Skip to main content

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांची बदनामी करणारा ‘जेम्स लेन’ कोण होता आणि सध्या तो काय करतोय…?

Suraj Patke
07 Jan 2026
5 min read
97 views
राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांची बदनामी करणारा ‘जेम्स लेन’ कोण होता आणि सध्या तो काय करतोय…?

सुरज पटके


  • जेम्स लेनच्या वादग्रस्त  'शिवाजी : हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया'  या पुस्तकाबद्दल ‘ऑक्सफर्ड’ने दोन दशकानंतर का मागितली माफी?
  • कोण होता जेम्स लेन आणि त्याने हे पुस्तक का लिहिलं?
  • राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांबद्दलची अवमानकारक लिखाणाची माहिती जेम्स लेनला कोणी पुरवली?



राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापणाऱ्या जेम्स लेनचं महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं भूत तब्बल २३ वर्षानी उतरलं आहे असं म्हणायला आता हरकत नसावी. याचं कारण म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने त्या प्रकाराबद्दल मागितलेली जाहीर माफी…दोन दशकांपूर्वी प्रकाशित झालेल्या 'शिवाजी : हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया' या जेम्स लेनच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने मंगळवारी जाहीर नोटीस प्रसिद्ध करून छत्रपतींचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांची माफी मागितली आहे.


याबद्दलची माहिती स्वत: उदयनराजे भोसले यांनीच दिली आहे. एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या सार्वजनिक जाहीर सुचनेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने कबूल केलं आहे की, 2003 साली प्रकाशित झालेल्या 'शिवाजी : हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया' या पुस्तकातील पान क्र. 31, 33, 34 आणि 93 वरील काही मजकूर पडताळणी न केलेला होता. प्रकाशनाने याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.


‘ऑक्सफर्ड’ने दोन दशकानंतर का मागितली माफी?


उदयनराजेंनी याबाबत एक सविस्तर पोस्ट लिहित या प्रकरणाबद्दल माहिती दिलीय. ते म्हणतात, "या पुस्तकातील काही परिच्छेद व उतारे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा मलिन करणारे आणि अपमानास्पद होते. या विरोधात सातारा येथील माननीय मुख्य न्यायाधीश दंडाधिकारी समोर फौजदारी केस क्र. 3230 /2004 ही खासगी तक्रार दाखल केली होती.


User Image

या कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी सैयद मंझर खान जे OUP चे संपादक होते, तसंच डॉ. श्रीकांत बहुळेकर, सुचेता परांजपे आणि व्ही एल मंजूळ या चौघांनी रिट याचिका दाखल केली. तसंच तक्रारदार म्हणजे उदयनराजे भोसलेंची माफी मागण्याचीही तयारी दाखवली. 17 डिसेंबरला कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशांनंतर 6 जानेवारीला मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये ही माफी प्रकाशित करण्यात आली.


कोण होता जेम्स लेन?


जेम्स डब्ल्यू लेन हा मूळचा अमेरिकन लेखक व प्राध्यापक. मिनेओस्टा नावाच्या राज्यात मॅकॅलेस्टर कॉलेजच्या धार्मिक अभ्यास केंद्राचा तो प्रमुख होता. सुप्रसिद्ध अशा हार्वर्ड विद्यापीठात त्याने थिऑलॉजी या विषयात त्याने डॉक्टरेट मिळवली होती. धर्मशास्त्र विषयातील एक हुशार शिक्षक म्हणून तिथे त्याला ओळखलं जायचं. जवळपास १६ वर्षे तो आपल्या विद्यापीठात धर्मशास्त्र विषयाचा विभागप्रमुख म्हणून कार्यरत होता. त्याचा संस्कृतचा अभ्यास मोठा होता. भारत चीन सारख्या पूर्वेकडील देशांमधील धर्माचा तो अभ्यास करायचा.


जेम्स लेनने 1989 साली 'व्हिजन ऑफ गॉडः थिओफनी नॅरेटिव्ह्ज इन द महाभारत' नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं. 2001 साली त्याने 'द एपिक ऑफ शिवाजी' नावाचं पुस्तक लिहिलं. 2003 साली त्यांनी 'शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' पुस्तक प्रसिद्ध केलं. 2014 साली त्यांनी 'मेटा रिलिजनः रिलिजन अँड पॉवर इन वर्ल्ड हिस्ट्री' हे पुस्तक प्रसिद्ध केलं. या पुस्तकात त्यांनी धर्म आणि राजकीय शक्ती यांच्या नात्यावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचा उहापोह केला आहे.


'शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हे पुस्तक जेम्स लेनने का लिहिलं?


आपण हे पुस्तक का लिहितोय हे सांगताना जेम्स लेन पुस्तकाच्या परिचयाच्या प्रकरणत लिहितो, "शिवाजी हे त्यांच्या काळात आख्यायिकेप्रमाणे झाले असतील, पण गेल्या 300 वर्षांमध्ये ही आख्यायिका विस्तारत गेली आहे. त्यामुळे पुस्तक लिहिताना मी दोन कामं केली आहेत. पहिलं म्हणजे शिवआख्यायिकेच्या कथानकाची तपासणी आणि दुसरं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीय हिंदू ओळखीशी त्यांचा संबंध जोडला जावा इतपत त्यामध्ये पडलेली भर."


User Image

या पुस्तकाच्या 93व्या पानावर शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांच्याबद्दल बदनामी करणारा मजकूर गावगप्पा म्हणून देण्यात आला. त्याला महाराष्ट्रातील इतिहासकारांनी आणि शिवप्रेमींनी जोरदार आक्षेप घेतला.


असं सांगितलं जातं की, या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी जेम्स लेन पुण्यात आला होता. त्याने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत संशोधन केल्याचं सांगण्यात आलं. जेम्स लेनच पुस्तक ऑक्सफर्ड पब्लिकेशन या संस्थेने प्रकाशित केलं. या पुस्तकात जेम्स लेनने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत बदनामीकारक लिखाण केलं होतं.


जेम्स लेनच्या या वादग्रस्त पुस्तकावरून महाराष्ट्र पेटून का उठला?


५ जानेवारी २००४… पुण्यातील सुप्रसिद्ध भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर जोरदार हल्ला झाला. शेकडोंचा जमाव या संस्थेवर चालून आला होता. अनेक पुस्तके व तिथली साहित्याची नासधूस करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाची कडक शब्दात निर्भत्सना केली. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर झालेल्या हल्ल्याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली. संभाजी ब्रिगेडने हा हल्ला आम्ही केला असं सांगत त्याची जबाबदारी स्विकारली. सोबतच हा हल्ला का केला याच कारण देखील सांगितलं.


जेम्स लेनच्या या वादग्रस्त पुस्तकावरून महाराष्ट्र पेटून उठला. यातूनच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला केला. याचे राजकीय पडसाद उमटले, सर्व राजकीय नेत्यांनी या पुस्तकाचा निषेध केला. महाराष्ट्राच्या विधिमंडळात घनघोर चर्चा झाली. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या पुस्तकावर बंदी घातली. या बंदीवरून देखील महाराष्ट्रात दोन भाग पडले. एका बाजूचे म्हणणे होते कि जेम्स लेनच्या पुस्तकाला बंदी घातली पाहिजे तर दुसऱ्या बाजूचे म्हणणे होते कि बंदी व चर्चा यामुळे जेम्स लेन ला फुकट प्रसिद्धी मिळत आहे, ही बंदी नकोच. शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या लोकांचं देखील असच मत होतं.


User Image

या जेम्स लेन प्रकरणात महाराष्ट्रातील काही इतिहास संशोधक व साहित्यिकांवर टीका झाली. जेम्स लेनला लिखाण करण्यासाठी मदत केल्याचे आरोप झाले. या वादाचे रंग बदलू लागले होते. गृह मंत्री आर आर पाटील यांनी जेम्स लेन याच्या मुसक्या बांधून त्याला भारतात परत आणण्याची घोषणा केली.


न्यूयॉर्क मधल्या ऑक्सफर्ड पब्लिकेशनने हे भारतीय समाजमनाची भावना लक्षात घेऊन माफी मागितली व हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला. भारतात या पुस्तकावर कोर्ट केसेस देखील दाखल झाल्या.


वादाच्या पार्श्वभूमीवर जेम्स लेन काय म्हणाला?


तिकडे जेम्स लेन मात्र निवांत होता. त्याची मॅकॅलेस्टर कॉलेजमध्ये प्राध्यापकी व्यवस्थित सुरु होती. त्याच्यावर प्रचंड आरोप झाले. अगदी मारण्याच्या धमक्या देखील आल्या. पण जेम्स लेनच्या पाठीशी त्याची संस्था उभी राहिली. दरम्यान जेम्स लेनने या राजकीय घटनेची सखोल पार्श्वभूमी देणारा Resisting My Attackers, Resisting My Defenders. या शीर्षकाचा एक लेखही लिहिला.


तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी २००४ च्या १६ मार्चला 'द हिंदू' या वर्तमानपत्रात मुलाखत देताना 'आपण या पुस्तकाच्या बंदीच्या विरोधात आहोत," ठामपणे सांगितलं. पुढे २०१० साली सर्वोच्च न्यायालयाने या पुस्तकावरील बंदी उठवली. जेम्स लेनच्या मुसक्या बांधून आणायच्या घोषणा हवेतच विरून गेल्या, भारतात ज्या जेम्स लेन वरून वाद विवाद होत होते त्या जेम्स लेनला अमेरिकेत त्याच्या विद्यापीठाने थॉमस जेफरसन पुरस्काराने सन्मानित करण्याचा निगरगट्टपणा दाखवला.


बाबासाहेब पुरंदरेंनी माहिती पुरवली होती का?; जेम्स लेन म्हणतो…


'शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक लिखाण करणारा लेखक जेम्स लेन याने पुस्तक लिखाणासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरविलेल्या माहितीचा आधार घेतला होता,' असा आक्षेप सातत्याने घेतला जात असताना, 'मी बाबासाहेब पुरंदरे यांना कधीही भेटलो नव्हतो, वा त्यांच्याशी कधीही चर्चा केली नव्हती,' असा दावा जेम्स लेन याने चार वर्षांपूर्वी केला होता.


User Image

जेम्स लेन याची छोटेखानी मुलाखत 'मुंबई तक' या वेबसाइटने त्यावेळी प्रसिद्ध केली होती. 'शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या पुस्तकात मी कोणताही इतिहास सांगितलेला नसून, शिवाजी महाराजांबाबत प्रचलित असलेल्या कथांबाबतचे ते लिखाण आहे,' असे त्याने सांगितले. 'हे पुस्तक लिहिताना मी एका शब्दानेही पुरंदरे यांच्याशी चर्चा केलेली नाही,' असे लेनने न्हटले होते; मात्र जिजाऊसाहेबांबाबतचा बदनामीकारक मजकूर आपल्याला कुणी पुरवला, या कळीच्या प्रश्नाचे थेट उत्तर देणे मात्र त्याने टाळले.


'महाराष्ट्रातील एक गट तुकारामांना शिवाजी महाराजांचे गुरू मानतो, तर दुसरा गट रामदास स्वामींना शिवरायांचे गुरू मानतो,' असेही लेनने त्या मुलाखतीत म्हटले. 'बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर होत असलेले आरोप हे अठराव्या व एकोणिसाव्या शतकात वाचल्या गेलेल्या इतिहासाचा परिपाक आहे. त्या काळी काही ब्राह्मणांना शिवाजी महाराजांचे वंशज हे खरेखुरे क्षत्रीय नसल्याचे वाटत असे. त्यातून निर्माण झालेल्या रोषाचा परिणाम मराठा व ब्राह्मण यांच्यात इतिहासाच्या आकलनावरून झालेल्या वादात पाहायला मिळतो,' असे लेन याचे म्हणणे होते.


दोन दशके राजकारणावर प्रभाव टाकणारा वाद



  • 90 च्या दशकात जेम्स लेन अभ्यास करण्यासाठी भारतात आला होता.
  • पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत अभ्यासाला सुरुवात.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा समाज मनावर झालेला परिणाम यावर पुस्तक लिहिण्याचा निर्णय
  • जून 2003 मध्ये 'Shivaji:Hindu King in Islamic India' हे पुस्तक प्रकाशित झाले.
  • ऑक्सफर्ड प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले.
  • प्रकाशनानंतर पुस्तकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला.
  • इतिहास संशोधकांनी ऑक्सफर्ड इंडिया प्रेस ला पत्र लिहून या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली.
  • 21 नोव्हेंबरला ऑक्सफर्ड प्रेसने या पुस्तकाबद्दल माफी देखील मागितली.
  • पुस्तकाबद्दल भांडारकर प्राच्यविद्या शिक्षण संस्थेला जबाबदार धरण्यात आले तसेच संस्थेच्या कार्यालयात शिवसेनेच्या वतीने तोडफोड करण्यात आली.
  • भांडारकर संस्थेतील संस्कृत भाषेचे अभ्यासक श्रीकांत बहुलकर यांना काळे फासण्यात आले
  • 5 जानेवारी 2004 रोजी पुन्हा भांडारकर संस्थेवर हल्ला झाला.
  • 6 जानेवारी २०२६ ला मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये माफी प्रकाशित करण्यात आली.




Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...