टाईम्स मासिकाच्या 'वुमन ऑफ द इयर 2025' च्या यादीत स्थान मिळवणारी भारतीय महिला म्हणजे जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संवर्धक पूर्णिमा देवी बर्मन. असाधारण कामगिरी करून जगाच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी सतत काम करणाऱ्या 13 महिलांना टाईम्स मासिकाने सन्मानित केले. त्यापैकी एकमेव भारतीय महिला म्हणजे पूर्णिमा देवी बर्मन.
ह्रास पावणारे प्राणी म्हटले की आपल्यासमोर एक शिंगी गेंडा, वाघ, सिंह, काळवीट, पेंग्विन्स, यांसारख्या किती वन्यजीवांची नावे लगेच डोळ्यासमोर येतात. परंतु, आपल्याच भारतात आसाम राज्यातील ‘हरगीला’ नावाच्या पक्षाबद्दल क्वचितच कुणी ऐकले असेल. हरगीला हे पक्षीदेखील नामशेष होण्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.
परंतु, आसाममधल्या ‘पूर्णिमादेवी बर्मन’ यांच्या पुढाकाराने आणि त्यांनी या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे आज हे पक्षी ‘लुप्त’ होत चाललेल्या पक्ष्यांच्या श्रेणीतून काढून, त्यांचे ‘नियर थ्रेटन्ड’ या श्रेणीमध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरने (IUCN) वर्गीकरण केले आहे. इतकेच नाही तर नुकत्याच व्हिटली फंड फॉर नेचरने (WFN) पूर्णिमादेवी बर्मन यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना 2024 च्या व्हिटली गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यापूर्वी आसाममधील वन्यजीव शास्त्रज्ञ डॉ. पूर्णिमा देवी बर्मन यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च पर्यावरण सन्मानासाठी निवड झाली होती. निसर्गाच्या सान्निध्यातील बालपण आणि आजीचे निसर्गप्रेमाचे संस्कार यांमुळे आकर्षक करिअरचा मोह सोडून त्यांनी संवर्धनाचा आणि त्यासाठी चळवळीचा मार्ग निवडला. ब्रह्मपुत्रेच्या किनारी त्यांचे बालपण गेले. आजीने शिकविलेल्या पक्ष्यांच्या गाण्यांमधून त्यांचे निसर्गाशी नाते जडले. त्यातूनच या कामाची प्रेरणा त्यांना लाभली.
आशियात आढळणाऱ्या या बगळ्याच्या प्रजातीचे फक्त हजार-बाराशे पक्षी शिल्लक असून त्यातील 75 टक्के आसाममध्ये आहेत, हे लक्षात आल्यानंतर त्यांना नामशेष होण्यापासून रोखण्याचा ध्यास डॉ. पूर्णिमा यांनी घेतला. या चळवळीत अनेकजण हत्ती किंवा गेंड्यासारख्या प्रजातींसाठी काम करीत असताना, त्यांनी या बगळ्यांच्या संवर्धनाचे काम हाती घेतले. त्यासाठी त्यांनी आपल्या पीएचडीकडेही दुर्लक्ष केले. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी महिला संघटनांचे काम सुरू केले.
प्रारंभी पाककृती स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम, पथनाट्ये आणि समूहनृत्यासारखे कार्यक्रम आयोजित करून त्यांना निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. या पक्ष्यांचे रक्षण करण्याचे ध्येय त्यांनी आपल्या संस्कृतीशी जोडून घेतले. त्यातूनच ‘हार्गिला आर्मी’ ही महिला संघटना उभी राहिली. सध्या या संघटनेच्या दहा हजारांहून अधिक सदस्य असून, पक्ष्यांची घरटी वाचविणे, जखमी पक्ष्यांवर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करणे आणि या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती अशी कामे त्या संघटनेमार्फत केली जातात.
कोण आहेत या पूर्णिमादेवी बर्मन?
कोण आहेत या पूर्णिमादेवी बर्मन आणि त्यांची दहा हजारांहून अधिक स्त्रियांची ‘हरगीला आर्मी’ पाहूया.
