विठ्ठल साबळे
नांदेड जिल्ह्यातील कंधार नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक दोन मध्ये झालेला निवडणूक निकाल हा केवळ एका नगरसेवकाच्या विजयापुरता मर्यादित नाही. हा निकाल एका अशा समाजासाठी महत्त्वाचा ठरतो ज्यांचा उल्लेख वर्षानुवर्षे फक्त भटका समाज म्हणून केला गेला, त्या समाजाने मतदान केलं पण कधीच निर्णय प्रक्रियेत आपला माणूस पाहिला नाही. पण आता वैदू समाजातून पहिल्यांदाच एक लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून निवडून येणं ही या समाजासाठी जवळपास पन्नास वर्षांच्या राजकीय वनवासानंतर मिळालेली पहिली संधी मानली जात आहे. कंधारच्या गल्लीबोळात फिरताना हा विजय जल्लोषात नाही तर शांत समाधानात स्वीकारला गेलेला दिसतो. लोकांच्या नजरेत मोठमोठ्या घोषणा नाहीत पण आता आमचा माणूस तिथे आहे ही भावना स्पष्टपणे जाणवते, आणि हाच या निकालाचा खरा अर्थ सांगतो.
(घरोघरी घरगुती वस्तू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी वैदू समाजातील महिला.(Photo credit:Avinash gavli))
कंधार नगरपरिषदेतील या प्रभागात वैदू समाजाची लोकसंख्या सुमारे 700 आहे. याच प्रभागात वडार समाजाचे 500, मुसलमान समाजाचे 350, गोसावी समाजाचे 180, बौद्ध समाजाचे 150 आणि भोई समाजाचे 160 मतदार आहेत. या सर्व समाजांच्या मिश्र लोकसंख्येतून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप संतराम देशमुख यांचा विजय झाला. स्थानिकांशी बोलताना स्पष्टपणे जाणवतं की हा विजय केवळ पक्षीय राजकारणाचा परिणाम नाही तर दीर्घकाळ साठून राहिलेल्या दुर्लक्षाच्या भावनेचा आणि हक्काच्या आवाजाच्या मागणीचा हा परिणाम आहे. अनेक वर्षे इतर समाजांचे नगरसेवक झाले, त्यांनी आश्वासनं दिली पण वैदू समाजाच्या मूलभूत समस्या तशाच राहिल्या आणि त्यामुळे यावेळी समाजाने स्वतःचा निर्णय घेतला.
“माझ्या समाजाने मला संधी दिली आहे आणि मी या संधीचं सोनं करेन”
या सगळ्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप संतराम देशमुख यांचा विजय महत्त्वाचा ठरतो. एमएससी बीएड शिक्षण घेतलेले दिलीप देशमुख ‘बाईमाणूस’ बोलताना सांगतात की, मी शिकलेलो आहे आणि मला पंधरा हजार रुपयांवर नोकरी होती. मी विद्यार्थ्यांना शिकवत होतो पण माझ्या समाजाने मला सांगितलं की तुम्ही उभे राहा तुम्ही शिकलेला आहात आणि तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. ते सांगतात या अगोदर आम्ही फक्त मतदान केलं. निवडणुकीत उभं राहून जिंकू असं कधी वाटलंच नव्हतं. अनेक नेते येतात मतदान मागतात पण निवडणूक झाली की कोणीच ऐकत नाही. आमच्या समस्या तशाच राहिल्या म्हणून समाजाने निर्णय घेतला आणि मला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली.
दिलीप देशमुख सांगतात, माझ्या समाजाने मला संधी दिली आहे आणि मी या संधीचं सोनं करेन. त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास आहे पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही आहे. हा विजय वैयक्तिक नसून समाजाच्या सामूहिक निर्णयाचा परिणाम असल्याचं ते स्पष्ट करतात. समाजाने पहिल्यांदाच स्वतःचा माणूस उभा केला आणि त्याला निवडून आणलं ही बाब वैदू समाजासाठी मानसिकदृष्ट्या मोठी आहे.
(नवनिर्वाचित नगरसेवक दिलीप देशमुख (Photo credit:Avinash gavli ))
वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका पक्षाच्या मूलभूत राजकीय भूमिकेशी सुसंगत असल्याचं पक्षाचे प्रवक्ता तथा प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे सांगतात. त्यांच्या मते, वंचित बहुजन आघाडीचा उद्देश ज्यांना वर्षानुवर्षे राजकीय पटलावरून बाजूला सारलं गेलं, ज्यांना कुठेही प्रवेश मिळत नाही, अशा शोषित-वंचित समाजांना थेट राजकारणात आणि सत्तेच्या केंद्रस्थानी आणणं हा आहे. राज्यभरात याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात, जिथे पारंपरिक राजकारणात ज्यांना उमेदवारीही मिळत नाही, अशा समाजांतील लोकांना पक्षाने तिकीट देऊन निवडून आणलं आहे. कंधारमधील वैदू समाजातून निवडून आलेला नगरसेवक हा याच भूमिकेचा भाग असून, वंचित समाजांच्या हाती सत्ता देण्याचा प्रयत्न पक्ष सातत्याने करत असल्याचं ते स्पष्ट करतात.
