Skip to main content

“हाथरस अजून संपलेलं नाही…” सहा वर्षांपूर्वी मध्यरात्री जाळलेली चिता अजून धगधगतेय!

Article in Marathi
Shantanu Khuje
6 days ago
4 min read
0 views
 “हाथरस अजून संपलेलं नाही…” सहा वर्षांपूर्वी मध्यरात्री जाळलेली चिता अजून धगधगतेय!

शंतनू खुजे


  • त्या रात्री हाथरसमध्ये फक्त एका दलित मुलीची चिता पेटलेली नव्हती; भारतीय समाजाच्या विवेकालाच जणू आग लागली होती. पोलिसांच्या घेरावात, कुटुंबाच्या आक्रोशावर मात करत मध्यरात्री गुपचूप पार्थिव जाळलं जात असताना, देशभरातील लाखो लोक मोबाईलच्या स्क्रीनवरून लोकशाहीचा एक भयावह चेहरा पाहत होते. 


  • सहा वर्षांनंतर ‘हाथरस : 16 डेज’ हा माहितीपट त्या राखेत अजूनही धगधगत असलेल्या प्रश्नांकडे पुन्हा पाहायला भाग पाडतो . जात अजून किती जिवंत आहे? स्त्रीच्या शरीरावरच समाजाची नैतिकता का उभी केली जाते? आणि न्यायाच्या नावाने आपण नेमकं कोणाला वाचवत असतो?


हाथरस बलात्कार प्रकरण… ज्यात 14 सप्टेंबर 2020 रोजी दलित मुलीवर हल्ला झाला, 4 उच्चवर्णीय मुलांवर सामूहिक बलात्काराचा आरोप झाला, मुलीचा मृत्यू झाला, गदारोळ झाला, राहुल-प्रियंका गांधींसह अनेक बड्या नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली, पीडितांना 25 लाखांची सरकारी मदत मिळाली, त्यानंतर बराच काळ शांतता पसरली. त्यानंतर अडीच वर्षांत 35 साक्ष आणि 70 सुनावणीनंतर 2 मार्च 2023 रोजी निर्णय आला. न्यायालयात खटला टिकला नाही. तीन आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, एकावर अहेतुक हत्येचा दोष सिद्ध झाला. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. बलात्कार किंवा सामूहिक बलात्काराचा आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही.


आता, तब्बल सहा वर्षांनंतर ZEE5 वर प्रदर्शित झालेला ‘हाथरस : 16 डेज’ हा माहितीपट त्या जखमेवरची खपली पुन्हा उघडतो. दिग्दर्शक पॅट्रिक ग्रॅहम आणि पत्रकार तनुश्री पांडे यांच्या नजरेतून उलगडणारा हा माहितीपट केवळ एका गुन्ह्याचा मागोवा घेत नाही, तर जात, पितृसत्ता, सत्तेची निर्दयता आणि भीतीने गुदमरलेल्या ग्रामीण भारताचं वास्तव समोर आणतो.


सप्टेंबर २०२० मध्ये हाथरस जिल्ह्यातील एका १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला. गंभीर जखमी अवस्थेत दोन आठवडे मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दिल्लीतील रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाने देश हादरला. रात्रीच्या अंधारात पोलिसांनी कुटुंबाच्या संमतीशिवाय केलेला अंत्यसंस्कार, प्रशासनाची भूमिका आणि नंतर सुरू झालेला राजकीय व सामाजिक संघर्ष , या सगळ्याने हाथरस केवळ एक गुन्हा राहिला नाही, तर भारतीय लोकशाहीच्या नैतिकतेवर उभा राहिलेला प्रश्न बनला.


User Image


“हाथरस अजूनही संपलेलं नाही…”


‘हाथरस : 16 डेज’ चे दिग्दर्शक पॅट्रिक ग्रॅहम सांगतात की, कोविड काळात घडलेली ही घटना त्यांच्या मनात कायमची घर करून राहिली होती. २०२४ मध्ये या प्रकरणावर माहितीपट करण्याची कल्पना समोर आली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला.


