ज्ञानपरंपरा काळानुसार बदलत जातात .प्रत्येक काळातील ज्ञानपरंपरा त्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक भानातून आकाराला येतात. आधुनिक काळातील ज्ञान परंपरा तार्किक आणि विज्ञानवादी आहेत. समग्र विश्व आणि मानवी जीवन यातील गुंतागुंत आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न ज्ञानपरंपरांना अनुसरूनच केला जातो.
प्रत्येक काळात ज्ञानप्रसाराची माध्यमे आणि ज्ञानाच्या अभिव्यक्तीच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. लिखित ज्ञानसाधनांची परंपरा तशी जुनीच आहे. ज्ञानाचे प्रमुख माध्यम भाषा आहे. भाषेचा उगम हा मानवी संस्कृतीचा उगम आहे. बोलली जाणारी भाषा आणि लिखित भाषा या दोन्ही प्रकारांमध्ये मानवाने ज्ञानाचे आदानप्रदान केले आहे. मौखिक ज्ञानपरंपरा आणि अनुभवाधिष्ठीत ज्ञानपरंपरा मानवी बुद्धीचा अविष्कार आहेत. लिपीच्या शोधामुळे ज्ञानाचे आणि अनुभवाचे संग्रहण करणे सोपे झाले.
आधुनिक काळात मुद्रणाच्या शोधामुळे ज्ञानाच्या कक्षा विस्तारत गेल्या. जगभरातील वेगवेगळ्या ज्ञानपरंपरा, इतिहास, समाज संस्कृती, भाषा आणि साहित्य याकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन यांचे आदानप्रदान करणे सुलभ झाले. त्यातून ग्रंथ प्रकाशाचे क्षेत्र विस्तारत गेले. आधुनिक मुद्रणकलेची सुरुवात 1430 मध्ये जोहान्स गटेनबर्ग यांनी केली. याआधी इसवी सन दुसऱ्या शतकात चिनी लोक कोरलेल्या मजकुरावर विशिष्ट शाई वापरून त्यावर ओला कागद वापरून छपाई करत असत. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी या प्रकारे छपाई केली जात असे. आजपर्यंत मुद्राकलेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक बदल झाले आहेत.
"मुद्रण कलेचा उगम चीनमध्ये झाला असावा असे दिसते. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी धार्मिक साहित्य व चित्रे तयार करून वितरित करण्याची धर्मोपदेशकांना जाणवणारी गरज ही मुद्रणकलेच्या शोधाची जननी म्हणता येईल. बुद्धाची चित्रे लाकडी ठोकळ्यावर कोरून ठोकळा मुद्रण ( Xylography) पद्धतीने त्यांच्या अनेक प्रती काढण्याच्या या पद्धतीला इ.स 650 मध्ये प्रारंभ झाला असे समजले जाते. सर ऑरेल स्टेन या संशोधकाला चीनमधील 'सहस्र बुद्धांची गुहा' नावाच्या खाली इसवी सन १७७७साली 'हीरक - सूत्र' नावाचे इसवी सन 88 सालचे एक मुद्रित पुस्तक मिळाले. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या मुद्रित पुस्तकांपैकी हे जुन्यातले जुने पुस्तक मानले जाते."
भारतात मुद्रण कलेची सुरूवात 1556 मध्ये झाली. सेंट फ्रान्सिस झेवियरने 1549 मध्ये लिहिलेल्या एका पत्राचा दाखला देऊन अ. का. प्रियोळकर यांनी नमूद केले आहे की "जपानी भाषेत ख्रिश्चन धार्मिक साहित्याचे मुद्रण व्हावे अशी अपेक्षा त्यांनी या पत्रात व्यक्त केलेली दिसते. गोव्यामध्ये मात्र धर्मप्रसाराच्या उद्देशाने मुद्रण व्हावे अशी तातडीची गरज वाटली नव्हती. त्याऐवजी केवळ राजसत्तेच्या पाठबळावरच ख्रिस्ती धर्माचा प्रसार करावा अशीच भूमिका पोर्तुगीज सत्ताधाऱ्यांची होती. पंधराशे छप्पन्नसाली गोव्यात आलेले मुद्रण यंत्र सिरियामधील मिशनऱ्यांच्या उपयोगासाठी होते. परंतु त्या देशाकडे नेतांना ते गोव्यातच राहावे अशी परिस्थिती निर्माण झाली." यातून गोव्यात मुद्रण कलेला सुरुवात झालेली दिसते.
