रक्तदान एक श्रेष्ठदान… ही या देशातली एक अतिशय यशस्वी जनजागृतीपर मोहीम ठरली. रक्तदानाविषयी सातत्याने केल्या जाणाऱ्या जाणीवजागृती मोहिमेमुळे रक्तदान मोहिमेला मिळणारा प्रतिसाद हा वाढता आहे. हे जरी चांगलं लक्षण असले तरी दुसऱ्याबाजूला भारतात रक्त वाया जाण्याची टक्केवारीही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि ही एक गंभीर बाब आहे.
राज्यात रक्ताचा अतिरिक्त साठा, 35 दिवसांत वापरले नाही तर…?
अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये उद्भवली आहे. 30 जानेवारी 2025 पर्यंत राज्यामध्ये एक लाख 52 हजार 499 युनिट, तर मुंबईमध्ये 17 हजार 871 युनिट रक्त उपलब्ध होते. मुंबईची दिवसाची गरज एक ते दीड हजार युनिट असताना, मुंबईसह राज्यात अतिरिक्त रक्तसाठा आहे. हे रक्त 6 ते 26 जानेवारीदरम्यान संकलित करण्यात आल्याने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते मुदतबाह्य होणार आहे.
संकलनाच्या दिवसापासून पुढील 35 दिवसांमध्ये रक्त कालबाह्य होत असल्याने, या मुदतीमध्येच त्याचा वापर करावा लागतो. मुंबईसह राज्यातील सरकारी रक्तपेढ्यांनी संकलित रक्त वाया जाऊ नये यासाठी काय करावे, अशी विचारणा केली आहे. तर खासगी रक्तपेढ्यांनी हे रक्त राज्याबाहेर देण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेपुढे आता या अतिरिक्त रक्ताचे व्यवस्थापन कसे करावे, अशी गंभीर समस्या आहे.
रक्त वाया का जातं, काय आहेत कारणं?
आकडेवारीनुसार मागील तीन वर्षे पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात 8,41,244 रक्ताचे युनिट वाया गेले. राज्यामध्ये ही संख्या 1,24,397 इतकी आहे. जानेवारी 2018 ते मे 2021 या कालावधीमध्ये राज्यात रक्त वाया जाण्याचे प्रमाण 14.8 टक्के इतके असल्याचे दिसून आले आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीमध्ये विविध प्रकारच्या आजारांच्या संसर्गामुळे देशात 4,05,385 युनिट रक्त, तर राज्यात 35,521 युनिट रक्त वाया गेले. रक्त विनावापर वाया जाण्याचे एकूण प्रमाण पाहिले, तर हे प्रमाण 8.8 टक्के इतके आहे.
राज्यात एकाचवेळी अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले, तर रक्त वाया जाण्याची शक्यता असते. असे रक्त नियमबाह्य प्रकारे इतर राज्यांना अनियंत्रित दराने विकले जाण्याचीही शक्यता जाते. सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांत एकाचवेळी अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
एका शिबिरामध्ये साठ हजारापेक्षा अधिक युनिट रक्तसंकलन झाले. मेगाकॅम्पबाबत निर्बंध असतानाही, अशाप्रकारचे मोठी शिबिरे घेण्यात येतात. रक्त कालबाह्य होण्याचा कालावधी लक्षा घेता, त्याचे योग्य नियोजन गरजे आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांच्या सुटीच्या कालावधीमध्ये रक्ताचा तुटवडा असतो.
पुण्याच्या केईएम हॉस्पिटलच्या रक्तपेढी विभागाचे प्रमुख डॉ. आनंद चाफेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रक्तपेढ्या आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून विविध रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन केले जाते. रक्तपेढ्यांनी संकलित केलेल्या रक्तावर प्रक्रिया करून त्याची साठवणूक केली जाते. संकलित रक्त आणि त्यावर प्रक्रिया करून विलग केलेल्या लाल पेशी यांची जीवन मर्यादा 35 दिवसांची असते. त्यानंतर हे रक्त व लाल पेशी वापरण्यासाठी अयोग्य ठरतात. त्यामुळे त्यांचा वापर वेळेत होणे आवश्यक आहे.