त्यांच्या मते, हाथरस ही एक ‘एकटी’ घटना नाही. अशा प्रकारची हिंसा आजही देशाच्या वेगवेगळ्या भागांत घडते आहे. आपण काही काळ एखाद्या प्रकरणावर लक्ष केंद्रित करतो, संताप व्यक्त करतो आणि नंतर पुढे निघून जातो. पण ज्यांच्यावर ही हिंसा कोसळते, त्यांच्यासाठी तो काळ कधीच संपत नाही.


माहितीपटासाठी टीम जेव्हा पुन्हा त्या कुटुंबाकडे गेली, तेव्हा सहा वर्षांनंतरही त्या घरात भीती, असुरक्षितता आणि आघात तसाच जिवंत असल्याचं दिसून आलं.


पत्रकार तनुश्री पांडे सांगतात,


“परिस्थिती बदलली आहे, पण चांगल्यासाठी नाही. सरकारकडून नुकसानभरपाई मिळाली खरी, पण महागाईच्या काळात एका अत्यंत गरीब कुटुंबासाठी ते पुरेसं नाही. मला सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे हा आघात आता पुढच्या पिढीकडे जात आहे.”


पीडितेच्या लहान पुतण्यांनाही शाळेत सहज प्रवेश मिळत नाही. आरोपींची मुलं त्याच शाळेत शिकतात म्हणून कुटुंबाकडून जबाबदारीचे लेखी कागद मागितले जातात. “त्या मुलींना बलात्कार म्हणजे काय हेही पूर्णपणे कळत नाही, पण त्या आधीपासूनच भीतीच्या सावटाखाली वाढत आहेत,” असं तनुश्री म्हणतात.


ट्रोलिंग, भीती आणि पत्रकारितेची किंमत


हाथरस प्रकरणाचं वार्तांकन करताना तनुश्री पांडे यांना प्रचंड ट्रोलिंग आणि धमक्यांचा सामना करावा लागला. त्या काळाची आठवण सांगताना त्या स्पष्ट शब्दांत म्हणतात, “एका क्षणी मला वाटायला लागलं होतं की माझं करिअर संपलं.”


त्यांच्या मते, हा केवळ सोशल मीडियावरील विरोध नव्हता, तर सुनियोजित हल्ला होता. “मला अटक होईल का, तुरुंगात जावं लागेल का, अशी भीती वाटत होती. मी पत्रकारिता निवडली कारण मला वाटत होतं की सत्य मांडणं आणि सत्तेला प्रश्न विचारणं हेच तिचं काम आहे. पण जेव्हा मी ते केलं, तेव्हा मला शिक्षा दिल्यासारखं झालं,” त्या म्हणतात.


User Image


तनुश्री यांना या अनुभवातून ग्रामीण भारतातील महिलांची असुरक्षितता अधिक तीव्रतेने जाणवली. “जर माझ्यासारखी व्यक्ती, जिला काही प्रमाणात पाठिंबा आणि ओळख आहे, ती एवढी घाबरू शकते, तर एखादी ग्रामीण दलित महिला आवाज उठवताना काय सहन करत असेल?” असा प्रश्न त्या उपस्थित करतात.


“बलात्कारासारखी गोष्ट अस्तित्वातच नसते…”


या माहितीपटातील सर्वाधिक अस्वस्थ करणाऱ्या बाबींमध्ये आरोपी पक्षाच्या मुलाखतींचा समावेश आहे. आरोपींचे वडील आणि वकील उघडपणे बलात्कार नाकारतात आणि घडलेलं सर्व काही “संमतीने” झालं, असा दावा करतात. हा अनुभव सांगताना पॅट्रिक ग्रॅहम हादरलेले दिसतात. “जेव्हा तुम्ही लोकांना उघडपणे असं बोलताना ऐकता की ‘बलात्कार असं काही नसतंच’ किंवा ‘मुलीच त्यासाठी कारणीभूत असतात’, तेव्हा ते एखाद्या मध्ययुगीन समाजात आल्यासारखं वाटतं,” ते म्हणतात.


