- स्नेहा भुरा
इराण–इस्रायल संघर्षाच्या आगीने मध्यपूर्व पेटून निघालेला असतानाच, भारताच्या विविध भागांतील ‘मिनी इराण’मध्ये मात्र आठवणी, चिंता आणि सांस्कृतिक नात्यांच्या हलक्याशा ठिणग्या उसळू लागल्या आहेत. तेहरानच्या गजबजाटापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या कर्नाटकातील अलिपूरसारख्या गावांमध्ये आजही क्रांतीच्या कविता, शिया श्रद्धा आणि इराणी कुटुंबांशी असलेले बंध जिवंत आहेत. पण या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर एक सवालही दाटून येतो, आपण कुठले? इराणी की भारतीय? की दोन्ही? या वस्तीत अशी असंख्य लोकं आहेत ज्यांच्या रक्तात इराण आहे, पण हृदय मात्र हिंदुस्थानात.
गेल्या तीन दिवसांपासून, 67 वर्षीय शफिक आबिदी त्यांच्या कर्नाटकातील अलिपूर येथील घरात धुळीने झाकलेल्या कपाटात आणि जुन्या ट्रंकमध्ये एक जुना फोटो शोधत आहेत. हा तो फोटो होता जेव्हा ते फक्त 25 वर्षांचे होते आणि त्याकाळी क्रांतिकारी कविता लिहीत होते.
"इन्कलाब’’नंतर आयातुल्ला अली खामेनेई (सध्याचे इराणचे सर्वोच्च नेता) त्यावेळी भारतात आले होते. तो काळ म्हणजे 1979च्या इराणी क्रांतीनंतर. त्यावेळी कर्नाटकच्या याच अलिपूरमध्ये मोठा कार्यक्रम झाला होता आणि मी स्टेजवरून क्रांतीच्या कविता म्हटल्या. खामेनेई इतके खूश झाले की त्यांनी मला मिठी मारली," शफिक आबिदी यांना आजही ती घटना आठवते.
आज इराणमध्ये 86 वर्षीय खामेनेई यांच्या कठोर शासनाला इराणी जनता प्रचंड नाखुश आहे, मात्र इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे अनेकांना जड अंतःकरणाने का होईना, खामेनेईच्या विरोधात असूनही एकत्र उभं राहावं लागत आहे. याच घडामोडीमुळे भारतातील मिनी इराण ज्याला ‘लिटिल इराण’ असे ओळखले जाते, तिथेही त्याचे पडसाद उमटत आहे. हे लिटिल इराण म्हणजे कर्नाटकच्या अलिपूरसारखे ठिकाण, जिथे आता जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
कर्नाटकच्या अलिपूरचे इराणशी एक खास नातं आहे…
अलिपूर हे चिक्कबल्लापूर जिल्ह्यातील 25,000 लोकवस्तीचे गाव आहे, जिथे जवळपास 90 टक्के जनता शिया मुस्लीम असून त्यांचे मूळ इराणशी संबंधित आहे. शफिक आबिदी म्हणतात, "मी चौदाव्या पिढीतला आहे." आजही आमच्या अलिपूरमधून जवळपास 50 विद्यार्थी इराणमधील क़ुम शहरात इस्लामी धर्मशास्त्र शिकत आहेत, आणि 15 जण तेहरानमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. अनेकजण मशहद आणि क़ुमला यात्रा किंवा व्यापारासाठी जातात.
‘’इस्त्रायल-इराण युद्ध सुरू झालयं, मात्र आम्ही इथे बसून फारसं करू शकत नाही. पण आमच्या प्रार्थनांमध्ये इराण कायम आहे."आबिदी सांगतात. मात्र त एका क्षणाचाही विलंब न करता पुढे लगेचच म्हणतात की, "आम्ही इंडो-इराणी असलो तरी आमची निष्ठा भारताशीआहे. आमचा ‘मुल्क’ आता हाच भारत देश आहे.’’
अलिपूरसारखेच लडाखमधील कारगिल, बिहारमधील किशनगंज आणि मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्येही अशा अनेक "मिनी इराण" आहेत. बहुतेकजण उशिरा 19व्या शतकात इराणहून भारतात आलेले असून यामध्ये झरथोस्त्री (झोराष्ट्रियन) धर्मीय आणि शिया मुस्लिम दोघेही आहेत. विशेष म्हणजे झोराष्ट्रियन इराणी हे पारशींपेक्षा वेगळे आहेत. पारशी समुदाय भारतात अनेक शतकांपूर्वी आला होता.
