'आदिवासींना आपल्या जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणाच्या संघर्षात फक्त एवढेच हवे आहे की मोठ्या कंपन्यांच्या हितासाठी विकासाच्या नावाने त्यांना उद्धवस्त केले जाऊ नये. यासाठीही त्यांना सरकारशी संवाद हवा असतो आणि त्यांची अशी इच्छा आहे की सरकार याबाबत त्यांच्या खऱ्याखुर्या प्रतिनिधींना विश्वासात घेईल.'
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील खुदपोस नावाच्या गावात एक ओरांव आदिवासी कुटुंबात १९८३ मध्ये ३ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कवयित्री, लेखिका, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या जसिंता केरकेट्टा यांना आज त्यांच्या सृजनाबरोबरच देशातील आदिवासींच्या स्थितीबाबत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संवाद-परिसंवादात बोलण्यासाठीही ओळखले जाते.
पण एक काळ असा होता, जेव्हा त्यांना कठीण जीवनसंघर्षातून आपली वाट काढावी लागली. स्वाभाविकच त्यांचे बालपण भयंकर गरीबी आणि अभावग्रस्ततेत गेले आणि लहानपणी हाट-बाजारात चिंचा विकून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे गोळा करावे लागले. तरीही त्यांनी शिक्षण घेण्याची आपली जिद्द कधीच कमी होऊ दिली नाही आणि पैशाअभावी कॉलेजचे शिक्षण अडले तेव्हा त्यांच्या आईने जमीन गहाण ठेवूनही त्याची व्यवस्था केली. तरीही भागले नाही तर त्यांनी स्वतः अनेक छोटी-मोठी कामे करून प्राप्त परिस्थितीचा सामना केला.
कोण आहेत जसिंता केरकेट्टा ?
कठीण संघर्षाच्या काळातच त्यांनी कवितालेखन सुरू केले होते, पण त्यांचा पहिला कविता संग्रह ‘अंगोर’ची प्रतिक्षा २०१६ मध्ये संपली, जेव्हा आदिवाणी प्रकाशन, कोलकाता यांनी तो हिंदी आणि इंग्रजीमध्ये एकत्र प्रकाशित केला. मात्र, यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि आता त्या देशातील पहिल्या अशा आदिवासी कवी-प्रतिभा मानल्या जातात, ज्यांच्या कवितासंग्रहांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाचवेळी तीन-तीन भाषांमध्ये प्रकाशन झाले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या अनेक कवितांचा अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे, ज्यात जर्मन, इटालियन, फ्रेंच, स्पॅनिश, पंजाबी, उर्दू, गुजराती, मराठी,आसामी,कन्नड, तमिळ आणि संथाली इत्यादी भाषांचा समावेश आहे.

याशिवाय त्यांच्या कवितांना ऑस्ट्रेलिया, युक्रेन, इस्रायल आणि रशिया इत्यादी देशांच्या अनेक विद्यापीठांमध्ये शिकवले जाते आणि कविता वाचन व संवादासाठी त्या अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, ब्राझील, चिली, कोस्टारिका आणि थायलंड इत्यादी देशांना भेटी देऊन आल्या आहेत.
समिक्षकांच्या मते त्यांच्या कवितांमध्ये त्यांचे वैयक्तिक दुःख समष्टिगत दुःखात व्यक्त होताना आपल्या समाजविमर्शाला पुढे नेताना दिसते. सखोल, अचेतन आणि न सांगितलेल्या भावनांना शब्द आणि प्रतिमांमध्ये गुंफण्याची त्यांची कला अनोखी आहे आणि या कलेद्वारे त्या या भावनांना वास्तवाचा आकार देतात.
अलिकडेच अवधचा प्रतिष्ठित ‘माटी रतन सम्मान’ घेण्यासाठी त्या अयोध्येला आल्या होत्या तेव्हा ‘द वायर’ने त्यांच्याशी दीर्घ संवाद साधला. त्या संवादाचा भाग…
तुम्ही पहिल्यांदाच अयोध्येला आला आहात, ही नगरी कशी वाटली?