गतवर्षीच्या तुलनेत रक्त वाया जाण्याचे प्रमाण कमी असले तरी लाल पेशी वाया जाण्याचे प्रमाण हे तुलनेने अधिक आहे. राज्यात 2023 मध्ये लाल पेशींच्या 1684 बाटल्या वाया गेल्या होत्या तर या यंदा मेपर्यंत ११६० इतक्या बाटल्या वाया गेल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेने माहिती अधिकारी कार्यकर्ता चेतन कोठारी यांना ही माहिती दिली आहे.
दहा वर्षांमध्ये रक्त वाया जाण्याचे प्रमाण घटले
मागील 10 वर्षांमध्ये रक्त आणि त्यातील लाल पेशींची 35 दिवसांची जीवन मर्यादा संपुष्टात येऊन रक्त वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यात राज्य रक्त संक्रमण परिषद व रक्तपेढ्यांना यश आले आहे. 2014 पासून आतापर्यंत रक्त वाया जाण्याचे हे प्रमाण 80 टक्क्यांनी घटले आहे. 10 वर्षांमध्ये 10 हजार 495 लिटर रक्त म्हणजे 49 हजार 64 बाटल्या रक्त वाया गेले आहे.
अत्यावश्यक स्थितीमध्ये रक्त उपलब्ध व्हावे यासाठी रक्तपेढ्यांना अतिरिक्त रक्त ठेवावे लागते. अनेकदा सारखा रक्तगट उपलब्ध न झाल्यास त्याची मुदत संपल्याने ते वाया जाते. परंतु कोणतीही रक्तपेढी जाणीवपूर्वक रक्त वाया घालवत नाही. देशातील सर्व रक्तपेढ्यांनी गेल्या पाच वर्षांत 28 लाख एकक रक्त आणि रक्तघटक वाया घालविले असून, ते सरासरी सुमारे सहा टक्के असल्याचे ‘नॅको’ या संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बहुतेक सर्व रक्तपेढ्यांमध्ये हल्ली रक्ताचे विघटन तांबड्या पेशी, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, प्लेटलेट्स आणि कित्येक वेळा क्रायोप्रेसिपिटेट अशा चार घटकांत करतात. वाया गेलेला रक्ताचा आकडा प्रथमदर्शनी खूप मोठा वाटतो.
एक उदाहरण घेऊन हे थोडे समजण्याचा प्रयत्न करू. एखाद्या रक्तपेढीचे वार्षिक रक्तसंकलन 12 हजार एकक आहे. प्रत्येक रक्तपिशवीचे किमान तीन रक्तघटकांत विघटन केल्यास सुमारे 36 हजार रक्तघटक तयार होतात. वाया जाणाऱ्या रक्तघटकांचे प्रमाण सहा टक्के असल्यास पाच वर्षांत सुमारे 10,800 रक्तघटक वाया जातात. (यामध्ये तांबड्या पेशी, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, प्लेटलेट्स या तिन्ही रक्तघटकांचा समावेश होतो.) या हिशेबाने महिन्याला 180 रक्त घटक वाया जातात. म्हणजे एक हजार पिशव्या दर महिन्याला जमा केल्यास सुमारे 60 रक्तपिशव्या वाया जातात.)