संबंधित लेख वाचा: 1) …आणि आता असचं म्हणावं लागतयं, ‘इथे एक इराणी होता...’! |
बिहारच्या किशनगंज शहरात आजही इराणची पर्शियन भाषा बोलली जाते…
परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, भारतात राहणाऱ्या इराणी लोकांची एकूण संख्या सुमारे 10,765 आहे. बिहारच्या ईशान्य भागात असलेले किशनगंज हे एक शहर आहे ज्याला अनेकदा भारताचे मिनी इराण म्हटले जाते. येथे शिराझ (इराण) या भागातल्या शिया समुदायाची वस्ती आहे, जे सुमारे 500 वर्षांपूर्वी मुघल काळात भारतात आले होते. पूर्वी हे लोक घोडे विकायचे आणि आज ते कुलूप आणि चाव्या, फोटो फ्रेम, चष्मा आणि मौल्यवान दगडांचा व्यापार करतात. किशनगंजचे वैशिष्ट्य असे की हा समुदाय अजूनही पर्शियन भाषा बोलतो, तर सार्वजनिक जीवनात ते हिंदी, उर्दू आणि कधीकधी बंगाली वापरतात. त्यांचा मुख्य सण मोहर्रम आहे, जो ते पारंपारिक इराणी शैलीत साजरा करतात.
जर आपण या जिल्ह्यातील त्यांच्या लोकसंख्येबद्दल बोललो तर 2011 च्या जनगणनेनुसार, किशनगंज जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 16,90,400 आहे, ज्यामध्ये मुस्लिमांची संख्या 11,49,095 आहे. येथे विशेषतः हुसेनाबाद आणि आसपासच्या भागात शिया मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय आहे. जरी शिया मुस्लिम लोकसंख्येचा अचूक टक्केवारी उपलब्ध नसला तरी, त्यांची संख्या देशाच्या इतर भागांपेक्षा खूपच जास्त आहे. हे प्रामुख्याने इराणी वंशाचे शिया मुस्लिम आहेत.
‘मशीद-ए-इरानी’... मुंबईतील इराणी संस्कृतीची एक महत्त्वाची खूण
मुंबईत पारसी आणि शिया इराणी लोक मोठ्या संख्येने राहतात. 19-20 व्या शतकात इराणहून पारसी आणि काही शिया मुस्लिम समुदाय ब्रिटिश भारतात आले होते. मुंबईत ते स्थायिक झाले होते. या लोकांनी मुंबईत इराणी हॉटेलचा पाया रचला. आजही मुंबईत इराणी हॉटेल प्रसिद्ध आहेत. कयानी अँड कंपनी, ब्रिटानिया अँड कंपनी आदी इराणी हॉटेल प्रसिद्ध आहेत. या कॅफेत इराणी चहा, खिमा पाव, ब्रुन मस्का आदी पदार्थ मिळतात. मुंबईत इराणी समुदायात शिया मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. सध्या मुंबईत अडीच हजार इराणी लोक राहतात.
पुण्यातही पारसी आणि इराणी समुदाय राहतो. पुण्यात कॅफे गुडलक सारख्या कॅफेमुळे इराणी संस्कृती जिवंत आहे. पारसी धर्माचे लोक अग्नि मंदिरात पूजा करतात. नवरोज सारखे उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे करतात.
मुंबईतील नागपाड्याजवळ एक प्रसिद्ध इराणी रेस्टॉरंट चालवणारे असद असकरी सांगतात, "माझे काका, मामा, चुलत भावंडं इराणमध्ये आहेत. पण इंटरनेट बंद असल्यामुळे संपर्कच होत नाही." शेवटचा संवाद झाला तेव्हा ते तेहरानहून याझदकडे जात होते.
मुंबईच्या डोंगरी भागात एक ऐतिहासिक मुघल मशीद आहे जी ‘मशीद-ए-इरानी’ म्हणूनही ओळखली जाते. ही मुंबईतील इराणी संस्कृतीची एक महत्त्वाची खूण आहे. 1860च्या दशकात बांधलेली ही शिया मशीद मोहम्मद पैगंबरांचे नातू, इमाम हुसैन यांच्या करबला युद्धातील शहादतीच्या वेळी बांधण्यात आली होती. आजही, मुहर्रममध्ये, दु:ख भरलेल्या ‘इराणी मर्सिया’ कवितांनी ही मशिद गूंजून जाते.
"मुंबईतही दोन प्रकारचे इराणी आहेत… एक, जे 1979 च्या क्रांतीचे समर्थक आहेत; दुसरे, जे रझा शाह पहलवी यांचा पूर्वकाल परत यावा असं वाटणारे आहेत. पण कोणीच आपल्या भावना उघडपणे बोलत नाही, कारण टार्गेट होण्याची भीती आहे," असं एका ज्येष्ठ शिया मुस्लिमाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
फ्रेंच बेकरी 'एल'ओपेरा'चे संस्थापक काझेम सामंदरी 1988 मध्ये फक्त 7 व्या वर्षी इराणमधून बाहेर पडले. झुलन आणि फ्रान्समध्ये फिरल्यानंतर त्यांनी 2008 मध्ये भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. बहाई धर्मीय असलेल्या सामंदरी यांचे कुटुंब इराणमध्ये धार्मिक अत्याचाराचे बळी ठरले आहे. त्यांच्या नातेवाइकांची हत्या झाली, मालमत्ता हिसकावून घेतली गेली. तरीही ते इराणबद्दल कटुता ठेवत नाहीत. "बहाई धर्म हे सर्वसमावेशक बंधुभावाचे प्रतीक आहे. या घटना (जसे की वडिलांना व भाऊबंदांना गोळ्या घालून मारणे) अपवाद आहेत," असं ते सांगतात.