त्यांच्या मते, ही केवळ काही व्यक्तींची मतं नाहीत; तर समाजात खोलवर रुजलेल्या स्त्रीद्वेषी आणि पितृसत्ताक मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. “महिलांना तुच्छ लेखणारी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी संस्कृती शेवटी समाजाला कुठे घेऊन जाते, हे हाथरस दाखवून देतं,” असं ते म्हणतात.


तनुश्री पांडे याही या मानसिकतेबद्दल तीव्र अस्वस्थता व्यक्त करतात. त्यांच्या मते, आपण सोशल मीडियावर पुरोगामी भाषा बोलतो, पण प्रत्यक्ष समाजात परिस्थिती फार वेगळी आहे.


“फक्त खेड्यांमध्येच नाही, तर शहरांमध्येही स्त्रियांविषयीचे दृष्टिकोन अत्यंत सनातनी आहेत,” त्या म्हणतात. महिलांसाठी वेगळे नियम, वेगळे निर्बंध आणि सततचं नैतिक नियंत्रण हे अजूनही समाजाच्या केंद्रस्थानी असल्याचं त्या सांगतात.


त्या उदाहरण म्हणून आसाराम बापू प्रकरणाचा उल्लेख करतात. “दोषी किंवा आरोपी व्यक्ती समाजात मोकळेपणाने फिरते; पण पीडित महिला मात्र अजूनही घरात बंदिस्त आयुष्य जगते. आपल्या देशात निर्बंध गुन्हेगारांवर कमी आणि पीडितांवरच जास्त असतात,” असं त्या म्हणतात.


“हाथरसमध्ये गेल्यावर जणू भूतकाळात गेल्यासारखं वाटत होतं”


चित्रीकरणादरम्यानचे अनुभव सांगताना पॅट्रिक ग्रॅहम उत्तर भारतातील खोलवर रुजलेल्या लैंगिक विषमतेकडे लक्ष वेधतात. त्यांच्या मते, हाथरसमध्ये महिलांची सार्वजनिक उपस्थिती जवळजवळ अदृश्य होती. रस्त्यांवर महिला क्वचितच दिसायच्या. दिसल्या तरी चेहरा झाकलेला असायचा. स्मार्टफोन सोडले, तर जणू आपण भूतकाळात आलो आहोत असं वाटायचं.” 


User Image


तनुश्री एक प्रसंग सांगतात… शूटिंगनंतर एका बँक्वेट हॉलमध्ये पुरुषांची पार्टी सुरू होती, पण तिथे एकही महिला नव्हती. “महिला मद्यपान किंवा पार्टी करताना दिसली, तर समाज लगेच तिच्या चारित्र्यावर प्रश्न उभे करतो,” त्या म्हणतात.


त्यांच्या मते, महिलांविरोधातील हिंसेची सुरुवात इथूनच होते. स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून न पाहणाऱ्या मानसिकतेतून.


“माहितीपट पाहताना आई पुन्हा रडली…”


माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबाने तो पाहिला. तनुश्री सांगतात, “आईने मला फोन केला. तिच्या डोळ्यांत पाणी होतं. माहितीपट पाहणं म्हणजे तो संपूर्ण आघात पुन्हा जगणं होतं.”


त्या सांगतात की, पत्रकार म्हणून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला जातो, पण ही कथा टीममधील प्रत्येकाला आतून हादरवून गेली. कुटुंब अजूनही मुलीच्या आठवणींमध्ये जगतं. ती कशी स्वयंपाक करायची, घरकामात मदत करायची, हे सांगताना ते वारंवार भावूक होत होते.


मात्र, या सगळ्या वेदनेतही तनुश्री एका छोट्या आशेचा उल्लेख करतात. माहितीपट पाहिल्यानंतर काही उच्चवर्णीय लोकांनी त्यांना फोन करून “अशा गोष्टी घडतात” हे मान्य केलं आणि आपल्या परिसरात ते पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करू, असं सांगितलं.


तनुश्री म्हणतात, “जर हा माहितीपट पाहून एका व्यक्तीने जरी आत्मपरीक्षण केलं, तरी कदाचित या माहितीपटाने आपलं काम केलं आहे.”


