अभिजीत तांगडे
- महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसांस्कृतिक परंपरेत प्रत्येक प्रदेशाने आपली स्वतंत्र कला जोपासली आहे. खान्देशातील वही गायन, कोकणातील नमन-खेळे आणि जाखडी, तर विदर्भातील झाडीपट्टी या लोककला आजही ग्रामीण समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत.
- मात्र बदलत्या काळात या परंपरा आर्थिक दुर्लक्ष, घटती व्यासपीठे आणि नव्या पिढीच्या उदासीनतेमुळे अस्तित्वाच्या संघर्षाला सामोऱ्या जात आहेत.
- अशा वेळी राज्य शासनाने या चार लोककला प्रकारांचा लोककलावंत अनुदान योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला असून, या निमित्ताने या परंपरांचा आणि त्यांच्याशी जोडलेल्या कलाकारांच्या वास्तवाचा घेतलेला हा वेध.
महाराष्ट्राची लोकसंस्कृती ही बहुरंगी आहे. प्रत्येक प्रदेशाने आपली स्वतंत्र बोली, देव-देवता, उत्सव, संगीत, नृत्य आणि लोकनाट्य परंपरा निर्माण केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात तमाशा, कोकणात दशावतार, विदर्भात झाडीपट्टी, तर खान्देशात वही गायन अशा अनेक परंपरा आजही जिवंत आहेत. मात्र त्यांपैकी अनेक लोककला आर्थिक दुर्लक्ष, बदलती मनोरंजन संस्कृती आणि नव्या पिढीच्या उदासीनतेमुळे अस्तित्वासाठी झगडत आहेत.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने वही गायन, नमन-खेळे, जाखडी आणि झाडीपट्टी या चार लोककला प्रकारांचा लोककलावंत अनुदान योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केवळ आर्थिक मदतीचा नसून, महाराष्ट्राच्या विविध सांस्कृतिक प्रदेशांची अधिकृत दखल घेणारा मानला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाने लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान सभेत केली.
महाराष्ट्राला लोककलेचा समृद्ध वारसा लाभला असून लोककला ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून लोकप्रबोधन, सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारशाची जपणूक करणारे प्रभावी माध्यम आहे. या लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन विविध लोककला महोत्सव आयोजित करत असून लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदानही देत आहे. सन २००८ पासून तमाशा, दशावतार, शाहिरी, खडीगंमत आणि संगीतबारी या लोककलांना शासनाकडून अनुदान दिले जात आहे. आता या योजनेत नव्याने ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ या लोककलांचाही समावेश करण्यात आला आहे.
झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील १३० वर्षांहून अधिक परंपरा असलेली वैशिष्ट्यपूर्ण लोकनाट्य परंपरा आहे.
वहीगायन ही धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील लोकप्रिय लोककला असून, नमन खेळे आणि जाखडी या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत.

या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातील २० कलापथकांना प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे प्रत्येकी १० लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. त्यानुसार:
- झाडीपट्टी – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये.
- वहीगायन – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये.
- नमन खेळे – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये.
- जाखडी – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये
खान्देशातील वही गायन, कोकणातील नमन-खेळे आणि जाखडी, तर विदर्भातील झाडीपट्टी या लोककला आजही ग्रामीण समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मात्र बदलत्या काळात या परंपरा आर्थिक दुर्लक्ष, घटती व्यासपीठे आणि नव्या पिढीच्या उदासीनतेमुळे अस्तित्वाच्या संघर्षाला सामोऱ्या जात आहेत. अशा वेळी राज्य शासनाने या चार लोककला प्रकारांचा लोककलावंत अनुदान योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला असून, या निमित्ताने या परंपरांचा आणि त्यांच्याशी जोडलेल्या कलाकारांच्या वास्तवाचा घेतलेला हा वेध…
काय आहे वहीगायन ?