जसिंताः हे पाहून आनंद झाला की सत्ता आणि सामर्थ्य असलेल्यांनी द्वेष वाढवण्यासाठी पूर्ण ताकद लावूनही अयोध्येत केवळ हिंदू आणि मुस्लिमांमधीलच नव्हे तर इतर धर्म आणि संप्रदायांच्या लोकांमधील बंधुभावातही भेगा पडल्या नाहीत.उलट तो अधिक मजबूत झालेला दिसतो.
याआधी न्यूज चॅनेल्स, वृत्तपत्रे आणि इतर माहिती व बातम्या माध्यमांद्वारे मी जी अयोध्या पाहू शकत होते, त्यात अयोध्या कमी आणि तिचा उपयोग जास्त दिसत होता- स्पष्ट सांगायचे तर सत्तेच्या शिडीच्या रूपात तिच्या वापराचे राजकारण जास्त नजरेत येत होते. पण इथे येऊन मी पाहिले की साधे लोक अवधच्या पारंपरिक गंगा-जमुनी तहजीबनुसार स्वाभाविक सहजीवनाने जगत आहेत आणि त्यांना परस्परांपासून कसलीच अडचण नाही.

यामुळे माझा हा विश्वास अधिक दृढ झाला की साध्या लोकांचा सहजीवनातील विश्वास बळकट राहिला तर बाहेरून लादलेले जात आणि धर्मांचे संघर्ष किंवा मतभेद इतके अनर्थ घडवू शकत नाहीत, जितके लादणाऱ्यांना हवे असते. लादणाऱ्यांना काय हवे असते, हे यावरून समजू शकते की सत्तेत आल्यानंतर त्यांनी धर्माला हत्यार बनवून जे विकास आणि बदल केले आहेत, तेही धर्माला त्याच्या मूल्य आणि मौलिकतेपासून वंचित करत आहेत. तरीही मी मानते की, ही खूप मोठी गोष्ट आहे की इतक्या झंझावातांनंतरही सामान्य अयोध्यावासीयांचा हा विश्वास मजबूत आहे की मानवाचे जीवन शत्रुत्वाने नव्हे तर परस्पर सहकार्याने चालते आणि ते ते परस्पर सहकार्याने चालवत आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे का की ज्या आदिवासी समूहाचे तुम्ही प्रतिनिधित्व करता आहात, त्यांना अयोध्येत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुटुंबाच्या संघटनांद्वारे नव्याने हिंदू असण्याची इच्छा जागृत करण्यासाठी नाना प्रकारच्या धडपडी केल्या जातात?
जसिंताः हो, मला माहिती आहे. आणि अयोध्येतील या धडपडींसाठी ज्या राज्यांतून आदिवासी तरुण आणि तरुणी आणल्या जातात, त्यांतही जे आदिवासी ख्रिश्चन झाले नाहीत, संघ परिवारातील संघटनांना ते जबरदस्तीने हिंदूच म्हणतात आणि तेच सिद्ध करण्यात गुंतलेले असतात.
तिथे आदिवासी समाजातून त्याचा पारंपरिक लवचिकपणा काढून घेऊन त्याला कट्टर बनवून त्यात धर्माच्या लढाया निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर आदिवासी समाजात एकाच गावात वेगवेगळ्या धर्मांला मानणारेही सौहार्दपूर्ण पद्धतीने राहण्याची क्षमता आहे. कोणत्याही इतर धर्माला स्वीकारण्याबाबतही हा समाज नेहमीच लवचिक राहिला आहे. आणि इतर धर्मांच्या प्रभावानंतरही लोकांनी निसर्ग पूजा, आपले सण-उत्सव सोडलेले नाहीत. आदिवासी समाज असाच सामंजस्याने जगणारा समाज आहे.
पण चिंतेची गोष्ट एवढीच नाही. आज सत्तेद्वारे संवेदनशून्य, घाबरलेला आणि क्रूर समाज निर्माण करण्याच्या प्रयत्नांत आपल्या शक्तींचा जो घोर दुरुपयोग केला जात आहे, आदिवासी समाजही त्याच्या कक्षेत आहे. तरीही तो जाणतो की जो निसर्ग त्याचे आराध्य आहे, अमर्याद शक्ती असूनही तो आपल्या शक्तींचा अत्यंत कोमलतेने उपयोग करतो आणि अपवादाने रौद्र रूप धारण करतो. तेही मानवाच्या अविवेकपूर्ण अंधाधुंद शोषणाने
खिन्न होऊन. म्हणून आदिवासी समाज सत्तेकडूनही आपल्या शक्तींचा सौम्यतेने उपयोग
करण्याची अपेक्षा करतो.
