रक्तशुद्धीकारक, पोटदुखी निवारक, बलवर्धक, कृमीनाशक, आम्लपित्तहारक, तसेच तजेलदार त्वचेसाठी वापरली जाणारी हळद हा भारतीयांच्या जीवनातील महत्वाचा घटक. जीवनातील असं म्हणण्याचं कारण म्हणजे,धार्मिक विधींतही हळदीला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठी देखील हळदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
सांगायचा मुद्दा हाच की हळद ही बहुगुणी औषधी वनस्पती आहे. पण जेव्हा हळदीवरून महासत्ता असलेली अमेरिका व विकसनशील भारत आमनेसामने येतात तेव्हा नेमकं काय होतं आणि हा बौद्धिक संघर्ष नेमका काय हे आपण पाहणार आहोत.
नव्वदीनंतरच्या काळात जगाचे रूपांतर खऱ्या अर्थानं ग्लोबल व्हिलेजमध्ये झाले. सेविएत युनियनच्या विघटनानंतर ही प्रक्रिया अधिकच गतिमान बनली.तेव्हा ओळखल्या जाणाऱ्या तिसऱ्या जगातील काही राष्ट्रे नुकतीच समाजवादाला झिडकारून नव्या जगताची बाजारपेठ आपल्या कवेत घेण्यासाठी नाही पण त्यात सामील होण्यासाठी धडपड करू लागली होती.
भारताने याच 1900 ते 2000 या दशकाच्या सुरूवातीच्या वर्षांत खुल्या आर्थिक धोरणांचा स्वीकार केला होता. जागतिक पटलावरील अशा पार्श्वभूमीवर अमेरिकेसारख्या महासत्तेच्या आव्हान देत भारताने एक विजय संपादन केला. तो म्हणजे हळदीच्या पेटंटवर भारताचा हक्क असेल.

त्याचे झाले असे की, 1995 साली अमेरिकेच्या मिसिसिपी विद्यापीठाच्या दोन संशोधकांनी अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाकडे हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्मावर पेटंट मिळण्यासाठी अर्ज केला. या अर्जात हळदीच्या सहा गुणधर्मांची नोंद होती. त्यापैकी अल्सरवर हळद गुणकारी आहे असे देखील संशोधन होते.
यावर अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाने या दोघा संशोधकांना पेटंट ग्राह्य केले.दोघेही भारतीय वंशाचे. एक सुमन दास व दुसरे हरिहर कोहली. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर, या हळदीच्या पेटंटवर ऑक्टोबर 1996 मध्ये इंडीयन कौन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्चने हरकत घेऊन त्याविरोधात आव्हान दिले. त्याला कारण म्हणजे, सुरूवातीला पाहिल्याप्रमाणे हळद ही भारतीयांचे जीवन व्यापणारी वनस्पती आहे.
आपल्याकडे असलेला पारंपारिक आजीबाईचा बटवा हा हळदी शिवाय अपूर्णच आहे.म्हणजेच भारतीयांना माहिती असलेला हळदीचा गुणकारी उपयोग त्याचे वैद्यकीय गुणधर्म हे पारंपारिक ज्ञानावर अवलंबून आहेत. या पारंपारिक ज्ञानाला दुर्लक्षित करून अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाने या दोघांच्या नावे हळदीचे पेटंट दिले होते.
तेव्हा इंडीयन कौन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्चच्या संचालक पदावर डॉ.रघुनाथ माशेलकर होते. या हळदीच्या पेटंटला आव्हान देण्यासाठी त्यांनी सहकाऱ्यांच्या साथीने हळदीचे भारतीय साहित्यातील, परंपरेतील संदर्भ शोधण्यास सुरूवात केली. संस्कृत, हिंदी, उर्दू या भाषांतील 32 संदर्भ निश्चित केले गेले.

या 32 संदर्भाच्या जोडीला 1953 साली इंडीयन मेडिकल कौन्सिलने प्रसिद्ध केलेला हळदीवरील पेपरचा आधार घेतला.अखेर 1997 साली हे पेटंट रद्द करण्यात आले. भारताचा हा विजय केवळ आपल्याच देशासाठी महत्वाचा नव्हता तर इतर अन्य देशांतील पारंपारिक ज्ञानाचे जतन, संवर्धन व गौरव करणारा हा निर्णय किंवा विजय होता.
याच निर्णयाचा परिणाम म्हणून भारतातील पारंपारिक ज्ञान जतन करण्यासाठी एक उपक्रम राबवला गेला. तो उपक्रम म्हणजे, 'Traditional Knowledge Digital Library' (TKDL) त्यामुळे पारंपारिक ज्ञानाचे संचित एकाच प्लॅटफॉर्मवर शोधण्यास व एकत्रित राहण्यास मदत होईल. पेटंट धोरण व त्यासंबंधी कायदे यात या निर्णयानंतर आमूलाग्र सुधारणा करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
त्यावेळी डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी ' पेटंट ऑर पेरिश ' असा इशारा देत भारतीयांचे परंपरागत हक्क पुरव्यासहित अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडून देशाला मोठे योगदान दिले होते. हळदीच्या नंतर बासमती, कडुनिंब व तांदूळ या पिकांच्या अथवा वनस्पतींच्या बाबत देखील असाच निर्णय झाला होता.
भारत आणि हळदीचे उत्पन्न व व्यापार
जगभरातील हळद उत्पादनाच्या 75% हून अधिक हळदीचे उत्पादन भारतात होते. हळदीच्या जागतिक व्यापाराचा विचार करता त्यात भारताचा वाटा 62% हून अधिक आहे. मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली. हळद आणि हळद उत्पादनांच्या विकासावर आणि वाढीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्रातही राज्य सरकारने, हिंगोली जिल्ह्यात वसमत या ठिकाणी देशातील पहिले हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू केले. हे सगळे उपक्रम वाखाणण्याजोगे असले तरीही, शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून हळदीला किमान आधारभूत किंमत संरचनेत स्थान मिळावे ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही.
यामुळे हळदीच्या पिकाला मिळणारा दर कधी समाधानकारक तर कधी अपेक्षाभंग करणारा असतो. आज हळदीच्या पेटंट संदर्भातील अमेरिकेवरील भारताच्या विजयाचा दिवस. हा दिवस साजरा करताना हळद उत्पादक शेतकऱ्याला चांगले दिवस यावेत हीच अपेक्षा.






