- किरण गिते
आज भारत हा तरुणांचा देश आहे. जगातल्या कोणत्याही देशापेक्षा जास्त तरुण वर्ग आज आपल्या देशात नांदतो आहे. पण या देशाची मानसिकता तरुण व्हायला तयार नाही, या देशाच्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाला तरुणाईची भाषा आकळायला तयार नाही. प्रेम हा तरुणाईचा धर्म पण या प्रेमाला होणारा सामाजिक विरोध एवढा दाहक आहे की, तरुणांच्या या देशात दरवर्षी एक हजाराहून अधिक ‘ऑनर किलिंग’ (?) होतात आणि हा देश पाहत राहतो.
या देशात आपलं प्रेम मिळविण्याकरिताच तरुणाईची अवघी ऊर्जा खर्च होते आणि विज्ञान,कला,क्रीडा या क्षेत्रात लावायला ऊर्जाच उरत नाही. अनेकदा हे प्रेम मिळवण्या करिता ऊर्जाच काय आपलं आयुष्यही काही जणांना गमवावं लागतं आणि मग अंगणात प्रेमच न उमललेली तरुणाई जगण्यातलं काव्य आणि उत्साहच हरवून बसते.
असंच प्रेम मिळवण्यासाठी आपलं आयुष्य गमावणाऱ्या प्रणय आणि अमृताची ही एक दर्दनाक कहाणी… गोष्ट तशी सात वर्षांपूर्वीची असली तरी कोर्टाच्या एका निर्णयामुळे आज त्या हादरवून टाकणाऱ्या जखमेची खपली पुन्हा वर निघाली आहे. तेलंगणाच्या नालगोंडा येथील विशेष न्यायालयाने 2018 साली घडलेल्या ऑनर किलिंगप्रकरणी दोषी असलेल्या सराईत गुन्हेगारांपैकी एकाला फाशीची तर इतर सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मात्र हे सगळं नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सात वर्ष मागे जावं लागेल…
अमृता आणि प्रणय यांची सात वर्षांपूर्वीची प्रेमकथा
30 जानेवारी 2018 रोजी त्यांचा विवाह झाला. दोघेही आनंदात होते आणि त्यात भर म्हणून त्यांना एक गोड बातमी कळली. ती म्हणजे त्यांच्या कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याची. अमृता गरोदर होती. तिला गरोदर राहून पाच महिने झाले. बाळ सुखरूप आहे ना हे तपासायला ते दोघे आणि प्रणयची आई दवाखान्यात गेले. तपासणी झाली, सगळे व्यवस्थित आहे हे कळल्याने सगळे अत्यंत समाधानाने घरी परतत होते.
ते तिघे गाडीत बसणार तेवढ्यात दोन अनोळखी व्यक्तींनी मागून येऊन प्रणयकुमारचा गळा चिरला आणि ती व्यक्ती नाहीशी झाली. अमृता आणि तिच्या सासूने तात्काळ दवाखान्यात मदतीसाठी धाव घेतली. उपचार सुरु करण्यापूर्वीच प्रणयचा मृत्यु झाला. काही सेकंदातच सर्व होत्याचे नव्हते झाले. आपले प्रेम असणाऱ्या व्यक्तीसोबत धाडसाने विवाह केलेली अमृता क्षणात विधवा झाली. का? तर तिने निवडलेला मुलगा तिच्यापेक्षा खालच्या जातीतला होता म्हणून?
मुलीचे सुख, तिचे भविष्य, तिचे प्रेम, तिचा संसार हे सर्व गौण ठरत जातीभेद वरचढ ठरला. दलिताशी विवाह केल्याने समाजातील प्रतिष्ठा कमी झाली आणि ती पुन्हा मिळवण्याच्या अट्टहासापायी सरळ-सरळ जावयाचा खून घडवून आणला गेला. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या नवऱ्याची हत्या तिच्या वडिलांनीच मारेकऱ्याकडून घडवून आणली.
"प्रणय माझी खूप काळजी घ्यायचा…’’
"प्रणय माझी खूप काळजी घ्यायचा. तो माझ्यासाठी जेवण बनवायचा, मला खाऊ घालायचा. तो माझं आयुष्य होता." अमृता तिच्या दिवंगत नवऱ्याबद्दल आवंढा गिळत बोलत होती. ती प्रणयला कशी भेटली असा प्रश्न जेव्हा तिला विचारला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. "तो माझा शाळेत सिनिअर होता. आम्ही एकमेकांना कायमच आवडलो. मी नववीत होते आणि प्रणय दहावीत होता. आमच्यात तेव्हाच प्रेम फुललं. आम्ही दोघं फोनवर खूप बोलायचो." ती सांगते. 
