कुणाला भेटायचं असेल आणि समोरच्याने ‘भेटायचं असेल तर स्मशानत येऊन भेटा’ असं जर सांगितलं तर…? 26 वर्षाची पूजा तिला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला हेच सांगते, ’मी स्मशानात आहे, तिथेच या’! होय हे अगदी खर आहे की पूजाचा पत्ता हा स्मशानभूमीच आहे, मग दिल्लीतील कोणतीही स्मशानभूमी…
दोनेक वर्षांपूर्वी पूजाचं आयुष्य हे कोणत्याही इतर मुलींप्रमाणे सुरू होतं. तिच्या आईने एका एनएसजी कमांडोसोबत पूजाचा विवाह नक्की केला होता. मात्र एका घटनेनंतर पूजाच्या आयुष्याने एकदम वेगळं वळण घेतलं. स्मशानांमध्ये बेवारस प्रेतांसोबत राहणारी पूजा कोण आहे…? काय असेल तिची कहाणी…? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जेव्हा आपण पूजाला स्मशानात जाऊन भेटतो तेव्हा एकामागोमाग एक असे कोसळलेले तिच्यावरचे दु:खाचे डोंगर आणि तरीही एखाद्या मजबूत शिळेप्रमाणे असलेला तिचा निर्धार हे आपल्या समोर येतं…

स्थळ दिल्लीतील सराय काले खान परिसरातील स्मशानभूमी… पांढऱ्या पॉलिथिनमध्ये गुंडाळलेले चार मृतदेह तिथे होते. त्या मृतदेहांजवळच, 30 वर्षांची पूजा शर्मा काहीतरी करतेय. ती समोरच्या शिवमंदिरात जाते आणि परमेश्वरासमोर नतमस्तक होते, नंतर ती कमरेला स्कार्फ घट्ट बांधते जणू ती युद्ध लढणार आहे. तोपर्यंत स्मशानभूमीत काम करणारा एक कामगार तिरडी आणि कफन घेऊन तिच्याकडे येतो. पूजा तिरडीवर आच्छादन पसरवते, नंतर मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जाते. मृतदेह विजेच्या चितेसमोरच्या प्लॅटफॉर्मवर ठेवते. अंत्यसंस्कार करण्यासाठी पंडित तिथे उपस्थित असतात. पंडित मंत्र म्हणतात, त्यांच्या सूचनेनुसार पूजा मृतदेहावर गंगाजल, उदबत्ती, कापूर… ठेवते. मग ती बांबूच्या पट्टीवर कापूर ठेवते आणि मृतदेह जाळण्याचा विधी पूर्ण करते.
‘’आता ज्या कपड्यात तुम्ही मला बघत आहात, तुम्ही मला दोन वर्षांपूर्वी भेटला असता तर तुम्हाला ती पूजा ओळखता आली नसती. मी नेहमीच एक लाजाळू, गंभीर मुलगी होते. स्वतःच्या छंदात जगले. पेहराव, पद्धती, मेक-अप… सर्व काही वेगळं. पण वर्ष 13 मार्च 2022 हा दिवस आमच्यासाठी काळा दिवस होता आणि त्याच दिवशी आजच्या पूजाचा जन्म झाला.’’ पूजाने तिच्या कहाणीला सुरूवात केलेली असते.
भावाचा खुन झाला आणि माझा पुनर्जन्म…
पूजा सध्या दिल्लीतील नंद नगरी येथे आजी नरेशकांता आणि वडील यशपाल शर्मा यांच्यासोबत राहते. चार वर्षांपूर्वीपर्यंत ते सुखी कुटुंब होते. कुटुंबात आई ममता आणि भाऊ रामेश्वर होते. मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. वडील दिल्ली मेट्रोमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत होते. भाऊ रुग्णवाहिका चालवायचा. एके दिवशी 20 डिसेंबर 2019 रोजी पूजाच्या आईचा मेंदूतील मज्जातंतू तुटल्याने तिचा अचानक मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरतो तोच 13 मार्च 2022 च्या रात्री पूजा तिच्या भावासोबत जेवण करून घराबाहेर चालली होती, त्यावेळी किरकोळ वादानंतर तीन-चार नराधमांनी पूजाच्या भावाची डोळ्यासमोर गोळ्या झाडून हत्या केली. भाऊ घराजवळच्या पार्कमध्ये दोन-तीन लोकांसह बसला होता. सगळे बोलत होते. अचानक त्यांच्यात वाद सुरू झाला. आणि काही समजण्याआधीच पूजाच्या डोळ्यासमोर त्या बदमाशांनी पूजाच्या भावाच्या छातीत गोळ्या झाडल्या.
पूजा सांगते, ती लोकांकडे मदत मागत राहिली. पण कोणीही हिंमत दाखवू शकले नाही. रक्ताने माखलेल्या भावाला ती एकटीच जीटीबी रुग्णालयात घेऊन गेली. तिला जे दिसलं ते पाहून ती खूप व्याकूळ झाली, ती रुग्णालयात मृतदेह सोडून घरी आली. तिला भीती वाटत होती की आजी आणि पप्पांना कळलं तर काय होईल? पूजाने घरी सांगितलं नाही. मात्र मध्यरात्री ड्युटीवरून परतलेल्या वडिलांना घरात येताच कळलं. मुलाच्या हत्येचा धक्का ते सहन करू शकले नाहीत आणि त्याच ते रात्री कोमात गेले. वडील दवाखान्यात होते.