खानदेशातील ग्रामीण भागात काही विशिष्ट गावांमध्ये गणेशोत्सव, नवरात्री अथवा काही ठिकाणी स्थानिक यात्रोत्सवात कधीकाळी हमखास दिसणारे आणि सध्या दुर्मीळ होत चाललेली कला म्हणजे वहीगायन. खानदेशातील लोककलेचा दुर्मीळ झालेला व नामशेष होत चाललेला प्रकार. वहीगायन हा लोककला प्रकार तर अस्सल खानदेशी मातीतला, राज्यात अन्य कुठेही न दिसणारा. तरीही या कला प्रकाराला ना प्रतिष्ठा मिळाली ना राजमान्यता..
खानदेशातील, प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यात आढळून येणारी लोककला वहीगायन. 'ओवी' या शब्दाचा अपभ्रंश होत जाऊन 'वहीं' हा शब्द या लोककला प्रकारात रुढ झाला. पौराणिक काळातील कथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुरुवातीच्या काळात मौखिक आणि नंतर लिखित स्वरूपात वर्ग झाल्या. कागद-शाईच्या शोधानंतर या कथा वह्यांमध्ये अवतरल्या. वह्यांमधील या कथा पद्य स्वरुपात, त्यांना ताल-वाद्याची जोड देत, प्रसंगी लोकांच्या मनोरंजनासाठी अभिनय करत यात्रोत्सव अथवा मोठ्या सोहळ्यांमध्ये सादर करायची ही कला म्हणजे वहीगायन. खानदेशात जवळपा तीन-चारशे वर्षांपासून या कला प्रकाराचे अस्तित्व आढळून येते.
जळगाव जिल्ह्यात काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वहीगायन सादर करणारे कलावंत आजही आहेत. महाभारत, रामायण, पांडवप्रताप, नवनाथांची महती, खानदेशातील प्रसिद्ध कान्हुबाई उत्सवाचे महत्त्व (कानबाई) अशा विविध कथा ओवी, पद्यरुपात वहीगायनातून सादर केल्या जातात. पद्यस्वरुप समजायला कठीण असल्याने पथकातील दुसरा कलावंत त्याचे निरुपण करुन सांगतो. वहीगायनादरम्यान आवश्यक त्या वेळी डफ, तुणतुण्याचा गजर. टाळ वाजविणारे झिलकरी आणि 'कोरस' देणारे सहकारीही सहकलावंत असतात.

खानदेशाचे कुलदैवत म्हणजे कानबाई. कन्हेर- कान्होळा हे पार्वती- शंकराचं खानदेशी रुप. वहीगायनात प्रारंभी त्यांना वंदन केलं जातं. नंतर गण (अर्थात, गणपती), नंतर निसर्गदेवता, कलेची देवता म्हणून सरस्वती आणि शेवटी गुरुवंदन होतं. स्थानिक बोलीभाषा, प्रसंगी हिंदीचाही यात वापर केला जातो. मात्र, प्रामुख्याने अहिराणी, तावडी, लेवा गणबोली या भाषांचा वापर अधिक. कथांचे पद्य पद्धतीने सादरीकरण करताना त्यात रंजकता आणण्यासाठी काही किस्सेही सांगितले जातात. एकेका पथक, मंडळात सहा ते बारा कलावंत असतात. गरजेनुसार एखादा कलावंत महिलेच्या वेशभुषेतही दिसतो.
महाभारत, रामायण, पांडवप्रताप यासारख्या कथा अनेक वह्यांमधून लिखित असतात. वहीगायन सादर करणारे कलावंत कुठेही वही हाती घेऊन गायन सादर करीत नाहीत. तर या कथा त्यांच्या अगदी तोंडपाठ असतात. एकेका सादरीकरणात सहा, आठ, दहा अशा सम संख्येत कथेच्या कड्या असतात. काही कथांत तर अठरा कड्यांचा समावेश असतो. यात्रोत्सवात वहीगायनाची चार- सहा मंडळं बोलावून एकामागून एक असे सर्वांचे प्रयोग सादर होतात.
अलीकडे त्यात काही बदल होऊन व्यसनमुक्ती, कौटुंबिक वादाची समस्या यासारखे विषयही हाताळले जातात. काही यात्रांच्या ठिकाणी सध्या कोरोनाचा विषय घेऊन जनजागृती होत असल्याचे आढळून आले. परंपरने शे-दीडशे मंडळं आजही हा कला प्रकार सादर करत आहेत.