रक्त पिशव्यांचे क्वालिटी सेंटर टेस्टिंग
रुग्णाला केवळ सुरक्षित रक्त मिळावे यासाठी रक्तसंकलन केल्यानंतर त्यावर निरनिराळ्या चाचण्या घेतल्या जातात व केवळ सुरक्षित रक्त आणि रक्तघटक रुग्णांना दिले जातात. रक्त वाया जाण्याची प्रमुख कारणे म्हणजे रक्तामार्फत पसरणाऱ्या रोगांच्या चाचणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह येणे, ठरावीक काळात न वापरल्यामुळे, प्लाझ्मा, प्लेटलेट्स यांसारख्या रक्तघटकांत तांबड्या पेशी असणे किंवा एखाद्या तांबड्या रक्तघटक असलेल्या पिशवीचा सेगमेंट शिल्लक न राहणे, बॅग लीक असणे अशी निरनिराळी आहेत. यांमध्ये सिरो पॉझिटिव्हमुळे वाया जाणाऱ्या रक्तपिशव्यांचे प्रमाण जास्त आहे.
‘एमएसएसीएस’च्या माहितीनुसार एचआयव्हीचे प्रमाण 0.27 टक्के, एचबीव्हीचे प्रमाण 1.6 टक्के, तर एचसीव्हीचे प्रमाण 0.14 टक्के आहे. म्हणजे रक्तामार्फत पसरणाऱ्या रोगांच्या चाचणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आल्यामुळे सुमारे 2 टक्के रक्त वाया जाते. प्लेटलेटमधील वेस्टेजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, कारण प्लेटलेट्सचे शेल्फ लाइफ केवळ पाच दिवस आहे. बऱ्याच वेळेला प्लेटलेट्सच्या बॅगांची संख्या जास्त, तर मागणी कमी असल्याने पाच दिवसांनंतर हे प्लेटलेट्स वाया जातात.
‘एफएफपी’ हा रक्तघटक उणे 30 अंश सेल्सिअसला ठेवतात. अशा फ्रोझन प्लाझ्माचा सेगमेंट अतिशय फ्रेझाइल असतो. अशा बॅग हाताळताना हा सेगमेंट तुटल्यामुळे प्लाझ्मा लीक होऊन तो वाया जातो. अन्यथा शिल्लक राहिलेला जास्तीचा प्लाझ्मा हा प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन सेंटरला जातो. दर महिन्याला संकलित होणाऱ्या रक्तपिशव्यांपैकी एक टक्का रक्त पिशव्यांचे क्वालिटी सेंटर टेस्टिंग करणे बंधनकारक आहे. म्हणजे वरील उदाहरणातील वाया गेलेल्या 60 पिशव्यांपैकी 10 रक्तपिशव्या क्वालिटी कंट्रोलमुळे, तर 12 पिशव्या सेरो पॉझिटिव्ह निष्कर्षामुळे वाया जातात.
रक्तातील घटक विलग केल्यानंतर ते ठरावीक तापमानाला विशिष्ट कालावधीसाठी साठविले जातात. तांबड्या पेशी (सीपीबीए) 35 दिवस, तर ‘एसएजीएम’मध्ये साठविलेल्या तांबड्या पेशी 42 दिवस 2 ते 4 अंश सेल्सिअस तापमानाला साठवितात. प्लाझ्मा उणे 30 अंश सेल्सिअस तापमानाला 1 वर्ष, तर प्लेटलेट्स 22 अंश सेल्सिअस तापमानाला केवळ 5 दिवसच साठविता येतात. या कालावधीत हे रक्तघटक वापरले न गेल्यास टाइम एक्स्पायर्ड/आउटडेटेड म्हणून ते वाया जातात.
काही रक्तपेढ्यांमध्ये ‘रक्तघटक संकलन क्षमतेपेक्षा’ अधिक रक्त संकलित केले जाते व ते ठरावीक कालावधीमध्ये न वापरल्यामुळे वाया जाते. स्वेच्छा रक्तदानात महाराष्ट्र आघाडीवर आहे. यानंतर तमिळनाडू, गुजरात, प. बंगाल यांचा क्रम लागतो. रक्तदात्यांमध्ये गेल्या पाच वर्षांत फार वाढ झालेली नाही; परंतु रक्ताच्या विघटनानंतर तयार होणाऱ्या रक्तघटकांमध्ये वाया जाण्याचे प्रमाण मात्र वाढलेले दिसते. याच्या उलट काही कालावधीत या रक्तघटकांचा तुटवडा असतो.