अशा स्थितीत आदिवासींमध्ये नव्याने हिंदू असण्याची इच्छा जागृत करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील की...?
जसिंताः स्पष्ट सांगायचे तर या दिवसांत या देशातील आदिवासी अनेक प्रवाहांमध्ये उभे आहेत. नक्षलवाद आणि गांधीवादाच्या प्रवाहांशी ते आधीपासूनच जोडलेले होते, आता हिंदुत्वाच्या प्रवाहाशीही जोडलेले आहेत. हा प्रवाह सत्तेत आहे म्हणजे स्वाभाविकच त्याचा दबदबा काही जास्तच आहे आणि तो त्यांच्यात आपला ‘धर्माभिमान’ जागृत करण्यासाठी उत्सुक आहे. ही गोष्टही त्याच्या बाजूने जाते की लोकशाहीत घडणाऱ्या-बिघडणाऱ्या सत्ता आणि शक्तीच्या समीकरणांत आदिवासींनाही आपल्या हिश्श्यानुसार कोणत्याही बाजूला जाऊन आपल्यासाठी जागा बनवावी लागते.
याच्याही व्यतिरीक्त त्यांच्यात हिंदू असण्याची इच्छा जागृत करणे सोपे नाही, कारण त्यांचे निसर्गाशी नाळ जोडलेले तत्त्वज्ञान हिंदू धर्माच्या चौकटीशी जुळत नाही. त्यांच्या तत्त्वज्ञानात कट्टरतावाद आणि हिंसेला कुठेही थारा नाही आणि ते आपल्या आदिवासियतशी कसलीही तडजोड करू इच्छित नाहीत. जात किंवा वर्णव्यवस्था तर त्यांना ठाऊकच नाही. त्यांची संस्कृती मतभेदांचाही आदर करण्याची आहे आणि हिंसा त्यांच्यासाठी शेवटच्या पल्याडचा पर्याय आहे.

लक्षात घेण्याजोगे आहे की गांधीवादाच्या सर्व उदारतेनंतरही ते त्याच्याशी फार सहजपणे राहत नाहीत कारण तोही कमी-अधिक हिंदू धर्माच्या चौकटीतच बोलतो. दुसऱ्या बाजूला नक्षलवादाशी त्यांची अडचण अशी आहे की हिंसक पद्धत त्यांच्या स्वभावातच नाही. त्यात सह-अस्तित्वाची भावना आहे. पण त्यांनी तेव्हा काय करावे जेव्हा त्यांना अशा किचकट प्रश्नासमोर उभे राहावे लागते की ते नक्षली किंवा माओवादी यांच्याबरोबर आहेत की तुलनेने अधिक हिंसक आणि क्रूर सरकारी सुरक्षा दलांबरोबर?
याच्याही व्यतिरीक्त त्यांच्या बदलासाठी अशी शांततापूर्ण आंदोलनेच हवी असतात, जी त्यांना इतर कुठल्या चौकटीत बसवण्याऐवजी स्वतःला त्यांच्या आदिवासियतच्या चौकटीत बसवतात. याच कारणामुळे त्यांच्यातील जे स्वतःला हिंदू मानत नाहीत आणि बहुतेक मानतच नाहीत, हिंदुत्ववादी त्यांच्यावर चिडतात. त्यांना स्वतःला हिंदू मानल्यावर मिळू शकणाऱ्या सत्तेच्या जवळकीच्या लाभांची यादी ते देतात आणि समजावतात की त्यांच्यातील जे ख्रिश्चन झाले आहेत, ते त्यांचे शत्रू आहेत आणि ते त्यांचा हक्क हिरावत आहेत.
मग पुढचा मार्ग काय आहे?
