दीप्ती जीवनजी ही तेलंगणाची ही धावपटू रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर दाम्पत्याच्या पोटी जन्माला आली. लहानपणी तिच्या अध्ययन अक्षमतेमुळे तिला बोल लावले गेले.
पण, ही मुलगी धावू लागली, की सगळ्या मर्यादा मागे टाकते, हे ‘ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया’शी संलग्न प्रशिक्षक एन. रमेश यांच्या नजरेतून सुटले नाही. त्यांनी तिला प्रशिक्षण दिले आणि दीप्ती भारताची स्टार धावपटू झाली.
पॅरिसच्या पॅरालिम्पिकमध्ये 400 मीटर धावण्याच्या टी-20 प्रकारात (गतिमंदांसाठीची स्पर्धा) कांस्यपदक मिळवणारी दीप्ती जीवनजीची ही कहाणी प्रातिनिधि असली तरी पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्याच अशा कहाण्या आहेत.
दोन्ही हात नसलेली अवघी 17 वर्षांची तिरंदाज शीतल देवी, पाय आणि तोंडाच्या साह्याने लक्ष्यवेध करत असलेल्या चित्रफिती अनेकांना प्रेरित करून गेल्या. कांस्यपदक विजेत्या शीतल देवीच्याच गावातील एक 13-वर्षीय अपंग मुलगी तिच्यापासून प्रेरणा घेऊन तिच्याच प्रशिक्षकांकडे तिरंदाजी शिकत आहे.
प्रेरणेची ही अशी साखळी तयार होणे हे या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचे वेगळेपण ठरावे. अर्थात, याच जोडीने एकूणच अपंगांबाबतचा समाजाचा नकारात्मक दृष्टिकोन बदलला, तर तेही हवे आहे.
जिद्दीच्या बळावर विजय खेचून आणणाऱ्या अनेक यशोगाथा पॅरालिम्पिकमधून पुढे आल्या
पॅरिसच्या मुख्य ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी अपवाद वगळता यथातथाच राहिली असताना पॅरालिम्पिकमध्ये दिव्यांग खेळाडूंनी पदकांची लयलूट करीत ही कसर भरून काढली. पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आजवरची सर्वाधिक (29) पदके मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वीच्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 19 पदकांसह 24 वे स्थान मिळविले होते, यंदा पदकांच्या संख्येत भर पडली आणि देशाचे स्थानही 18 पर्यंत उंचावले.


भारतीय पथकातील 84 खेळाडूपैकी सात जणांनी सुवर्णयश मिळविले, नऊ खेळाडूंनी रौप्य, 13 खेळाडूंनी ब्राँझ पदांवर नाव कोरले. शारीरिक दौर्बल्य, आर्थिक अडचणी, प्रशिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा अशा अनेक अडचणींवर मात करीत जिद्दीच्या बळावर विजय खेचून आणणाऱ्या अनेक यशोगाथा या पॅरालिम्पिकमधून पुढे आल्या.
त्यामध्ये व्हीलचेअरवर बसून सुवर्णपदकाचा वेध घेणारी अवनी लेखरा, जन्मानंतर सहाव्या दिवसापासून दोन्ही पाय प्लास्टरमध्ये असताना ॲथलेटिक्समध्ये तिरंगा फडकावणारी प्रीती पाल, कोमातून बाहेर येऊन सर्वांची मने जिंकणारी महाराष्ट्राची भाग्यश्री जाधव, कृत्रिम पायांनी नेत्रोद्दीपक पदलालित्याचे दर्शन घडविणारा बॅडमिंटनपटू नितेश कुमार, तिरंदाज हरविंदर सिंग, आपल्या उंचीपेक्षा अधिक उंच भाला फेकून सुवर्णपदकावर नाव कोरणारा नवदीपसिंह आणि ॲथलेट सुमीत अंतिल, धरमवीर नैन, प्रवीणकुमार अशा अनेकांची जिगर पाहून लाखो भारतीयांचे डोळे आनंदाश्रूनी भरून येत होते.
या पदक विजेत्यांशिवाय यंदा भारतीय खेळाडूंनी विक्रमांना गवसणी घातली, अनेकांनी वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
भारत सरकारचा कौतुकास्पद पुढाकार
दुसऱ्या महायुद्धानंतर, 1948 मध्ये युद्धात जखमी झालेल्या सैनिकांचे मनोबल उंचावण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या स्पर्धांनी मूळ धरले. 1960 मध्ये रोममध्ये झालेल्या स्पर्धेत चारशे खेळाडू सहभागी झाले होते, यंदा 79 देशांमधून खेळाडूंची संख्या चार हजारांवर पोहोचली आहे. जगभरातील दिव्यांगांसाठी हे यश प्रेरणादायी असून या स्पर्धेतला वाढता सहभाग, हा निव्वळ पदके मिळविण्यापेक्षा सबलीकरण आणि स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे.
भारतामध्ये यंदा केंद्र आणि विविध राज्यांच्या सरकारांसह पॅरालिम्पिक समितीच्या पुढाकारालाही या यशाचे श्रेय दिले पाहिजे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय संघासाठी 26 कोटी रुपयांची तरतूद होती, यंदा ती 74 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. त्यामध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि वैद्यकीय साझातही मोठ्या सुधारणा करण्यात आल्या.
या सर्वांचा लाभ घेऊन भारतीय खेळाडूही विलक्षण जिद्दीने खेळले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय खेळाडू, अभिनेते यांच्यासारख्या विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींनीही या खेळाडूंना मनापासून प्रोत्साहन दिले.


