कोलकाता येथील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट रोजी एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत झालेल्या बलात्कार आणि खूनाच्या घटनेने देश पुन्हा एकदा हादरला. त्यानंतर कोलकाता, पश्चिम बंगाल सहीत देशभरात अनेक ठिकाणी सातत्याने या घटनेच्या विरोधात आंदोलनं होत आहेत. ज्यात लोक, स्त्रियांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा मिळावी, त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात त्यांना न्याय मिळावा म्हणून सहभागी होत आहेत.
अशा लोकआंदोलनांतून व्यवस्थेचा विरोध होत असतानाच लोकशाही देखील मजबूत होत असते. पण अशा गंभीर लैंगिक आणि सामाजिक मुद्द्यांवर एकत्र येणाऱ्या लोकांमध्येच फुट पाडण्याचे प्रयत्न होत असतील तर त्यामुळे लोकशाहीलाच धोका पोहोचू शकतो. काही महिला संघटना या घटनेच्या विरोधात एकत्र येण्याचा संकल्प करतात. त्यासाठी 14 ऑगस्ट रोजी त्या ‘रिक्लेम द नाईट’ या नावाने विरोध प्रदर्शन आयोजित करतात.
सोशल मीडियावर याविषयी माहिती सर्वांना देण्यात येते. यातूनच मुंबईच्या पवई उपनगरातील हिरानंदानी गार्डन्स शेजारी असलेल्या गॅलेरीया शॉपिंग मॉल्समध्येही असंच विरोध प्रदर्शन आयोजिक केलं जातं. हिरानंदानी गार्डन्समधील अनेक रहिवाशी यात उपस्थित राहतात.
मुंबईच्या हिरानंदानी गार्डन्स या पॉश सोसायटीत राहणाऱ्या या तथाकथित ‘हायफाय’ लोकांसोबतच, जवळच्या रस्त्यांवर राहणाऱ्या काही गरीब महिला, ज्यात दलितही आहेत, त्याही हातात मेणबत्ती घेऊन या प्रदर्शनात सहभागी होतात. त्याबरोबर हिरानंदानी गार्डन्सच्या काही महिला या रस्त्यावरच्या महिलांच्या हातातील मेणबत्त्या विझवून टाकतात आणि त्यांना तिथून जायला सांगतात.
या लाजीरवाण्या घटनेतून हे स्पष्ट दिसून येतं की या पॉश महिलांना या गरीब महिलांसोबत राहण्याची लाज वाटते, त्यांनी त्यांच्या बरोबर येऊन विरोध व्यक्त करावा हे त्यांना अपमानास्पद वाटतं. त्यांच्या वागण्यातून त्या दाखवून देतात की न्याय मिळण्यासाठी त्यांना, या गरीब बायका ज्या त्यांच्या घरी कामं करतात, कचरा वेचतात, किंवा आणखीही काय-काय करत असतील, त्यांची आम्हाला गरज नाही. या दलित बायका त्यांना घाणेरड्या वाटत असतील, ज्यांना बोलता येत नाही नीट, वागता येत नाही, असं वाटत असेल.

‘कॅण्डल मार्च’मध्ये दलित महिलांना नाकारले
या गरीब वर्गातील स्त्रियांसोबत झालेली ही वागणूक हेच दाखवतं की आता आंदोलनांतही जात आणि वर्ग यांना महत्त्व येत आहे. हे आंदोलन करणारे, राबवणारे फक्त उच्च वर्गातील, श्रीमंत असावेत असाही त्यांचा होरा असू शकतो. दुसरीकडे या गरीब स्त्रियांच्या वागण्यातून हे दिसतं की त्यांच्या स्वतःच्या जगण्याच्या संघर्षातही त्यांना इतरांच्या दुःखांची जाणीव आहे आणि त्यासाठी ते आपलं शक्य तितकं योगदान देऊ इच्छितात.