दुर्दैवाने वहीगायन या खानदेशी लोककला प्रकाराला लोकमान्यता मिळालेली नाही. कुटुंबाचा वारसा म्हणून काही लोक या कलेचे जतन करत आहेत, तर काही तरुण आवड म्हणून सहभागी होत आहेत. जळगाव जिल्ह्यासह जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात जवळपास चार ते पाच हजार वहीगायन करणारे कलावंत असून या कलेच्या संवर्धनासाठी आता प्रयत्न सुरु झाले आहेत.
‘पयलं नमान…’ कोकणातील नमन-खेळे
‘पयलं नमान माजं नवखंड प्रिथ्वीला
दुसरं नमान माजं चांद वो सूर्याला
तिसरं नमान माजं पारबती वो महादेवाला
चवथं नमान माजं माय वो बापाला...’
... ज्याचं ज्यांचं म्हणून आपण देणं लागतो, त्या साऱ्यांना पहिल्याच फटक्यात असं नमन म्हणजे वंदन करून 'नमन-खेळे' या कोकणातील कलाप्रकाराला सुरुवात होते. मग गावाबाहेर काढलेल्या पालखीतल्या देवाला जागवत नमनाचा खेळ उत्तरोत्तर असा काही रंगतो की, दिवसभर पालखी नाचवून दमलेल्या खेळ्यांना आपल्या श्रमांचंही भान राहत नाही. नमन बघता बघता रात्र सरते आणि पहाटेचं कोंबडं आरवताच पुन्हा देवाला बाहेर काढण्यासाठी खेळ्यांची धांदल उडते.
नमन हा आंगणीय म्हणजे अंगणात सादर होणारा लोककलाप्रकार. एखाद्या अंगणात किंवा देवळाच्या प्रांगणात कुठल्याही नेपथ्याशिवाय सादर होणारा. नमनाचा खेळ कधी सुरू होणार म्हणता म्हणता पंधरा-वीस जणाची टोळी येऊन एका रांगेत आडवी उभी राहते. त्यांच्यातच टाळ आणि मृदुंगकरी असतात. यांचा वेशही साधासाच. म्हणजे गावातला रोजचाच. ही वीसजणांची फळी टाळ-मृदुंगाच्या संथ लयीवर एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे झुलत राहते. सुरुवातीला पृथ्वीला-देवतांना-मातापित्यांना अशा सृष्टीतील तेरा गोष्टींना वंदन केलं जातं आणि मग पायघोळ अंगरखा घातलेला नायक आणि त्याच्यासोबत डोक्यावरून पदर घेतलेला स्त्रीवेशधारी पुरुष येतो.

या स्त्रीपात्राला कधी राधा, कधी गोमू, तर कधी कोळीण म्हणूनही संबोधलं जातं. नायक आणि या गोमूच्या संवादातून-नाचातून हे नमन रंगत जातं. नमन झाल्यावर काही नमनात गणपती येतो आणि नाचून जातो. तो गेल्यावर नटवा येतो आणि म्हणतो- ‘गणपती आला नि नाचून गेला, नटवा बाई मागे राहिला.’ त्यानंतर हा नटवा काही थट्टा-विनोद करतो आणि जातो. तो गेल्यावर गवळणी (स्त्री-वेशधारी पुरुष) येतात. मग गवळणी म्हटल्या जातात. नंतर कृष्ण-सुदामा येतो, त्यांची वाट अडवतो. त्यांच्याकडून दूध-दही वसूल केल्यावरच त्यांना मथुरेच्या बाजाराला जायची परवानगी देतो.
एवढं होईस्तोवर मध्यंतर होतं. आणि मग उत्तररंगातील आख्यानाला सुरुवात होते. हे आख्यान अर्थातच रामायण-महाभारत नि पुराणातील कथांवर आधारलेलं असतं. मात्र हे सारं सादर होताना मागची कलावंतांची आडवी भिंत कायम असते. कारण ही माणसांची भिंतच आधुनिक रंगभूमीवरील विंगेची भूमिका निभावत असते. सर्व पात्रांची वेशभूषा या भिंतीच्या मागेच चालते. त्यामुळे पात्र या भिंतीतून येतात आणि काम झाल्यावर भिंतीच्या मागेच गडप होतात. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांना 'घाशीराम कोतवाल'च्या फॉर्मची प्रेरणा नमन आणि नमनातील माणसांच्या भिंतीतूनच मिळालेली आहे.
