शिक्षण घेऊच शकली नाही. 'मी घराच्या बाहेर पडले की लोक वेगळ्या नजरेनं बघत होती. चेहरा बघून प्रश्न विचारत होती. लहान मुले मला घाबरत होती. त्यामुळं मी स्वतःला घरात कोंडून घेतलं होतं,' असं सांगत सांगत माननीचे डोळे भरून आले.
(शिरोज कॅफेत काम करणाऱ्या मुली)
माननीच्या नऊ शस्त्रक्रिया आणि इलाजासाठी तिच्या वडिलांनी लोकांकडून आणि बँकेकडून खूप मोठं कर्ज काढलं होतं. आता परिस्थिती अशी झाली होती की, बँकवाले आणि पैशांच्या वसुलीसाठी रोज तिच्या घराचे उंबरठे झिजवत होते. लोकांचे टोमणे आणि आई-वडिलांची ही हतबलता पाहून माननीचं मन तुटायचं. तिच्या मनात अनेक प्रश्न घोळू लागले. 'मी अशी किती दिवस घरात बसून राहणार? माझे आई-वडील म्हातारे झाल्यावर मला किती दिवस कमवून सांभाळणार? मी जर आज उभी राहिली नाही तर आमचं कसं होणार?'
नोकरी करण्याचा निर्णय
माननी म्हणाली, 'मी जोपर्यंत स्वतःहून बाहेर पडणार नाही, तोपर्यंत माझ्यासाठी दुसरं कोणी काही करणार नाही.' मग 'हा समाज काय म्हणेल, लोक काय विचार करतील' याचा सगळा विचार तिने बाजूला सारला आणि अत्यंत धाडसाने तिने घराबाहेर पाऊल टाकलं. तिने नोकरी करण्याचा पक्का निर्णय घेतला.
सुरुवातीला तिनं दोन वर्ष एका ठिकाणी काम केलं. समाजात वावरताना काही माणसं चांगली भेटली तर काही वाईट, पण ती सगळ्यांना सोबत घेऊन काम करत राहिली. प्रत्येक ठिकाणी लोक तिला तोच प्रश्न विचारायचे, 'हे कसं काय झालं तुझ्यासोबत?' सुरुवातीला या प्रश्नाचं उत्तर द्यायला तिला नको वाटायचं, खूप त्रास व्हायचा. पण नंतर तिने विचार केला, 'यात माझी काहीच चूक नाही, गुन्हा त्या विकृताने केलाय, मग आपण आपली सत्यकथा सांगायला का लाजावं?' त्यानंतर ती लोकांना तिचं आयुष्य एका रात्रीत कसं बदललं, हे उघडपणे सांगू लागली.
विविध राज्यात नोकरीसाठी धावपळ
आपल्या करिअरबद्दल सांगताना माननी म्हणाली,
'सुरुवातीला मी जॉबसाठी बेंगलोर गेली. तिथे मी एका कंपनीत काम करत होते. काही लोक चांगली असतात काही नसतात. हे असताना मी सगळं मॅनेज करत होती. आपण नवीन ठिकाणी गेलं की वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारत असतात. माझी काय चूक नव्हती तर माझ्या आयुष्यात काय झालं ते सांगायला मी का घाबरू? माझ्यासोबत झाले ते मी सांगत होते. माझे मॅनेंजर खूप सपोर्ट करत होते. २०१८ मध्ये तिथेच मला छावा फाऊंडेशनची माहिती मिळाली. २०१९ ला कोरोना आला होता. त्यावेळी आई-वडील घरी बोलवत होते. पण मी तिथेच राहिले. २०२२ ला मी घरी आले. २०२२ ला मग नोएडामध्ये मी शिरोज कॅफेमध्ये कामाला सुरुवात केली.
त्यानंतर एका वर्षाने माझं आग्र्याला ट्रान्सफर झाले. भाषेचा प्राॅब्लेम येत असल्याने, हिंदी आणि इंग्रजीचा ऑनलाईन क्लास लावला. मी तिथे चार वर्ष काम केलं. तिथे मी खूप गोष्टी शिकले. कॅफेमधील सर्व काम केल्यानंतर उर्वरीत वेळेमध्ये इअरिन्ग बनवणे, हातातील ब्रेसलेट बनवणे, हातावर मेहंदी काढायला शिकले. कोणाला हातावर मेंहदी काढताना खूप भारी वाटतं. मेहंदी काढता काढता ते आमची स्टोरी पण ऐकतात. हे भारी वाटतं. जोपर्यंत आम्ही आमची कहाणी त्यांना सांगणार नाही, तोपर्यंत आमची कहाणी आमच्यापर्यंतच मर्यादित राहील. मी आता पुण्यात काम करत आहे.'

