संजना खंडारे
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत, विरोधी पक्षनेते राहुल गाधी यांच्यासह अनेक राजकीय नेते दलितांच्या घरी जेवत असल्याचे व्हिडियो, छायाचित्र व्हायरल होत असतात. त्यांच्या या कृतीची प्रशंसा होते, त्यांची व्होटबँक तगडी होते आणि जात निर्मूलनाच्या या प्रक्रीयेत आपणही सहभागी आहोत हा संदेश समाजापर्यंत पोहचण्यास मदत होते. मात्र हाच प्रकार एखाद्या सामान्य व्यक्तीने केला तर…?
मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील पिपरिया पुआरिया गावात एक अशी घटनी घडली आहे की या दशातील जातीय व्यवस्थेची पाळेमुळे अद्याप किती घट्ट रुजली आहेत हे दिसून येते. पिपरिया पुआरिया गावात राहणाऱ्या एका दलित कुटुंबाच्या घरी जेवल्याबद्दल एक तरुण आणि त्याच्या कुटुंबाला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असलेल्या भारत राज धाकड याने जिल्हाधिकारी अरुण कुमार विश्वकर्मा यांच्या समोर झालेल्या सार्वजनिक सुनावणीत त्याची व्यथा मांडली.
भारत धाकडने दिलेल्या माहितीनुसार, संतोष मेहतर या दलित समाजाच्या तरुणाच्या घरी श्राद्धाचा कार्यक्रम होता, त्यामुळे त्याने आणि त्याच्या दोन मित्रांनी संतोषच्या घरी घरी जाऊन जेवण केले. मात्र घरी जेवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि काही लोकांनी याचा विरोध सुरु केला. गावचे सरपंच भगवान सिंह पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली पंचायत बसली. त्यात बलराम पटेल, नागेंद्र पटेल, निरंजन पटेल, जवाहर पटेल, लखन धाकड, लक्ष्मण दास, रामसेवक शर्मा, जसमान सिंह आणि उपसरपंच चंद्र प्रकाश यांच्यासारखे गावातील प्रतिष्ठित लोकांचा सहभाग होता. या पंचायतीनं एक फर्मान काढलं. दलित कुटुंबाच्या घरी जेवणं पाप असल्याचं पंचायतीनं आदेशात म्हटलं. दलित कुटुंबाच्या घरी जाऊन जेवणाऱ्या तिघांनी स्वत:चं शुद्धीकरण करावं. त्यांनी गंगा नदीत स्नान करावं आणि अपराधाचं प्रायश्चित म्हणून सार्वजनिक भंडारा आयोजित करावा, असा आदेश देण्यात आला.
ग्रामस्थांच्या दबावामुळे भारत यांचे साथीदार मनोज पटेल आणि सत्येंद्र रघुवंशी यांनी पंचायतीनं सुनावलेली शिक्षा मान्य केली. पण राज धाकड यांनी हा प्रकार घटनाबाह्य, बेकायदेशीर असल्याचं म्हणत प्रायश्चित घेण्यास साफ नकार दिला. मी संघाचा कार्यकर्ता असून स्पृश्य अस्पृश्यावर माझा विश्वास नाही, असं धाकड ठामपणे म्हणाले. यामुळे त्यांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे.
भारत धाकडसोबत त्यावेळी गावातील शिक्षक सत्येंद्र सिंह रघुवंशीदेखील उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, ही गोष्ट खरी आहे, पंचायतीने आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यांच्या निर्णयानंतर मीदेखील अलाहबादला जाऊन गंगास्नान करून आलो. मी जात-पात मानत नाही, त्यामुळे संतोष मेहतरच्या घरी जेवायला गेलो होतो. कोणीतरी त्याचा व्हिडियो व्हायरल केला आणि वाद सुरू झाला.
राज यांचे वडील निरंजन सिंह यांना गावातील कार्यक्रमांना बोलावलं जात नाही. ग्रामस्थ त्यांच्याशी बोलत नाही. त्यांना टोमणे मारले जातात. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. धाकड यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पण काहीच उपयोग झाला नाही. या प्रकरणात आता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे.