मुलगा मुलगी एकमेकांना भेटतात, प्रेमात पडतात आणि लग्न करतात, असं साधं आयुष्य अमृता आणि प्रणयच्या वाट्याला आलं नाही. त्यांना धमक्या आल्या, लग्न होण्याआधी त्यांना अगदी मारहाणसुद्धा झाली.
"हे अगदी छोटं गाव आहे. त्यामुळे माझ्या आईवडिलांना आमच्या नात्याबद्दल लगेच कळलं. मी प्रणयला भेटू नये, अशी धमकी त्यांनी मला दिली होती. पण त्यामुळे माझा निश्चय ढळला नाही. मी त्याची जात किंवा आर्थिक परिस्थिती पाहिली नाही. आमचं एकमेकांवर प्रेम होतं आणि एकमेकांना समजून घेत होतो इतकंच आमच्यासाठी पुरेसं होतं," अमृता सांगते.
त्यांनी पहिल्यांदा एप्रिल 2016 मध्ये लग्न केले. तेव्हा अमृता इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होती. मात्र या लग्नाची कुठेही नोंद झाली नव्हती. तिचं हे कृत्य तिच्या पालकांना आवडलं नाही आणि त्यांनी तिला एका खोलीत कोंडून ठेवलं. "माझ्या काकांनी प्रणयला धमकी दिली होती. त्यांनी मला डंबेल्सने मारहाण केली. हे सगळं माझ्या नातेवाईकांसमोर आणि माझ्या आईसमोर घडत होतं. माझ्यासाठी कोणीही उभं राहिलं नाही. मला एका खोलीत कोंडलं होतं. प्रणय दलित असल्यामुळे मी त्याला विसरून जावं अशी त्यांची इच्छा होती," असं ती सांगते.
या संपूर्ण काळात ती प्रणयला भेटली नाही. ती थेट 30 जानेवारी 2018 ला प्रणयला भेटली. त्या दिवशी त्यांनी आर्य समाज पद्धतीने लग्न केलं. "माझी तब्येत तेव्हा सारखी खराब व्हायची. मी डॉक्टर किंवा हॉस्पिटलच्या लोकांकडे प्रणयशी बोलण्यासाठी फोन मागायचे. तेव्हाच काय तो दिलासा मिळायचा. मग आम्ही आर्य समाज मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला आमच्या लग्नासाठी कायदेशीर कागदपत्रांची गरज होती. आमच्या प्रेमासाठी आम्ही दोघांनी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला," अमृता सांगते.
गर्भपात करण्यासाठी वडिलांचा दबाव
प्रणयच्या कुटुंबाला लग्नाची काहीही कल्पना नव्हती. लग्नानंतर दोघंही हैदराबादला गेले. तिथे कदाचित सुरक्षित राहू असं त्यांना वाटलं. उच्च शिक्षणासाठी आमची अमेरिकेला जाण्याची योजना होती. त्याच दरम्यान मी गरोदर राहिले. तो आमच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. आम्ही मूल जन्माला येईपर्यंत भारतात राहण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत आम्ही मुल जन्माला आल्यानंतर कॅनडाला जाण्याची तयारी करत होतो.
(जावयाची हत्या करणारा मारोती राव)
अमृता सांगते, ती गरोदर असण्याची बातमी जेव्हा आली तेव्हा आशेचा आणि आनंदाचा नवा प्रकाश दिसू लागला. आम्ही जरी पालकत्वाच्या जबाबदारीसाठी वयाने लहान असलो तरी बाळाच्या आगमनामुळे माझ्या पालकांचं मत बदलेल असं प्रणयला वाटतं होतं.
अमृताने तिच्या आईवडिलांना गरोदर असल्याचं कळवलं होतं. "माझे वडील मला गर्भपात कर असं सांगत होते. मी त्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता, तेव्हाही त्यांनी मला गर्भपात करण्यासाठी सांगतिलं. माझे वडील आणि वडिलांचे गुंड आम्हाला इजा करतील, अशी भीती आम्हाला नेहमीच वाटत होती. पण ते इतका अमानुष प्रकार करतील असं वाटलं नव्हतं," असं ती सांगते.
माझ्यासमोर प्रणयचा गळा चिरत होते…
ती सांगते, "मी त्या दिवशी फार उशिरा म्हणजे 11 वाजता उठले. मी प्रणयला बोलवलं. मला त्याने 'येतोय कन्ना' असं म्हटलं होतं, हे मला चांगलं आठवतं. मी नाश्ता केला, पण प्रणयने काहीच खाल्लं नव्हतं. आम्ही हॉस्पिटलला गेलो. आम्ही माझ्या पाठदुखीवर बोलत होतो, ही दोघं जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा तिच्या वडिलांनी डॉक्टरना फोन करून गर्भपाताविषयी विचारणा केली होती.
