(भागा वरखडे)
यंदाचा उन्हाळा हा उन्हाळा म्हणून असा जाणवला नाही, अशी काहीशी परिस्थिती आहे. मराठवाड्यासारख्या भागात फेब्रुवारीमध्येच उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. मार्चमध्ये पारा चांगलाच चढला. विदर्भात अकोला, चंद्रपूरमध्ये पारा 43 ते 45 अंशापर्यंत गेला. त्यानंतरचे दोन महिने जादा तापमानाचे असतील, असा अंदाज होता;परंतु एप्रिलची सुरुवातच अवकाळी पावसाने झाली.
फक्त विदर्भच नाही, तर मुंबई, कोकणातही एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाकडून आज आकाश निरभ्र राहील, असा अंदाज वर्तवला जातो आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहते. संध्याकाळी, रात्री अवकाळी पाऊस कोसळतो. यामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव सध्या महाराष्ट्राला येत आहे.
राज्यात या वर्षी तरी अवकाळी पाऊस होणार नाही, असे वाटत होते;परंतु गेल्या दीड महिन्यांपासून राज्यात नियमित मॉन्सूनसारखा पाऊस पडतो आहे. अवकाळी पाऊस का पडतो, यामागे विज्ञान आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. ज्या विदर्भात पारा 45 अंशावर पोहोचला होता, तिथेच सर्वाधिक पाऊस कोसळला. मॉन्सूनच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. 
शेतजमिनीमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बाष्पीभवनाच्या स्तरांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन वातावरणामध्ये भोवरे तयार होतात आणि त्या भोवऱ्यामध्ये बाष्प अडकतात. वेगवेगळ्या ठिकाणचे कमी जास्त तापमान आणि वायूदाब यामुळे वारे वाहू लागतात. बाष्पीभवन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाल्यामुळे ऊर्ध्व दिशेने, पाणी धारण करणारा; पण मसाला डोसासारखा पसरट अशा पद्धतीचे ढग तयार होऊन पाऊस पडतो.
मॉन्सून पॅटर्न बदलामुळे चक्रीवादळ, गारपीट, ढगफुटी
महाराष्ट्रात आपण साधारणतः 7 जून ते 30 सप्टेंबर असे चार महिने ऑफिशियली पावसाळा धरायचो; पण मॉन्सून पॅटर्न बदलामुळे चक्रीवादळ, गारपीट, ढगफुटी यांच्याही अनियमित बदलामुळे मराठवाडा हा ढगफुटीचा प्रदेश बनला की काय, अशी शंका येते. अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यात वित्तहानीसोबतच जीवितहानीदेखील झाली. माणसे, जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यात 4 हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले. अमरावतीमध्ये सर्वाधिक नुकसान आतापर्यंत झाले आहे.
उन्हाळ्यात बाजारपेठांमध्ये धान्य आणि इतरही पदार्थ बाहेरच असतात, त्यांचीही नासाडी अवकाळी पावसामुळे झाली. कोकणात एप्रिलच्या सुरुवातीलाच सलग दोन दिवस पाऊस पडत होता. यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजूचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्यातील अवकाळी पावसामुळे शहरामधील मध्यमवर्ग सुखावत असला, घराबाहेर पडता येत नाही म्हणून थोडा नाराज आणि बाहेर असेल तर थोडी फजिती झाल्यामुळे चिडचिड करत असला तरी शेतकऱ्यांचे किती आणि कसे नुकसान झाले हे अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. येथेही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना सर्वाधिक फटका बसला. एप्रिलच्या सुरुवातीला सुरू झालेला अवकाळीचा फटका राज्यात दर दोन-तीन दिवसांनी कुठल्या ना कुठल्या भागाला आता मेच्या मध्यातही बसत आहे.
मुंबईपासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आणि विदर्भ, मराठवाड्यापासून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळीच्या कोसळधारा कोसळत आहेत. ऐन उन्हाळ्यात ऐतिहासिक वेरुळ लेणीवरील धबधबा जिवंत झाला आहे. उन्हाळ्यात निर्माण झालेल्या आल्हाददायक वातावरणामुळे शहरी मध्यमवर्गीय सुखावला असला तरी महिन्याभराच्या या अवकाळीमुळे 21 जिल्ह्यांतील 86 तालुक्यांमध्ये अतोनात नुकसान झाले आहे.
संबंधित लेख वाचा: 1) या शेताचा आता लळाच राहिलेला नाही… शेती करणाऱ्याांच्या संख्येत विक्रमी घट |
राजाने मारले अन् पावसाने झोडपले तर दाद कुठे मागायची’?