भारतातील देशी भाषांच्या लिपीमध्ये पहिले मुद्राक्षरे तयार करण्याचे श्रेय बुस्तामांतीबरोबर गोव्यात आलेल्या जुवांवगोन्सालव्हिस या स्पॅनिशव्यक्तीला दिले पहिजे, असे प्रियोळकरांनी नमूद केले आहे. 1578 मध्ये 'दौत्रिनां किस्ता' हे भारतातील पहिले मुद्रित पुस्तक आहे. या सर्व पार्श्वभूमीवरून हे लक्षात येते की भारतातील मुद्रण व्यवस्थेची सुरुवात ही गोव्यातून झाली आणि नंतर इतर प्रांतांमध्ये मुद्रणाला सुरुवात झाली. ख्रिस्तीधर्मोपदेशकांना धर्माचा उपदेश करण्यासाठी मुद्रणाची निकड भासली.
महाराष्ट्रातील ग्रंथ मुद्रण आणि प्रकाशन यांचा आरंभ अमेरिकन मिशन प्रेसच्या स्थापनेपासून झाला. सरकारी छापखाना 1824 मध्ये निघाला. त्यानंतर गणपत कृष्णाजीचा छापखाना 1831 मध्ये सुरू झाला. त्यांनी ब्राह्मणांच्या उपयोगाचे पंचांग यावर्षी प्रकाशित केले .'मराठील दोन मुद्रेते' या ग्रंथात गणपत कृष्णाची भंडारी यांच्या छापखान्यातून प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या नोंदणीपैकी पहिली नोंद 1835 मधील आहे.
1818 मध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात मुद्रण व्यवस्थेचा विकास झाला. एकंदरीतच भारतातील मुद्रण व्यवस्थेचा विचार केल्यास आधुनिक काळात देखील मुद्रण व्यवस्थेची सुरुवात झाल्यानंतर मुख्य उद्देश हा धर्मप्रसाराचाच होता. कालांतराने ब्रिटिशांनी शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर काही शालोपयोगी ग्रंथांचे मुद्रण गरजेपुरते होऊ लागले आणि पुढील काळात मुद्रणव्यवस्था भरभराटीस आली. नियतकालिकांचा उदय हा यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. भारताप्रमाणेच युरोपियन देशांमध्ये देखील पंधराव्या शतकात उदयाला आलेल्या मुद्रण व्यवस्थेचा प्राथमिक उद्देश धर्मप्रसराचाच होता. ब्रिटिश राजवटीचा प्रभाव मुद्रण व्यस्थेपासून एकंदरीतच सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर पडणे अपरिहार्य होते.
19व्या शतकामध्ये इंग्लंडमधील उच्चशिक्षणासंबंधीची परिस्थिती लक्षात घेतली तर "साधारणपणे 1825 पर्यंत उच्च शिक्षण हे चर्चकेंद्री होते. चर्च इंग्लंड प्रोटेस्टंट पंथाकडे झुकलेल्या चर्चव्यवस्थेची विद्यापीठांवर मिरासदारी होती.
ऑक्सफर्ड आणि केंब्रिज ही दोन विद्यापीठे होती. तेथे तीन विषय शिकवले जात; एक म्हणजे अभिजातकालीन ग्रीक व रोमन साहित्य, दुसरा गणित आणि ज्यांना धर्मगुरू व्हायचे आहे त्यांच्यासाठी तिसरा धर्मशास्त्र हा विषय असे. या विद्यापीठांना संलग्न असणाऱ्या वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये तसेच दोन्ही विद्यापीठांमध्ये शिक्षक म्हणून केवळ या चर्चेचे धर्मगुरू व पाद्रीयांना नेमले जात असे. ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांची कॉलेजे या चर्चच्याच संस्था होत्या. तेथील शिक्षण धर्मनिरपेक्ष वगैरे असणे शक्यच नव्हते. प्रोटेस्टंट धर्मनिष्ठतेच्या यावर तेथील व्यवहार चालत. उदाहरणार्थ विद्यापीठ अध्यापक हे अविवाहित पुरुष धर्मगुरू असत आणि ते कॉलेजमध्ये राहत. स्त्रिया, निरीश्वरवादी मते असणारे लोक तसेच कॅथलिक जुईश व मेथडिस्ट पंथाचे लोक यांना विद्यापीठ शिक्षणासाठी प्रवेश मिळत नसे. 1826 मध्ये लंडनचे युनिव्हर्सिटी कॉलेज (पुढे लंडन विद्यापीठ ) स्थापन होऊन स्त्रियांना तसेच कोणत्याही पंथाच्या व धर्माच्या लोकांना त्याचप्रमाणे अधार्मिक लोकांना प्रवेश मिळू लागला."