"तेव्हा डॉक्टरने त्यांचा कॉल कट केला आणि आम्ही दवाखान्यात नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी मला मिस कॉल केला होता. तपासणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमधून बाहरे पडलो. मी प्रणयला काही तरी विचारत होते, पण मला त्याचा आवाज ऐकू आला नाही. एक व्यक्ती त्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न करत होता आणि प्रणय खाली कोसळला होता, इतकंच मला दिसलं," ती हुंदके देत सांगत होती.
इस तस्वीर को देखकर मुस्कराइए..
30 जानेवारी 2019 रोजी अमृताने बाळाला जन्म देऊन आपला संघर्ष सुरूच ठेवला. त्यावेळी त्या घटनेला सोशल मीडियावर जातिवादावर विजयाचे उदाहरण म्हणून सादर केलेगेले. हॅशटॅग# इस तस्वीर को देखकर मुस्कराइए... व्हायरल झाला होता. अमृताने सांगितले, 'माझे आता दोनच उद्देश आहेत. मुलाचे चांगले पालनपोषण आणि प्रणयला न्याय मिळवून देणे.मी मुलाला फक्त आणि फक्त भारतीय बनण्यासाठीच सांगेन, जो जाती, धर्माबद्दल बोलणार नाही. शोषितांची मदत करेन आणि अन्यायाविरुद्ध लढेन.
अमृताला जेव्हा विचारण्यात आले की, मुलाला कसे सांगाल की, तुझ्या वडिलांना कोणी मारले? यावर अमृताने उत्तर दिले की, समाजात जाती, क्षेत्र, धर्माच्या आधारो विष पसरवणारेच असे करतात.
जावयाला मारल्यानंतर दोन वर्षाने सासऱ्याने केली आत्महत्या
ऑनर किलिंगच्या या घटनेनंतर अमृताचे वडील मारुती राव याला अटक करण्यात आली होती. सहा महिन्यांच्या तुरुंगावासनंतर त्याला जामीन मिळाला होता. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर 2020 साली खैरताबाद येथे त्याने आत्महत्या केली. मारुती राव याचे गाव नलगोंडा जिल्ह्यात आहे. एकारात्री मारुती राव खैरताबाद इथे आर्य व्यास भवन येथे एका खोलीत उतरला होता.
त्याच्या पत्नीने आणि नंतर आर्य व्यास भवनाने फोन करुनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना बोलवण्यात आले. तेव्हा तो मृतावस्थेत सापडला. मारुती रावच्या मृत्यूवर त्याची मुलगी अमृता म्हणाली होती की, की प्रणयच्या हत्येनंतर मी माझ्या वडिलांबरोबर बोलणं सोडलं होतं. प्रणयच्या हत्येचा कदाचित त्यांना पश्चाताप झाला असावा…
(प्रणयची हत्या करणारे आरोपी)
फाशी आणि जन्मठेप… सहा वर्षानंतर मिळाला न्याय
गेल्या सहा वर्षांपासून ऑनर किलिंगचा हा खटला तेलंगणा येथील एससी/एसटी विशेष न्यायालयात सुरू होता. अमृताच्या वडिलांनी ज्या सराईत गुन्हेगाराला जावयाच्या हत्येची सुपारी दिली होती त्याचे नाव होते सुभाष शर्मा. तो बिहारचा होता. मारुती रावने आपल्या जावयाचा खून करण्यासाठी सुभाष शर्मा आणि त्याच्या इतर साथीदारांना एक कोटी रुपयांची सुपारी दिली होती.
मृत प्रणयच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी मारुती राव, मारेकरी सुभाष शर्मा यांच्यासह असगर अली, अब्दुल बारी, एमए करीम, मारुती रावचा भाऊ श्रवण कुमार, ऑटो चालक निजाम आणि कार चालक शिवा अशा आठ आरोपींना अटक केली होती. 12 जून 2019 रोजी पोलिसांनी 16000 पानांची चार्जशिट न्यायालयात सादर केली. मुख्य मारेकरी सुभाष शर्मा सोडून इतर सगळ्यांना जामीन मिळाला होता. मात्र आज तेलंगणाच्या न्यायालयाने सुभाष शर्माला फाशीची तर इतर अन्य आरोपींना जन्मठेपाची शिक्षा सुनावली.