'छांव फाउंडेशन' आणि 'शेरोज कॅफे'चा जन्म
२०१४ मध्ये अलोक दीक्षित यांनी 'छांव फाउंडेशन' आणि 'शीरोज हँगआउट कॅफे'ची स्थापना केली. या संस्थेमार्फत एसिड अटॅक सर्व्हायव्हर्सना वैद्यकीय उपचार, कायदेशीर मदत, समुपदेशन, पुनर्वसन आणि रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्यांनी ‘स्टॉप ॲसिड अटॅक्स’ आणि ‘स्टॉप ॲसिड सेल’ मोहीम चालवली. ही संस्था विविध राज्यात पसरली आहे. 'छांव फाउंडेशन' आणि 'शीरोज हँगआउट कॅफे' या दोन्ही संस्था एकमेकांशी अगदी जवळून जोडलेल्या आहेत. 'शीरोज कॅफे' हा 'छांव फाउंडेशन' या संस्थेचा एक मुख्य प्रकल्प आहे.
हा कॅफे म्हणजे या महिलांच्या स्वावलंबनाचे आणि पुनर्वसनाचे केंद्र आहे. आग्रा आणि लखनऊ सारख्या शहरांमध्ये चालवल्या जाणाऱ्या या कॅफेचे संपूर्ण व्यवस्थापन, जसे की जेवण बनवणे, ऑर्डर्स घेणे, हिशोब ठेवणे आणि कॅफे सांभाळ, या सर्व गोष्टी अॅसिड हल्ला पीडित महिलाच करतात. हे कॅफे आग्रा, नोएडा, लखनऊ, दिल्ली आणि पुण्यात आहे.
ॲसिड हल्ला सोसलेल्या मुली चालवतात कॅफे
पुण्यात 'शीरोज हँगआउट' नावाचं एक अनोखं कॅफे सुरू केलं. ते कॅफे पूर्णपणे ॲसिड हल्ला सोसलेल्या धाडसी मुली चालवतात. या कॅफेमुळे या मुलींना केवळ रोजगारच मिळाला नाही, तर समाजात ताठ मानेने आणि स्वावलंबी होऊन जगण्याची ताकद मिळाली. या पुण्यातील कॅफेमध्ये १५ मुली आहेत.
पुण्यातील विमाननगर भागात असलेले 'शीरोज हँगआउट कॅफे' हे सकारात्मकता आणि जिद्दीचे जिवंत केंद्र आहे. या कॅफेमध्ये पाऊल ठेवताच तिथले चैतन्यदायी, रंगीबेरंगी आणि ऊर्जेने भरलेले वातावरण मनाला भुरळ घालते. येथील कॅफेत अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या 'शीरोज'च्या संघर्षाच्या आणि यशाच्या प्रेरणादायी गोष्टी समजतात. हा परिसर कॉलेज आणि आयटी पार्कच्या जवळ असल्याने, येथील मुख्य ग्राहकवर्ग हा तरुण विद्यार्थी, कॉर्पोरेट प्रोफेशनल्स आणि सामाजिक भान जपणारे नागरिक असा आहे. सुरुवातीला अनेक ग्राहक केवळ उत्सुकता म्हणून येतात, पण तिथल्या महिलांचे हसमुख आदरातिथ्य, आपुलकी आणि त्यांचा आत्मविश्वास पाहून भारावून जातात. इथे ग्राहक कॉफी, स्नॅक्सचा आनंद घ्यायला येतात.
फाउंडेशनचे डायरेक्टर आशिष सांगतात की,
या संपूर्ण चळवळीची सुरुवात ८ मार्च २०१३ रोजी एका छोट्या मोहिमेने (कॅम्पेन) झाली होती. त्या मोहिमेचं नाव होतं 'स्टॉप ॲसिड अटॅक'. तिचा मुख्य उद्देश हाच होता की, समाजात ॲसिड हल्ल्याबाबत उघडपणे चर्चा झाली पाहिजे. कारण २०१३ च्या आधी भारतीय दंड संहितेत ॲसिड हल्ल्यासाठी स्वतंत्र असा कोणताही कडक कायदा नव्हता आणि अशा किती केसेस होतात, याची कोणतीही आकडेवारी सरकारकडे नव्हती.
या मोहिमेमुळे लोकांमध्ये जागरूकता आली, पीडित लोक स्वतःहून पुढे येऊन बोलू लागले. लोकांचा रेटा वाढल्यामुळे शेवटी सरकारी पॉलिसी आणि कायद्यामध्ये मोठे बदल करावे लागले. २०१३ च्या या यशस्वी मोहिमेनंतर २०१४ मध्ये अधिकृतपणे 'छांव फाउंडेशन'ची स्थापना झाली.'
खरंतर माननी सारख्या अशा अनेक मुली या फाउंडेशनशी जोडल्या असून, त्या कॅफेत काम करत आहेत. आज माननी केवळ एक ॲसिड हल्ल्यातून वाचलेली मुलगी नाही, तर संकटाच्या छातीवर पाय देऊन ताठ मानेनं जगायला शिकवणारी एक खरीखुरी 'फायटर' आहे.