हिरानंदानी गार्डन्सच्या जवळ भीम नगर नावाची वस्ती होती, जी जून महिन्यात खाली करण्यात आली. तिथून बेघर झालेल्या या बायका होत्या. या लोकांच्या रोजच्या सुरक्षेचा, त्यांच्या जगण्याचा, शोषणाचा हे उच्च वर्गातील आंदोलक कधी विचार करतील का?
‘मकतूब मीडिया’तील एका वार्तांकनातून हे समजतं की अशा निराश्रीत बायकांना तर नेहमीच लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो. कोलकाता सारखी एखादी घटना त्यांच्याबाबतीत घडू नये या भावनेतून या बायका या आंदोलनात सहभागी होतात. पण त्यांना हिरानंदानीच्या तथाकथित सभ्य बायकांकडून टोमणे ऐकावे लागतात, आणि विरोध करण्याच्या त्यांच्या लोकतांत्रिक अधिकारापासून वंचित व्हावं लागतं. त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं साहस टिंगलटवाळीचा विषय केला जातो. त्यांना या तथाकथित उच्च वर्गीयांसोबत उभं राहून एखाद्या गंभीर मुद्द्यावर विरोध करण्याचा अधिकार नाकारला जातो.

‘रिक्लेम द नाईट’ फक्त अभिजन महिलांसाठीच का?
‘रिक्लेम द नाईट’ या शब्दप्रयोगामागचा अर्थ आधी समजून घेण्याची गरज आहे. रात्रीदेखील स्त्रियांना स्वतंत्रपणे, सुरक्षितपणे, निर्भयपणे हिंडता-फिरता यावं अशी स्थिती मिळावी, असावी यासाठी हा शब्दप्रयोग केला जातो. सध्या सुरक्षा आणि घराची इज्जत यांच्या नावाखाली अनेक महिलांना पितृसत्ताक विचारसरणीच्या लक्ष्मणरेखेच्या आतच राहावं लागतं. यातूनच त्यांच्यावर रात्री एकट्यानं जायला प्रतिबंध केला जातो.
रात्री या केवळ पुरूषांच्या समजल्या जातात, त्यांच्यावर त्यांचाच अधिकार समजला जातो. रात्रीही ते हवं तिथं जाऊ शकतात, कामं करू शकतात, पण स्त्रिया नाही. यातूनच ‘रिक्लेम द नाईट’ हा स्त्रीवादी, स्त्रीमुक्तिचा नारा अस्तित्त्वात आला आहे. पण एकाच समाजातील एका मोठ्या वर्गाला बाजूला ठेऊन, निवडक समानता आणि स्वातंत्र्य दाखवून, स्त्रीमुक्तिचा विचार करणं कसं शक्य आहे?
अशा परिस्थितीत देशातील तो विशिष्ट समुदाय ज्यांच्याकडे गेटेड कम्युनिटी मध्ये राहण्याच्या सुविधेसोबतच, प्रिमियम मॉलमध्ये खरेदी करण्याची आणि प्रवासासाठी खासगी ड्रायव्हर असलेलं वाहन आहे, आपली सुरक्षा करण्यासाठी अधिक सक्षम आहेत. अर्थात अशा वर्गातील स्त्रियाही असुरक्षित आहेत ही वास्तविकता आहे. त्या या विरोधात लढू तरी शकतात, पण गरीब घरातील स्त्रिया, रस्त्यावर, झोपडपट्टीत राहणाऱ्या स्त्रिया यांना मात्र त्यांच्यावरील अन्याय सोसण्यापलीकडे दुसरा पर्याय नसतो.
जेव्हा या स्त्रिया दलित समुहातून येतात, त्यांची वस्ती उध्वस्त करण्यात येते, जसा भीम नगर मोहल्ला उध्वस्त करण्यात आला आणि तोही हिरानंदानी बिल्डर्सच्या सांगण्यावरून असा आरोप आहे, त्यांच्यासाठी परिस्थिती अधिक बिकट असते.