असे हे 'नमन-खेळे' म्हणजे खास रत्नागिरी जिल्ह्यातील लोककलाप्रकार. जसा सिंधुदुर्गात दशावतार, तसंच रत्नागिरीत नमन-खेळे. विशेष म्हणजे बाल्यानृत्य (मूळ जाखडी नृत्य) ज्याप्रमाणे मुख्यत: कुणबी समाजाचं लोकनृत्य, त्याप्रमाणेच 'नमन-खेळे' हादेखील कुणबी समाजाचाच लोककलाप्रकार. साधारणपणे शिमग्यापासून नमनाच्या खेळांना सुरुवात होते आणि गुढीपाडव्यापर्यंत हे खेळ सुरू राहतात. केवळ शिमगा-पाडवाच नाही, तर कुणाच्या घरचं लग्नकार्य, बारसं अशा विशिष्ट प्रसंगीही कुलदेवाचं-गावदेवाचं स्मरण म्हणून नमन घालण्याची प्रथा आहे. पण नमनाचा खरा मान शिमग्यातच. कारण देवाच्या पालखीबरोबर बाहेर पडलेल्या खेळ्यांनी तो सादर करायचा म्हणून 'नमन-खेळे.'

हा लोककलाप्रकार आता जरी 'नमन-खेळे' या नावाने ओळखला जात असला, तरी त्याचं मूळ नाव 'नमन'च आहे. देवाची पालखी निघाली की पालखीबरोबर जाणाऱ्यांना 'खेळी', तर पालखी निघाल्यापासून परत देवळात देव मुक्कामाला येईपर्यंत तिच्यासोबत असणाऱ्यांना 'मूळ खेळी' म्हणण्याची पद्धत कोकणात आजही आहे. नुस्ते खेळी असतील, तर त्यांना अर्ध्या प्रवासातून मागे फिरण्याची मुभा असते. पण 'मूळ खेळीं'ना पालखीची साथ अर्ध्यावर सोडता येत नाही. पालखीबरोबर असणारे हे खेळीच पूर्वी पालखीच्या वस्तीच्या ठिकाणी नमन खेळायचे, म्हणजे सादर करायचे. आणि म्हणूनच गावात त्यांचं आगमन झालं की 'नमन-खेळे' आले, असं म्हटलं जायचं आणि त्यातूनच या लोककलाप्रकाराला 'नमन-खेळे' हेच नाव पडून गेलं.
गणा धाव रे…कोकणातील पारंपरिक जाखडी नृत्य
कोकणातील एक लोकप्रिय कलाप्रकार म्हणजे जाखडी नृत्य होय. हा कलाप्रकार सर्वांचे निखळ मनोरंजन करतो.सोबतच परमेश्वर चिंतनही घडवतो. जाखडी नृत्य हे ‘नागेशवळी’ यांच्या पंथातून जन्मास आली. ‘जाखडी’ मधील खडी म्हणजे उभे राहणे. जाखडीचा नाच हा उभ्याने केला जातो, म्हणून त्यास ‘जाखडी’ असे म्हटले जाते. जाखडीचा आणखी एक अर्थ होतो – ‘जखडणे’. ‘जाखडी’ मध्ये नृत्य करणार्यांची शृंखला तयार केली जाते. जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्हटले जाते.