आणि पूजाने शपथ घेतली, बेवारस मृतदेहांचा मी वारस होईन
‘’माझे घरदार उद्ध्वस्त झाले. भावाला मुखाग्नी देणारे घरात कोणी नव्हते. माझ्या आजूबाजूचे लोक म्हणू लागले की ते माझ्या भावाला जाळतील, पण मी नकार दिला. विचार करू लागले, भाऊ माझा होता, त्यांचा नाही. मी समाजाचे नियम पाळण्यास नकार दिला आणि सर्वांची अवहेलना करून माझ्या भावाला मुखाग्नी दिला’’ पूजा सांगत होती.
डोक्यावर फेटा बांधून पूजा आपल्या भावाचे अंतिम संस्कार करत होती. भावाच्या मृत्यूच्या दिवशी तिने एकही अश्रू ढाळला नाही. दोन दिवसांनंतर ती तिच्या भावाचे अस्थिकलश घेण्यासाठी स्मशानभूमीत गेली आणि तेथे ती शिवलिंगाला मिठी मारून दोन तास रडत राहिली. यानंतर अस्थिकलश उचलताना पूजाने भावाच्या अंत्यसंस्काराची राख कपाळावर लावली. बेवारस मृतदेहांचा मी वारस होईन, अशी शपथ घेतली. हा सर्व प्रकार पाहून तिथल्या केअरटेकरला धक्काच बसला. काहीतरी अघटित घडण्याच्या भीतीने त्याने पूजाचा व्हिडिओ बनवला. त्या मुलीचे स्वप्न न्यायाधीश होण्याचे होते, त्या दिवशी कायद्याच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या पूजाच्या आयुष्याचा उद्देशच बदलला.
पूजा सांगते, तिच्या आईने लग्नासाठी केलेले दागिने तिने विकले. त्यानंतर आपल्या भावाची शेवटची वस्तू म्हणजेच स्कूटरही विकली. मालमत्ताही गहाण ठेवली. तिने सर्व पैसे बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी खर्च करण्यास सुरुवात केली. भावाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी, ती हॉस्पिटलमध्ये पोहचली. बेवारस मृतदेह कुठे पाठवले जातात आणि त्यावर अंतिम संस्कार कसे केले जातात याचा तिने अभ्यास केला, माहिती गोळा केली आणि तेव्हापासून तिने आतापर्यंत 4 हजार बेवारस मृतदेहांवर फक्त अंतिम संस्कारच केले नाहीत तर त्यांचे अस्थी दर महिन्याच्या अमावस्येला हरिद्वारच्या कंखल घाटावर दान करते. ज्या मृतदेहाचीओळख पटली की की त्याच्या धर्मानुसार अंतिम संस्कार करते.

ती चांडाळ आहे. भुतं तिच्या मागे चालतात…
पूजा झपाटल्याप्रमाणे हे सगळं काम करत असते. तिच्या भावाच्या मृत्यूच्या काही महिने अगोदरच तिचे लग्न ठरले होते. सात वर्षांचे प्रेम लग्नात बदलणार होते, पण जेव्हा तिने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला सुरुवात केली तेव्हा हे सर्व संपलं. मुलाकडच्यांनी नातं तोडलं. मुलगा म्हणाला – तुला लग्न आणि सेवा यापैकी एक निवडावा लागेल. पूजाने ही सेवा निवडली. पूजा म्हणते, ‘’त्यावेळी मी कोणत्या परिस्थितीतून गेले असेल हे तुम्ही समजू शकता. ज्याच्यासोबत तुम्ही सात वर्षांपासून स्वप्ने जपत आहात, हसत आहात, उठता आहात, सर्वकाही एका झटक्यात संपतं. सासरच्यांनी सांगितले की, ती मृतदेहाचे अंतिम संस्कार करते. ती चांडाळ आहे. भुतं तिच्या मागे चालतात. त्याच्या आत्म्यात किती आत्मा सामावल्या असतील कुणास ठाऊक.
‘मी दोन वर्षांपासून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे, पण स्मशानभूमीवरून घरी परतल्यानंतर मी कधीही आंघोळ केली नाही. लोक म्हणतात की मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर, स्मशानभूमीत गेल्यावर शरीर अशुद्ध होते. मी त्यांना सांगतो की ही सर्वात शुद्ध जागा आहे, प्रत्येकाला एक ना एक दिवस इथे यावेच लागेल. हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. यावर लोक म्हणतात – ती वेडी झाली आहे. अघोरी झाली. शेजारचे कोणीही माझ्याशी बोलत नाही. 20 वर्षांची मैत्रीही संपली. मित्रांनीही बोलणे बंद केले.
पूजा ‘ब्राइट द सोल’ नावाने स्वतःची एनजीओ चालवते. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याबरोबरच ती असहाय महिलांना आश्रयही देते. निधीची अडचण आहे, तिच्याकडे स्वतःची रुग्णवाहिकाही नाही.