मुद्रणव्यवस्था, विद्यापीठांची स्थापना, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा पुनर्विचार त्यातून निर्माण झालेली प्रबोधनाची चळवळ या आधुनिक काळातील एकमेकांशी संबंधित असलेल्या बाबी आहेत. या सर्व व्यवहारात आपण स्त्रियांच्या स्थानाचा विचार केला तर स्त्रियांचे स्थान हे दुय्यमच होते. त्यामुळे ज्ञानव्यवहाराचा एक अपरिहार्य भाग असलेला मुद्रणव्यवहार यात स्त्रियांची उपस्थिती असणे तसे दुरापास्तच होते. जगभरात मध्ययुगीन धर्मव्यवस्थेचा पगडा आधुनिक काळातील सुरुवातीच्या प्रबोधन विचारांमध्ये काही प्रमाणात असलेला दिसतो. धर्मव्यवस्थेने स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेले असल्यामुळे आधुनिक काळातील सर्व व्यवस्थेमध्ये स्त्रिया दुय्यम असलेल्या दिसतात.
युरोपियन देशांमध्ये 17 व्या शतकापासून सुरू झालेल्या स्त्री हक्कांच्या चळवळीमुळे स्त्रिया ज्ञानव्यवहारात हस्तक्षेप करू लागल्या. त्यातून वेगळ्या अशा स्त्रीवादी सिद्धांतनाची सुरूवात झाली. यातून मुद्रणव्यवहारात स्त्रियांच्या हस्तक्षेपाची गरज निर्माण झाली. स्त्रीवादी सिद्धांतनाप्रमाणे केवळ स्त्री म्हणून एखादा व्यवसाय करणे किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेत आपले योगदान देणे याला स्त्रीवादी हस्तक्षेप म्हणता येणार नाही; तर स्त्री हक्कांच्या विशिष्ट जाणिवेने प्रेरित होऊन स्त्रीवादी सिद्धांतनाचा पुरस्कार करत स्त्री पुरुष समानतेची मागणी करणे आणि या मागणीसाठी आवश्यक ते सिद्धांत उभारणे येथे अभिप्रेत आहे. हा विचार प्रमाण मानून जगभरातील स्त्रिया मुद्रण व्यवहारात हस्तक्षेप करू लागल्या.याचा परिणाम भारतीय मुद्रणव्यवस्थेवरही झाला. भारतातही विसाव्या शतकात मुद्रण व्यवस्थेत स्त्रियांनी आपला समतावादी हस्तक्षेप नोंदवायला सुरुवात केली आणि स्त्रीवादाशी काही मुद्द्यांवर समांतर असलेल्या विचारांचा स्वीकार करीत प्रकाशन व्यवसाय सुरू केला.
‘गुटेनबर्गच्या सावल्या’ या पुस्तकात प्रवीण घोडेस्वार यांनी भारतातील आणि मुख्यतः महाराष्ट्रातील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा घेतलेला आहे. हा आढावा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की, ज्ञानप्रसाराचे एक माध्यम म्हणून स्त्रिया जेव्हा प्रकाशन व्यवसायाचा विचार करू लागल्या, तेव्हा त्यांना आपल्या दुय्यमत्त्वाची जाणीव होती आणि या जाणिवेतून जगाला समतेचा विचार देण्यासाठी आणि मुख्यतः स्त्रियांच्या हक्काची, अधिकाराची मांडणी करण्यासाठी या व्यवसायात त्या उतरल्या.