शहरांमध्ये तर हल्ली रक्तपेढ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. तर काही ग्रामीण भागांत रक्तपेढीच नाही. यासाठी ‘नॅको’ने रक्त साठवणूक केंद्रांना परवानगी दिली आहे. तरीसुद्धा या रक्तसाठवणूक केंद्रांना ठरावीक कालावधीत रक्तपेढ्यांकडून काही रक्तघटक उपलब्ध होत नाहीत. एकीकडे रक्तघटक वाया जातात, तर दुसऱ्या बाजूला रक्तघटकांचा तुटवडा असे विराधाभासी चित्र दिसते.
हे टाळण्यासाठीच्या उपाययोजना
1. खासगी रक्तपेढ्यांची वाढलेली संख्या आणि त्यांच्यातील रक्त संकलनासाठी असलेली स्पर्धा प्रमाणाबाहेर रक्त संकलित होण्यास कारणीभूत ठरते. यासाठी शहरातील ठरावीक भागात केवळ एक किंवा दोन रक्तपेढ्यांना परवानगी देण्यात यावी आणि बाकीच्या रक्तपेढ्यांना रक्तसाठवणूक केंद्र म्हणूनच काम करण्यास परवानगी द्यावी.
2. राष्ट्रीय सण, उत्सव या ठरावीक दिवशीच रक्तदान शिबिरे घेण्यास शिबिर संयोजक आग्रह धरतात. त्यामुळे या ठरावीक दिवशीच बहुतेक सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्तघटकांचा मोठ्या प्रमाणावर साठा होतो. काही शिबिर आयोजक ‘मास डोनेशन कॅम्प’चा आग्रह धरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनावश्यक रक्तसाठा होतो व या सर्व गोष्टी रक्तघटक वाया जाण्यास कारणीभूत ठरतात.
या साठी शिबिर संयोजकांनीही ठरावीक दिवसांचा, तसेच मोठ्या प्रमाणात रक्तसंकलनाचा आग्रह न धरता ठरावीक कालावधीनंतर रक्तदान शिबिरे आयोजित केल्यास संकलित रक्ताचे सर्व घटक त्यांच्या मुदतीत वापरले जाऊन टाइम एक्स्पायर्ड किंवा आउटडेटेडमुळे वाया जाणाऱ्या रक्तघटकांचे प्रमाण कमी होईल.
3. रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्यास काही प्रश्न विचारले जातात. संमतीपत्रातील काही प्रश्नांची खरी उत्तरे त्यास द्यावी लागतात. त्याची वैद्यकीय तपासणी होते व त्यानुसार तो रक्तदाता रक्तदानास योग्य आहे किंवा नाही हे ठरविले जाते. याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास/केल्यास सेरो पॉझिटिव्ह रक्ताचे प्रमाण कमी झालेले आढळले आहे. दुर्दैवाने मोठ्या रक्तसंकलन शिबिरात याची अंमलबजावणी होत नाही. सुरक्षित रक्तदात्यापेक्षा रक्तदात्यांच्या संख्येत वाढ केली जाते. परिणामी सेरो पॉझिटिव्ह रक्ताचे प्रमाण वाढून ते रक्त वाया जाते.
4. प्रत्येक रक्तपेढीने आपल्या आवश्यकतेनुसार ठरावीक काळानंतर रक्तदान शिबिरे आयोजित केल्यास सर्व रक्तघटक त्या त्या कालावधीत वापरले जाऊन वाया जाणाऱ्या रक्तघटकांचे प्रमाण कमी होईल, तसेच यामुळे फ्रोझन प्लाझ्माची हाताळणी कमी होऊन तुटलेल्या सेगमेंटमुळे लीक झालेल्या आणि त्यामुळे वाया गेलेल्या प्लाझ्माचे प्रमाणही कमी होईल.
5. एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात रक्त संकलन झाल्यास त्याचा परिणाम रक्तपेढीतील तंत्रज्ञांच्या कार्यक्षमतेवर होतो. हे सर्व रक्तघटक ६ ते ८ तासांत वेगळे करणे आवश्यक असते. या वेळेच्या बंधनामुळे रक्तघटक निराळे करताना प्लाझ्मा किंवा प्लेटलेट्समध्ये तांबड्या पेशींचे प्रमाण वाढून ते रक्तघटक वाया जातात.
6. मोठ्या रक्तदान शिबिरात रक्तसंकलनाच्या घाईत निश्चित प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त रक्त रक्तपिशवीत जमा केले जाते. यामुळे अशा रक्तपिशव्या वाया जातात.
7. ‘नॅको’ व केंद्र सरकारने रक्तपेढीतील अतिरिक्त रक्तसाठा इतर रक्तपेढींना देण्यास परवानगी दिली आहे; परंतु रक्तेपढ्यांतील वैयक्तिक कारणांमुळे हे अजूनही शक्य झालेले नाही. त्यामुळे अतिरिक्त रक्तघटक वाया जातात.
8. कित्येक वेळा एकाच रक्तगटाचे रक्त खूप मोठ्या प्रमाणात जमा होते (उदा. ‘ओ’ पॉझिटिव्ह). परंतु त्या सर्व रक्तगटाच्या रक्तघटकांसाठी मागणी नसल्यास ते रक्तघटक वाया जातात.
9. ‘ओ’ पॉझिटिव्ह तसेच ‘ओ’ निगेटिव्हचे रक्तघटक तातडीच्या रक्तघटक पुरवठ्यासाठी राखीव ठेवले जातात. परंतु ते त्यांच्या ठरावीक कालावधीत मागणी नसल्यामुळे वापरले न गेल्यास टाइम एक्सपायर्ड म्हणून वाया जातात.
10. भारतातील सर्वच रक्तपेढ्या थॅलेसिमियाच्या रुग्णांना रक्तपुरवठा करतात. या रुग्णांचे नातेवाइक मात्र नुकत्याच रक्तसंकलित केलेल्या रक्तपिशवीचाच आग्रह धरतात. रक्तपेढ्या त्याप्रमाणे रक्तपुरवठा करतातही; परंतु यामुळे आधीच्या साठ्यातील रक्तघटकांचा वापर होत नाही. ‘तांबड्या पेशी’ या रक्तघटकाकरिता ही स्थिती उद्भवते व हे घटक टाइम एक्स्पायर्ड म्हणून वाया जातात.
रक्तघटक वाया जाण्यास केवळ रक्तपेढ्याच जबाबदार नाहीत. रक्तपेढी, रक्तदान शिबिर संयोजक, रक्तघटकांचा रुग्णांसाठी वापर करणारे वैद्यकीय अधिकारी या सर्वांनी एकत्रितपणे रक्तसंकलन व रक्तघटकांचा योग्य वापर केल्यास वाया जाणाऱ्या रक्तघटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
यासाठी रक्तपेढ्यांची संख्या कमी करणे, रक्तपेढी असलेल्या भागात नवीन रक्तपेढीस परवानगी न देणे, रक्तसाठवणूक केंद्रे वाढविणे, रक्तपेढ्यांनी एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करणे टाळून ठरावीक काळानंतर छोटी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तसंकलन नियंत्रित करणे, रक्तपेढ्यांच्या साठ्यानुसार रक्तदान शिबिरे आयोजित करणे, तसेच छोट्या रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही रक्तसंक्रमणाचे योग्य नियोजन करणे, रक्त संकलन करणाऱ्या रक्तपेढ्यांनी रक्तदात्यासाठी असलेल्या निकषांचे काटेकोर पालन करणे, अशा विविध एकत्रित उपायांनी वाया जाणाऱ्या रक्तघटकांचे प्रमाण निश्चितपणे कमी होऊ शकते!