मुख्य प्रवाह आणि स्त्रीवाद
सवर्ण स्त्रीवादी स्त्रियांची एकजूट आणि वागणूक आपल्याला एैंशी आणि नव्वदच्या दशकातील देशातील उदयमान स्त्रीवादाकडे वळण्यास सांगतो ज्याकाळी सवर्ण वर्गातील स्त्रियाच यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायच्या आणि अन्यायग्रस्त अशा परिघावरील स्त्रिया, दलित स्त्रियांना मात्र त्यात स्थान नव्हतं.
दलित स्त्रीवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, मुख्य प्रवाहातील स्त्रीवाद हा ब्राह्मणी वृत्ती, वर्गीय उतरंड आणि उच्च जातिय लोकांनी भरलेला आहे. त्यांच्याविरोधात म्हणून दलित स्त्रीवादी संघटना उभ्या राहू लागल्या ज्यांनी दलित स्त्रियांवरील अन्यायाविरोधात आंदोलनं केली. त्यानंतर मुख्य प्रवाहातील स्त्रीवाद, दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून दलित स्त्रियांच्या प्रश्नांकडे पाहू लागला, त्यावर बोलू लागला.
दलित पार्श्वभूमितून येणाऱ्या स्त्रियांना त्यांची जात आणि लिंग यांच्यातील अंतर्विरोधामुळे लैंगिक हिंसेचा सामना वाढत्या प्रमाणावर करावा लागतो. गुन्हा करणे, त्याच्यासाठी शिक्षा न होण्याचा आत्मविश्वास, याच्यामुळे गुन्हेगार सहसा अशा हतबल, दुर्बळ घटकातील स्त्रियांना लक्ष्य करतात. दुसरीकडे दलितांना त्यांची ‘पायरी’ दाखवून देण्याची वृत्तीही यामागे असते.
या स्त्रियांचं सामाजिक पातळीवर, लैंगिक हिंसाचाराच्या घटनांविरोधात आंदोलन करणं किंवा त्यात सहभागी होणं, हे अशा गुन्हेगारांच्या दुर्बळ घटकातील स्त्रियांचा गैरफायदा घेण्याच्या वृत्तीला आव्हान देण्याचा एक मार्ग असू शकतो. तथाकथित अभिजात समाजातील लोक आपल्या वेळेनुसार आपल्या आवडत्या ठिकाणी फारसा त्रास होणार नाही पण प्रसिद्धी मिळेल अशा पद्धतीने अशा आंदोलनाच्या योजना तयार करतात.
एका मेडिकल कॉलेजमधील बलात्कारीत मृत स्त्रीसाठी, जी दूरच्या राज्यातील आहे, त्यांनी वेळ काढून सहानुभूती दाखवली ही चांगलीच गोष्ट आहे पण, त्यांच्या जवळच्या भागात राहणाऱ्या गरीब वर्गातील स्त्रियांसाठीही त्यांना ही सहानुभूती दाखवता आली असती. तसं झालं नाही. स्त्रीवादी आंदोलन आणि स्त्री-सुरक्षेचा मुद्दा केवळ एका वर्गापूरता आणि जातिपूरता मर्यादित राहू शकत नाही.

सामाजिक आणि लैंगिक समानतेची गोष्ट करत असताना आपल्याला हे समजून घ्यायला हवं की जोवर सर्व धर्म, वर्ग आणि जातीच्या स्त्रियाच नाहीतर सर्वलिंगीय व्यक्तिंना जोवर समानता आणि सुरक्षेचा अधिकार मिळत नाही, तोवर स्त्रीवादी आंदोलनाची सार्थता संभवनिय नाही. ‘रिक्लेम द नाईट’ सारखे आंदोलन तेव्हाच यशस्वी होतील जेव्हा, त्यात इतरांसोबतच परिघावरील समूह, दलित स्त्रिया, निम्न वर्गातील स्त्रिया सारेच सहभागी होऊ शकतील आणि कोणत्याही भेदभावाविना त्या सर्व एकत्र येऊन त्यांच्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठवू शकतील.
सौजन्य फेमिनिजम इन इंडिया
(अनुवाद - प्रतिक पुरी)






