रणजितसिंह राजपूत
- जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच एक हत्याकांड आदिवासी बांधवांचे नंदुरबारच्या रावलापाणी येथे झाले होते. भारताच्या इतिहासाच्या पानांवर याची कुठेही नोंद नाही.
- रावलापाणीच्या जंगलात २ मार्च १९४३ च्या त्या रात्री नेमकं काय घडलं…?
जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच एक हत्याकांड आदिवासी बांधवांचे नंदुरबारच्या रावलापाणी येथे झाले होते, मात्र भारताच्या इतिहासाच्या पानांवर याची कुठेही नोंद नव्हती. ब्रिटिशकालीन नोंदींमध्ये मात्र या घटनेच्या वस्तुनिष्ठ वर्णनांचे पुरावे आहेत. एवढेच नाही तर रावलापाणी' संग्रामस्थळी अंदाधुंद गोळीबाराच्या 'निशाण्या' तेथील कातळावर आजही इतिहासाच्या स्मृती जाग्या करतात.
आदिवासीचे हे हत्याकांड घडलं होतं, आजच्याच दिवशी म्हणजे २ मार्च १९४३ या दिवशी… नंदुरबार जिल्ह्यातील पूर्वीच्या अक्राणी महाल आणि सध्याच्या धडगाव तालुक्यातील ‘रावलापाणी’ येथे आदिवासी सत्याग्रहींवर ब्रिटिशांनी केलेल्या बेछूट गोळीबारात अनेक आदिवासी शहीद झाले होते.
या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी देशभर चळवळी, सत्याग्रह, आंदोलने झाली. यात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचेही योगदान उल्लेखनीय आहे. भलेही झालेल्या बलिदानाच्या स्मृती जागविण्यात आदिवासी कमी पडले असतील म्हणून त्याचे मोल कमी होऊ शकत नाही. आजच्या शहिद दिवसा निमित्ताने इतिहासाने कधीही न सांगितलेली एक रक्तरंजित कहाणी… "रावलापाणी"!
संत गुला महाराज आणि त्यांची ‘आपधर्म’ चळवळ
देशात स्वातंत्र्याचे वारे जोराने वाहत होते. यात धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल तळोदे तालुका कसा मागे राहील? १९३० नंतरच्या काळात स्वत: आदिवासी सुमुदायाचे असलेले संत गुला महाराज यांनी समाजबांधवांसाठी उभी केलेली आत्मसन्मानाची चळवळ बाळसे धरू लागली होती. दारूबंदी, आत्म व बाह्यशुद्धी, आत्मसन्मानासाठी व कौटुंबिक स्थैर्यासाठी याला चळवळीचे रूप प्राप्त झाले होते. ‘आपधर्मा’च्या स्थापनेतून आत्मसन्मानाचा विचार रुजू लागला होता.

अशातच १९३७ च्या फैजपूर काँग्रेसला उपस्थिती देण्याच्या काँग्रेसजनांच्या प्रयत्नाला यश आले व संत गुला महाराज स्वत: अधिवेशनासाठी मोरवडहून पायी गेले, मात्र प्रस्थापितांच्या वर्चस्वामुळे संत गुला महाराजांना काँग्रेसकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने काँग्रेस चळवळींकडे न वळता ‘आपधर्म’ चळवळ मोठी करण्याच्या कार्यात त्यांनी वाहून घेतले. याला मिळू लागलेला मोठा प्रतिसाद इंग्रज सरकार व प्रस्थापितांना डोळ्यात खुपू लागला. दुर्दैवाने १९ जुलै १९३८ ला संत गुला महाराजांना देवाज्ञा झाली. त्यामुळे संपूर्ण समाजात दारूबंदीचे पाहिलेले स्वप्न मात्र अपुरे राहिले.
त्यांच्या मृत्यूनंतर आपधर्माच्या चळवळीचे दृश्य स्वरूप वृद्धिंगत होत होते. संत गुला महाराज यांचे कनिष्ठ बंधू रामदास महाराज या चळवळीचे अध्वर्यू ठरले. चळवळीचा ओघ आटत नाही हे पाहून इंग्रजांनी नोव्हेंबर १९४१ मध्ये आरती चळवळीवर बंदी घातली. मोरवडला बंदुकधारी शिपाई ठेवण्यात आले.
जो आरतीला जाईल त्याला १ वर्षाची शिक्षा व संत गुला महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार्यास बंदुकीच्या गोळीचा प्रसाद अशी अफवा सर्वदूर पसरविण्यास प्रस्थापित यशस्वी झाले होते. दुसरीकडे दारूबंदीमुळे दारू व्यवसाय बुडायला लागला. प्रस्थापितांनी पिणारे-न पिणारे, खाणारे-न खाणारे अशी भांडणे लावली. यातून निर्माण झालेल्या लुटूपुटूच्या घटनांमधून कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा कांगावा करत त्यास जबाबदार संत रामदास महाराज यांना धरले गेले. त्यांना ४ मे १९४२ रोजी हद्दपार करण्याचा हुकूम तत्कालीन ब्रिटिश शासनाने बजावला.
ब्रिटिशींच्या जुलमी राजवटीविरोधात एकवटली आदिवासांची ‘आपधर्म’ चळवळ
हद्दपारीत रामदास महाराज मोरवडहून मध्य हिंदुस्थानातील राजघाट (चिखलदरा) येथे आपले कुटुंब व अनुयायांसह गेले. याच काळात देशात ‘चले जाव’ चळवळ जोरात होती. तत्कालीन धुळे जिल्हा काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षांनी रामदास महाराजांना पत्र लिहून हद्दपारीची मुदत संपण्याची वाट न पाहता साम्राज्यवाद्यांच्या विरोधातील संघर्षात सामील होण्याचे आवाहन केले. नानासाहेब ठकार स्वत: रामदास महाराजांना विनंती करण्यास राजघाटला गेले. या सर्वांचा परिपाक म्हणून रामदास महाराज नर्मदा नदी पार करून जिल्ह्यात परत यावयास निघाले. रस्त्यात त्यांच्याबरोबर त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने सामील होऊ लागले.