जाखडी नृत्यास ‘बाल्या नाच’ असेही म्हटले जाते. मुंबईत ग्रामीण भागातील शेतकरी घरगड्याचे काम करत असत. त्यांच्या कानात बाली हे आभूषण असे. त्या आभूषणावरुन ते करीत असलेल्या नृत्याला, ‘बाल्या नाच’ असे नाव पडले. बाल्या अथवा जाखडी नृत्यास रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी ‘चेऊली नृत्य’ असेही म्हणतात.जाखडीला ‘बाल्या’, ‘जाखडणे’ किंवा ‘तंभुली नृत्य’ असेही म्हंटले जाते. यामध्ये शाहिरांमध्ये ज्याप्रकारे सवाल जवाब होत असतात त्याचप्रकारे जाखडीत सुध्दा दोन्ही बुवांचे सवाल जवाब होतात. या सवाल जवाब करणार्या दोन्ही शाहीरांना शक्ति-तुरा या नावांनी ओळखले जाते. शक्ती-तूरा म्हणजे शंकर-पार्वती व राधा- कृष्ण यांचा संवाद असतो. बुवा म्हणजे शाहीर. त्यात कलगीवाले व तुरेवाले असे दोन पंथ असतात.. बाल्या नाचाला कलगीतुरा किंवा शक्ती-तुर्याचा सामना असेही म्हणतात.
सहाव्या शतकानंतर होऊन गेलेले कवी नागेश यांनी ‘कलगी’ या पंथाची सुरुवात केली. त्यांच्या नावावरुन त्या पंथाला ‘नागेशवळी’ म्हणजेच नागेशाची ओळ किंवा पंथ असेही ओळखले जाऊ लागले. नागेश यांनी कलगी पंथाची स्थापना केल्यानंतर त्यांचा प्रतिस्पर्धी असलेला समकालीन कवी हरदास यांनी ‘तुरेवाले’ या पंथाची सुरुवात केली. त्याला हरदासवळी म्हणजेच हरदासाची ओळ किंवा पंथ असेही म्हटले जाऊ लागले. दोन पंथांपैकी एकाने शक्तीचा (पार्वतीचा) मोठेपणा आपल्या कवितेतून किंवा शाहिरीतून मांडला आणि दुसर्याने हराचा (शिवाचा) मोठेपणा सांगितला.

पुढे, पंथांना ओळखण्याची खूण म्हणून कलगीवाल्यांनी कलगी या चिन्हाचा वापर केला आणि तुरेवाल्यांनी आपल्या डफावर पंचरंगाचा तुरा लावण्याचा प्रघात पाडला. या दोन गटात काव्यात्मक जुगलबंदी रंगते. त्या प्रकारच्या डफ-शाहिरीतून तमाशा हा लोककला प्रकार निर्माण झाला. त्याची कोकणातील आवृत्ती म्हणजे ‘बाल्या नृत्य’. बुवा जाखडी नृत्याच्या माध्यामातून प्रबोधन व निव्वळ प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.
गणेशोत्सवाच्या काळात जाखडी नृत्य व परंपरेला मोलाचे स्थान आहे. गणेशोत्सवात जाखडी पथके वाड्यावाड्यांतून बाल्या नृत्य सादर करताना दिसतात. ही जाखडी पथके नृत्य सादर करताना, नैसर्गिक आपत्ती, तसेच समाजातील विविध समस्यांवर गीते रचतात. नृत्याच्या वेळी गीते गायली जातात. राधाकृष्णावर विशेष करून गाणी रचली जातात. वासुदेवाची गाणी, अथवा भारूडासारख्या लोकप्रकारांतून केली जाणारी जनजागृती जाखडी नृत्यातील गीतांतही दिसून येते. जाखडी नृत्यातील गीतांमध्ये ‘गणा धाव रे…’हे गीत विशेष प्रसिद्ध आहे.पूर्वीच्या काळात या खेळामध्ये प्रामुख्याने नाचासाठी ढोलकी, मृदुंग, घुंगरू, झांज, टाळ, बासरी, सनई , खुळखुळा, बासरी, टाळ, तबला, टिमकी, सुंदरी चकवी, बुलबुला संगीत वाजविण्यासाठी अशा प्रकारची पारंपारिक वाद्ये पूर्वीच्या काळी वापरली जात असे.