"तुम्ही इराणमधून बाहेर पडू शकता, पण इराण तुमच्यातून बाहेर जात नाही."
सामंदरी यांच्या दिल्लीतील घरी ते ‘शिरीन पुलाव’सारख्या इराणी खाद्यसंस्कृतीला जपत आहेत, पण इंटरनेट बंद असल्यामुळे ते आपल्या कुटुंबाशी संपर्क साधू शकलेले नाहीत.
माजी राजदूत अनिल त्रिगुणायत यांचं म्हणणं आहे की, भारतातील ‘मिनी इराण’ला ‘घेट्टो’ म्हणून पाहणं चुकीचं आहे. "जिथे एकसमान पार्श्वभूमीची लोकं असतात, तिथे ते एकत्र राहतातच. अमेरिकेत ‘लिट्टल इंडिया’ आहे तसंच हेही आहे." ते सांगतात की ‘शुद्ध शिया’ अशी संकल्पना भारतात योग्य नाही. "बहुतेकजण येथे जन्मलेले, येथेच लग्न केलेले आणि इथेच मुळं रुजवलेले आहेत." मात्र ते कबूल करतात की इराणवर हल्ला झाला की भारतातील शिया समाज भावना व्यक्त करतो. "प्रार्थना सभांपासून ते निदर्शने होतात. त्यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नातं आहे. इराणच्या प्रतिकारावर अनेक भारतीय शियांचा अभिमान आहे."
पुण्यात ‘शीशा जॅझ कॅफे’ चालवणारे 70 वर्षीय मेहदी निरूमंद म्हणतात, "तुम्ही इराणमधून बाहेर पडू शकता, पण इराण तुमच्यातून बाहेर जात नाही." पुण्यात जन्मलेले आणि वाढलेले असले तरी ते आणि त्यांची पत्नी दरवर्षी इराणला जातात. "आमचे खूप नातेवाईक तिकडे आहेत, विशेषतः माझा पुतण्या जो आजारी आहे आणि तेहरानमधून बाहेरही पडू शकत नाही."
लडाखच्या कारगिरीमधील 48 टक्के शिया मुस्लिम काय म्हणतात?
लडाखमधील कारगिल जिल्ह्यात, जिथे शिया लोकसंख्या सुमारे 48 टक्के आहे, तेथील 'इमाम खोमेनी मेमोरियल ट्रस्ट' (IKMT) स्थानिक समाज एकवटून काम करत असतो. गेल्या एप्रिलमध्ये त्यांनी इयत्ता ६वीच्या एका पुस्तकात खोमेनी यांना "जगातील सर्वात वाईट लोकांमध्ये" दाखवल्याबद्दल प्रकाशकाला माफी मागायला भाग पाडले होते. 13 जून रोजी जेव्हा इराण-इस्रायल संघर्ष तीव्र झाला, तेव्हा त्यांनी शुक्रवारी नमाजानंतर निदर्शने केली. "15 जूनला 5,000 हून अधिक लहान मुलांनी देखील एक जुलूस काढला. आम्ही अन्यायाविरुद्ध उभं राहण्यावर विश्वास ठेवतो," असं IKMT चे वरिष्ठ सदस्य हाजी असगर अली करबलायी सांगतात.
कारगिलचे राजकीय कार्यकर्ते सज्जाद कारगिली सांगतात की, हे नातं फक्त धर्मापुरतं मर्यादित नाही. "काश्मीरमधील पेपर माशे कला, हरिसा सारख्या खाद्यपदार्थांमध्ये इराणी प्रभाव दिसतो. नवरोझ केवळ पारश्यांपुरता न राहता शिया समाजातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो."
एक विशेष ऐतिहासिक संदर्भ म्हणजे, आयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचे आजोबा सय्यद अहमद मुसवी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बाराबंकीजवळील किंतूर गावात झाला होता. नंतर ते १९व्या शतकात इराणला स्थलांतरित झाले.
बिहारमध्येही किशनगंज येथेही "इराणी" म्हणून ओळखला जाणारा एक लहान समुदाय आहे. त्यांच्या पूर्वजांनी मुघल काळात शिराझहून घोड्यांच्या व्यापारासाठी स्थलांतर केलं होतं. 21 वर्षीय व्हिडिओग्राफर साहिल अब्बास यांच्या व्हॉट्सअॅप डीपीवर आयातुल्ला खामेनेई यांचा फोटो आहे. तो सांगतो, "आम्ही निदर्शने करत नाही, पण इराणी संस्कृती, मानवतेवर आधारित व्हिडीओ बनवतो… द्वेषावर नाही."
"माझं स्वप्न पलायनाचं नाही… अभिव्यक्तीचं आहे. मी इराणबद्दल बोलतो, पण माझं आयुष्य इथेच भारतात आहे. मी दोन्ही संस्कृती दाखवू इच्छितो, इराणचीही आणि आपलीसुद्धा." असं साहिल म्हणतो.






