Skip to main content

जे घर विधवा प्रथा पाळणार नाही, त्यांची घरपट्टी-पाणीपट्टी पूर्ण माफ… कोकणातील कलमठ ग्रामपंचायतीचा क्रांतिकारी निर्णय.

Sanjana Khandare
06 Jan 2026
5 min read
625 views
जे घर विधवा प्रथा पाळणार नाही, त्यांची घरपट्टी-पाणीपट्टी पूर्ण माफ… कोकणातील कलमठ ग्रामपंचायतीचा क्रांतिकारी निर्णय.

संजना खंडारे 


  • कलमठ ग्रामपंचायतीचा विधवा प्रथा बंदीचा ऐतिहासिक आणि समाजपरिवर्तनकारी निर्णय.


  • विधवा प्रथा नाकारणाऱ्या कुटुंबांना घरपट्टी व पाणीपट्टी माफीचा ठाम संदेश.


  • सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त निर्णयाला महिलांसह पुरुषांचा व्यापक पाठिंबा.



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीने पतीच्या निधनानंतर स्त्रीचे सौंदर्य, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या अमानवी विधवा प्रथेला ठाम नकार देत एक ऐतिहासिक आणि समाजपरिवर्तनकारी निर्णय घेतला आहे. ज्या घरामध्ये विधवा प्रथा पाळली जाणार नाही, अशा कुटुंबांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते मंजूर केला असून, या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली.


विधवा प्रथा म्हणजे पतीच्या निधनानंतर स्त्रीवर लादली जाणारी सामाजिक बंधने, तिच्या आयुष्याला काळ्या छायेत ढकलणारी प्रथा होय. मंगळसूत्र काढून घेणे, बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे, रंगीत कपडे न घालण्याची सक्ती, आनंदाच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवणे असे अमानवी कुप्रकार आजही काही भागांत दिसून येतात. या प्रथेमुळे स्त्रीचे केवळ सौंदर्यच नव्हे, तर तिचा आत्मसन्मान, व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक अस्तित्वही नाकारले जाते.


कलमठ ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी 2025 च्या वर्षअखेरीस अध्यक्षपदावरून यासंबंधी ठराव मांडला. ‘महिला स्नेही गाव’ या संकल्पनेवर आधारित काम करत असताना, विधवा प्रथा बंदीसाठी ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी सभेत स्पष्ट केले. कोणत्याही सामाजिक प्रथेपेक्षा माणुसकी श्रेष्ठ असून, स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, या भावनेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.


घरपट्टी आणि पाणीपट्टी माफीचा अभिनव निर्णय


नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या ग्रामपंचायत सभेत हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. ज्या घरामध्ये विधवा प्रथा पाळली जाणार नाही, अशा कुटुंबांची घरपट्टी व पाणीपट्टी थेट माफ करण्याचा निर्णय घेतल्याने या ठरावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक बदलासाठी आर्थिक सवलतींचा उपयोग करून सकारात्मक प्रेरणा देण्याचा हा अभिनव प्रयोग मानला जात आहे.


याबद्दल ‘बाईमाणूस’ने सरपंच संदीप मेस्त्री यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले,


"गावामध्ये महिला सन्मान, समानता आणि सुरक्षिततेबाबत केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृती झाली पाहिजे, या भूमिकेतून हा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी किंवा ३ जानेवारी असा कोणताही ठरावीक दिवस डोळ्यासमोर नव्हता, मात्र गेल्या तीन वर्षांपासून आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या ‘महिला स्नेही गाव’ या संकल्पनेवर सातत्याने काम करत आहोत. महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सपासून ते उद्योग प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनासाठी विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत. या पार्श्वभूमीवरच समाजात खोलवर रुजलेल्या काही रूढी-परंपरांबाबत ठोस पाऊल उचलण्याची गरज मला जाणवली.”


User Image

संदीप मेस्त्री पुढे बोलताना सांगतात, "माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटनेमुळे हा विचार अधिक ठाम झाला. गेल्या वर्षी माझ्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले. त्या वेळी कोणतेही आजारपण नसताना त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर माझ्या आईसाठी पारंपरिक पद्धतीने ज्या रूढी पाळल्या जातात, त्या आम्ही जाणीवपूर्वक नाकारल्या. बदलाची सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे, असे मला वाटते. त्यामुळेच गावासाठी निर्णय घेताना मला नैतिक बळ मिळाले.’’


