नोबेल पुरस्कारात शांततेच्या आणि साहित्याच्या पुरस्काराला वेगळे महत्त्व असते. या वर्षी हे दोनही पुरस्कार आशिया खंडातील देशातील संस्था आणि व्यक्तीला मिळाले. विशेष म्हणजे मध्य पूर्वेत आणि रशिया-युक्रेन संघर्ष सुरू असताना दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेल्या देशातील संस्थेला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला. युद्ध हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही, तर शांततापूर्ण मार्गाने वाटाघाटी करून प्रश्नाच्या मुळाशी जाणे हा त्यावरचा उपाय आहे, हे सांगूनही पटत नसताना असे प्रयत्न न सोडता सातत्याने प्रयत्न करणाऱ्या संस्थेचा गौरव व्हावा, यासारखा पुरस्काराचा दुसरा सन्मान असू शकत नाही.
दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यातून वाचलेल्या जपानी लोकांच्या ‘निहोन हिडांक्यो’ या संस्थेला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला. नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष जॉर्गन व्हॅटने फ्रिडनेस म्हणाले, ‘दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात वाचलेल्यांचा हा तळागाळातील प्रयत्न कौतुकास्पद आहे.’
या संस्थेने आपल्या मोहिमेद्वारे अण्वस्त्रमुक्त जग मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. अण्वस्त्रे पुन्हा कधीही वापरली जाऊ नयेत, हा त्यांचा उद्देश आहे. ‘निहोन हिडांक्यो’ची स्थापना 1956 मध्ये झाली आणि तिचा उद्देश मानवजातीचे होणारे नुकसान दृश्यमान करून अण्वस्त्रांच्या धोक्याबद्दल जगाला चेतावणी देणे हा होता. बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर जवळपास एक दशकानंतर ही संघटना सुरू झाली.
6 ऑगस्ट 1945 रोजी एका अमेरिकन लढाऊ विमानाने हिरोशिमा शहरावर युरेनियम बॉम्ब टाकला. यामध्ये एक लाख 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तीन दिवसांनंतर अमेरिकेने नागासाकी या आणखी एका शहराला लक्ष्य केले आणि येथे अणुबॉम्ब टाकला. दोन आठवड्यांनंतर जपानने शरणागती पत्करली आणि त्यामुळे दुसरे महायुद्धही संपले. ‘निहोन हिंडनक्यो ग्रुप’च्या सह-प्रमुख सेत्सुको थर्लो या हिरोशिमावरील अणु हल्ल्यातून वाचलेल्या भाग्यवानांपैकी एक होते. तेव्हा त्या 13 वर्षांच्या होत्या. तेव्हापासून त्या जगभरातील लोकांना अण्वस्त्रांच्या धोक्याबद्दल सावध करण्यासाठी सतत मोहीम राबवत आहेत.
सेत्सुको अणुबाँबच्या घटनेबाबत म्हणाल्या, की मी एक तेजस्वी प्रकाश पाहिला. मला ते काय आहे याचा विचार करायलादेखील वेळ मिळाला नाही. कारण माझे शरीर हवेत फेकले गेले आणि नंतर मी बेशुद्ध झाले. 6 ऑगस्ट 1945 च्या सकाळी 8:16 वाजले होते, अमेरिकेने हिरोशिमावर 'लिटल बॉय' नावाचा अणुबॉम्ब टाकला.
जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मला स्वतःला अंधाराने वेढलेले दिसले, कोणताही आवाज नव्हता. मी माझे शरीर हलवण्याचा प्रयत्न केला; पण करू शकलो नाही. अचानक मला माझ्या पाठीवर हात जाणवला आणि एक मर्दानी आवाज म्हणत होता, ‘जगण्याची हिंमत करा. प्रयत्न करत राहा. पुढे जात राहा.
सेत्सुको त्या माणसाला पाहू शकल्या नाहीत, पण अंधारातून बाहेर पडण्याच्या त्याच्या सूचना ऐकत राहिला. सेत्सुको आणि इतर दोन मुली या हल्ल्यातून वाचू शकल्या. त्या म्हणतात, “मला दिसले की काही क्षणापूर्वी जे शरीर मानवी होते, ते आता कोणत्याही प्रकारे मानवी दिसत नाहीत. तो मला भुतासारखा दिसत होता कारण त्याचे केस संपले होते. त्याचे मांस आणि कातडे वितळत होते आणि हाडांमधून लटकत होते आणि शरीराचे काही भाग गायब होते. हिरोशिमा जळलेल्या मृतदेहांमध्ये आणि ढिगाऱ्यात बदलले होते.