हरगीला हा आकाराने अतिशय मोठा असून, हा करकोचा समूहातील पक्षी आहे. या पक्षाची उंची साधारण साडेचार ते पाच फूट इतकी असू शकते. त्याच्या पंखांची लांबी ही साधारण आठ फूट इतकी असू शकते. अतिशय जाड, लांब चोच आणि निळेशार डोळे असे या पक्षाचे साधारण वर्णन करता येते. या पक्षाच्या गळ्याभोवती लालसर रंगाची लटकणारी पिशवी असते.
बेडूक, साप, मासे, कोणतेही मृत जीव, कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उपलब्ध असणारे खाद्य असा या पक्ष्यांचा आहार आहे. तसेच मानवी वा प्राण्यांच्या शरीरातून उत्सर्जित केलेले टाकाऊ पदार्थदेखील हरगीला खातात. त्यामुळे त्यांना सफाई कामगार असेदेखील म्हटले जाते. म्हणूनच धोक्यात असणाऱ्या या पक्ष्यांची संवर्धन करणे आणि त्यांना लुप्त होण्यापासून वाचवणे महत्त्वाचे आहे, असे पूर्णिमादेवी बर्मन यांचे मत आहे.
पक्ष्यांवर केवळ अभ्यास आणि पीएचडी पुरेशी नसून…?
पूर्णिमादेवी बर्मन या वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहेत. 2007 साली, पूर्णिमादेवी यांनी त्यांच्या पीएचडीसाठी ‘हरगीला’ पक्ष्यांवर अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस त्यांना संवर्धन म्हणजे एखाद्या विषयावर केवळ अभ्यास आणि संशोधन करणे इतकेच महत्त्वाचे असते असे वाटत होते. परंतु, त्यांना आलेल्या एका फोनमुळे त्यांचा संवर्धन आणि हरगीला पक्ष्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदलून गेला.
पूर्णिमादेवी यांना, ‘कुणीतरी झाड तोडत आहे’ असा संदेश देणारा गावातील एका कुटुंबाचा फोन आला. तेव्हा त्या ठिकाणी नेमके काय झाले आहे हे पाहण्यासाठी पूर्णिमादेवी तिथे पोहोचल्या असताना त्यांना दिसले की, एका झाडावर नऊ हरगीला पक्ष्यांची घरटी असून, त्यात नऊ पिल्लं होती आणि त्या माणसाने झाड तोडताच, सर्व घरटी आणि त्यामधील पिल्लं उंचीवरून खाली जमिनीवर कोसळली. खाली पडलेल्या पिल्लांपैकी अगदी काही पिल्लंच जिवंत राहिली होती.
हा सर्व प्रकार पाहून पूर्णिमा देवींनी झाड तोडणाऱ्या माणसाला ‘त्यांनी असे का केले’ असा प्रश्न केल्यावर त्या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. आजूबाजूचे लोकदेखील पूर्णिमा देवींची खिल्ली उडवू लागले. इतकेच नाही, तर हे पक्षी अतिशय अस्वच्छ, दुर्गंध पसरवणारे आणि अशुभ आहेत; हे पक्षी जिवंत असण्याची काहीही गरज नाही, असे तेथील लोकांचे म्हणणे असल्याचे पूर्णिमा देवींना समजले.
पूर्णिमा देवींसह घडलेला हा प्रकार त्यांना या पक्ष्यांबद्दल, पक्ष्यांच्या भविष्याबद्दल विचार करायला लावणारा होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, या पक्ष्यांवर केवळ अभ्यास आणि पीएचडी पुरेशी नसून, या पक्ष्यांबद्दल लोकांचे विचार बदलण्याची गरज आहे. यासाठी त्यांनी नेस्ट ट्री मालक [nest tree owner], शाळा आणि विद्यार्थी, महिला, सरकार, वन विभाग अशा विविध समूहांची मदत घेण्यास सुरुवात करून, हरगीला संवर्धनाच्या प्रकल्पाला सुरुवात केली.
अशी तयार झाली ‘हरगीला आर्मी’?