यातील काही स्त्रियांचे प्रयत्न या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. वृत्तपत्रात चालवलेल्या पाक्षिक सदराचे रूपांतर या पुस्तकात झाले आहे. त्यातून प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या विचारविश्वाचा परिचय करून देण्याचा आणि त्यांची ऐतिहासिक कामगिरी मांडण्याचा प्रयत्न प्रवीण घोडस्वार यांनी केलेला आहे. या दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व निर्विवादपणे मान्य करावे लागेल. उर्वशी बुटालिया, रितू मेनन, चिकी सरकार, मिली ऐश्वर्या, नीता गुप्ता कार्तिकी व्हीके, नाझिया खान यांसारख्या महाराष्ट्राबाहेरील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रियांच्या कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. या सर्व स्त्रिया महिलांच्या अधिकारांचा पुरस्कार करणाऱ्या आणि स्त्रीवादी सिद्धांतनाची मांडणी करणाऱ्या आहेत.
उर्वशी बुटालिया आणि रितू मेनन यांनी ‘काली फॉर विमेन’ या प्रकाशनसंस्थेची स्थापना 1984 मध्ये केली. स्त्रीवाद तसेच डाव्याविचारसरणी सहप्रागतिक विचारधारांना डोळ्यासमोर ठेवून प्रकाशन व्यवसाय सुरू करणाऱ्या या दोन्ही स्त्रियांनी लिंगभेद, धर्मांधता, सांप्रदायिकता, हिंसाचार यांची चिकित्सा करणाऱ्या समतावादी विचारांना डोळ्यासमोर ठेवून प्रकाशन व्यवसाय निष्ठेने चालवला.
उर्वशी बुटालिया यांनी 2003 मध्ये ‘जुबान’ या स्वतंत्र प्रकाशन संस्थेची स्थापना करून इंग्रजी, हिंदी ग्रंथांबरोबरच वेगवेगळया प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय भाषांमधील भाषांतरित साहित्याचे दालन समृद्ध केले. रितू मेनन यांनी ‘काली फॉर विमेन’पासून वेगळे झाल्यावर ‘विमेन अनलिमिटेड’ या प्रकाशन संस्थेचीची सुरुवात करून अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन केले.
या दोन स्त्रीवादी प्रकाशकांचा यथार्थ परिचय या पुस्तकात घोडेस्वार यांनी करून दिला आहे. याचबरोबर चिकी सरकार यांनी प्रकाशन व्यवसायाला दिलेल्या आधुनिकतेची जोड तसेच बदलत्या काळात या व्यवसायात अनुरूप बदल करण्याच्या आवश्यकतेची नोंद घेतली आहे.
मिली ऐश्वर्या यांची प्रकाशन व्यवसायातील कारकीर्द ‘रूपा बुक्स’ने सुरू झाली. सध्या त्या ‘पेंग्विन रँडम हाऊस, इंडिया’मध्ये कार्यरत आहेत. नीता गुप्ता, कार्तिका व्हीके, नाझिया खान या सर्व प्रकाशात स्त्रिया आपल्या प्रकाशन व्यवसायातून प्रागतिक विचारधारा डोळ्यासमोर ठेवून पुस्तकांची निर्मिती करताना दिसतात. घोडेस्वार यांनी या सर्व स्त्रियांच्या प्रकाशन व्यवसायातील योगदानाची नोंद घेतली आहे.
आधुनिक काळातील भारतीय स्त्रियांच्या लिखाणाची सुरुवात कशा पद्धतीने झाली, पुढे त्याचा विकास कसा झाला, त्यातील स्थित्यंतराचे टप्पे कोणकोणते आहेत, यावर प्रकाश टाकून स्त्रियांच्या दडपलेपणाचा इतिहास शोधणे जसे आवश्यक आहे; तसेच या सर्व मुद्द्यांचे महत्व लक्षात घेऊन हा सगळा दस्तऐवज प्रकाशित करणाऱ्या स्त्रीवादी प्रकाशन संस्थांची गरज या सर्व स्त्रीवादी स्त्रियांनी पूर्ण केली, त्याची नोंद घेणेही आवश्यकच आहे.
जागतिक ज्ञानव्यवहार आणि प्रामुख्याने स्त्रियांच्या ज्ञान व्यवहाराची गरज पूर्ण करण्यासाठी या सर्व स्त्रिया पुरुषांचे वर्चस्व असलेल्या प्रकाशन व्यवसायात उतरल्या आणि त्यांनी आपला वेगळा वैशिष्ट्यपूर्ण ठसा या व्यवसायावर उमटवला. यामुळे स्त्रीवादी सिद्धांतनात मूलभूत भर पडली. स्त्रीकेंद्री इतिहास लेखनाची दृष्टी विकसित झाली. लिंगभावाची चर्चा आणि त्यातील समतादर्शी वाड्मयनिर्मितीच्या परंपरा या स्त्रीवादी प्रकाशन संस्थांनी नेटाने पुढे चालवल्या.