वैदू समाजाचे सध्याचे प्रश्न काय आहेत?
वैदू समाजाचा इतिहास पाहिला तर हा समाज पारंपरिकरित्या औषधी वनस्पती, जडीबुटी आणि लोकवैद्यकावर अवलंबून होता. गावोगाव फिरून औषधी वनस्पती विकणं, पारंपरिक उपचार करणं, हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य मार्ग होता. मात्र कालांतराने सरकारी आणि खासगी वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या, डॉक्टर आणि दवाखाने वाढले आणि त्याचबरोबर वैदू समाजाचा पारंपरिक व्यवसाय हळूहळू ठप्प झाला. व्यवसाय गेला पण त्याला पर्याय उभा राहिला नाही. त्यामुळे या समाजाला नव्या पद्धतीने जगण्याचा संघर्ष करावा लागला. आज कंधारमध्ये वैदू समाजाची आर्थिक स्थिती पाहिली तर ती अजूनही अस्थिर आहे आणि रोजच्या कष्टावर अवलंबून आहे.
आज वैदू समाजातील पुरुष पत्र्यापासून चाळणी बनवणं, घरगुती वापराच्या वस्तू तयार करणं, उन्हाळ्यात कुल्फी आणि आईस्क्रीम विकणं अशा छोट्या मोठ्या कामांवर अवलंबून आहेत. महिलांची स्थितीही काही वेगळी नाही. त्या घरोघरी जाऊन बांगड्या, कानातले, झुमके, घरगुती उपयोगाच्या वस्तू विकतात आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. हा व्यवसाय कोणतीही स्थिरता देणारा नाही. आज मिळालं तर उद्या मिळेलच याची खात्री नाही. तरीही हा समाज आपला संघर्ष चालू ठेवतो.कारण दुसरा पर्यायच नाही.
“आता आमच्या समाजाचा हक्काचा माणूस निवडून आला आहे”
याच वस्तीतील वैदू समाजातील महिला सखुबाई दादाराव देशमुख बोलताना आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहत सांगतात की, आधी आमचा समाज रोजीरोटीसाठी गावोगाव भटकायचा. लोक आम्हाला भिकाऱ्यासारखी वागणूक द्यायचे. खाण्यासाठी काहीच नसायचं तेव्हा दारोदारी भटकंती करावी लागायची. मुलाबाळांचं पोट भरण्यासाठी भीक मागावी लागायची. भाकरीच्या तुकड्यासाठी लोकांकडे विनवणी करायचो आणि देवो माय देवो लेकरासाठी देवो, देव तुझं भलं करेल असं म्हणत दरवाजे ठोठवावे लागायचे. त्यांच्या शब्दांतून केवळ गरिबी नाही तर सामाजिक अपमान आणि उपेक्षेची खोल जखम दिसते. मात्र त्या पुढे सांगतात की आता आमच्या समाजाचा हक्काचा माणूस निवडून आला आहे आणि त्यामुळे कामं होतील अशी आशा वाटते.
(वैदू समाजातील महिला सखुबाई देशमुख (Photo credit:Avinash gavli))
पारंपरिक व्यवसाय बुडाला, आता जगण्याचे नवे प्रश्न
‘बाईमाणूस’शी बोलताना वैदू समाजातील संतोष दादाराव देशमुख सांगतात की, वैद्यकीय सुविधांमुळे आमचा पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. औषधी वनस्पती विकणं हा आमच्या आजोबा पंजोबांचा व्यवसाय होता पण डॉक्टर आले आणि आमचा व्यवसाय हळूहळू संपला. गेली पाच-सहा दशकापासून आम्ही वाटेल तो व्यवसाय करून पोट भरतो आहोत. पत्र्याची चाळणी बनवणं, कुल्फी विकणं, छोट्या मोठ्या कामांतून रोजीरोटी मिळवणं हाच मार्ग उरला आहे. महिला सुद्धा घरोघरी जाऊन बांगड्या, झुमके आणि घरगुती वस्तू विकतात. कष्टाशिवाय पर्याय नाही असं ते सांगतात. या विधानातून समाजाच्या बदललेल्या वास्तवाचं चित्र स्पष्ट होतं.