बदलत्या काळानुसार आणखी काही नवीन इलेक्ट्रोनिक साहित्याचा वापर यामध्ये होवू लागला. ती म्हणजे कॅशिओ, ऑरगन ,पॅड, आणि प्रभावी ध्वनीसाठी विविध प्रकारचे माईक्स. जो केंद्रस्थानी गीत गाणारा (बुवा) असतो. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे माईक्स दिले जातात. त्याचबरोबर स्वर मिक्सरचा वापर केला जातो. आवाज सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी आवाज उपकरणांचा उपयोग केला जातो. बाला नृत्यप्रकारात एक-दोन गायक, एक ढोलकी किंवा मृदुंग वादक, एक शैलीवादक, एक-दोन झांजरीवादक व गायकांना साथ देणारे एक-दोन सुरते (कोरस देणारे) असतात. ते सर्वजण मधोमध बसतात आणि आठ ते दहा जण त्यांच्या सभोवती गोलाकार भरजरी कपडे व पायात चाळ बांधून पायांच्या विशिष्ट हालचालींवर नृत्य करतात.
पूर्वीच्या काळी जाखडीत नाचण्यासाठी वीस ते पंचवीस लोकांचा समावेश असायचा त्यांचा पोशाख हाफ चड्डी किंवा शर्ट एवढाच असायचा आणि मध्यस्थानी एक साधा विजेचा दिवा असयाचा परंतु कालानुरूप यामध्ये बदल होत गेले बदलत्या काळानुसार बाल्यांचे कपडे, म्हटली जाणारी गाणी यात बदल होत गेले. पूर्वी कासोटा बांधून नाच केला जात असे. त्यानंतर नाचणारे धोतर घालू लागले. त्यासोबत डोक्यावर पेशवेशाही पगडी आणि कमरेला रंगीत शेला ही जाखडी नृत्याची वेशभूषा असे. हल्ली रंगेबेरंगी कपडे वापरले जातात आणि सध्य स्थितीत जाखडीच्या पोशाखात बदल झाला आहे. तो खूप आकर्षक असा वापरला जातो. पायात घुंगुर, डोक्यात पगडा, हाताच्या मधल्या बोटाला मापक असा झगमगीत रुमाल बांधला जातो. चेहरा विशिष्ट प्रकारे सजवला जातो किंवा मुले किंवा मुली देव देवतांची किंवा राजा महाराजांची वेशभूषा करतात

पूर्वीच्या काळात जास्तीत जास्त पुरुषच (२५ वर्षा पुढील ) गायन करत असे. सध्या मात्र यामध्ये बदल करून वयाची अट न ठेवता लहान मुले व महिलांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. गोफ नृत्यप्रकारात हातात गोफ घेतलेले बाल्या नृत्यासोबत गोफ विणत जातात आणि तेवढ्याच लकबीने तो सोडवतातही. गोफ नृत्यासाठी नर्तकांची संख्या समप्रमाणात असावी लागते. चार, सहा, आठ अशा संख्येने त्यांच्या जोड्या असतात. गोफ रंगेबेरंगी साड्या, ओढण्या अथवा कपड्यांपासून तयार केला जातो. नृत्य सादर करण्याच्या जागी, नर्तकांच्या शिरोभागी आढ्याच्या केंद्रस्थानी गोफ बांधून त्याची अनेक (नृत्य करणा-या व्यक्तींच्या संख्येएवढी) टोके अधांतरी सोडलेली असतात.
प्रत्येक बाल्या एकेक टोक हाती घेतो. त्यानंतर गाण्याच्या तालावर आणि ढोलकीच्या ठेक्यावर नृत्य सुरू होते. काही वेळातच, बाल्या नृत्याची वर्तुळाकार गती सोडून परस्परांना सामोरे जाऊ लागतात आणि गोफाची गुंफण सुरू होते. त्यावेळी त्यांची नृत्याची पद्धत नागमोडी (झिगझॅग) वळणाची असते. अर्ध्या जोड्या डाव्या तर उर्वरित जोड्या उजव्या बाजूने प्रवास करत गोफ गुंफत असतात. गाण्याची रंगत जसजशी वाढत जाते तसतसा गोफ घट्ट विणला जात असतो. त्या वेळी ढोलकीच्या ठेक्यावरील पदन्यास, परस्परांसोबत असलेली सुसुत्रता यांचे फार महत्त्व असते. चुकलेल्या एका पदन्यासामुळेही गोफाची गुंफण बिघडू शकते. एका टप्प्यावर, गुंफण पूर्ण होते आणि बाल्या उत्साहाने नाचू लागतात. अनेकदा, गाण्याची चाल अथवा गाणे बदलले जाते. एखादे कडवे झाल्यानंतर गोफ सोडवण्याचा भाग सुरू होतो. त्या वेळी बाल्या विरूद्ध दिशेने परस्परांना सामोरे जाऊ लागतात आणि विणलेला गोफ तितक्याच लकबीने सोडवला जातो.