जसिंताः मार्ग तर संवादातूनच निघू शकतो आणि खरे सांगायचे तर समस्या फक्त त्यामुळेच गुंतागुंतीची होत चालली आहे की संवादाचा मार्ग रोखण्यात आला आहे. आदिवासींना आपल्या जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठीच्या संघर्षात फक्त एवढेच हवे आहे की मोठ्या कंपन्यांच्या हितासाठी विकासाच्या नावाने त्यांना उजाड केले जाऊ नये. यासाठीही त्यांना सरकारशी संवाद हवे असतात आणि त्यांची इच्छा आहे की सरकार याबाबत त्यांच्या खऱ्या प्रतिनिधींना विश्वासात घेईल.
हो, आता नक्षलवादी/माओवादी यांनाही सरकारशी बोलणी हवी असतात. पण सरकार बोलणीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष तर करतच आहे, नक्षलींच्या निःपाताच्या निमित्ताने आदिवासींना दोन घाण्यांत पिळले जात आहे. म्हणून ते घडत आहे जे सत्ताधारी शक्ती क्रूर झाल्यानंतर घडत असते. कारण तेव्हा समजतच नाही की ज्याच्याकडे जास्त शक्ती असते, त्याच्यावर जास्त लोकांची काळजी घेण्याची जबाबदारीही असते. ती जबाबदारी पार पाडली गेली तर जाणले जाऊ शकते की आदिवासींनी ना ख्रिश्चन मिशनऱ्यांना आमंत्रित केले होते, ना नक्षलवाद्यांना बोलावले. उलट तेच त्यांच्याकडे जाऊन त्यांना आमंत्रित करतात. अगदी तसेच जसे गांधीवादी आणि हिंदुत्ववादी आले.
आदिवासींच्या दृष्टीने पाहिले तर देश म्हणजे स्वतःची काळजी घेताना आपल्या आजूबाजूच्या आणि जग-दुनियेची आणि निसर्गाची काळजी घेण्याचे नाव आहे आणि यात संकुचितपणाला कुठेही जागा नाही.
तुम्हाला वाटते का की सरकार कधी ही गोष्ट समजून घेईल?
जसिंताः सरकारला समजून घ्यावेच लागेल, कारण दुसरा कुठलाच मार्ग नाही. पण आता तर ते ज्या मार्गावर चालले आहे, त्यामुळे देशात एक विशेषाधिकार प्राप्त, घाबरलेला, संवेदनशून्य आणि संकुचित समाज निर्माण झाला आहे जो आपल्या शक्तींचा आपल्या देशात आपल्याच लोकांना संपवण्यासाठी उपयोग करत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी खरे लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार आणि सिव्हिल सोसायटीबरोबर बहुसंख्याक समाजाला शक्तीची नवीन व्याख्या नव्या पद्धतीने सांगावी लागेल. ती व्याख्या ज्याअंतर्गत निसर्गपूजक आदिवासी शक्तीला कठोरतेच्या नव्हे तर कोमलतेच्या अर्थाने घेतात. म्हणतात की निसर्गप्रदत्त हवा, पाणी, माती, नद्या आणि पाऊस यातही अपार शक्ती आहे, ज्याच्या कोमलतेमुळे तिथून जीवन, सभ्यता आणि त्यानंतर नवीन सभ्यता उगवते, आजची सत्ता जर त्यांच्यासारखे एकत्र उगवणे आणि फुलणे शिकली असती तर किती बरे झाले असते!
‘माटी रतन सम्मान’ घेताना तुम्ही तुमच्या संबोधनात म्हटले होते की क्रांतिकारी आंदोलनात ज्यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ हा सन्मान दिला जातो अशा अशफाकउल्लाह खान यांची आणि आदिवासींची स्वातंत्र्याची कल्पना एकच आहे...
जसिंताः हो, आणि म्हणूनच पुरस्कार आणि सन्मानांबाबत मनात कोणतीही अपेक्षा नसतानाही मी या सन्मानाने स्वतःला अधिकच गौरवान्वित झाल्यासारखे अनुभवत आहे. हे तेव्हा, जेव्हा आधीचे जे पुरस्कार आणि सन्मान माझ्याकडे आहेत, मी त्यांच्या आरशात आपल्या कामाचे मूल्यांकन करून समाधानी किंवा असमाधानी होत नाही.