सुरुवातीला नेस्टिंग ट्री मालकांचे जाहीरपणे कौतुक करून, त्यांना प्रोत्साहन आणि शिक्षण देण्याचे काम पूर्णिमा देवींनी सुरू केले. विविध कार्यक्रमाचे आणि सभेचे नियोजन त्या करू लागल्या. परंतु, या सर्वांमध्ये महिलांचा सहभाग अतिशय कमी होता. त्याचे कारण विचारता असे लक्षात आले की, घरातील कामांमुळे महिला हरगीला संवर्धनाकडे लक्ष देऊ शकत नव्हत्या. मात्र, यावर उपाय म्हणून पूर्णिमादेवी यांनी महिलांना पारंपरिक पाककला स्पर्धेसाठी बोलावण्यास सुरुवात केली. पूर्णिमा देवींची ही युक्ती काम करून गेली.
हळूहळू बऱ्याच महिलांनी या प्रकल्पात सहभाग घेतला. पुढे, पूर्णिमादेवी आणि या महिलांनी मिळून हरगीला पक्ष्यांसाठी ‘बेबी शॉवर’ म्हणजेच डोहाळेजेवण कार्यक्रम सुरू केला. सुरुवातीला पूर्णिमादेवी यांची ही कल्पना ऐकून सर्व स्त्रियांनी त्यांची मस्करी केली. परंतु, इतर गरोदर स्त्रियांचे जसे कौतुक केले जाते, त्यांना आशीर्वाद दिले जातात, त्याचप्रमाणे हरगीला पक्षालादेखील अशी वागणूक मिळावी यासाठी त्यांनी ही पद्धत सुरू केली.
एकमेकांच्या मैत्रीतून आणि एकच ध्येय असणाऱ्या या महिलांनी कोणत्याही पूर्वतयारीशिवाय आपली ‘हरगीला आर्मी’ स्थापन केली. या आर्मीमध्ये एकूण दहा हजारांहून अधिक स्त्रिया असून, वर्ष 2023 पर्यंत तब्ब्ल चार हजार स्त्रिया दररोज हरगीला पक्षाच्या संवर्धनासाठी, जनजागृतीसाठी काम करत आहेत. आता या आर्मीचा आकडा दुप्पट करण्याकडे म्हणजेच 20 हजार स्त्रियांची हरगीला आर्मी तयार करण्याचे ध्येय पूर्णिमा देवींचे असल्याचे त्यांनी व्हिटली गोल्ड पुरस्कार सोहळ्यात सांगितले आहे.
संवर्धन करण्यासाठी लोकांना एकत्र करणे आणि पुढील पिढीला त्याचे महत्त्व पटवून देणे महत्त्वाचे असल्याचे पूर्णिमादेवी म्हणतात. पूर्णिमादेवी यांचे हरगीला संवर्धन महिलांसाठी आणि आसाममधील लोकांच्या उपजीविकेसाठीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. “आसाममधील विणकाम करणाऱ्या स्त्रिया, कपड्यांवर हरगीला पक्ष्यांचे नक्षीकाम करून अशी उत्पादने आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रीसाठी पाठवली जातात. त्यामुळे सुरुवातीला केवळ काम म्हणून विणकाम करणाऱ्या या स्त्रिया, आता हरगीला संवर्धनाचे एक ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विणकाम करत आहेत”, असे पूर्णिमादेवी म्हणतात.
“संवर्धन करताना त्या कामात खंड पडता कामा नये, हे पूर्ण वेळ लक्ष देण्याचे काम आहे. 15 वर्षांच्या माझ्या या प्रवासामध्ये माझ्यासमोर अनेक अडथळे आले, अनेकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला; परंतु मी हार मानली नाही. लोकांचा आपल्या बोलण्यापेक्षा आपल्या कृतीवर अधिक विश्वास असतो, त्यामुळे परंपरा आणि संस्कृती यांच्या जोडीने या पक्ष्यांना अशुभ न म्हणता त्यांची ओळख एक सांस्कृतिक चिन्ह म्हणून नक्कीच करता येऊ शकते.आता हरगीला पक्ष्यालादेखील इतर सर्व प्राण्यांप्रमाणे समान ओळख आणि वागणूक दिली जात आहे आणि याचा मला प्रचंड आनंद होत आहे. त्यामुळे, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हरगीला पक्ष्यांसाठी लढत राहीन”, असे पूर्णिमादेवी बर्मन यांनी टेड एक्समध्ये दिलेल्या भाषणात म्हटले आहे.