जंगलातील तिसरी घंटा…झाडीपट्टी रंगभूमी
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चारही जिल्ह्यांचा संपूर्ण भाग घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या भागाला झाडीपट्टी असं संबोधण्यात येतं. या झाडीपट्टी भागातील रहिवाशांचं नाटकांवर अतोनात प्रेम. तेथील मूळ व्यवसाय हा शेतीचा. तेव्हा शेतीचा हंगाम संपला की तिथे नाटकांचा मौसम सुरू होतो. या काळात येथील आबालवृद्धांच्या नाट्यप्रेमाला उधाण येतं. झाडीपट्टी भागातील ही नाट्यचळवळ ‘झाडीपट्टी रंगभूमी’ या नावाने प्रसिद्ध आहे. या रंगभूमीला १२५ ते १५० वर्षांची परंपरा आहे हे विशेष.
भारतीय संस्कृतित जेवढं महत्त्व सणांना आहे तेवढंच महत्त्व झाडीपट्टीत नाटकांना आहे. पूर्वीपासूनच शेतीचा हंगाम संपला की दिवसा बैलांच्या शर्यती (ज्याला स्थानिक लोक शंकरपाट म्हणतात) आणि रात्री नाटक असा कार्यक्रम पुढील पाच महिने म्हणजेच ऑक्टोबर ते मार्चपर्यंत चालतो. या काळात दिवसभराची कामं आटपली की संध्याकाळी गावकरी पारांवर मोकळ्या मैदानात जमून यंदा कुठलं नाटक करायचं, कोणी कुठली भूमिका करायची, बॅकस्टेजचं काम कुणी सांभाळायचं हे आखतात. नाटकाशी संबंधित कुठलंही काम या लोकांसाठी गौण नसतं, हे विशेष. प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग हा रात्रभर चालतो आणि नाटक कुठलंही असलं तरी त्यात गाणी आणि लावण्या असायलाच पाहिजेत हा इथला अलिखित नियम.

गावाबाहेरील मोकळी जागा पाहून तिथे प्रेक्षकांना बसण्यासाठी एक मोठा आयताकृती खड्डा खणून त्यातून निघालेली माती खड्ड्यासमोर रचून २० ते ३० फूट उंच असा रंगमंच केला जातो. प्रयोगाच्यावेळी त्या जागेवर लाकडी फळ्यांच्या साहाय्याने तात्पुरता रंगमंच उभारला जातो. अशा ओपन थिएटरमध्ये रंगणार्या नाट्यप्रयोगाचा आस्वाद एकावेळी तीन ते चार हजार प्रेक्षक घेऊ शकतात.
अशा या आगळ्यावेगळ्या रंगभूमीला नाट्यशास्त्राचे कुठलेच नियम लागू नाहीत. आजूबाजूच्या गावातील नटमंडळी एकत्र येऊन नाट्यप्रयोग करत असल्याने सलग तालमींना वेळ नसतो. त्यामुळे संवाद पाठ करण्याऐवजी प्रॉम्पटरकडून संवाद ऐकून अभिनय सादर करण्यावर कलाकारांचा भर असतो. त्यामुळे कलाकारांएवढाच प्रॉम्पटरचा रोलही महत्त्वाचा. प्रयोगाच्यावेळी हार्मोनियम वा ऑर्गन वाजवून प्रॉम्पटरचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाते. साऊंड सिस्टीमची रचनाही आगळीवेगळी असते. प्रयोगाच्यावेळी रंगमंचाच्या मधोमध एक पॉवरफूल माईक लावला जातो आणि पात्र प्रत्येकवेळी त्याच्यासमोर येऊन संवाद म्हणतात.