आपली पदकसंख्या सात पटींनी वाढली
आपण 2016 मध्ये पॅरालिम्पिकमध्ये भाग घेण्यास सुरुवात केल्यापासून आठ वर्षांत चार पदकांपासून २९ पदकांपर्यंत मजल मारली आहे. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यावर पॅरालिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या, तेव्हा क्रीडाजगत अजूनही ऑलिम्पिकच्या आठवणींत रमले होते. पण, पॅरालिम्पिकने आणखी नवे भव्य स्वप्न दिले – क्षमतांचे क्षितिज शारीरिक वा मानसिक अक्षमतेमुळे आक्रसत नाही.
स्पर्धेच्या अगदी सुरुवातीला पॅरिसकरांना स्टेडियममध्ये आणण्यासाठी संयोजकांना थोडे कष्ट पडले असले, तरी नंतर ही स्पर्धा केवळ स्टेडियममधूनच नाही, तर जगभरात अनेक पडद्यांवर पाहिली गेली, नावाजली गेली. जगभरातील आठ अब्ज लोकांपर्यंत ही स्पर्धा पोहोचेल, अशी व्यवस्था आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने केली होती.
तिचा साहजिकच सर्वंकष बोलबाला झाला आणि आता समारोपानंतरही त्याचे कवित्व शिल्लक आहे. पदकांच्या दृष्टिकोनातून पाहायचे, तर भारतासाठी ही स्पर्धा निश्चितच फलदायी ठरली. आपल्या केवळ चौथ्या स्पर्धेत भारतीयांनी आपली पदकसंख्या सात पटींनी वाढवली. त्यात महिला क्रीडापटूंचाही मोठा सहभाग होता, हे नक्कीच उल्लेखनीय.
मुळात सर्वसाधारण ऑलिम्पिकपटूंपेक्षा पॅरालिम्पिकपटूंना इजा होण्याची शक्यता 1.79 टक्क्यांनी अधिक असते, असे अमेरिकेत झालेला एक अभ्यास सांगतो. यंदाच्या स्पर्धेतही अनेक पॅरालिम्पिकपटूंना या इजांचा सामना करावा लागला आणि तज्ज्ञांच्या मते तर, आता स्पर्धा संपल्यानंतर अनेकांच्या अशा इजा खऱ्या अर्थाने समोर येऊ लागतील. सर्वसाधारण क्रीडापटूंना शरीराच्या खालच्या भागांत इजा होण्याचे प्रमाण अधिक असते, तर दिव्यांग खेळाडूंच्या बाबतीत हे उलट असते.
त्यामुळे शरीराच्या वरच्या भागाच्या स्नायूंवर अतिताण हे इजांचे एक प्रमुख कारण, मात्र अनेक प्रशिक्षक आणि तंदुरुस्ती मार्गदर्शकांना पॅरालिम्पिकपटूंच्या तंदुरुस्तीची शास्त्रशुद्ध देखभाल कशी करायची असते, हे माहीत नसल्यानेदेखील इजा होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यावर जितका अभ्यास होईल आणि त्यावर मात करण्याचे उपाय समोर येतील, तितका या खेळाडूंचा हुरूप आणखी वाढेल, हे नक्की.

/shethepeople/media/media_files/jPMGdqEXuSZIKw9as7ab.png)
‘’आता तरी आम्हाला सन्मान द्या’’
या स्पर्धेत आघाडी मिळविणाऱ्या चीन, ब्रिटन आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये दिव्यांगांचे जीवनमान आणि प्रगती उंचावण्यासाठी काय व्यवस्था आहे, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. 'आजवर आम्हाला दुर्बलतेमुळे अवहेलना सहन करावी लागत होती, आता आम्हाला सन्मान द्या,' ही या स्पर्धेतील विजेता नवदीप सिंहची प्रतिक्रिया खेळाडूच नव्हे; तर एकूण दिव्यांगांच्या दृष्टीने बोलकी आहे.
दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन जगण्यातही अनेक छोट्या छोट्या अडचणींना सामोरे जावे लागते. विविध सरकारांनी त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी दिव्यांग धोरणही आखले आहे. मात्र, अगदी सार्वजनिक ठिकाणी रॅम्प उभारण्यापासून ते नोकरीत अडीच टक्के राखीव जागा भरण्यापर्यंत त्यातील अनेक तरतुदी कागदावरच राहतात, असा अनुभव आहे. दिव्यांगांना साह्यकारी ठरतील, अशा सुविधा उपलब्ध करून देताना त्यांच्या सन्मानाला धक्का बसणार नाही, अशा पद्धतीची वागणूक समाजाकडून अपेक्षित आहे.
अगदी रोजच्या बोलण्यातील शेरेबाजी-टीकाटिप्पणीत नकळत होणाऱ्या अपंगत्वाच्या उल्लेखांपासून अशा व्यक्तींबाबत दाखविण्यात येणाऱ्या अवाजवी दया-सहानुभूतीच्या भावनांतून संबंधित व्यक्तींच्या सन्मानाला धक्का बसणार नाही, यासाठी संवेदनशीलतेचे संस्कार गरजेचे आहेत. या सर्व सुविधा, उपाययोजना प्रतीकात्मक न राहता त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, हा उद्देश सरकार आणि समाजाने समोर ठेवला, तरच पॅरिस पॅरालिम्पिक हे त्या दिशेने पडलेले पहिले पाऊल ठरेल.