घोडेस्वार यांनी या सर्व स्त्री प्रकाशनाचा या ज्ञानव्यवहारातील हस्तक्षेप प्रकाशन व्यवसायाच्या आधारे त्यांनी कसा पूर्ण केला याचा आलेख मांडला आहे. जगभरातील स्त्रीवादी सिद्धांतने, इतिहास लेखनदृष्टी, वंचित, उपेक्षित, कष्टकरी, विस्थापित समुदायांशी नाते जोडत या प्रकाशक स्त्रियांनी आपली प्रागतिक समताप्रवण प्रकाशकीय परंपरा निर्माण केली. या प्रकाशक स्त्रियांचा या पुस्तकातील आलेख प्रकाशन व्यवसायातील स्त्रीवादी प्रकाशन संस्थांमधील स्त्रियांच्या कामगिरीच्या इतिहास लेखनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.
या पुस्तकात उर्वरित पंधरा स्त्रिया या महाराष्ट्रातील प्रकाशन व्यवसायात कार्यरत असलेल्या स्त्रिया आहेत. त्यातील सुमती लांडे यांनी 22 एप्रिल 1984 मध्ये ‘शब्दालय प्रकाशन’ची सुरुवात केली. सुमती लांडे या स्वतः एक संवेदनशील कवयित्री आहेत. मराठी प्रकाशन व्यवसायावर सुमतीबाईंनी आपला अमीट ठसा उमटवला आहे. साहित्याची प्रगल्भ जाण असणाऱ्या सुमतीबाईंनी विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन मराठी प्रकाशन व्यवसाय समृद्ध केला.
‘शब्दालय’ दिवाळी अंकातून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विषय हाताळले. त्यातून स्त्रीवाद आणि लिंगभावाच्या सिद्धांतनाला पाठबळ दिले. सर्जनशील आणि सैद्धांतिक साहित्य निर्मितीतील शब्दालयचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. वितरणासाठी पुस्तकांची गाडी घेऊन महाराष्ट्रात सर्वत्र फिरणाऱ्या सुमतीबाई यांनी अत्यंत धडाडीने प्रकाशनाबरोबरच वितरणव्यवस्था सांभाळली. ‘पुस्तक वितरण करणारी स्त्री’ बघण्याची सवय त्यांनी महाराष्ट्राला लावली. महाराष्ट्रातील प्रकाशन आणि वितरण व्यवसायातील पुरुषी वर्चस्वाला त्यांनी आव्हान दिले. त्यांचा कित्ता गिरवत आज अनेक स्त्रिया प्रकाशन आणि वितरण या दुहेरी व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत आहेत. याचे श्रेय सुमतीबाईंना द्यावेच लागेल.
डॉ. स्नेहल तावरे या मुळात मराठीच्या व्यासंगी प्राध्यापक आहेत. ‘स्नेहवर्धन प्रकाशन’चा भार त्यांनी अलगद पेलला आहे. १९९०मध्ये सुरू झालेल्या स्नेहवर्धन प्रकाशनाने नव्या, जुन्या लेखकांमध्ये पूल साधण्याचे काम केले आहे. अनेक महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ, समीक्षाग्रंथ आणि सर्जनशील कलाकृतींची निर्मिती स्नेहवर्धन प्रकाशकाने केली आहे. प्रकाशक म्हणून तावरे यांची कार्यपद्धती वैशिष्ट्यपूर्ण आहे. नियोजनबद्ध कार्यपद्धतीचा अवलंब त्या सर्वच क्षेत्रात करतात, मग तो प्रकाशन व्यवसाय असो, प्राध्यापकी असो किंवा चर्चासत्र आणि विविध उपक्रमांचे आयोजन असो, डॉ. स्नेहल तावरे शांतपणे अगदी सहजतेने सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात .त्यांच्या याच सर्वांगीण कार्याचा परिचय घोडेस्वार यांनी करून दिला आहे.
