अकस्मात हे अरिष्ट | हदरूनि गेला महाराष्ट्र |
जागे झाले अनेक दुष्ट | आपुले डाव साधाया ||
निचेष्ट झाला ऐरावत | कावळे बसले तया टोचित |
कोल्ही कुत्री आनंदात | धाक सगळा निमाला ||
राजर्षी शाहू छत्रपतींच्या निधनानंतर दिनकरराव जवळकर यांनी लिहिलेल्या या ओळी. श्रीशिवस्मारक पुराण या त्यांच्या पुस्तकात त्यांनी या ओळी लिहिल्या आहेत. आग्या वेताळ या टोपणनावाने जवळकरांनी हे पद्य स्वरूपात असलेले पुस्तक लिहिले.
जगातील पहिल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या वादाच्या संदर्भात केलेल्या या पुस्तक लेखनामागची कारणे आपण पाहणार आहोतच पण हे सगळं आत्ता सांगण्याचे कारण म्हणजे सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील, अनावरण केलेला शिवछत्रपतींचा पुतळा अक्षरशः मोडून पडला.ब्राँझच्या पुतळ्याची शकले झाली.यावरून आता आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिवछत्रपतींच्या पुतळ्याची ही अवस्था दुर्दैवी आहे. आजची ही परिस्थिती पाहण्याआधी आपण पाहूया छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याच्या निर्मिती निमित्ताने तत्कालीन महाराष्ट्रातील परिस्थिती.
सुरूवातीला उल्लेख केलेल्या दिनकरराव जवळकर यांच्या पुस्तकातील आणखी मजकूर पाहिला तर, पद्यमय स्वरूपात त्यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले होते. पोथी सारखे हे लेखन होते.पहिले शिवस्मारक उभारण्यासाठी गोळा केलेल्या सतरा हजार रुपयांच्या देणगीबाबत काही घोळ झाल्याने सतरा अध्यायांत त्यांनी याचे लेखन केले.
या पहिल्या शिवस्मारक संबंधीची घटना अशी की, 1917 साली ग्वाल्हेरचे खासेसाहेब पवार व बडोद्याचे खासेसाहेब जाधव यांनी श्रीशिवस्मारकाची योजना मांडली. राजर्षी शाहू छत्रपतींनी यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. या स्मारकाबद्दल ग्वाल्हेरच्या अलिजाबहाद्दुर माधवराव शिंदे यांनीही शाहू छत्रपतींच्या सोबत असल्याचे सांगितले. ब्रिटनच्या युवराजाच्या हस्ते स्मारकाची कोनशिला पुण्यात बसवण्यात आली.

वादाची पहिली ठिणगी
स्मारकाच्या कोनशिला अनावरण प्रसंगी युरोपियनास बोलावले हे विठ्ठल रामजी शिंदे यांना आवडले नाही. ते या समारंभाला हजर राहिले नाहीत. त्यानंतर थोड्याच कालावधीत राजर्षी शाहू महाराजांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर श्रीशिवस्मारकासंबंधीची सूत्रे ग्वाल्हेरच्या शिंदेंच्या हाती गेली. स्मारक समितीत शिंदेंनी सांगलीचे राजेसाहेब पटवर्धन व समितीचे चिटणीस म्हणून गोपाळराव देवधर यांचा समावेश केला.ब्राम्हण मंडळींचा समावेश केल्याने श्रीशिवाजी मराठा सोसायटीची मंडळी संतापली. सोसायटीची सभा केशवराव जेधेंच्या जेधे मॅन्शनमध्ये विठ्ठलराव झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.
श्रीपतराव शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे यांची भाषणे झाली. केसरी व ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रांत मराठा समाजात दुफळी निर्माण होईल असे लेख लिहून आल्याबद्दल त्यांचा निषेध करणारा ठराव मांडला गेला. त्यानंतर ज्ञानप्रकाशचा अंक जाळण्यात आला. शिंदे सरकारच्या सोबत असणारा श्रीमंत पक्ष व केशवराव जेधे, जवळकर अशी तरुण मंडळी अशी फूट पडली. या दोन गटांत समेट घडवण्याचे प्रयत्न झाले. त्याच कालावधीत दिनकरराव जवळकर यांनी, श्रीमंत शिंदे सरकारविरोधात श्रीशिवस्मारक पुराणातून जळजळीत टीका केली.
ॐ नमोजी माधवराया | सर्व वादाचा जो मुख्य पाया ||
वादी पहुडलेल्या शिंधया | घ्यावा माझा नमस्कार ||
अशी पुस्तकाची सुरूवात करून अत्यंत जहाल लेखन करून ब्राम्हणेत्तर चळवळीत उत्साह भरला. मात्र या दुफळीमुळे स्मारकाचे काम मागे पडणार किंबहुना ते कधीच पूर्ण होऊ शकणार नाही या कारणास्तव तरूण मंडळाने नमते घेतले. केशवराव जेधे, गवंडी बंधू, विठ्ठलराव झेंडे, दिनकरराव जवळकर, शंकरराव मोरे यांनी श्रीशिवाजी मराठा सोसायटीचे राजीनामे दिले. पुढे जून 1925 मध्ये अलिजाबहाद्दर शिंदे यांचेही निधन झाले.
अखेर छ्त्रपती राजाराम महाराजांनी दिवाण सर रघुनाथराव सबनीस, भास्करराव जाधव, बाबुराव जगताप यांच्या सहकार्याने स्मारकाचे काम पार पाडले. दिनांक 16 जून 1928 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लेस्ली विल्सन यांनी जगातील पहिल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. श्रीशिवाजी प्रिपरेटरी स्कूलच्या समोर पुण्यात उभारलेला हा पुतळा नानासाहेब करमरकर यांनी साकारला होता. प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी हा पुतळा साकारला.

(दिनकरराव जवळकर)
सिंधुदुर्गातील शिवछत्रपतींचा पुतळा
काल पडलेला पुतळा पाहता,या पुतळ्याच्या निर्मितीवर व एकूणच वापरलेल्या साधनसामुग्रीच्या उत्कृष्टतेबद्दल शंका उपस्थित होत आहे. शिवछत्रपतींचा पुतळा साकारण्याचे काम मिळणाऱ्या कलाकाराला याहून दुसरे भाग्य ते कोणते? असे असताना निव्वळ कार्यभार उरकण्याच्या प्रयत्नात पैसे उकळून निकृष्ट दर्जाचा पुतळा बनवल्याबद्दल सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
कर्तव्यात कसूर केल्याबद्दल स्वराज्यात टकमक टोकाचा पर्याय उपलब्ध होता. तशी धाक व जरब होती.आज कायद्याचा तसा धाक उरला नाही का हा देखील प्रश्न आहे. अभेद्य रायगडाचे बांधकाम पार पडल्यानंतर, गडाच्या बांधकाम निर्मात्यांनी मोबदला म्हणून फक्त एक पायरी
मागितली. 'सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर ' असा उल्लेख असलेली पायरी आपण आजही गडावर पाहतो. असे आदर्श आपल्यासमोर असताना, एकही वर्ष पूर्ण न झालेला पुतळा पडणे ही महाराष्ट्रातील कार्यसंस्कृतीची झालेली वाताहत आहे असे म्हणता येईल. जगोजागच्या पुतळ्यांवरून कुसुमाग्रजांनी त्यांच्या स्वातंत्र्यदेवतेची विनवणी या फटक्यात लिहिले की,
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका.
महामानवांच्या पुतळ्याच्या निर्मितीत देखील असा प्रकार घडत आहे हा अतिशय चुकीचा प्रकार आहे.






