एखाद-दुसऱ्याला एक वेळ मूर्ख बनवता येते; परंतु सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही, अशा आशयाचा एक सुविचार आहे. मराठीत जैसी ज्याची करणी, तैसे फळ देतो देव असे एक लोकप्रिय गाणे आहे. त्याचा प्रत्यय कधी ना कधी येतो. सत्तेचा, पदाचा आणि पैशाचा माज असला, तरी तो कधीकाळी उतरतोच. त्याला वेळ लागतो, इतकेच. सामान्य लोक कायम म्हणतात, की चांगल्याला वाईट अनुभव येतात आणि वाईटांचे काहीच कसे होत नाही.
पूजा खेडकरसारखी प्रकरणे उघडकीस आल्यानंतर हेच लोक म्हणतात, शिशुपालाचे शंभर अपराध भरायचे होते. भगवान के घर देर है, लेकिन अंधेर नही. एक झाकावे, तर दुसरे उघडे पडते, दुसरे झाकावे तर तिसरे समोर येते अशी गत पूजाची झाली होती.
सत्ता विनयाने शोभते; परंतु सत्तेचा आणि पैशाचा माज केला, पदाच्या जोरावर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला वाकवू शकतो, असा अहंकार आला, की मग फजिती आलीच. त्यातही ज्या घरात पहिल्या दोन पिढ्या प्रशासनात वावरल्या आहेत, त्या घराला प्रशासनातील ‘लूप होल्स’ जसे माहीत असतील, तसेच प्रशासनाच्या विरोधात गेले, तर कितीही मोठा माणूस असला,तरी त्याला प्रशासन कसे सरळ करते, हे माहीत असायला हवे.
एखाद्याने फसवायचे ठरवले असेल, तर तो संपूर्ण व्यवस्थेला फसवू शकतो, सगळ्यांनाच कसे खुळ्यात काढू शकतो, हे पूजाच्या प्रकरणाने स्पष्ट झाले.
एखाद्या सराईत गुन्हेगाराला लाजवील, अशा पद्धतीने पूजाने कायद्याची आणि संपूर्ण व्यवस्थेची फसवणूक केली. व्यवस्थेतल्या त्रुटींचा गैरफायदा घेत, सगळे नियम धाब्यावर बसवत पूजा सनदी अधिकारी झाली; परंतु खुर्ची आणि ऐषारामी मागण्यांनीच तिला या टप्प्यावर आणून सोडले.
खोट्याच्या पायावर बांधलेली इमारत फार काळ टिकत नाही, हे जगन्मान्य सत्य तिलाही आता अनुभवायला मिळाले. एक सत्य लपवायला गेले, की अनेकदा असत्याचाच आधार घ्यावा लागतो आणि असे असत्य मग कधी ना कधी अंगलट येते.

वास्तविक घरात पन्नास कोटी रुपयांहून अधिक संपत्ती, बेनामी मालमत्ता, वेगवेगळ्या कंपन्या, पैशाच्या जोरावर मिळवलेली वैद्यकीय शाखेची पदवी असताना प्रशासकीय सेवेचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न पडतो. जिद्द, ध्येय आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करायची तयारी असेल, तर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णयही समजू शकतो;परंतु यापैकी काहीच नाही आणि छानछोकी, मिजास आणि पैशाचा माज नडला.
बरे केंद्रीय लोकसेवा आयोगाने ओबीसी समाजासाठी ठरवून दिलेले परीक्षा देण्याच्या प्रयत्नांची मर्यादा संपल्यानंतर तरी हा मार्ग सोडून द्यायचा, तर ते ही नाही.
एवढे कांड, चमकोगिरी आणि एका मागून एक कारनामे बाहेर आल्यानंतर थेट पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचा आरोप करणे हा तर निर्लज्जपणाचा कळस. आरोप करायचा आणि पोलिसांनी चौकशीला बोलावले, तर यायचेच नाही, याला काय म्हणायचे? एका कथेत तुरुंगात गेलेल्या मुलाला भेटायला त्याची आई आली.
त्याने आईच्या कानाचा कडकडून चावा घेतला. आईने मुलाला विचारले, की तू असे का केलेस, त्यावर त्या कैद्याने दिलेले उत्तर पूजालाही लागू होते. पहिल्या चोरीच्या वेळी आईने त्याचा कान जोरात पिरगाळला असता, तर पुढे त्याचे चोरीच्या मार्गावरून जाणे थांबले असते. पूजाच्या आईवडीलांनी तिला वेळीच रोखले असते, तर आज देशात पूजाच्या नावे जो काळाकुट्ट इतिहास लिहिला गेला, तो लिहिला गेला नसता.
पूजाचे आजोबा, तिचे वडील आणि आईचे वर्तन पोर्शे कार प्रकरणातील अग्रवाल कुटुंबासारखे आहे. पूजाची चूक दिसत असताना तिला त्यापासून परावृत्त करण्याऐवजी तिला फूस दिली, तर तिच्याकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षाच करता येत नाही. गेल्या महिन्याभरात पूजा आणि तिच्या कुटुंबीयांचे वेगवेगळे कारनामे पाहून महाराष्ट्रातल्या जनतेवर थक्क होण्याची वेळ आली आहे.
आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने तिचे सनदी अधिकारी पद काढून घेतले आणि तिला यापुढे परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घातली. पंतप्रधान कार्यालयाने जेव्हा या प्रकरणात दखल घेतली, तेव्हाच पूजा आणि तिच्या कुटुंबीयांना त्यातले गांभीर्य लक्षात यायला हवे होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने एखाद्याचे आयएएस पद काढून घेणे हे दुर्मिळातील दुर्मिळ उदाहरण आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने यासाठी गेल्या 15 वर्षांतील तसेच 2009 ते 2015 या दरम्यानच्या सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची छाननी केली.त्यात 14 हजार 999 उमेदवारांची प्रमाणपत्रे योग्य ठरली आणि एकट्या पूजाचे प्रमाणपत्र बनावट निघाले. यावरून पूजाने जिल्हाधिकारी होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगालाही गंडवले. स्वतः चे नाव तर बदलण्यावर तिचे समाधान झाले नाही.
आई-वडिलांच्या नावाच्या स्पेलिंगमध्येही तिने बदल करून फसवणूक केली. त्यामुळेच पूजाने नेमकी किती वेळा परीक्षा दिली, हे केंद्रीय लोकसेवा आयोगालाही समजले नाही. नाव बदलून तिने अनेकवेळा परीक्षा दिली. नऊ वेळा ओबीसीतून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रयत्नाची मुदत संपल्यानंतरही तिने दिव्यांग प्रवर्गातून दोन वेळा परीक्षा दिल्या. एक चांगले झाले, की पूजा प्रकरणाचा बोध घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता अधिक पारदर्शकता आणि नियम कडक करण्याबरोबरच अशा संशयास्पद प्रकरणांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दरवर्षी हजारो, लाखो उमेदवार देतात. त्यात ओबीसी आणि दिव्यांगांचा समावेश असतो. त्यासाठीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने दिले आहे की नाही, त्यावरची तारीख, प्रमाणपत्रावर काही ओव्हररायटिंग आहे की नाही याची प्राथमिक छाननी केली जाते; परंतु ही सर्व प्रमाणपत्रे खरी आहेत, की नाही याची सत्यता तपासण्याचे साधन किंवा व्यवस्था केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे नाही.
ह्या त्रुटीचा अभ्यास करून पूजाने त्याचा गैरफायदा घेतला. जिल्हा स्तरावर सक्षम अधिकाऱ्यांकडून बनावट प्रमाणपत्रे मिळवली. तिच्या या कटात वैद्यकीय अधिकारी सामील असून त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची गरज आहे. पूजाने संपूर्ण व्यवस्थेसोबत ‘फ्रॉड’ केला असून एका प्रामाणिक उमेदवाराची संधी तिने हिरावून घेतली आहे.
व्यवस्था बदलायची असेल, तर आधी व्यवस्थेचा भाग व्हावे लागते, असा विचार करून अनेक तरुण दिवसरात्र अभ्यास करतात. परिस्थितीशी दोन हात करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी रक्ताचे पाणी करतात. अशा सर्वांच्या दुर्दम्य आशावादाला पूजाच्या कारनाम्यांनी ठेच पोचवली आहे. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या प्रशासनाकडे सर्वसामान्य जनता संशयाच्या नजरेने पाहू लागली तर या देशाला, या व्यवस्थेला आणि या समाजालाही ते परवडणारे नाही.
पूजावरची ही कारवाई एकतर्फी आहे, असेही म्हणता येत नाही. तिला म्हणणे मांडण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने पुरेशी संधी दिली होती. मुदतवाढही दिली होती. दिल्ली पोलिसांनी या याधीच पूजावर खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला आहे. पूजाला लाल दिव्याचा सोस नडला.
ऑडी कारवर महाराष्ट्र सरकारचे स्टिकर्स लावून फिरणे, अधिकाऱ्यांना धमकावणे, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेंबरवर कब्जा करणे आदी प्रकरणामुळे तिचे पुढचे कारनामे उघड झाले.
पूजाच्या या सर्व कारनाम्यामुळे तिच्या आयुष्याचे सोने होण्याऐवजी पितळ झाले. सरकारी नियमांनुसार, अपंगत्वाचे प्रमाणपत्र बनवण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे; परंतु पूजाच्या प्रमाणपत्रात रेशन कार्डचा समावेश करण्यात आला होता. तिने अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलची अपंगत्वाची दोन प्रमाणपत्र सादर केली होती. सनदी अधिकारी होण्यासाठी कुशाग्र बुद्धी लागते.
तिला ‘मॉक इंटरव्यू’मध्ये ती ज्या जिल्ह्याच्या सीमेवर राहते, त्या बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपात केंद्रावर झालेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारला होता;परंतु त्याचेही उत्तर न देता आलेली पूजा आता बाद झाली, हे बरे झाले. नाही,तर तिने प्रशासनाला कीड लावली असती.