वैदू समाजाच्या आर्थिक स्थितीवर आणखी एक महत्त्वाचा परिणाम करणारा मुद्दा म्हणजे या समाजाकडे शेती नाही. कंधारमधील वैदू समाजातील कुटुंबांकडे कोणतीही शेतजमीन नाही आणि शेती धान्य पिकवणं हा व्यवसाय त्यांच्या जीवनाचा भाग कधीच राहिलेला नाही. त्यामुळे स्थिर उत्पन्नाचा कोणताही आधार या समाजाला मिळू शकला नाही. रोजच्या हाताला मिळेल त्या कामावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून राहिला. याच असुरक्षिततेमुळे शिक्षण, आरोग्य आणि भविष्यासाठी नियोजन या गोष्टी या समाजासाठी नेहमीच दुर्लक्षित ठरत गेल्या.
या समाजासमोरील एक मोठा प्रश्न म्हणजे शिक्षण. कंधारमधील वैदू समाजाच्या वस्तीत फिरताना काही मोजकीच मुलं शिकतायत. बहुतांश विद्यार्थी सहावी किंवा सातवीपर्यंत शिक्षण घेतात, मात्र त्यानंतर शाळा सोडतात. परिस्थिती पाहून ही मुलं आपल्या आई वडिलांना उदरनिर्वाहासाठी हातभार लावू लागतात. काही जण हॉटेलमध्ये काम करतात, तर काही दुकानांमध्ये किंवा छोट्या मोठ्या कामांसाठी बाहेर जातात. प्रभागांमधील स्थानिक रमेश देशमुख सांगतात की, त्यांनीही हेच वास्तव पाहिलं आहे. त्यांच्या मते ज्या कुटुंबांमध्ये आई वडील स्वतः शिकलेले आहेत, त्या कुटुंबांतील मुलांचंच शिक्षण पुढे सुरू राहतं. उर्वरित बहुसंख्य कुटुंबांमध्ये मात्र शिक्षण गरजेपुरतंच मर्यादित राहिलेलं दिसतं.
वैदू समाज अनेक सरकारी योजनांपासून दूर असल्याची तक्रारही स्थानिकांकडून वारंवार ऐकायला मिळते. घरकुल योजना असो किंवा इतर सामाजिक योजना असोत आमच्यापर्यंत त्या पोहोचत नाहीत असं लोक सांगतात. अनेक वेळा फॉर्म भरले पण पुढे काहीच झालं नाही अशी भावना समाजात आहे. आरक्षणाचा मुद्दाही या समाजासाठी महत्त्वाचा आहे पण त्याचाही प्रत्यक्ष फायदा जमिनीवर दिसत नाही अशी तक्रार आहे. योजनांची कागदपत्रं भरली जातात पण त्याचा परिणाम होत नाही आणि त्यामुळे सरकारबद्दल नाराजीही दिसते.
(दैनंदिन उपजीविकेसाठी पत्र्याच्या चाळण्या बनवणारा वैदू समाजातील तरुण.(Photo credit:Avinash gavli))
या समाजाच्या काही परंपरा इतर समाजांपेक्षा वेगळ्या आहेत. वैदू समाजात अंत्यसंस्काराची पद्धत वेगळी असून मृतदेह जमिनीत अंतर्भूत केला जातो. ही परंपरा त्यांच्या जीवनशैलीचा आणि इतिहासाचा भाग आहे. मात्र आधुनिक व्यवस्थेत या समाजाच्या परंपरा आणि गरजा फारशा समजून घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे अनेकदा हा समाज मुख्य प्रवाहापासून आणखी दूर गेला.
कंधारमध्ये फिरताना कुठेही मोठा जल्लोष किंवा उत्सव दिसत नाही. पण लोकांच्या बोलण्यात एक शांत बदल जाणवतो. आता आमचा माणूस नगरसेवक आहे. ही भावना लोक पुन्हा पुन्हा व्यक्त करतात. हा केवळ एका नगरसेवकाचा विजय नाही तर पिढ्यानपिढ्या वंचित राहिलेल्या समाजाच्या आत्मसन्मानाची सुरुवात आहे. पाणी रस्ते घरकुल शिक्षण यांसारख्या प्रश्नांवर आता बाहेरच्यांवर अवलंबून राहावं लागणार नाही अशी अपेक्षा समाज व्यक्त करत आहे.
नांदेड जिल्ह्यातील कंधार नगरपरिषदेचा हा निकाल केवळ राजकीय नाही. हा वैदू समाजाच्या इतिहासात नोंद होणारा क्षण आहे. पन्नास वर्षांच्या राजकीय उपेक्षेनंतर या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं आहे. आणि हा लोकप्रतिनिधी किती बदल घडवेल हे पुढचा काळ ठरवेल पण आजच्या घडीला एवढं नक्की की कंधारमधील हा विजय वैदू समाजासाठी नव्या प्रवासाची सुरुवात आहे आणि त्या प्रवासाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.