अरुणा सबाणे या मुळात स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्याचबरोबर लेखिका, कादंबरीकार आहेत. त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेला पूरक अशा ‘आकांक्षा’ प्रकाशनाची सुरुवात २००३-४मध्ये केली. त्याआधी त्यांनी ‘आकांक्षा’ मासिकाची सुरुवात केली. मराठी साहित्यात आकांक्षा प्रकाशनाने अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन करून मराठी साहित्यात भर घातली आहे. ‘माहेर’ संस्थेची स्थापना करून स्त्रियांचे प्रश्न सोडवणाऱ्या अरुणाताईंनी विदर्भातून प्रकाशन व्यवसायात चांगलाच जम बसवला आहे.
सुनिताराजे पवार यांनी २०२०मध्ये ‘संस्कृती प्रकाशन’ची स्थापना केली. अल्पावधीतच त्यांनी या व्यवसायात आपला जम बसवला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक मान्यवर लेखक तसेच नवोदित लेखकांची ५००च्या आसपास पुस्तके छापली आहेत. त्यांना मिळालेले यश उल्लेखनीय आहे असे नमूद करून घोडेस्वार यांनी एका खेड्यातील मुलगी ते यशस्वी प्रकाशक असा त्यांचा प्रवास चित्रित केला आहे.
मोहिनी कारंडे या देखील एक सुस्पष्ट वैचारिक भूमिका घेऊन प्रकाशन व्यवसायात उतरल्या आहेत. गुणवान पण दुर्लक्षित लेखकांचे साहित्य प्रकाशित करणे त्यांचे उद्दिष्ट आहे, असे घोडेस्वार यांनी नमूद केले आहे. अनुवादाच्या क्षेत्रात मोहिनी यांनी विशेष लक्ष देऊन इतर भाषांमधल्या महत्त्वाच्या कलाकृती मराठीत आणल्या आहेत. ‘पृथा’ हा वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक त्या संपादित करतात.
सारिका उबाळे या मराठीतील महत्त्वाच्या कवयित्री आहेत. लिंगभाव आणि स्त्रीप्रश्नांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या प्रकाशन व्यवसायात उतरल्या आहेत. ‘मुक्ता’ या प्रकाशन संस्थेद्वारे त्यांनी जात, वर्ण, वर्ग, लिंगभेदाच्या जाणिवा जागृतीसाठी पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे.
याचबरोबर ज्योती कपिले, चंद्रलेखा दिंडे, लता गुठे या वेगवेगळ्या कारणांनी प्रकाशन व्यवसायात आलेल्या स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाची दखल या पुस्तकात घेतली आहे.
या सर्व प्रकाशक स्त्रियांच्या कार्याचा यथोचित गौरव घोडेस्वार यांनी केला आहे. पुरुषी वर्चस्व असलेल्या प्रकाशन व्यवसायात या स्त्रिया आपला विशिष्ट वैचारिक हस्तक्षेप नोंदवत आहेत, या दृष्टीने या पुस्तकातील नोंदी महत्त्वाच्या आहेत.
मुळात प्रकाशन व्यवसायात कुटुंबातील सदस्य असल्यामुळे या व्यवसायात येणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्या योगदानाची सार्थ दखल घोडेस्वार यांनी घेतली आहे. नीलिमा कुलकर्णी, भाग्यश्री कासोटे, अमृता कुलकर्णी, मीना कर्णिक, नम्रता मुळे, मधुमिता बर्वे इत्यादी प्रकाशन व्यवसायात कार्यरत स्त्रियांच्या कार्याची दखलही या पुस्तकात घेतली आहे .
प्रकाशन व्यवहार हा ज्ञानाच्या कक्षा विस्तारित करणारा व्यवहार आहे. या व्यवहारात व्यवसायिक मूल्यांपेक्षा ज्ञानाधिष्ठीत मूल्यांचा स्वीकार करणे आणि त्याची जपणूक करणे आवश्यक ठरते. या पुस्तकात आपापल्या वैचारिक परिप्रेक्ष्यानुसार या व्यवसायात मूल्यांची जपणूक करणाऱ्या स्त्री प्रकाशकांच्या कार्याचा परिचय प्रवीण घोडेस्वार यांनी करून दिला आहे.
‘गुटेनबर्गच्या सावल्या’
लेखक - प्रवीण घोडेस्वार
भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर
पाने : ११४, मूल्य : २०० रुपये.