अमेरिकेने 1952 मध्ये जगातील पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली, ज्याची शक्ती हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा एक हजार पट जास्त होती. त्या वेळी सेत्सुको एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, ‘पुरे झाले आता. हिरोशिमा आणि नागासाकी पुन्हा कधीही होऊ नयेत.’ त्यांनी अमेरिकेच्या आण्विक धोरणावर टीका केली. त्या बदल्यात त्यांना अमेरिकनांकडून धमक्या आणि द्वेषयुक्त पत्रे मिळाली; पण सेत्सुको हिंमत हरल्या नाहीत आणि तेव्हापासून त्यांनी अण्वस्त्रांच्या धोक्याबद्दल जगभरात प्रचार सुरू ठेवला.
अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या प्रयत्नांना नोबेल समितीने यापूर्वीही गौरविले आहे. ‘टू अबोलिश न्यूक्लियर वेपन्स’ ला 2017 मध्ये शांततेचा नोबेल पारितोषिक देण्यात आला. अण्वस्त्रांच्या वापराविरूद्ध मजबूत आंतरराष्ट्रीय प्रतिबंध राखणे हे सर्व मानवतेसाठी महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षी इराणमध्ये महिलांच्या हक्कांसाठी, लोकशाहीसाठी आणि फाशीच्या शिक्षेविरोधात वर्षानुवर्षे लढणाऱ्या नर्गिस मोहम्मदी या तुरुंगात असलेल्या कार्यकर्तीला शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता.
साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखक हान कांग यांना देण्यात आला. त्यांच्या प्रगल्भ काव्यात्मक गद्यासाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांचे गद्य मानवी जीवनातील नाजूकपणा अधोरेखित करते. त्यांच्या पुस्तकांमध्ये द व्हेजिटेरियन, द व्हाईट बुक, ह्युमन ॲक्ट्स आणि ग्रीक लेसन यांचा समावेश आहे. हान कांग यांनी आपल्या लेखनासोबतच कला आणि संगीतातही स्वत:ला वाहून घेतले.1993 मध्ये कोरियन मासिक साहित्य आणि सोसायटीमधील अनेक कवितांच्या प्रकाशनाने आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.
त्यांचे गद्य पदार्पण 1995 मध्ये ‘लव्ह ऑफ येओसू’ (कोरियन भाषेत) या लघुकथा संग्रहाने सुरू झाले. कादंबरी आणि लघुकथा या दोन्ही गोष्टी नंतर लगेचच आल्या. हान कांग यांच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय कादंबऱ्यांमध्ये ‘द व्हेजिटेरियन’चा समावेश होतो. या कविता तीन भागांत लिहिल्या गेल्या. त्यात हिंसक परिणामांचा उल्लेख करण्यात आला आहे.
या कथेचा नायक मांस न खाण्याचा निर्णय घेतो आणि त्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते. आतापर्यंत 121 जणांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले असून, त्यापैकी 18 महिला आहेत. रवींद्रनाथ टागोर हे एकमेव भारतीय आहेत, ज्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे.

(लेखिका हान कांग)
नोबेल पारितोषिक देणाऱ्या ‘रॉयल स्वीडिश अकादमी’ने त्यांच्या नावाची घोषणा करताना म्हटले आहे, की, हा सन्मान हान यांच्या भेदक काव्यात्मक गद्यासाठी आहे, जो भूतकाळातील आघातांना तोंड देतो आणि मानवी जीवनातील नाजूकपणा प्रकट करतो. दक्षिण कोरियाच्या ग्वांगजू शहरात जन्मलेल्या हान सध्या सोलमध्ये राहतात. त्यांचे कुटुंब साहित्यिक आहे. त्यांच्या ‘रेड अँकर’ या कथेसाठी साहित्यिक स्पर्धेत पुरस्कारही मिळाला होता. 2007 मध्ये प्रकाशित झालेली त्यांची ‘द व्हेजिटेरियन’ ही कादंबरी म्हणजे त्यांना यश मिळवून देणारे काम. या पुस्तकाला 2016 मध्ये बुकर पुरस्कारही मिळाला होता.
