- वामन केंद्रे
नाटक म्हणजे नक्की काय ? रंगावकाशाचा वापर वेगळ्या पद्धतीने करता येईल का? परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालता येईल का? ... साधारण सत्तरच्या दशकात असे काही प्रश्न रंगकर्मीना पडले. त्यातूनच 'थिएटर ऑफ रूट्स' या चळवळीचा उदय झाला. भारतीय संस्कृती, नाट्यपरंपरेच्या प्रकाशात समकालीन नाटकाचा नव्याने शोध घेण्याचा प्रयत्न या चळवळीने केला. रतन थिय्याम हे या चळवळीचे महत्त्वाचे सदस्य आणि दिशा देणाऱ्यांपैकी एक. बुधवारी त्यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले.
प्रवाहाबाहेरची समृद्ध नाट्यचळवळ
थिय्याम यांनी रंगभूमीच्या माणसाच्या माध्यमातून जाणिवांचा वेध घेतला आणि आपल्या राज्यात - मणिपूरमध्ये राहून त्यांनी जगाचे लक्ष तेथे चाललेल्या प्रयोगांकडे वेधून घेतले. थिय्याम यांचा जन्म 1948 मध्ये इंफाळ येथे झाला. सन 1971 मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी मिळवली. ते या संस्थेचे नंतर काही काळ संचालकही होते. थिय्याम यांनी भारतीय लोककला, पुराणकथा, तत्त्वज्ञान, नाट्यशास्त्र यांच्या आधारे समकालीन नाटकाचा नव्याने शोध घेतला.
त्यांनी नृत्य, संगीत आणि कायिक अभिनयाच्या साह्याने जागतिक पटलावर प्रभावी ठरेल, अशी भारतीय रंगभाषा विकसित केली. भाषेच्या पलीकडे जाऊन किंवा भाषेचा अडथळा न वाटता नाटकाद्वारे आपले म्हणणे मांडता आले पाहिजे, हा त्यांचा विचार होता. संवादाऐवजी दृश्यात्मकता, शारीर हालचाली आणि संगीत यांच्याद्वारे अर्थ उलगडण्यावर त्यांचा भर होता. त्यांच्या नाटकांत तात्त्विक संकल्पना आणि आध्यात्मिक प्रतीकांचा प्रभावी वापर दिसतो.
नाटकांतून त्यांनी केवळ राजकीय वा सामाजिक प्रश्नच मांडले नाहीत, तर माणसाच्या अस्तित्वाचा गाभा शोधण्याचाही प्रयत्न केला. 'चक्रव्यूह', 'उत्तरा', 'अंधार युग' ही त्याची काही उदाहरणे. त्यांच्या या कार्याची दखल देशविदेशांत घेतली गेली. पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कालिदास सन्मान, फ्रान्सचा 'शेवालिए' अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
रंगकर्मींची पिढी घडवण्यासाठी थेट मणिपूरमधील जन्मगावाची वाट धरली...
रंगभूमी आणि रतन थिय्याम या दोन भिन्न गोष्टी नाहीत, असे आजही अनेक रंगकर्मी मानतात. रंगभूमी हाच ध्यास आणि रंगभूमी हाच श्वास मानलेले, रतन थिय्याम ७० वर्षांच्या आपल्या झंझावाती आयुष्यात रंगभूमीशी कमालीचे प्रामाणिक राहिले. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये माझी खोली म्हणजे रतन थिय्याम यांच्यासोबतच्या गप्पांचा अड्डा असे. रात्रभर रंगणा-या या गप्पांमध्ये रंगभूमीशी निगडित अनेक गोष्टी यायच्या.
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून शिक्षण पूर्ण झाल्यावर हा गडी थेट मणिपूरमधील आपल्या जन्मगावी गेला. तेथे ‘कोरस रेपट्री थिएटर’च्या माध्यमातून 20 ते 25 रंगकर्मी त्यांनी तयार केले. त्यातील प्रत्येकाला गायन, वादन, अभिनय या सगळ्या कला येत होत्या. त्यामुळे कोणाविना अडवणूक होण्याचा प्रसंग त्यांच्या नाटकात उद्भवणार नाही, ही त्यांची दूरदृष्टी! मायभूमीत त्यांनी वेगळ्या पद्धतीची रंगभाषा विकसित केली.
रतन थिय्याम
मणिपूरला जाऊन त्यांनी आपल्या स्थानिक कला सादरीकरणाच्या परंपरेला महत्त्व दिले. तटस्थपणाने आपल्या परंपरेकडे बघून, त्यातील सर्वोत्तम तेच वेचले. त्यांनी आपल्या नाटकांत संगीत, नृत्यशैली अशा सर्व पारंपरिक कलांचा; अगदी मार्शल आर्टचासुद्धा वापर केला. ख-या अर्थाने त्यांनी भारतीय रंगमंचाचे रूपच बदलले. भारतातील उत्कृष्ट दिग्दर्शकांमध्ये हबीब तन्वीर, कावालम नारायण यांच्या जोडीला रतन थिय्याम यांचे नाव जोडले गेले ते याचमुळे!