User Image(पत्रकार तनुश्री पांडे)


मध्यरात्रीच्या अंत्यसंस्काराची साक्षीदार ठरलेली पत्रकार तनुश्री पांडे


२०२० मध्ये हाथरस प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वात आक्रमक आणि सातत्यपूर्ण ग्राउंड रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांमध्ये तनुश्री पांडे यांच नाव अग्रक्रमाने घेतलं गेलं. पीडित कुटुंबाशी संवाद साधण्यापासून ते प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करण्यापर्यंत, तनुश्रीने त्या काळात केलेलं वार्तांकन राष्ट्रीय चर्चेचा भाग बनलं होतं. विशेष म्हणजे, टीआरपीकेंद्री ‘क्राईम कव्हरेज’च्या पलीकडे जात त्यांनी हाथरसकडे जात, सत्ता आणि स्त्रीविरोधी हिंसा यांच्या छेदनबिंदूवरून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच ‘हाथरस : 16 डेज’ या माहितीपटात त्यांची उपस्थिती केवळ पत्रकाराची राहत नाही; ती साक्षीदाराची, प्रश्न विचारणाऱ्या नागरिकाची आणि त्या कुटुंबाच्या वेदनेशी जोडल्या गेलेल्या एका संवेदनशील स्त्रीची बनते.


हाथरस प्रकरणातील सर्वात संतापजनक आणि देशाला हादरवून सोडणाऱ्या घटनांपैकी एक म्हणजे पीडित तरुणीच्या पार्थिवावर पोलिसांनी मध्यरात्री कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध केलेला अंत्यसंस्कार. त्या रात्रीच्या घटनांची प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून तनुश्री पांडे यांचं नाव विशेषतः घेतलं जातं. प्रशासनाने गाव सील केलेलं असताना, माध्यमांना रोखलं जात असताना आणि कुटुंबीयांना मुलीचा शेवटचा चेहराही पाहू दिला जात नसताना, तनुश्री घटनास्थळी उपस्थित होत्या. त्यांनी केलेल्या वार्तांकनातून देशाने प्रथमच पाहिलं की, एका दलित मुलीच्या मृत्यूनंतरही तिच्या कुटुंबाला सन्मानाने शोक करण्याचा अधिकार नाकारला जात होता. रात्रीच्या अंधारात पेटणारी चिता, आक्रोश करणारे कुटुंबीय आणि पोलिसांच्या घेरावात सुरू असलेली ती घाई हे दृश्य भारतीय समाजव्यवस्थेच्या अमानुष चेहऱ्याचं प्रतीक बनलं. तनुश्रीच्या रिपोर्टिंगमुळेच त्या रात्रीचा प्रश्न केवळ “काय घडलं?” इतकाच राहिला नाही, तर “राज्य व्यवस्था इतकी घाबरली कोणाला होती?” हा मोठा प्रश्न देशासमोर उभा राहिला.


तनुश्री पांडे यांचं पत्रकारितेकडे पाहण्याचं भानही या माहितीपटात प्रकर्षाने जाणवतं. त्या वारंवार सांगतात की, पत्रकारिता म्हणजे फक्त ‘दोन्ही बाजू’ दाखवणं नाही, तर सत्तेच्या केंद्रांमुळे दाबल्या गेलेल्या आवाजांना ऐकवण्याची जबाबदारी आहे. हाथरस प्रकरणानंतर त्यांना प्रचंड ट्रोलिंग, धमक्या आणि वैयक्तिक हल्ल्यांना सामोरं जावं लागलं; पण त्या अनुभवाने त्यांचा दृष्टिकोन अधिक तीव्र झाला. ग्रामीण भारतातील महिलांची भीती, दलित कुटुंबांची असुरक्षितता आणि समाजातील खोलवर रुजलेली पितृसत्ता, हे सगळं त्यांनी केवळ ‘स्टोरी’ म्हणून नाही, तर भारतीय लोकशाहीसमोर उभ्या असलेल्या प्रश्नांसारखं मांडलं. त्यामुळेच या माहितीपटात तनुश्री फक्त रिपोर्टिंग करताना दिसत नाहीत; त्या प्रेक्षकांनाही सतत अस्वस्थ करणारे प्रश्न विचारताना दिसतात.






Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...