मी म्हणून गौरव अनुभव करते आहे की क्रांतिकारकांच्या संपूर्ण समूहाने अशफाकउल्लाह खान यांनी ज्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले, त्या संदर्भात त्यांचे स्वप्न फक्त एवढेच नव्हते की इंग्रज देश सोडून जातील आणि त्यांच्यासारखेच असमानता आणि शोषणाचे समर्थक देशी लोक त्यांची जागा घेतील.

त्यांना हवे होते की स्वातंत्र्य आले तर देशात समानता आणि बंधुत्वावर आधारित नवीन व्यवस्था स्थापित होईल आणि त्यात कोणत्याही प्रकारच्या प्रतिष्ठेविरोधात,अशिक्षीतपणा आणि गरीबी यांना कोणतीही जागा नसेल. जे पदावर असतील, ते आपल्या पदांच्या सामर्थ्याला सेलिब्रेट करत राहणार नाहीत, आपली जबाबदारीही समजून घेतील.
आदिवासी समाजही अगदी अशाच स्वातंत्र्याची कल्पना करतो, ज्यामुळे अनेक अर्थांनी त्याच्यासाठी स्वातंत्र्याची लढाई अजूनही संपलेली नाही, कारण त्याच्या स्वातंत्र्याच्या व्याख्येत निसर्गाला मुक्त ठेवणेही समाविष्ट आहे. त्याचा इतिहास साक्षीदार आहे की गुलामी त्याला सहन होत नाही आणि त्याच्यासाठी स्वातंत्र्याचे मूल्य प्रवाही संवाद आहे.
अयोध्येला येण्याआधी एका लिटफेस्टच्या निमित्ताने तुम्ही शेजारी देश नेपाळमध्ये होत्या, जिथे नुकताच जेन झी ने…
जसिंताः हो, तिथे त्या पिढीच्या अनेक सदस्यांशी माझी चर्चा झाली. त्यांनी सांगितले की त्यांच्या देशातील धर्म किंवा समुदायाबाबत त्यांची कुठलीही लढाई नाही. जी काही लढाई आहे, ती सत्तेशी आहे आणि तीही आपल्या प्रश्नांबाबत आहे. ते आपल्या दुर्दशेच्या खऱ्या कारणांना ओळखून सत्तेला प्रश्न विचारत आहेत की ती त्या कारणांना दूर का करत नाही? याचा किमान इतका फायदा झाला आहे की सत्ताधारी त्यांच्याबरोबर बसून त्यांच्या प्रश्नांवर बोलत आहेत.
पण शोकांतिका ही आहे की आपला देश भारतात असे घडत नाही. इथे आपण आपल्या समस्यांसाठी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी शेजाऱ्यांना प्रश्न विचारत आहोत आणि त्यांना दोषी ठरवून केवळ त्यांना छळतच नव्हे तर त्यांच्या हत्याही करत आहोत.
सत्ताधारी याचा आपल्या सोयीनुसार उपयोग करत आहेत. त्यांनी धर्माच्या नावावर राजकारणाचा बाजार मांडला आहे आणि हे पाहून खुश होत आहेत की भुकेलेली, असुरक्षित आणि बेरोजगार तरुण पिढी आपल्या पूर्वजांच्या समृद्धी आणि संपत्तीची मागणी करत-करत भव्य प्रार्थना स्थळांच्या दारात डोके टेकवून बसली आहे. सत्तेला हे समजण्यातही अडचण येत आहे की अशा राजकारणाने तळागाळातील लोकांचे सर्वाधिक नुकसान होत असते.
हे विचारण्याचीही सध्या अडचण आहे की असे काय झाले आहे की माणसासाठी देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बाजारातून जायला लागला आहे?
(सौजन्य : ‘द वायर’ वरुन साभार, मराठी अनुवादः भरत यादव)
मूळ लेख वाचण्यासाठी :
https://thewirehindi.com/318637/interview-jacinta-kerketta/?fbclid=IwY2xjawPAPRVleHRuA2FlbQIxMABicmlkETE4NFVFaFZaUVVtTWxIQzhSc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHhyoUcz_LhVGcowha8VC4cLvV-0FPw5opvvBynBI4jVlRNzN17UZSMMq_5KH_aem_FhxpxXh5kO5eISwTJMvXkw