या रंगभूमीचं आणखी एक महत्त्वाचं अंग म्हणजे पाच महिन्याच्या काळात नाट्यप्रयोगांसाठी होणारी आर्थिक उलाढाल. आर्थिक निकषांवर पाहिल्यास झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकं मुंबई पुण्याच्या व्यावसायिक नाटकांच्या तोडीसतोड आहेत. या रंगभूमीवरील नाटकांच्या एका सर्वेक्षणाच्या निकालानुसार झाडीपट्टी रंगभूमी हा सांस्कृतिक व्यवसाय असून या व्यवसायात १० हजार कलावंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कार्यरत आहेत आणि या व्यवसायात पाच महिन्यांच्या कालावधित साधारणतः २५ करोड रुपयांची उलाढाल होते. यावरून झाडीपट्टी रंगभूमी आर्थिकदृष्ट्या किती समृद्ध आहे याची कल्पना येते. या रंगभूमीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
झाडीपट्टीच्या या चार ते पाच महिन्यांच्या सिझनवर कलावंत, मंडपवाले, बॅकस्टेज कलाकार, तबलजी, पेटीवाले, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार, जाहिरातदार ते थिएटरबाहेरील चहाची टपरी, दुकानदार असे अनेकजण आपला गुजारा करतात. झाडीपट्टी रंगभूमीच्या नाटकांच्या प्रयोगाला ५० हजार ते दीड लाख रुपयांची विक्रमी तिकीट विक्री होते.

गेल्या १२५ ते १५० वर्षांच्या कालावधित झाडीपट्टी रंगभूमीत अमूलाग्र बदल झालाय. पूर्वीच्या संगीत नाटकांची जागा गद्य नाटकांनी घेतलीय. या रंगभूमीच्या प्रचंड आर्थिक उलाढालीमुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील व्यावसायिक, कलाकारांनीही इथे प्रवेश केलाय. किंबहुना आपल्या कंपनीची पत वाढावी म्हणून शहरातील व्यावसायिक कलाकारांना वाट्टेल तेवढे पैसे मोजून आपल्या कंपनीत ओढण्याची चढाओढ इथे लागलली असते. त्यामुळे व्यावसायिक नाट्य कलाकारही पाच महिने इथे तळ ठोकून रहातात. पण यामुळे स्थानिक कला आणि कलाकारांची उपेक्षा होऊ लागलीय. असं असलं तरीही नॉनस्टॉप १०० ते १५० प्रयोग करणारे कलाकार, प्रॉम्पटरच्या मदतीने हजारो प्रेक्षकांसमोर बेमालूम अभिनय करणारी नटमंडळी आणि गावागावातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांच्या कलेला उत्स्फूर्त दाद देणारे नाट्यवेडे प्रेक्षक हीच झाडीपट्टी रंगभूमीची खरी ओळख आहे!
अनुदान पुरेसं ठरेल का?
या चारही लोककला प्रकारांचा अनुदान योजनेत समावेश हा स्वागतार्ह निर्णय असला, तरी लोककला अभ्यासकांच्या मते ही केवळ सुरुवात आहे. लोककला टिकण्यासाठी आर्थिक मदतीबरोबरच दस्तऐवजीकरण, प्रशिक्षण, शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये समावेश, जिल्हास्तरीय महोत्सव, डिजिटल संग्रहालये आणि कलाकारांना वर्षभर रोजगाराच्या संधी यांचीही गरज आहे. कारण लोककला ही केवळ मनोरंजन नसते; ती त्या प्रदेशाचा इतिहास, भाषा, स्मृती आणि सांस्कृतिक ओळख जपणारी जिवंत परंपरा असते. शासनाचा हा निर्णय त्या परंपरांना नवं बळ देऊ शकतो. मात्र त्या खऱ्या अर्थाने जिवंत राहतील की नाही, हे पुढील सांस्कृतिक धोरणांवर आणि समाजाच्या सहभागावर अवलंबून असेल.