याशिवाय त्यांनी ‘ह्युमन ॲक्टस्’, ‘द व्हाईट बुक’यांसारख्या कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. त्यांचे सर्वात अलीकडील पुस्तक तीन वर्षांपूर्वी 2021 मध्ये प्रकाशित झाले, “वुई डो नॉट पार्ट.” कविता आणि कथा या दोन्ही प्रकारांत त्या सतत लिहित्या राहिल्या. जिवंत आणि मृत, शरीर आणि आत्मा यांच्यातील संबंधाची तिची त्यांची जाणीव त्यांच्या लेखनातून दिसून येते आणि कवितेतील त्यांच्या सततच्या प्रयोगामुळे त्या गद्य लेखनाच्या सध्याच्या जगात एक मानक बनली आहे. हान यांच्या कल्पनेचे जग म्हणजे मानवी मनाच्या तळघरांमध्ये लपलेल्या अंधाराचा शोध घेण्याचा प्रयत्न.
बुद्ध म्हणाले होते, "जीवन दुखम, सर्वं दुखम" म्हणजे जीवनात दुःख आहे आणि सर्वत्र दुःख आहे. महान संस्कृत कवी भवभूती यांनी तर ‘एक रस करूं एव’ असे म्हटले होते. एकच रस आहे आणि तो म्हणजे करुण रस. आनंदाचे वेगवेगळे स्तर आहेत; पण दु:ख हे निळ्याशार आकाशासारखे असते, ज्यात सर्वांचा समान वाटा असतो. हान यांनी त्यांच्या खोबणीचे आकाश पांढऱ्या रंगाने रंगवले. 2016 मध्ये प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘द व्हाईट बुक’ हे पुस्तक दुःखाचा दस्तावेज आहे. ही कादंबरी अशा व्यक्तीला समर्पित आहे, जी कादंबरीच्या मुख्य पात्राची मोठी बहीण असू शकते; परंतु जन्मानंतर काही तासांतच ती मरण पावली.
पांढऱ्या वस्तूंवर लिहिलेल्या छोट्या नोटस् घेऊन पुस्तक पुढे सरकते. त्यामुळे हे पुस्तक कादंबरीपेक्षा ‘प्रार्थनेचे पुस्तक’ आहे. ही कादंबरी कल्पनाशक्ती कशी पोकळी भरून काढते, याचे एक नमुना आहे. या पुस्तकात तिच्या मृत बहिणीला लिहिलेले शेवटचे शब्द होते, ‘त्या सर्व पांढऱ्या गोष्टींमध्ये, मी तू सोडलेला शेवटचा श्वास घेईन.’ त्यांच्या लिखाणात प्रतिबिंबित झालेल्या भूतकाळातील आघात त्यांच्या आयुष्यात घडलेल्या दोन्ही वैयक्तिक घटना आहेत आणि कोरियन समाजाने एकत्रितपणे काय भोगले हेदेखील प्रतिबिंबित करते. हान हा एक कोरियन शब्द आहे. ही एक ‘जंबो-इमोशन’ आहे.
ज्याचा अर्थ एका शब्दांत सापडत नाही. दुःख, द्वेष, खेद, राग, क्रोध आणि वेदना हे त्याचे व्यापक अर्थ आहेत. या सर्वांचा एकत्रित अर्थ होऊ शकतो आणि त्याचे वेगवेगळे अर्थदेखील असू शकतात. हान यांनाही एक प्रकारची बदला घेण्याची इच्छा असते; परंतु त्या या इच्छेचा पाठपुरावा करत नाही. काही आठवणी कधीच भरून येत नाहीत. जेव्हा बाकी सर्व काही निघून जाते, तेव्हा काळाच्या ओघात त्या आठवणी मागे राहतात. जग अंधाराने भरलेले असते, अशा वेळी एखादा आशादायी प्रकाशच दिशा दाखवतो, तसे या पुरस्कारांचे आहे.