‘’केवळ समज देऊन किंवा भाषण करून समाज बदलत नाही’’ - सरपंच


२९ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत मी अध्यक्षपदावरून स्पष्टपणे ठराव मांडला. केवळ समज देऊन किंवा भाषण करून समाज बदलत नाही, तर त्यासाठी वेगळ्या आणि प्रभावी मार्गाची गरज असते. म्हणूनच ज्या कुटुंबांमध्ये महिलांना पाठिंबा दिला जाईल, विधवा प्रथा किंवा अन्य अमानवी रूढींना नकार दिला जाईल, अशा कुटुंबांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला." अशी माहिती सरपंच संदीप मेस्री यांनी दिली.


"योगायोगाने ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती होती. स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या सावित्रीबाईंच्या जयंतीदिनी या निर्णयाची घोषणा करणे मला योग्य वाटले. त्या दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निर्णयाला गावातील महिलांसह पुरुषांचाही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिला संघटना, डॉक्टर्स, कार्यकर्त्यांनी फोन, मेसेज करून कौतुक केले, याचा मला सरपंच म्हणून अभिमान आणि समाधान आहे, असेही ते म्हणाले.



User Image(सरपंच संदीप मेस्त्री)

कोकणात तरी असा निर्णय घेणारी आमची ग्रामपंचायत पहिली असावी, असे मला वाटते. मोठ्या लोकसंख्येच्या गावात असा सामाजिक निर्णय घेणे सोपे नसते, पण विश्वासात घेऊन आणि प्रामाणिक हेतूने पावले टाकली तर बदल शक्य आहे, हे आम्ही दाखवून दिले आहे.” असे संदीप मेस्त्री बाईमाणूस’शी बोलताना म्हणाले..


कठोर अंमलबजावणीचा निर्धार


कलमठ ग्रामपंचायतीने केवळ ठराव न करता त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सामाजिक दबावामुळे किंवा अंधश्रद्धेमुळे कोणत्याही महिलेला अन्याय सहन करावा लागू नये, यासाठी ग्रामपंचायत सक्रिय भूमिका घेणार आहे. जनजागृती, संवाद आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या प्रथेचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पंचायतराज समृद्धी अभियान तसेच शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारी कलमठ ग्रामपंचायत याआधीही सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत आलेली आहे. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत ग्रामपंचायतीचे कार्य उल्लेखनीय आहे.


यापूर्वी हेरवाड ग्रामपंचायतीने घेतला होता असा निर्णय


यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीची मोहीम सुरू करून राज्यभर लक्ष वेधून घेतले होते. त्या ठरावाची दखल घेत राज्य शासनाने सर्व ग्रामपंचायतींना विधवा प्रथा बंदीचे ठराव घेण्याचे आवाहन केले होते. या निर्णयांमुळे काही गावांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले असून, अनेक महिलांनी ही अमानवी प्रथा उघडपणे नाकारली आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी रूढी-परंपरांच्या नावाखाली ही प्रथा पाळली जात असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.


“निर्णय स्वागतार्ह, पण समाजाची मानसिकता बदलायला अजून वेळ”


या निर्णयामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेलाही आव्हान मिळणार आहे. पतीच्या निधनानंतरही स्त्रीला सन्मानाने, आनंदाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे, ही जाणीव समाजात रुजवणे हे या ठरावाचे मुख्य उद्दिष्ट आहे.


User Image

याबद्दल कलमठ गावातील पूजा कदम या तरुणीशी बोलल्यावर तिने सांगितले, " या निर्णयाचे स्वागत तर आहेच. पण खंत या गोष्टीची वाटते. की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी त्या काळात विधवा प्रथेला बंदी आणि विधवा पुनर्विवाह सुरू केले होते. मात्र आजही समाजात तळागाळापर्यंत हा विचार पोहोचलेला नाही. आणि त्यामुळे असे निर्णय घ्यावे लागतात. मुलगी म्हणून मला या गोष्टीचं दुःख आहे.‌ की आपल्या समाजात महिलांसंदर्भातील निर्णयाची ‌अंमलबजावणी व्हायला ‌ दशकं उलटून जातात. बाकी ‌ या निर्णयाचं ‌ स्वागत आहेच. पण हा निर्णय घेत असताना गावातील काही मंडळींनी याला विरोध केला यातून आजही समाजाची मानसिकता लक्षात येते.‌‌ पण बहुमत निर्णयाच्या बाजूने असल्याकारणाने तो ठराव मंजूर करण्यात आला."


ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करत सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले की, "यापुढे कलमठ गावात विधवा प्रथा पूर्णतः बंद करण्यासाठी ग्रामपंचायत कसोशीने प्रयत्न करेल. कोणत्याही सामाजिक प्रथेपेक्षा माणुसकी श्रेष्ठ असल्याचा संदेश देणारा हा निर्णय केवळ कलमठपुरता मर्यादित न राहता राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी ठरेल."



Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...