प्रत्येक नाटक ‘स्टाइलाइज’ पद्धतीने सादर करण्याचा त्यांचा अट्टहास राहिला. मुळात पाहणाऱ्याला भारावून टाकण्याची त्यांची विशिष्ट नाट्यशैली आहे. म्हणूनच रंगभूमीची सांगड आधुनिक रंगभूमीशी घालून नवा कलाप्रकार म्हणावा असे दृश्यनाट्य जन्माला घालणारे मणिपूरचे रतन थिय्याम जगभरच्या नाटककारांपैकी एक गणले जातात. ‘चक्रव्यूह’ या नाटकाने त्यांना नाटककार म्हणून जागतिक पातळीवर स्थान मिळवून दिले.
इतिहासाच्या पुनर्मूल्यांकनाची आगळी नाट्यशैलीेसुद्धा आकारास आणली
अभिनय, प्रकाशयोजना, कपडेपट, सेट अशा सगळ्या गोष्टींत त्यांनी प्रारंभापासून समरसून भाग घेतला आणि आपले नाटक उत्तम व्हावे, यासाठी शक्य तिथे सगळीकडे लक्ष घातले. त्यांची प्रत्येक बाबतीतली लुडबुड प्रत्येक रंगकर्मीने समजून घेतली, याचे कारण प्रतिभावंत रतन थिय्याम यांच्या कलाविषयक निष्ठेवर प्रत्येकाचा विश्वास. केवळ लाइट्स करण्यासाठी एक संपूर्ण दिवस ते नाट्यगृह ताब्यात ठेवत.
त्या दिवसभरात ते केवळ लाइट्सवर प्रचंड मेहनत घेत. याचा फायदा नाटक प्रत्यक्ष पाहणा-या प्रेक्षकांना होत होता. एकूणच मंगोलियन परंपरेशी सुसंगत अशी समज त्यांना होती. थिय्याम यांचे नाटक पाहताना हे भारतातले की भारताबाहेरचे, असा संभ्रम पडतो. परंतु यातूनच भारताशी मंगोलियन संस्कृतीचा दुवा जोडण्याचे काम थिय्याम यांनी केले, हे स्पष्ट होते. एखाद्या संस्कृतीच्या पलीकडचे अस्पर्श विश्व त्यांनी आपल्या नाटकांतून दाखवले.
नाटकातील आशयाबाबत ते अधिक जागरूक राहिले आहेत, त्यामुळे दुसऱ्यांनी रचलेली नाटके त्यांनी फारशी घेतलेली नाहीत. आपल्या वेगळ्या संवेदना मांडण्यासाठी तसेच सगळ्यांशी जुळवून घेण्यासाठी नाटकात सातत्याने बदल करत दीड-दोन वर्षे तालमी घेऊन मैदानात उतरणारा, हा एकमेव दिग्दर्शक आहे. त्यांच्यावर भारतातील काव्यांचा आणि महाकाव्यांचा प्रभाव बऱ्या पैकी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
पौराणिक संदर्भ असलेल्या अनेक कथांना त्यांनी आपल्या नाटकात स्थान दिले आहे. एखादी कथा मांडताना तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करण्याची त्यांची पद्धत विलक्षण लोकप्रिय आहे. ‘उत्तरप्रदर्शीय’ या सम्राट अशोकाच्या संघर्षावर बेतलेल्या नाटकातून सम्राट अशोकाचा वेगळा पैलू लोकांसमोर आणण्यासाठी थिय्याम यांनी मेहनत घेतली. थिय्याम हे केवळ एकाच नाटकात रमले नाहीत, त्यांनी सातत्याने आपल्या नाटकांमध्ये वैविध्य आणले. ‘इंफाळ-इंफाळ’ या नाटकातून मणिपूरच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीवर थिय्याम यांनी बेधडक भाष्य केले आहे.
थिय्याम यांच्याकडून मराठी रंगभूमी काही शिकणार की नाही?
थिय्याम यांचा विचार करताना मराठी रंगभूमीचा विषयही टाळता येत नाही. अशा वेळी आपले नाटक शरीरभाषा आणि भावभाषा कमी ठेवून शब्दप्रधानतेवर भर देण्यात पटाईत असल्याने आपण अजूनही जागतिक स्पर्धेत मागे आहोत, याची जाणीव आपण ठेवलेली बरी. आपल्याकडे स्टाइलाइज याचा अर्थ दशावतार. परंतु भरजरी कपडे, भडक मेकअप आणि उच्चरवात बोलली जाणारी वाक्ये यांच्याऐवजी आपल्याकडे ‘स्टाइलाइज’ पद्धतीने सबंध नाटक मांडण्याचा विचार फारसा झालेला दिसत नाही.
‘जांभूळ आख्यान’सारखी काही उदाहरणे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर स्तुत्य ठरलेली आहेत. आपल्याला प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीवर भरवसा ठेवणे अधिक गरजेचे आहे. मराठी नाटकाच्या आजच्या फॅशनप्रमाणे कंसातलीही वाक्ये स्टेजवर सादर केली जातात, याला काय म्हणावे? अशा वेळी मराठी नाटकांनी आपण कुठल्या दिशेने गतिमान व्हायला पाहिजे, याचा विचार करणे गरजेचे आहे. थिय्यामसारख्या मोठमोठ्या नाटककारांनी आपापल्या मातीतल्या परंपरेला उंचावर नेले; मात्र आपण नेमके उलट्या दिशेने विचार करत आहोत, याबाबतही चिंतन होणे गरजेचे आहे.
शब्दांपलीकडचा अनुभव देणारे दिग्दर्शक असणारे रतन थिय्याम यांना श्रद्धांजली.