बघता बघता हजारो आदिवासींचा ‘कारवा’ तयार झाला. यात स्त्रियांचाही सहभाग मोठा होता. महाराज गावोगावी समाजबांधवांशी बोलत हेाते. ‘आपधर्म’ समजवून सांगत होते. १ मार्च,१९४३ ला ‘अक्राणी महल’ या किल्ल्यावरून निघालेला हा ‘कारवा’ रावलापाणीजवळच्या निझरा नाल्यात पोहोचला. मोठमोठी झाडे, कीर्र जंगल, खोल नाला, दोन्ही बाजूला मोठ्या टेकड्या, किनार्यावरच मोठे बोरीचे झाड, १५००-२००० लोक थांबतील असा नाल्यातील सपाट भाग अशा स्थितीत मुक्कामासाठी स्त्री-पुरुष तेथे स्थिरावले.
रावलापाणीच्या जंगलात त्या रात्री नेमकं काय घडलं…?
महाराज परतत असल्याबाबतची खबर वरिष्ठांना आधीच कळविण्यात आली होती. सरकार त्यांच्या वाटचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. सर्वात आधी ‘बोरद’ गाव लुटले जाईल, अशी खोटी अफवा पसरविण्यात आली. परिसरात अविश्वासाचे व भीतीचे वातावरण झाले. १ मार्च १९४३ ला ‘बन’ या गावी १ पलटण इंग्रज सैनिक पोहोचवले गेले. सैनिकांनी रात्रीतून पायी जाऊन रामदास महाराजांच्या ‘कारव्या’ला नाल्याच्या दोन्ही बाजूने घेरले.
२ मार्चला सूर्योदयापूर्वी हा ‘कारवा’ मार्गस्थ होताना अचानक दोन्ही बाजूंनी नि:शस्त्र जमावावर बेछूट गोळीबार केला गेला. हे ठिकाण एवढे विचित्र आहे की, येथून पुढे वा मागे जाण्यास तातडीचा मार्ग उपलब्ध नाही. महाराजांना गोळी लागू नये म्हणून त्यांच्या अनुयायांनी ढालीसारखे घेरून ठेवले. या एकतर्फी संघर्षात १५ जणांना जागेवरच हौतात्म्य मिळाले व २८ जखमी झाले.
प्राचार्य जी. बी. शहा यांच्या ‘धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान’ या पुस्तकात हे नमूद आहे. जनार्दन वळवी (हे त्याकाळी तळोद्याला इयत्ता ७ वीत शिकत होते) यांनी दोन बैलगाडी भरून लाकडे रचावीत तशी प्रेते रचून आणल्याचे प्रत्यक्ष पाहिले आहे.

सुमारे ४० प्रेते तळोदे येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आली होती, असे ते म्हणतात. डॉ. जी. बी. शहांनी या हत्याकांडाची जनरल डायरने केलेल्या जालियनवाला हत्याकांडाशी तुलना केली आहे. एकाच ठिकाणी एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने लोक गोळीबारात धारातीर्थी पडले होते. आज त्या ठिकाणी बोरीचे झाड नाही, निझरा नाल्यात तेवढे पाणी नाही, जंगल नामशेष झालेले दिसत असले तरी इंग्रजी क्रूर प्रशासनाने केलेल्या बेछूट गोळीबाराच्या ‘निशाण्या’ या इतिहासाची साक्ष देत आहेत.
पक्क्या दगडात घुसलेल्या गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसतात. प्रत्यक्ष स्थळावर गेल्यावर वेगळ्याच वातावरणाची अनुभूती होते. डोळे पाणावतात, मस्तक नत होते. एकूण परिस्थितीची जाणीव हेाते. परकीयांचे अत्याचार कसे पाषाणहृदयी होते हे लक्षात येते.
नंदुरबार जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळातल्या दोन गोळीबारांपैकी नंदुरबारच्या घटनेत हुतात्मा शिरीषकुमारसह ५ बालकांना हौतात्म्य पत्करावे लागले. तेथे आज हुतात्मा स्मारक उभे आहे, मात्र रावलापाणीचे स्मारक अद्याप आम्ही करू शकलो नाही. तेथे स्मारक होणे ही केवळ स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देणे नाही.
त्या स्मारकापासून प्रेरणा मिळेल, आदिवासींचा खरा इतिहास उजागर होईल, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या सहभागाची माहिती ज्ञात होईल, ‘आप की जय’ चळवळीचा इतिहास कळेल. आजही २ मार्चला दरवर्षी मोरवडचे आपधर्मी न चुकता रावलापाणीच्या संग्रामस्थळी जाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतात.