‘राजाने मारले अन् पावसाने झोडपले तर दाद कुठे मागायची’, अशी एक म्हण आहे; मात्र आता आपण लोकशाही देशात राहातो. कल्याणकारी आणि कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे या म्हणीचा पहिला भाग आता अस्तित्वात राहिलेला नाही. पावसाने झोडपल्यानंतर राज्य सरकारने अवकाळीग्रस्तांचे, पीडितांचे म्हणणे ऐकून घेण्याची गरज आहे. मदत आणि पुनर्वसन खाते राज्य सरकारकडे आहे.
स्वतंत्र कृषी विभाग आहे. त्यामुळे या संबंधित खात्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याची नितांत आवश्यकता आहे. मॉन्सून किंवा मॉन्सूनपूर्व कालावधीव्यतिरिक्त पडणारा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस म्हणून ओळखला जातो. अवकाळी पाऊस पडण्याचे कारण म्हणजे पाण्याच्या बाष्पीभवनाच्या वाढत्या प्रमाणामुळे अवकाळी पाऊस पडतो.
अवकाळी पावसाने नेमकं कुठे आणि किती नुकसान झालं?
यंदा अवकाळीचा तडाखा महाराष्ट्राला जरा जास्तच बसला आहे. साहजिकच हा हवामान बदलाचा परिणाम आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली. नाशिकच्या मांडसांगवीत द्राक्ष बागांना अवकाळीचा तडाखा बसला आहे. अवकाळीमुळे काढणीला आलेल्या द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना लाखोंचा फटका बसला आहे.
देशाची 40 टक्के कांद्याची गरज भागवणाऱ्या नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने कांढणीला आलेला उन्हाळी कांदा जमीनदोस्त केला. नाशिक जिल्ह्यातील बागलाण, देवळा, सटाणा परिसरात कांद्याचे अतोनात नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. ठाणेपाडा आणि गंगापूर भागात जोरदार गारपीट झाली. या अवकाळीच्या ताडाख्याने 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.
उशिराच्या हरभरा, गहू, मक्याचे पीकही भुईसपाट झाले आहे. गारपिटीमुळे टरबुजाच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यालाही अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. धुळे जिल्ह्यातील नेर, कापडणे, म्हसदी या परिसराला अवकाळी पावस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे फळबागांचा मोहोर गळून पडला आहे. या ठिकाणी काढणीला आलेली पिके भुईपाट झाली आहेत. या नुकसानीचे तात्काळ पंचानामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोट, तेल्हारा तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतातील आंबा, गहू, कांदा आणि फळबाग पिकांना फटक बसला. गहू अक्षरशः झोपला असून आंबे वादळी वाऱ्यामुळे गळून पडले आहेत. नागपूरमध्येही अवकाळीचा तडाखा बसला आहे.
कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले धान्य अवकाळीमुळे भिजून गेले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, जामखेड, राहुरी, पारनेर आणि अकोले तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला कांदा, गहू भुईसपाट झाला आहे. वाटाणा, मका आदी पिकांचेही नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला. आधीच पिकाला हमी भाव नसल्याने शेतकऱ्याला उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यातच आता अवकाळीच्या तडाख्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देणे गरजेचे आहेत. आता अचानक कधीही पाऊस पडणार असे गृहित धरून शेतकरी कशाप्रकारे पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. हवामान विभागाच्या अंदाजानंतर शेतकरी काय करू शकतात, याचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
गेल्या पाच-दहा वर्षांपासून हवामान बदलामुळे कधी कमी तापमान तर कधी जास्त तापमान असते. काहीवेळा गारपीट, मुसळधार पाऊस यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. पारंपारिक पिके नुकसान सहन करत नाही; मात्र दूरदृष्टीने शेती केल्यास नक्कीच अशा अचानक आलेल्या संकटावर शेतकरी मात करू शकतो. बटाटे, बीट, गाजर आदी पिके घेतल्यास नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. काही शेतकरी मल्चिंग करतात. शेडनेट, पॉलिहाऊस उभारतात. यामुळे गारपीट तसेच अतिवृष्टी आणि त्यांचा परिणाम जवळपास एक महिन्यापर्यंत संभाव्य नुकसान टाळू शकतो.
हवामान बदलाचा धोका लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आता त्याअनुषंगाने पिकांची लागवड करावी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री तसेच जालना जिल्ह्यात तुतीचे क्षेत्र वाढत आहेत. रेशीम शेती, बांबू, तीळ, कऱ्हाळा, ओवा, जवस हेसुद्धा बदलत्या हवामानास एक पर्याय आहे. पारंपारिक पिकांशिवाय बदलत्या हवामानास जे पिक बळी पडत नाही, त्या पिकांचा अवलंब शेतकऱ्यांनी केला पाहिजे.






