टीम बाईमाणूस
- मोशी कचरा डेपोत झालेल्या भीषण दुर्घटनेला आता दोन दिवस उलटून गेले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अद्यापही युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे.
- राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आतापर्यंत ९ कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.
- कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. मात्र, या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अजूनही ८ कर्मचारी कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती आहे.
मोशी कचरा डेपोत झालेल्या भीषण दुर्घटनेला आता दोन दिवस उलटून गेले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अद्यापही युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आतापर्यंत ९ कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.
मात्र, या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अजूनही ८ कर्मचारी कचऱ्याच्या महाकाय ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती आहे. दोन दिवस उलटूनही या ८ जणांचा कोणताही सुगावा न लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून, बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे.
४८ तासांनंतरही बचावकार्य सुरूचं
मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा भलामोठा डोंगर कोसळून झालेल्या या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. काल दुपारपासून सुरू असलेले रेस्क्यू ऑपरेशन आज दुसऱ्या दिवशीही अखंडपणे सुरू आहे. कचऱ्याचा ढिगारा प्रचंड मोठा आणि खोल असल्याने शोधकार्यात बचाव पथकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि श्वानपथकाच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. जोपर्यंत शेवटचा व्यक्ती बाहेर निघत नाही, तोपर्यंत हे शोधकार्य थांबणार नाही, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
९ जणांची सुटका, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
आतापर्यंत ढिगाऱ्याखालून ९ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एका कर्मचाऱ्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे मोशी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
इमारत कोसळताच अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्री बाला हे स्वतःहून बाहेर पडले. त्यानंतर एनडीआरएफ, भारतीय सेना, मनपा आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन दल आणि पोलिसांनी बचावकार्य सुरू करून बुधवारी रात्री सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण आणि रणवीर सिंह, तसेच विजय सपकाळ, भूषण पाटील आणि महेश राऊत यांना सुखरूप बाहेर काढले.
८ कामगार अद्याप ढिगाऱ्याखाली
महेश कुंभार, सनी माने, राहुल गायकवाड, सुनील कोरके, अक्षय सावंत, रणजीत पाटील, नागेश गायकवाड आणि वामन कसबे हे ८ कामगार अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. कचरा डेपोच्या आवारात बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून, आपल्या माणसांच्या सुरक्षेसाठी त्यांचा आक्रोश सुरू आहे.
मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असणारा ३२ वर्षीय महेश कुंभार एमबीएचं शिक्षण पूर्ण करून वर्षभरापासून या वेस्ट एनर्जी प्रकल्पात एचआर म्हणून काम करत होता. दुर्घटनेची माहिती मध्यरात्री दीड वाजता मिळाल्यानंतर त्याचा भाऊ संतोष कुंभार तातडीने घटनास्थळी पोहोचला. काहीतरी चमत्कार घडेल आणि आपला भाऊ जिवंत सापडेल, या आशेवर तो थांबला आहे.
अशीच अवस्था मूळच्या पंढरपूरच्या सुनील कोरके यांच्या कुटुंबाची आहे. नऊ वर्षांनंतर जन्मलेल्या एक महिन्याच्या बाळाला भेटून तीन दिवसांपूर्वीच सुनील कामावर परतला होता. त्याचे जुळे बंधू अनिल कोरके हे सुनील परत येईल या आशेवर घटनास्थळी थांबून आहेत.
'डोळ्यासमोर काळोख आणि मृत्यूची चाहूल'
या दुर्घटनेतून बचावलेले आणि 'एचआर' विभागात कार्यरत असलेले सचिन दबडगाव यांनी हा अंगावर काटा आणणारा थरार कथन केला. ते म्हणाले, "दुपारी दीड वाजता आम्ही १० ते १२ जण उपहारगृहात जेवण करत होतो. अचानक खिडकीच्या काचेतून कचऱ्याचा डोंगर इमारतीच्या दिशेने कोसळताना दिसला. काहीतरी भयंकर घडतंय हे लक्षात येताच आम्ही जिन्याच्या दिशेने सैरावैरा पळत सुटलो. तेवढ्यात मोठा आवाज झाला आणि आमच्या अंगावर स्लॅब कोसळला. आम्ही सहा जण तुटलेल्या बीमखाली अडकलो होतो. आजूबाजूला फक्त काळोख, कचऱ्याचा ढिगारा आणि राडारोडा होता. श्वास कोंडत होता आणि आता आपण जगू शकणार नाही असे वाटू लागले.
सोबत असलेल्या रणवीरला मधुमेहाचा त्रास होता आणि त्याच्या पायातून रक्त वाहत असल्याने तो मध्येच शुद्ध हरपत होता. पाच तास आम्ही एकमेकांना धीर देत मृत्यूशी झुंज देत होतो. अखेर सायंकाळी साडेसहाला स्लॅब फोडण्याचा आवाज आला, माईकवरून संपर्क झाला आणि जगण्याची आशा निर्माण झाली."
लगेच कुणाला दोषी धरता येणार नाही: मनपा आयुक्त
या दुर्घटनेबाबत पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले की, ज्याप्रकारे नैसर्गिक आपत्तीमध्ये दरड पडते, त्याच पद्धतीने कचऱ्याचा डोंगर इमारतीवर पडल्याने ही दुर्घटना घडली आहे, त्यामुळे यात लगेच कुणाला दोषी धरता येणार नाही. इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून ३० मीटर अंतरावर असल्याने संरक्षक भिंतीची गरज वाटली नाही आणि इमारतीचे बांधकाम निकष पाळूनच झाले होते.

१९८२ पासून येथे रोज १३०० ते १४०० मेट्रिक टन कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. अनेक वर्षांपासून साचलेल्या या कचऱ्याचा डोंगर पडेल अशी शक्यता वाटली नव्हती, मात्र सलग तीन दिवसांच्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा त्यांनी केला.
दोषींवर कारवाईची मागणी
या दुर्घटनेनंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी येथील इमारतीचे बांधकाम नियमानुसार झाले आहे का, याची चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच प्राण गमावलेल्या कामगाराच्या कुटुंबातील एका सदस्याला मनपात नोकरी देण्याची मागणीही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तीन वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाला केंद्र सरकारने १३५० कोटी रुपयांचे अनुदान दिले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
नगरसेविका सुलभा उबाळे यांनी या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत, कचऱ्याच्या डोंगराची उंची २० मीटर ठेवण्याची मुभा असताना येथे ३० मीटरपेक्षा अधिक उंचीचा डोंगर कसा उभारला गेला, असा सवाल उपस्थित केला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व बचावकार्याचा आढावा घेतला. मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून इमारतीचा अस्थिर भाग सुरक्षित करण्यासाठी यंत्रणांकडून वेगाने उपाययोजना केल्या जात आहेत.

